30 November, 2008

नामसाधना - ६ (अंतिम)

नामसाधना - ६ (शेवटचा भाग)
आतापर्यंत नामस्मरण कसे, तसेच अति दक्षतेने करणे का आवश्यक आहे हा विचार झाला. पण नामस्मरण कशासाठी करायचे ? मोक्षप्राप्ती साठी, मुक्तिसाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी आनंदप्राप्तिसाठी वगैरे म्हणतात. पण मोक्ष, मुक्ति, परमेश्वर प्राप्ती, नित्य आनंद स्थिती म्हणजे नेमके काय ?
वेदांतात चार सूत्रे 'महावाक्ये' म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रज्ञानं ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, तत् त्वं असि, अहं ब्रह्मास्मि, ही ती चार वाक्ये होत. ब्रह्म हे सर्व दृष्य जगताचे अधिष्ठानरूप आहे, प्रत्येक चेतन व जड वस्तूमध्ये ब्रह्म ओतप्रोत भरलेले आहे म्हणून 'सर्वं खलु इदं ब्रह्म' असे म्हणतात. जड आणि चेतन असे वेगळे वेगळे काही नाहीच, सर्वज ऊर्जा आहे, प्रत्येक वस्तू एका ऊर्जेचाच आविष्कार आहे, तर सर्वं दृष्यं जगत् खलु इदं ऊर्जा एव असे म्हणायला हरकत नाही. पण तेच ब्रह्म प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात 'अंगुष्ठमात्रं तिष्ठति' असे म्हणतात. अर्थात् 'हृदयात अंगठ्या एवढ्या रूपाने राहतो' हे काल्पनिक आहे, physical नव्हे. त्याचा भावार्थ असा की तेथे तो साक्षीभावाने वास करतो. साक्षीभावाने म्हणजे ? म्हणजे या दृष्यमय जगताचे , या दृष्य ब्रह्माचे अदृष्य असणारे अधिष्ठान - the prime support. पण त्याला ब्रह्म म्हणत नाहीत. त्याला आत्मा म्हणतात. आता बाहेर जगत् रूपाने दिसते ते ब्रह्म आणि या दृष्य जगताचा, या ब्रह्माचा, हृदयात साक्षीरूपाने पाहणारा असतो तो आत्मा हे दोन्ही एकच आहे. पण बाहेरचे ते ब्रह्म आणि आंतला तो आत्मा, असे एकाच वस्तूला दोन नावांनी संबोधण्याचे convention आहे इतकेच. गोंधळ होतोय ना ? त्या ब्रह्माने जेव्हां 'एकोऽहं, बहुस्याम्' असा संकल्प केला [पहा ऐतरेय उपनिषद] तेव्हां आपल्या क्रीडेसाठी ८४ लक्ष योनी (शरीरे) निर्माण करून त्यात साक्षीरूपाने तो वास करता झाला. ह्या सर्व योनी म्हणजे जीव. हा जीव जेव्हां आपल्या शरीराशी तादात्म्य पावतो, तेथे अहंभावाने व्यवहार करतो तेव्हां त्याला आपल्या नित्य सत् चित् आनंद स्थितीचे विस्मरण होते आणि त्याची स्वस्वरूप जी ज्ञान स्थिती असते त्यावर अज्ञानाचे आवरण येते. त्याक्षणीच जीवाची संसार कहाणी आरंभ झाली. तो एकम् एव अद्वितीय असूनही आपल्या बुद्धीनेच, कल्पनेनेच आपले जगत् निर्माण करतो आणि आपल्या जगतात आपल्याहून भिन्न अशा अनेक वस्तू निर्माण करतो. आणि त्या वस्तूंपासून सुख मिळविण्याचा प्रयत्‍न करीत राहतो. [इथे म्हटले आहे की 'प्रत्येक जीव आपले एक जगत् निर्माण करतो’. पण माझ्या जगतातील कितीतरी गोष्टी इतर अनेक जीवांच्या जगतात, त्यांच्या ओळखीच्या असतात, हे कसे ? ह्याचे स्पष्टीकरण विस्तारभयास्तव अशक्य आहे. परत कधीतरी त्यावर चर्चा करता येईल. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी योगवासिष्ठ, निर्वाणप्रकरण (पूर्वार्ध), सर्ग ५२ पाहावा]. द्वैतात सुख नसल्यामुळे तो जीव कधीच सुखरूप होऊ शकत नाही. मग पुनरपि जननं पुनरपि मरणं करीत अनेक जन्मात दुःखच दुःख पावल्यामुळे एक दिवस असा उजाडतो की थकला भागलेला जीव चिरंतन आनंदाचा शोध घ्यायला लागतो. मी कोण चा शोध घेत घेत जेव्हां त्याने पसरलेले हे जगत् म्हणजेच इदं सर्वं अहं असा ठाम निश्चय होऊन त्याच्याशी जेव्हां एकरूप होतो, थोडक्यात आपल्या हृदि स्थित असलेल्या आत्म्याला ओळखतो तेव्हां त्याला त्याच्या मूळ स्वस्वरूप सत् चित् आनंदाची अनुभूति होते. पण हे 'ओळखतो' म्हणजे काय होते ? तो ओळखतो तेव्हां त्याची कोणती स्थिती असते ? तूर्त एवढेच समजायचे की आपण ज्याला जाग्रत् म्हणतो तीही जीवाची ज्ञानप्राप्ती पूर्वीची स्वप्न स्थिती आहे. ज्ञानप्राप्ती नंतरची स्थिती म्हणजे तुर्यावस्था. विस्तारभयास्तव ह्याचे स्पष्टीकरण येथे देणे अवघड आहे. ऐतरेय उपनिषदात ह्याचा उहापोह आहे. थोडक्यात आपण ज्याला जाग्रत् अवस्था समजतो त्या स्वप्नमय, आभासरूपी जगतातून बाहेर पडून खर्‍या अर्थाने जागे होणे म्हणजेच 'मी' ला ओळखणे. म्हणजे आपण सर्व झोपेत आहोत आणि स्वप्न बघतो आहोत असे आहे का ? होय, असेच आहे. म्हणून तर भगवंत गीतेच्या दुसर्‍या अध्यायात (२/६९) म्हणतात - या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ज्या आत्म्याच्या बाबतीत मनुष्ये निजलेली, म्हणजे अज्ञानी असतात, त्या बाबतीत स्थिरबुद्धि योगी जागरूक असतो, तसेच ज्या प्रपंच्याच्या बाबतीत मनुष्ये जागरूक असतात, त्या बाबतीत योगी निजलेला, म्हणजे त्यापासून निवृत्त असतो. म्हणूनच श्री शंकराचार्य याला 'मिथ्या जगत्' म्हणतात.
आपल्या अंतरंगात जो आत्मा आहे तो मीच. गुरू आपल्याला 'तत् त्वं असि', म्हणजे तो जो आत्मा तो तूच आहेस असे सांगतात. त्याची अनुभूति आल्यावर जीव म्हणतो ओ हो, आता समजले. मग तो म्हणतो 'अहं ब्रह्मास्मि' , तो मीच आहे. 'तो मीच होय' अशी अनुभूति म्हणजेच मोक्ष, मुक्ति, परमात्मप्राप्ति, आनंदप्राप्ति वगैरे वगैरे. म्हणजे 'तो आत्मा मी आहे' ही वेदांताची central theme आहे असे म्हणायला हरकत नाही. मग कोणतीही साधना असो, 'मी' चा शोध, परमेश्वर प्राप्ति, मुक्ति, मोक्ष ह्या सर्वांचे मर्म 'तो मीच होय' असे जाणणे, उमजणे आहे. परमार्थात जर हे ध्रुपद बाजूला सारले तर बाकी काहीच शिल्लक राहात नाही. ह्याव्यतिरिक्त परमार्थ संबंधी जे काही आपण करू ती नुसतीच बौद्धिक कसरतच म्हणावी लागेल. साधनेचे पर्यवसन, मग तो ॐ, तो राम, तो परमात्मा दुसरा तिसरा कोणी नसून ’मीच तो' अशा प्रकारे होईपर्यंत साधना करणे, नाम घेणे नितांत आवश्यक आहे. आणि नुसतेच नाम घेत राहणेही पुरेसे नाही. त्यालाही साधन चतुष्टयाची जोड देखील नितांत आवश्यक आहे. आणि त्याकरिता साधनेत quantity तर पाहिजेच पण ती ज्या quality ने युक्त असेल त्या प्रमाणात गति लाभेल असे मला वाटते. मित्रांनो, आतापर्यंतच्या माझ्या लिखाणावरून वाटेल की, श्रीमहाराजांनी अगदी सोपे म्हणून जे सांगितले ते मी इतके क्लिष्ट, इतके भयावह करून का सांगतो आहे ? पण मला वाटत नाही की श्रीमहाराजांनी खरोखरच सांगितले की 'ते खरंच फार फार सोपे आहे' आपण जर सर्वच प्रवचनांचा आढावा घेऊन त्यावर चिंतन केले तर आढळेल की प्रपंच निवृत्ति आणि परमार्थ प्रवृत्ति जागी करण्याची गोडी लागावी ह्यासाठीच महाराजांनी सर्व खटाटोप केलाय. आणि एकदा का गोडी लागली, एकदा का मनुष्य मार्गी लागला तर मग कष्ट हे कष्ट राहात नाहीत. मनाच्या या स्वभावाबद्दल श्रीज्ञानेश्वरांच्या दोन छान ओव्या आहेत -
परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥ ६/४१९ ॥
कां जें यया मनाचें एक निकें ।जें देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥ ६/४२० ॥
आणि परमार्थ खरंच जर सोपा असता तर श्रीतुकारामांना - परमार्थ नोहे लेकुरांच्या गोष्टी - असे म्हणण्याची काय आवश्यकता होती ?
समाप्तः
एकोहम् 

