31 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३९

अतुल शरभो भीमः समयज्ञो हविर्हरिः  ।
सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः  ।।
(३५) अतुलः :  - ज्याची तुलनाच होवूं शकत नाही असा. ज्याceची नाम हेच जगाचे एक वैभव आहे त्याला सर्व स्वातंत्र्य आहे. गीते मध्ये म्हटलेच आहे की, 'तुझ्यासारखा दुसरा कोणीही अस्तित्वातच नाही, तर मग तुझ्याहून [1] श्रेष्ठ ह्या तीनही लोकांत प्रभावशील कोण असू शकेल ?' थोडक्यात त्याच्यासारखे दुसरे कांहीही नसल्यामुळे शरीरानी (इंद्रियांनी) ज्ञान होणार्‍या वस्तू श्रेणीमध्ये तो समाविष्ठ होत नाही, मनाच्या भावनांनी भावत नाही, बुद्धिच्या विचारांच्या कक्षेत येत नाही. त्याच्याशी तुलना करता येईल असे आपल्या जवळ कांहीही नाही.
(३५) शरभः :  - जो शरीरामध्ये रहातो व शरीरातूनच प्रकाशित होतो तो. शरीराला 'शर' असे म्हटले आहे.[2] कारण शरीर शीर्यमाण आहे. या क्षय पावणार्‍या शरीरांत साक्षी रूपानें जो रहातो व ज्याच्या वैभवानें व्यक्तित्व येते तो आत्मा म्हणजे परमेश्वरच होय. ह्याचाच दुसरा अर्थ असाही होतो की परमेश्वर स्वरूप हा त्याचा स्व-भाव आहे. भगवान् शंकराने 'शरभ' हा अवतार धारण केला आहे व त्यामध्ये त्याला आठ पाय आहेत व सिंहालाही मारू शकेल इतका बलवान आहे.
(३५) भीमः :  - सर्वप्रेरक किंवा अत्यंत भयानक. जे अत्यंत दुष्ट आहेत व अत्यंत विषयी आहेत त्यांना भयावह असे सामर्थ्यवान् तत्व. जे विकारी आहेत त्यांचे करता परमेश्वर अत्यंत सामर्थ्यवान खल निर्दालन शक्ति असलेला आहे व तो त्यांच्या पूर्ण विनाशापर्यंत पाठलाग करतो. कांही टीकाकार ही संज्ञा (समासासहित) अ-भीम असल्याचे प्रतीपादन करतात व त्याचा अर्थ जे साधू आहेत त्यांचे तो संरक्षक कवच आहे.
(३५) समयज्ञः :  - सर्व दर्शने (ज्ञानशाखा) जाणणारा, किवा उत्पत्ती-स्थिती- लय यांचा समय पूर्णपणे जाणणारा तो 'समय-ज्ञ' महाविष्णु. तिसरा अर्थ असा की [3] ज्याची पूजा (यज्ञ) म्हणजे दुसरे कांही नाही तर भक्तानें आपली समदृष्टी सतत जागृत ठेवणे हेच होय. भक्त श्रेष्ठ प्रल्हाद म्हणतात, 'सर्व स्थितींमध्ये 'सम' रहाणे हीच अच्युताची पूजा होय.
(३५) हविर्हरिः :  - सर्व आहुतींचा स्विकार करणारा. तोच सर्व यज्ञाचा स्वामी आहे म्हणूनच सर्व भक्त त्यालाच आहुती अर्पण करतात व तोच सर्व भक्तियुक्त समर्पणाचा स्विकार करणारा आहे. भगवत् गीतेत भगवंत म्हणतात,[4] 'मीच खरोखर सर्व यज्ञांचा भोक्ता व स्वामी आहे.' त्यालाच 'हवि' असे नामाभिधान आहे. त्याची पूजा हविंनी आहुती देऊन केली जाते.
काही विवेचक ही संज्ञा हवि व हरिः अशा दोन वेगवेगळया नामांनी तयार झाली आहे असे मानतात. अशा स्थितीत हवि ह्या प्रथम संज्ञेचा अर्थ होईल जो यज्ञकर्माने प्रसन्न करून घेतला जातो तो. दुसरी संज्ञा हरि  म्हणजे जो सर्व वासना अगर पापांचे हरण करतो तो. अर्थातच तो सर्व वासनांचे प्रकटनही पुसून टाकतो.
(३६०) सर्वलक्षणलक्षण्यः :  - सर्व लक्षणांनी म्हणजे प्रमाणांनी जो जाणला जातो तो. म्हणजेच तो परमात्मा सर्व वैज्ञानिक संशोधनाने व तात्विक चिंतनानेही सिद्ध होतो तो. ती विचारसरणी द्वैतवादी असो की अद्वैतवादी असो परंतु साक्षात्कारी साधकाला प्रतित होणारे अंतिम सत्य आहे श्रीविष्णु.
(३६) लक्ष्मीवान :  - लक्ष्मीचा पती. संपूर्ण प्रकृतीला प्रेरणा व चालना देणारा पुरूष तो लक्ष्मीपती. पुरुषाच्या प्रेरणेनें कार्यकारी झालेली प्रकृती म्हणजेच हे आपल्या भोवती पसरलेले जग होय. व्यक्ता-वस्थेतील परमात्मा हा नेहमीच प्रकृतीशी सम्मिलीत (बांधलेला) असतो. लक्ष्मी म्हणजे तेजोमयता. तिचा पती हा स्वतः प्रकाशमान असून शुद्ध चैतन्य स्वरूपाने तो सर्व प्रकाशित करतो. म्हणूनच तो खरोखरच लक्ष्मीवान आहे.
(३६) समितिंजय :  - सदा विजयी. पुरांणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अधर्माशी झालेल्या सर्व युद्धात, सर्व वेळी शेवटी भगवंतच विजयी होतात. आपल्या भक्तांची ’जीव’भावाची सर्व दुःखे तो नाहीशी करतो. समिति म्हणजे युद्ध, संघर्ष व त्यामध्ये तो नेहमीच विजयी होतो.
डॉ. सौ. उषा गुणे.