27 November, 2008

दैव आणि पुरुषार्थ -

दैव आणि पुरुषार्थ -
दैव हा शब्द सहसा negative अर्थाने वापरला जातो. एकाच तत्त्वाची ही एक बाजू. त्याची जी दुसरी बाजू आहे त्याला लोक भाग्य म्हणतात. दैव वा भाग्य हे दोन्ही आपल्या गतकर्मानुसार मिळतात. पण जेव्हां अनिष्ट गोष्टी घडतात तेव्हां आपण त्या घटनेला " माझे दैवच खोटे " म्हणून दैवावर खापर फोडतो. जेव्हां अनुकूल गोष्टी घडतात, तेव्हां म्हणतो, "किती थोर भाग्य माझे, मागच्या जन्मी मी पुण्यकर्मे केली त्याचे हे फळ". म्हणजे आता जे माझ्या भाग्याला आले आहे ते माझ्या गतकालीन् सत्कर्मामुळे आणि आत्ता जे मला भोगावे लागते आहे ते ’त्याची' वक्रदृष्टी यामुळे. माणूस आपल्या संचितातल्या दुष्कर्मांना आपण जबाबदार आहोत हे कबूल करायलाच तयार नसतो.
वाल्मीकि रामायणात जेव्हां कैकयी आपला डाव टाकते तेव्हां श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, " या सगळ्याला दैवच कारणीभूत म्हटलं पाहिजे. माझ्या मतानं कैकेयीचे हे विपरीत मनोरथ दैवाचंच विधान आहे. जर तसः नसतं तर तिनें मला वनवासात पाठवून पीडा देण्याचा विचार का केला असता ? तू तर जाणतोसच की, माझ्या मनात आधी कधी मातांच्यात भेदभावा आला नाही आणि कैकेयीही कधीच माझ्यात व स्वतःच्या पुत्रात फरक करीत नव्हती. माझा अभिषेक थांबविण्यासाठी व वनवासात पाठविण्यासाठी महाराजांना प्रेरीत करण्यासाठी तिनं ज्या भयंकर कटू वचनांचा प्रयोग केला, तो सामान्य मनुष्याच्या तोंडून निघणं कठीणच. तेव्हा असा प्रयत्‍न दैवामुळंच समर्थनीय ठरतो. जर असं नसतं तर त्या उत्तम स्वभावाच्या व श्रेष्ठ गुणयुक्त राजकुमारी कैकेयीनं एका साधारण स्त्रीप्रमाणे आपल्या पतीसमोर मला पीडा देणारी गोष्ट काढली असती का ? ज्या विषयी कधी विचारही झाला नाही तेच दैवाचं विधान आहे. प्राण्यांमध्ये अथवा देवांमध्येसुद्धा कोणीच असं नाही की जे दैवाधीन नाही, तेव्हा नक्कीच दैवानंच हे फेरफार माझ्यात व कैकेयीत घडवून आणले आहेत." [वालिमीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग २२, श्लोक १४-२०] श्रीरामांनी लक्ष्मणाला हे सांगितलं खरं [तो बिचारा शेषाचा अवतार, म्हणजे विष्णूचा सेवकच. Yes Sir म्हणून गप्प बसला. ’ह्या अवताराआधी तू काय काय क्लुप्त्या केल्यास मला ठाऊक नाहीत का ' असे नाही म्हणाला] पण रामावतारापूर्वी श्रीविष्णूने तीन चार अशी कर्मे केली होती की त्याला निरनिराळ्या आर्य स्त्रियांनी "तुलाही पत्‍नी विरह भोगावा लागेल" असा शाप दिला होता. पुराणांतून या कथा आलेल्या आहेत. ही झाली त्याच्या दैवाची पूर्व कहाणी. त्याबद्दल श्रीराम काही बोलले नाहीत.
महाभारतात भारत युद्धानंतर धृतराष्ट्राचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले. सर्वनाश होण्यास मुख्य कारणीभूत कोण होता तर धृतराष्ट्र्; याबद्दल कोणाचे दुमत असेल असे मला वाटत नाही. तरीही तो संजयाला सांगतोय -
न मे विशेष पुत्रेषु स्वेषु पाण्डुसुतेषु वा ।
वृद्धं मां अनुसूयन्ति पुत्रा मन्युपरायणाः ।
अहं तु अचक्षुः कार्पण्यात् पुत्रप्रीत्या सहामि तत् ॥
- मी कधी माझ्या व पाण्डुपुत्रात भेद केला नाही. पण काय करावे, माझे पुत्र क्रोधाला वशीभूत होत मलाच दोष देऊन माझी कधीही कोणतीही गोष्ट ऐकत नसत. मी अंध आणि दीन आहे ना ? म्हणून मी हा सर्व (दोषारोपाचा) अन्याय सहन करीत आलो आहे. पुढे तो संजयाला कमीत कमी ६५ अशा घटना सांगतो की त्या जसजशा घडत गेल्या त्या प्रत्येक समयी त्याने विजयाची आशाच सोडली होती. संजय देखील मुकाट्याने ऐकून घेतो असे नव्हे. श्रीव्यासांच्या विशेष मर्जितला शिष्य तो. आपण जसे घरात बसून टीव्ही बघतो तसे त्याला बसल्या जागी सर्व युद्ध पाहण्याचीच काय पण एवढ्या अफाट सैन्यात कोण कोण कसल्या चर्चा करत आहेत हे सुद्धा स्पष्ट ऐकता येईल अशी दिव्य दृष्टी दिली होती. तो निर्भय होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला " तू पुत्रांविषयी शोक करणे तर मुळीच उचित नाही. " त्याने पुढे दिव्य कर्म, पराक्रम, त्याग, सत्य, पवित्रता, दया, आर्जव इत्यादि सद्‍गुणांनी संपन्‍न अशा कमीत कमी ७८ महान् राजांची यादी सुनावली (श्रीराम हे त्यापैकी एक. लिखित इतिहासाअभावी आपण कितीतरी महान् महान् आदर्श व्यक्तिंच्या चरित्रांना मुकलो नाही का ? ]. हे सर्व बुद्धिमान शक्तिशाली महान् राजे देखील कालगतीमध्ये नष्ट झाले तेथे तुझ्या दुःस्वभावी, क्रोधी, लोभी आणि दुराचारी पुत्रांची काय कथा ? ते तर शोक करण्यास मुळीच पात्र नाहीत. तरीपण पुढे सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणतो - "दैवगति कोण टाळू शकतो. सुख-दुःख, जन्म-मृत्यु या सर्वांचे कारण काळ अहे. काळच सृष्टी निर्माण करतो आणि त्याचे विसर्जनही करतो. सर्व शुभ-अशुभ गोष्टींचा कर्ता काळ आहे. काळाच्या गतिचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. तेव्हां - तान् कालनिर्मिता बुद्ध्वा न संज्ञां हातुमर्हसि - ही सर्व काळाची करणी आहे हे जाणून आपला विवेक सोडू नकोस.
शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे. कारण विवेकाने सांप्रत कर्मे करणे हे पुढील कर्मफळाचे बीज आहे हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या जीवनातील सर्वच इष्ट-अनिष्ट घटनांशी आपल्या गतजन्मीचीच कर्मे कारणीभूत असतात असे नव्हे. या जन्मीच्या गत आयुष्यातील कमी अधीक प्रमाणातील प्रयत्‍न चालू परिस्थितीला कारणीभूत असू शकतात. उदा. शिक्षण घेत असताना अभ्यास कमी पडला तर यश त्याच लायकीचे असणार आणि त्यामुळे लाभणारी नोकरी धंदा यावर त्याचा परिणाम होणारच. हे एक उदाहरण झाले. याचा अर्थ शिक्षण न घेतलेले यशस्वी होत नाहीत आणि उत्तम शिक्षण घेतलेले बेरोजगार नसतात असे नव्हे. प्रयत्‍न कमी पडतो तेव्हां असेही होऊ शकते, एवढेच मला म्हणावयाचे आहे. सारांश सांप्रत काळातील आपल्या वाट्याला आलेले दैव वा भाग्य हे गतकर्मातील, गतआयुष्यातील कर्मगतिचे फळ आहे हे निश्चित. मग पौरुषाचा अर्थ काय ? आपल्याला पुढे कशा प्रकारचे आयुष्य वा जन्म अपेक्षित आहेत त्या ध्येयपूर्तीसाठी आत्ता काय करायला हवे याबद्दल जागरूक राहून विवेकाने चालू क्षण उत्तम कर्म करीत जगणे म्हणजे पुरुषार्थ.
अनिष्ट परिस्थितीत हतबल होऊन दैव दैव करत न बसता; तसेच इष्ट परिस्थितीत उन्मत्त न होता, वा खुशालचेंडू बनून ’मला हे करण्याची काय गरज' असे न म्हणता; आपण जे काही करतो आहोत ते सर्व शक्तिनिशी उत्तम प्रकारे करणे म्हणजे पुरुषार्थ.
आपण जे जे काही ज्या कशा प्रकारे करू ते ते सर्व भावी दैव वा भाग्याचे बीज आहे हे सदा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. यासंबंधी मागे मी एके ठिकाणी काय म्हटले होते ते repeat करणे उपयुक्त ठरेल - पुरुषार्थ = whatever is my past, changing my future is in my hands. This requires lot of guts, belief in one's self, दृढ विश्वास, सामर्थ्य, चिकाटी, अविरत प्रयत्‍नांची पराकाष्ठा and all that. And all this is not easy. कोणत्याही कष्टमय तपाचरणात सातत्य राहणे हे सामान्यचे काम नव्हे Only firmly determined pursue पुरुषार्थ. Hence I guess 98 to 99.5% fall under 1st category. म्हणून तर गीतेत भगवान् म्हणतात - मनुष्याणां सहस्रेषु कस्चित यतति सिद्धये - इथे सहस्रेषु म्हणजे अगणित आणि सिद्धये म्हणजे आपल्या ध्येयपूर्तिसाठी- कोणी एकादाच विरळा सिद्धिसाठी प्रयत्नशील असतो.

26 November, 2008

'' तो '' कृपा करतोच, पण...

'' तो '' कृपा करतोच, पण...
परवा एका मित्राला म्हटले, 'चल सज्जनगडावर जाऊ, तिथून गोंदवलेस जाऊन मुक्काम करू आणि उद्या प्रसाद घेऊन संध्याकाळपर्यंत परत येऊ.' माझ्यापेक्षा लहान तो. तरी म्हणाला, 'अरे आता कुठे गड चढायला सांगतोस. हे आपलं वय आहे का गड चढायचं'. म्हटलं, वाटतं तितकं कठीण नाही. थोड्याशा आग्रहानंतर जायचे ठरले. एस् टी जाते तिथपर्यंत गाडीने गेलो. मग थोडीशी चढण आणि अवघ्या ५० पायर्‍या. एकून २० मिनिटात चढून झाले. आल्यावर हिची धाकटी बहिण तिला विचारते, "वर चढून गेलीस ? कसं काय ?" बरेच लोक, विशेषतः VRS किंवा निवृत्तिनंतर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी करण्यास देखील निरुत्साही जाणवतात. अनुभवानंद स्वामी एका प्रवचनात म्हणत होते, "रिटायर् होने के बाद खाली मत बैठो. कंप्युटर सिखो, रशियन् सिखो, चाय बनाना सिखो, कुछ भी करो लेकीन व्यस्त रहो." अध्यात्मची, परमार्थाची गोडी लागली नाही अशांची गोष्ट सोडा पण परमार्थाची वाटचाल करणार्‍याने 'ह्या वयात आता हे शिकायचे कसे जमणार' , 'आता उमेद राहिली नाही हो' , ’ मी असलं काही करू शकेन असा माझा मलाच विश्वास वाटत नाही' वगैरे शब्द वापरले तर मला कसेसेच वाटते. वय झाल्यास हात पाय ढिले होतील, किंवा काही व्याधी असेल तर गीर्यारोहण सारखे शारिरीक क्षमता लागणारे काम करता येणार नाही हे कबूल. तरीही मला वाटते उमेदीचा संबंध मनाशी आहे. ज्या गोष्टीत शारिरीक कष्ट विशेष नाहीत त्या अवघड कशा ? मन थकले तर ? तर गीर्यारोहणाची शक्यता काय आशाच नाही असे होईल. पण आपण ठरविल्याशिवाय मन कधी थकत असते का ? तिरुपतीला जाताना ८०+ चे वयस्क १५ किलोमिटर पायी चढण माझ्याबरोबर चढत असलेले मी अनेकदा पाहिलेले आहेत. त्यांचे ते कृश आणि थकलेले शरीर पाहून मलाच कसेतरी वाटायचे. शंभर मिटर जाऊन बसतात आणि २-३ मिनिटात 'गोविंदा गोऽऽऽविंदा' अशी आरोळी ठोकून परत चढायला सुरू करतात. वैष्णवी देवीला जाताना देखील १३-१४ कि. मी. चढण आहे. एक अगदी म्हाताऽऽरी बाई थकून बसली होती. चार पोरे जाता जाता ओरडली, "नानी बोले जय मातादी, जोर लगाके जय मातादी". आणि नानी उठून तरातरा चढायला लागली. २०० मीटर जाऊन बसली परत. पण, परत कोणीतरी दुसरा डोस देई आणि परत चढणे चालू. उमेद मनात असते.
मुळात 'मी' काही करतो/करते ही भावनाच हळू हळू बाजूला करायचा प्रयत्‍न हवा. याचा अर्थ 'सर्व काही तो करतो, आपण काय करू शकतो. आपल्या हातात काही आहे का ?' असे म्हणत निवांत बसणे हेही योग्य नाही. कर्ता करविता "तो" आहे हे खरे पण I am a partner in His creation for which he lends me His helping hand हे देखील तितकेच खरे. बाळ चालते ते स्वप्रयत्‍नाने. आईबाप त्याच्या त्या प्रयत्‍नानंतरच त्याचे बोट धरतात आणि मदत करतात. पण बाळाने नुसतेच बसून राहून 'त्याने चालविल्या मी चालेन' असे म्हटले तर ते कधीच चालणार नाही. आधी बाळाने उढून उभे राहायचा प्रयत्‍न दिसला तर आईबापांची पुढची क्रिया संभवते. त्याअभावी आईबापांनी त्याचे बकोटे धरून त्याला उभे केले असे कधी पाहिलेत काय ? बाळाला जसे आईबाप तसे जीवाला गुरू आणि भगवंत. साधकाला गुरू/भगवंत भेटतात किंवा गुरू/भगवंत त्याला शोधत येतात ते साधकाच्या प्रयत्‍नामुळे. काही न करता " तो माझ्यावर केव्हां कृपा करील " अशी वाट बघणे व्यर्थ आहे. गुरू देखील मार्गदर्शन करताना, 'सर्व काही कर, पण त्याला नामाची (म्हणजेच अकर्तेपणाची) जोड दे. आपणही पाहतो एकेका गुरूचे कितीतरी शिष्य असतात. पण गुरूची मर्जी काही विशेष शिष्यांवरच असते. [मी फक्त सच्चे गुरू आणि सच्चे शिष्यांच्या बाबतीतच बोलतोय] बाकीच्या शिष्यावरही त्यांचे प्रेम असते, मार्गदर्शन करतात; पण त्यांची गति त्यांच्या स्वसाधनेवर अवलंबून असते. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात भगवंत म्हणतात, "अरे ह्यांना तूच मारणार आहेस असे तुला वाटते आहे काय ? पुढे म्हणतात - तूं भ्रमलेपणे अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगे काय हे होती । चिरंतन ॥ - तूं यांना मारले नाहीस तर हे चिरंजीवी होणार आहेत असे तुला वाटते काय ? यांच्यापैकी कोण केव्हां कसे मरणार हे मी ठरविले आहे. तरीपण तू तुझ्या वाटेस आलेले कर्तव्य कर्म - म्हणजे युद्ध - कर. भारत युद्धाच्याही आधी अर्जुन पराक्रम करीतच होता, स्वपयत्‍न करीतच होता, आणि भगवंताला आवडणार्‍या गुणांचीही त्याने जोपासना केली होती. म्हणून तर भगवंताने त्याची निवड केली, ते काम त्याला सोपविले आणि कीर्तिने तो अमर झाला.
काहीही करायचे झाल्यास शारिरीक क्षमतेची जाणीव असावी हे योग्यच. पण जिथे त्याची विशेष जरूरी नाही अशा गोष्टी निरुत्साहाने टाळणे म्हणजे एका नव्या अनुभवाला आणि पर्यायाने आनंदाला मुकावे लागणार हे निश्चित.
कृपया कोणी उपदेश करतोय असे समजून घेऊ नये. पण या कलाने विचार केल्यास मनातील जळमटे नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल असे मला वाटते.

24 November, 2008

नामसाधना - ५

नामसाधना - ५
नाम घेण्याच्या पद्धतीमध्ये जर qualitative change असेल तर काही फरक पडतो का ? का काहीच फरक पडत नाही, हे तपासणे आवश्यक आहे. श्रीमहाराजांच्या २९ ऑक्टो. च्या प्रवचनाचे शीर्षक आहे 'भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे'. त्यात म्हटले आहे, 'मनाने नेहमी शुद्ध असावे'. कशासाठी निर्दोष असावे, कशासाठी शुद्ध असावे ? आपण जेव्हां नाम घेतो तेव्हां ते नाम घेत असताना आपल्या मनात वा at subconscious level वर काय चालले आहे, आपला भाव कशा प्रकारचा आहे ह्याच्याशी नाम घेणे या क्रियेचा काहीतरी संबंध आहे का ? नामाची वा ॐ ची आवर्तने भस्मासुरानेही केली रावणानेही केली आणि प्रल्हादानेही केली. भस्मासुराने आणि रावणाने लगेच पार्वतीमाई आणि सीतादेवी ह्यांनाच भोगायची इच्छा झाली. पण प्रल्हादाला भगवंताची स्तुतिच करावी वाटली. मग तिघेही भक्त प्रल्हाद का झाले नाहीत ? प्रल्हाद वा ध्रुवबाळ यांना दर्शन होण्यास किती काळ लागला ? आणि वाल्या कोळी वाल्मीकि ऋषि व्हायला किती काळ लागला ? तो तर दुष्टच माणूस होता. मग त्याचे चित्त शुद्ध व्हायला बराच बराच काळ लागला असणार हे उघड आहे, नाही का ? कारण - वाल्याची आधीची लुटालुट करण्याची वासना घालवून त्या जागी नविन शुद्ध वासनांची स्थापना करणे - हे करावे लागले; आणि असे घडायलाच नेमका जास्त काळ लागतो. कारण वासना चक्रातून बाहेर पडून दुसरे काही करायला माणूस सहसा कधीच तयार नसतो. Resistance to change ही इतकी बलवान असते की resistance overcome करायला त्याच मनाच्या दुसर्‍या शक्तीचा प्रचंड वापर करावा लागतो. ह्याचा अर्थ तप करतेवेळी भस्मासुर व रावण ह्यांच्या मनांत सत्तेची, त्याच्या जोरावर भौतिक जगतातले काय वाटेल ते साध्य करून घेण्याची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. म्हणजे नामाच्या आवर्तना बरोबरच अशा सुप्त संकल्पांची/विचारांची [subconscious मध्ये] आवर्तने होत असलीच पाहिजेत आणि पुढे ते विचार बळकट होऊन त्याला कृती करण्याची शक्ति प्राप्त होतेच. रामदासांचे शिष्य हेरंबशास्त्री आफळे ह्यांची गोष्ट पहा. आफळेंचा एक कोटी गायत्री जप झाल्यावर त्यांना वाचासिद्धी झाली होती. पण चित्त वृत्ति शुद्ध नसल्यामुळे उन्मत्तपणा आला होता. आणि त्यांची जेव्हां स्वामींशी गाठ पडली तेव्हां काय झाले ? भलत्या ठिकाणी सिद्धीचा वापर केल्यामुळे वाचासिद्धी गेली. सर्व तप फुकटच गेले ना ? अर्थात् कृत्याचा पश्चात्ताप झाल्यावर करुणामय स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली हा भाग वेगळा. पण केव्हां ? पश्चात्ताप होऊन उन्मत्तपणा गेल्यावरच ना ? म्हणजे मन शुद्ध झालावरच ना ? तेच शुद्ध विचारांबरोबर गायत्रीची साधना झाली असती तर ती विशेषरूपे फलद्रूप झाली असती आणि पुढील तपाचरणात द्विगुणित झाली असती. पुराणाचे/इतिहासाचे जाऊ द्या. सद्यकाळीही काही अशी उदाहरणे दिसतात की कधी कधी १३ कोटी जप केलेल्या व्यक्तिपेक्षा तीन साडेतीन कोटी जप केलेल्या मनुष्यात संतपणाची लक्षणे जास्त आढळतात. पहिल्या व्यक्तिपेक्षा दुसर्‍या व्यक्तीची संगत जास्त हवी हवीशी वाटते. असे का ? आपणच विचार कारावा आणि आपणच उत्तर शोधावे.
मी जेव्हां पाण्यात प्रतिबिंब पाहायला जातो तेव्हा ते प्रतिबिंब पाणी किती स्थिर आहे वा स्वच्छ आहे ह्यावर अवलंबून असते. जर चंचलतेमुळे पाण्यात सतत तरंग असतील वा ते अतिशय गढूळ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसणार नाही. कदाचित् माझी छबी तिथे उमटणारच नाही. आणि जेव्हा उमटेल तेव्हांच कळेल की हे माझेच प्रतिबिंब आहे. आणि ते माझेच असल्यामुळे मला त्या बिंबाबद्दल आत्मीयता वाटते. जीव वा जीवात्मा परमेश्वराचे अंशात्मक प्रतिबिंब आहे असे शास्त्र म्हणते. पण हे प्रतिबिंब जेव्हां अहंकार धारण करते तेव्हां 'मी' म्हणजे मूळ बिंबाहून भिन्न अशी कल्पना करून घेते आणि त्याचा संसार, जन्म-मरण फेरे सुरू होतात. मी ह्या जगत् रूपी पाण्याशी, त्यातील विषय, त्या विषयांबद्दलची तृष्णा, तृष्णा शमविण्यासाठी वेळोवेळी करावी लागणारी अधार्मिक वा अनैतिक कर्मे; ह्या सर्वांशी मी इतका समरस झालो आहे, मग हे पाणी तर सोडाच मी स्वतःदेखील इतका गढूळ झालो आहे की, परमेश्वर मला - ह्या विशिष्ट जीवाला - पाहूच शकत नाही. पण मी, माझे विचार, माझे आचरण, माझ्या मनातून व्यक्त होणारे भाव - एकूण माझे चित्त व माझ्या वृत्ति - हे सर्व प्रयत्‍नपूर्वक मी शुद्ध करू शकतो का ? आणि शुद्ध करू शकलो तर माझे अशांत, अशुद्ध प्रतिबिंब परमेश्वराला नीट दिसायला, त्याला माझ्याबद्दल आत्मीयता वाटायला लावू शकेल का ? आणि मी माझ्या कोणत्याही बाबतीत यत्किंचितही बदल घडवून न आणता, परमेश्वरा धाव, परमेश्वरा धाव मला ह्या संसार सागरातून सोडव, असे म्हणत राहिलो तर ? No way. आधी असलेला विषयांच्या वासनेचा पगडा सुटून त्याजागी शुद्ध वासनेची स्थापना झाली तरच शक्य. मग तेरा कोटी काय आणि पंधरा कोटी काय. They remain only numbers. वाल्याने जितके कोटी केले तेवढे कोटी करावे लागणार का ? हो. resistance to change वर मात करे पर्यंत. वासना शुद्ध होईपर्यंत - अगदी subconscious level मधल्यादेखील, ज्याची आपल्याला सुतराम देखील कल्पना नसते. कारण नामाची जितकी आवर्तने त्याबरोबरच आपल्याला हव्या असलेल्या, प्रकट वा अप्रकट विचारांची आवर्तने असे गणित स्पष्ट दिसायला लागले आहे नाही का ?
एकोहम् 

23 November, 2008

नामसाधना - ४

नामसाधना - ४
मागे आपण पाहिले की - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action - हे कसे काय होते ?
आपण जेव्हां विचार करतो तेव्हां आपल्या अंतरंगात विचार तरंग निर्माण होतात. ज्या प्रकारची आपली विचार स्पंदने असतात त्याप्रकारची एक frequency निर्माण होते. आपल्याला वाटते की आपले विचार, विचार तरंग आपल्यापुरतेच मर्यादित असतात. पण तसे होत नाही. आपले विचार तरंग वातावरणात, आपल्या अवतीभवती असलेल्या space मध्ये पसरतात. मग एक महत्त्वाची क्रिया घडते आणि ती म्हणजे ज्या frequency चे आपले विचार आहेत ते त्याच frequency चे विचार शोधतात आणि त्या विचारांना उत्तेजित करतात. आपले विचार जर आनंदाचे असतील तर आनंदाची frequency घेऊन हा विचार बाहेर जातो आणि आपल्या आजूबाजूला आनंदाची frequency जागृत करतो, वातावरणात आनंदाच्या frequency जागृत करतो, इतर व्यक्तिंच्यात देखील आनंदाच्याच frequency जागृत करतो. ह्या कृतीला resonance म्हणतात. पण ह्या resonance प्रमाणे आसपासच्या इतर व्यक्ति लगेच आनंदित होतात काय ? तसे तर आपल्याला कधी दिसत नाही. कारण दोन frequencies जेव्हां जुळतात - match होतात - तेव्हांच resonance तयार होतो हा नियम आहे. मग आपल्या आनंदाच्या frequency चे होते काय ? त्याचे पडसाद जाणवत का नाहीत. ह्याचे कारण म्हणजे हा परिणाम अति सूक्ष्म स्तरावर असतो. एका मोठ्या पाण्याच्या पिंपात मिठाचा एक खडा टाकावा तसे. अर्थात् आनंदाच्या frequency बाहेर पडल्यास जशा आनंदाच्या ऊर्मी पसरतात तशाच दुःखाच्या, क्रोधाच्या, भितीच्या विचारांच्याही frequencies बाहेर पसरतात. आनंदाचे तरंग हे लांब पल्ल्याचे म्हणजे higher frequencies असतात, आणि मोह, लोभ, मद, मत्सर ह्यांच्या कमी अधिक प्रमाणात पण आनंदाच्या frequencies च्या तुलनेत कमी दाबाच्या, म्हणजे lower frequencies असतात. आता आपल्या सुदैवाने म्हणा ह्या system मध्ये एक नियम आहे. Higher frequencies can affect lower frequencies but not viceversa. म्हणजे आपल्या जवळील व्यक्ति दुःखात असली आणि त्याच्या दुःखाची level जर पाण्याच्या पिंपाएवढी नसून जर एका कपाएवढी असेल तर कदाचित काही वेळाने त्याचे दुःख जवळील आनंदाच्या frequency ने निवळेल. ह्याच नियमानुसार तुम्ही जर आनंदात असाल आणि जवळची व्यक्ति कोणत्यातरी विचाराने (भूतकाळातील अप्रिय घटना वा भविष्यातील चिंता) उद्विग्न वा शोकावस्थेत असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणजे त्याच्या विचारांची lower frequency आपल्या विचारांच्या higher frequency वर परिणाम करून शकत नाही. तसेच पवित्र ठिकाणी, देवळात, मठात तेथील वातावरणामुळे बहुधा प्रसन्न होण्यास अनुकूल अशा frequencies असतात, कारण बहुतेक मंडळी त्याच प्रकारचे विचार घेऊन तेथे वावरत असतात. [मंडळी तुमचा अनुभव काय आहे ? हां पण जवळील व्यक्तिवर बेतलेली दुःखद घटना, आणि दुःखद विचारामुळे तो शोकाकुल झाला आहे का ? ह्या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण तपासतो आहोत ते विचारांच्या frequencies चे परिणाम; घटनांचे परिणाम नव्हे; हे लक्षात ठेवून आपल्या अनुभवाचे निरीक्षण करावे]
आपण पाहिले की विचारांचे तरंग बाहेर पडतात आणि तत्सम तरंगांशी ते एकरूप होऊन तशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात, आणि त्यानुसार वातावरणावर परिणाम होतो. ह्याच न्यायाने वातावरणातील frequencies ना आपणही आकर्षित करून घेत असतो. आपण जरा खिन्न झालो (lower frequency) की खिन्न प्रकारचे तरंग आपल्यावर परिणाम करायला टपून बसलेलेच आहेत म्हणा. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीच्याच गोष्टी आपण आपल्याकडे आकर्षित करीत असतो. म्हणजे आपण जर नेहमी सकारात्मक विचार करीत असलो तर वातावरणातील सकारात्मक विचारच आपण आकर्षित करून घेऊ. तसेच failure, disease, finance, low self esteem, I can never do that, inferiority complex इत्यादि संबंधीचे नकारात्मक विचार घेऊन वावरत असू तर, तर त्याचे परिणाम आपण सर्वत्र पाहतोच आहोत. - म्हणून ही frequency, resonance प्रणाली लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सुमारे दहा वर्षापूर्वी मी ' रेकी ' चा अभ्यास करीत असताना मला quantum or string theory बद्दल काहीच कल्पना नव्हती. पण रेकीचा अभ्यास करताना मला एवढे समजले की आपल्या शरीरातील मध्य बिंदुपासून शरीराबाहेर सुमारे एक ते दीड फूट एवढे एक सूक्ष्म शरीर असते, त्याला etheric body म्हणतात; ज्याच्यावर आपले स्थूल शरीर आधारलेले आहे. [भाषांतर अवघड होत असल्या कारणाने मी एक परिच्छेदच उद्धृत करतो -
Penetrating the physical body is a more subtle body, vibrating at a higher frequency. This second body has come to be known as the etheric body. The etheric body contains an energy blueprint upon which the physical body is shaped and anchored. It contains the structures that allow us to absorb high-frequency energy of various kinds including the vital force (prana). It processes them and passes them into the physical. These etheric structures were seen by Indian seers (rishis) who called hem as Chakras].
ह्या सर्व गोष्टींचा 'नामस्मरणा'शी संबंध काय ? माझ्या मते आहे. मनात, बुद्धीत उत्पन्न होणार्‍या विचारांबद्दल जागरून राहून शुद्ध विचार पृष्ठभागी ठेवणे, त्याद्वारे मलीन वासनांचे शुद्धीकरण करणे, मलीन वासनांचे निर्दाळण करून चित्त व वृत्तिंची प्रचंड धाव, उधळण आटोक्यात आणणे आणि सरतेशेवटी मन प्रसन्न, शांत, तृप्त, उत्साही, निष्काम व आनंदी राहणे ह्या सर्वांचा आपल्या विचारांच्या qualitative परिणामाशी संबंध आहे असे मला वाटते. पाहू पुढे पटण्यासारखे आहे का ?
क्रमशः

22 November, 2008

नामसाधना - ३

नामसाधना - ३
मागच्या भागात आपण 'मनाची शक्ति' कशी काम करते हे पाहण्यासाठी अणुपासून सुरुवात केली. आपण पाहिले की नविन संशोधनानुसार आता हे स्पष्ट झाले आहे की ह्या विश्वात जे काही दृष्य वा अदृष्य आहे ते सर्व ऊर्जेचा अविष्कार आहे. ऊर्जा, स्पंदने, स्पंदनांचे 'resonance theory' नुसार वस्तूंचे एकमेकावर होणारे परिणाम हे पुढे आपण तपासूच. पण त्याआधी 'मन' म्हणजे काय आणि त्याची शक्ति म्हणजे काय ह्याचा एक आढावा घेऊ. 'मन' म्हणजे काय याची सर्वमान्य अशी नेमकी व्याख्या केलेली आढळत नाही. [निदान मला तरी तशी आढळली नाही]. विचारवंतांमध्ये याबद्दल बरेच मतभेद आहेत. पण मन म्हणजे विचारांची एक सरिता (नदी) असे बरेच विचारवंत मान्य करतात. जोपर्यंत विचारांची मालिका चालू आहे तोंवर मन आहे ह्याबद्दल शंकाच नसते. पण आपण जर काही क्षण विचार थांबवू शकलो तर जाणवते की मन गायब झाले आहे. अर्थात् विचाराव्यतिरिक्त 'भावना' हा देखील त्यातला एक घटक आहेच. पण भावनादेखील विचाराने प्रभावित होऊ शकते. तेव्हां आता विचार (thought) याबद्दल विचारबंत, संशोधक काय म्हणतात हे पाहू. अर्थात् काही उदाहरणेच. कारण विचार या विषयाबद्दल जगभर इतके संशोधन, लिखाण झाले आहे की कोणा एका माणसाला एका आयुष्यात ते सर्व तपासणे शक्य नाही. आता मनाची शक्ति म्हणजे विचारामुळे उत्पन्न होणारी, विचारामुळे प्रभाव पाडणारी शक्ति हे ओघाने आलेच. तेव्हां आपल्याला जे पाहायचे आहे ते मुख्यतः विचारांचा प्रभाव.
विसाव्या शतकाच्या सुरुवातील फ्रान्समध्ये एमिली कोये नावाचा एक डॉक्टर होऊन गेला. खरा तर तो रसायनशास्त्रज्ञ. पुढे त्याने संमोहनविद्येचा अभ्यास करून काही प्रयोग केले आणि आपली एक प्रणाली बनवली. १९१० मध्ये त्याने एक दवाखाना उघडला जिथे कोणात्याही रुग्णावर मोफत उपचार केले जात. खरे तर तो काहीच उपचार करत नव्हता. कारण त्याची थेरपी होती स्वयंसूचना - autosuggestion. त्याने अक्षरशः हजारो रुग्ण बरे केले. त्यात rheumatism. asthma, severe headaches, paralysis of a limb, fibrous tumors, ulcers and amazing variety of afflictions - ह्या सर्वांवर उपाय होते. उपाय म्हणजे त्याने कोणालाही कसलेही उपचार करून बरे केले नाही. त्याने सर्व रुग्णांना आपण स्वतः स्वतःलाच कसे बरे करावे हे शिकविले. त्याने त्या सर्व रुग्णांना स्वसूचना देण्यास शिकविले. अर्थात ह्या सर्व सूचना म्हणजे सकारात्मक, आपण बरे झालो आहोत अशा प्रकारच्या सूचना. डॉ. कोयेने स्वतः कसलाही उपचार न करता त्याच्या स्वसूचना प्रणालीने हजारो रुग्ण बरे झाले. आणि हे सर्व एक सुरेख रंगविलेले चित्र आहे असे नव्हे. कारण मी याबद्दल जिथे वाचले तिथे - All the cures are well documented - असे म्हटले आहे.
जगाला एक नविन प्रणाली मिळाली. ब्रीद वाक्य होते - Day by day, in every way, I am getting better, better and better - अर्थात् हे वाक्य डॉ. कोये यांचे होते का आणखी कोणाचे हे मला माहित नाही. पण या प्रणालीतून एक महत्त्वाचा निष्कर्ष जगापुढे आला. तो म्हणजे - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action. ह्याचा अर्थ आपले विचार - आपली हाडे, आपल्या मासपेशी, आपल्या रक्तपेशी, आपले अवयव - पदार्थ ह्या घटकात मोडणार्‍या वस्तूवर परिणाम करू शकतात, नव्हे करतात.
विचार फक्त आपल्यावरच प्रभाव पाडतात काय ? नाही त्याचा प्रभाव आपल्या आजूवाजूच्याच नव्हे तर हजारो मैल लांब असणार्‍या माणसांवर, घटनांवर, वस्तूवर होऊं शकतो. पण त्याआधी विचार - thought - यासंबंधी आणखी दोन-तीन जणांचे विश्लेषण पाहणे उपयोगी होईल.
क्रमशः

21 November, 2008

नामसाधना - २

नामसाधना - २

" मनाची अगाध शक्ति " ह्या विषयावर अनेक तज्ञांनी बरेच बरेच लिखाण केले आहे. पण ही शक्ति कशाप्रकारे काम करते ह्याचा शोध घेणे आवश्यक आहे. सुरुवात करायची आहे ती विश्वतील अती सूक्ष्म घटक असे समजल्या जाणार्‍या अणुपासून.
साधारण शंभर वर्षापूर्वी असा समज होता की ह्या विश्वातील सर्व वस्तूंचे दोन प्रकारात विभाजन होते. एक पदार्थ म्हणजे matter दुसरे म्हणजे energy अर्थात् चेतनत्त्व. पदार्थ म्हणजे दगड, भिंती, लाकूड, टेबल, सोफा, टीव्ही इत्यादि. चेतनत्त्व म्हणजे चेतनता असलेले वृक्ष, प्राणी, मानव वगैरे. दुसरा समज म्हणजे कोणत्याही पदार्थातील सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु. पण पुढे आढळले की त्याच्याही अंतरंगात एक nucleus नावाचा घटक असून त्यात neutrons व protons असतात आणि बहिरंगात electrons असतात. nucleus स्थायी स्वरूपाचा असतो आणि electrons अंतस्थ nucleus च्या सभोवती वर्तुळाकार सतत फिरत असतात.
म्हणजे निसर्गात तीन मूलभूत कण (fundamental particles) असून त्यांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत आणि अणूच्या निर्मितीत हे तिन्ही कण आवश्यक आहेत. पुढे समजले की अणू प्रारणे (radiation) शोषून घेऊन रासायनिक बदल घडवू शकतात तसेच योग्य परिस्थितीत अणू प्रारणे उत्सर्जित करतात. प्रारणे तरंगस्वरूप (frequency) असतात. आणखी काही वर्षांनी समजले की अणु व प्रारणे यांच्यात उर्जा विनिमय घडतो त्यावेळी प्रारणे पुंजस्वरूप (quantum) असल्यासारखीच वागतात. याचा अर्थ एकच वस्तू कधी प्रारणरूप तर कधी पुंजस्वरूप असू शकते. म्हणजे ती वस्तू पदार्थही आहे आणि ती ऊर्जाही आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप द्वैती आहे. विरोधाभास दिसतो खरा पण वस्तुस्थिती द्वैती स्वरूपाचीच आहे. निष्कर्ष : निसर्ग कसा आहे हे निसर्ग ठरवतो. आपण नैसर्गिक वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अणु व प्रारणांचे द्वैतीस्वरूप हे वस्तुस्थितीचे शक्य तेवढे अचूक वर्णन आहे.
शास्त्रज्ञ बोहर याने अणुप्रणालीद्वारे सूक्ष्म अणु आणि त्याहून सूक्ष्मतर अणुघटक यांचे नविन गतिशास्त्र "पुंजगतिशास्त्र" (quantum mechanics) या शास्त्राचा पाया घातला. बरेच पुढे या शास्त्राचे परिपूर्ण भावंड quantum electrodynamics सुप्रतिष्टीत झाले. Quantum Electrodynamics या प्रणालीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील जवळजवळ सर्व घटनांचे यशस्वी स्पष्टीकरण दिलेले आहे.
आता अणुचे स्वरूप जर पदार्थ आहे तर त्यात ऊर्जा येते कुठून. अणुचे संशोधन चालूच होते. शास्त्रज्ञांनी अणुच्या अंतरंगाच्याही आत म्हणजे nucleus च्या आत जायचा प्रयत्न केला तेव्हां त्यांना तिथे quark नावाचा पदार्थ दिसला. जेव्हां त्यांनी त्याच्याही आंत जायचा प्रयत्‍न केला तेव्हां त्यांना एक विलक्षण गोष्ट आढळली आणि ती म्हणजे त्या quarks मध्ये होता एक तरंग, एक vibration. त्याला भौतिकशास्त्रात string म्हणतात. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की अणुला जिथून ऊर्जा मिळते ती या तरंगापासून उत्पन्न होते. याचा अर्थ हे सर्व विश्व तरंगापासून बनलेले आहे. ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू तरंगांनी बनलेली आहे म्हणजेच विश्वामध्ये सर्वत्र vibrations आहेत. हे सर्व विश्व तरंगाच्या कंपनांनी भरलेले एक अतिप्रचंड जाळे आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाशी एका अती सूक्ष्म स्तरावर जोडलेली आहे. म्हणून या विश्वाला Holographic Universe असेही म्हणतात.
आपण सर्व सूक्ष्मतरावर का असेना पण एकमेकाशी जोडलेलो आहोत ? कल्पना तरी मजेदार वाटते ना ? पाहू पुढे कसे काय ते.
क्रमशः

20 November, 2008

नामसाधना -

नामसाधना

वेदांतानुसार नामरूपात्मक जगत् अनादि आहे. तसेच त्याचे नाम-रूप व त्याचे प्रेम उत्पन्न करणारी लीला यांचा संबंधही अनादी व अविनाशी आहे. वेदकाळी जे नाम घेतले जायचे ते म्हणजे ॐ. पण सद्यकाळी शुद्ध अशुद्ध, ब्राह्मण ब्राह्मणेतर इत्यादि बरेच वाद (मानवानेच) निर्माण करून त्याबद्दल जनसामान्यांत एक आदरात्मक का असेना, पण ॐ उपासनेबद्दल एक भितीच निर्माण केली आहे. मग परमेश्वरच संत अवतार धारण करून सामान्य जनांना झेपतील, पटतील, जमतील असे मंत्र देऊन त्यांना नाम-उपासनेला लावतात. संतजण जो मंत्र नाम म्हणून देतात तो मंत्र म्हणजे ॐ चेच प्रतीक असते. श्रीज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या तोंडी नाम घेतल्याने काय होते हे सांगितले आहे (अध्याय १७ ओवी ३३० ते ३३७). भगवान् म्हणतात -
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ते ठेवलेल्या नामाने हाक मारली असता, हे आपले नाव आहे, असे समजून ते "ओ" देत असते. संसारात अहोरात्र शीण करता करता त्रासलेले जीव जेव्हा आपल्या दुःखाचे निवारण करण्याकरिता परमेश्वराचा धावा करतात, तेव्हा ज्या नावाने मला हाक मारली असता मी धावून येतो, असे भगवंताने आपल्या वेदवाणीने ठरविले किंवा संकेत केला, ते संकेतरूप नाव हेच ( हेच म्हणजे ॐ ). परब्रह्म अखंड, अविकारी असे एकमेव सद्‍रूप आहे, त्यात काही बदल न होता, त्याची अबोल स्थिती बोलकी होईल व तेच परब्रह्म जीवाशी अद्वैत एकरूप राहून सद्‍रूपाने जीवाला गोचर होईल असा हा मंत्र कृपाळू बाप वेदाने शोधून काढला आहे. मग वेदाने ज्या एका नाममंत्राने परब्रह्माला आळविले असता दृष्टीआड असलेले परब्रह्मच दृष्टिगोचर होते. परंतु निगमरूपी पर्वताच्या शिखरावरील उपनिषदार्थरूप नगरात राहणार्‍या परब्रह्माच्या पंक्तीला जे बसले - परब्रह्मस्वरूप झाले, त्यांनाच ते कळून येते. [ भारीच जड वाक्य - काय कळून येते, तर परब्रह्माचे स्वरूप ]. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. आता श्रीमहाराजांनी [ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर] ज्यांना नाम दिले आहे ते नाम म्हणजे 'श्रीराम' ह्या अवताराचे नाम नसून त्या अवताराचे जे मूळ, म्हणजे सर्वव्यापी परमात्म्याचे, ॐ ह्या रूपाचेच प्रतिक आहे. पण सगुण उपासना मात्र 'श्रीराम' ह्या अवताराचीच बरं.
          रामायणात एक घटना आहे. सेतूबंधनाचे वेळी श्रीरामाला वाटले आपणही एक दगड टाकून बघावा. पण तो दगड बुडाला. रामाला आश्चर्य वाटले. पण मारुतीराय म्हणाले, असू दे असू दे, दगड जर पाण्यात तरंगतात तर ते तुमच्यामुळे नव्हे, तुमच्या नामामुळे.
क्रमशः