[1]    न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोन्यो  । लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभावः  ।। गीता ११.४३
[2]    'शीर्यमाणात् शरः'
[3]        समत्वमाराधनमच्युतस्य  । (विष्णुपुराण १-१७-९०)
[4]        अहं हि सर्व यज्ञांनां भोक्तांच प्रभुरेवच  । गीता १०-२४

27 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३८

पद्मनाभोऽरविन्दाक्षः पद्मगर्भः शरीरभृत् 
महर्द्धिऋद्धो वृद्धात्मा महाक्षो गरूडध्वजः  ।।
(३४) पद्मनाभः :  - ज्याच्या नाभीमध्ये कमलपुष्प आहे असा. ह्या संज्ञेचा शाद्बिक अर्थ घेता कामा नये. नाभी हे एक मानसिक केंद्र आहे, ज्या ठिकाणाहून अद्याप व्यक्त दशेला न आलेले सर्व विचार जाणीवेमध्ये - व्यक्तदशेस ये लागतात (पश्यंती)[1] सर्व विचारांच्या निर्बिज अवस्थेला योगशास्त्रात 'परा' असे म्हटले जाते. म्हणून ह्या संज्ञेचा अर्थ होतो की ज्याने आपल्या हृदयांत (उदरांत) व्यक्त सृष्टिची सुप्तावस्थेतील सर्व बीजे धारण केली आहे असा.
     दुसरा अर्थ असा की जो भक्तांच्या हृदयकमलांत व्यक्त होतो तो. कांहीजण असे विवेचन करतात की जो कमलपुष्पाच्या गर्भागारांत वस्ती करतो तो 'श्रीविष्णु'.
 (३४) अरविन्दाक्ष :  - ज्याचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर असतात असा 'श्रीविष्णु'. कमल पुष्प सुर्यादयाबरोबर उमलते व ते रात्री मिटून जाते. त्याचप्रमाणे भगवान् विष्णु आपले सौदर्य व कृपा भक्तांच्या ठिकाणी प्रकट करतात व त्यांच्या कृपेचा ओघ पूर विषयासक्तीच्या अंधःकारांत जणू लुप्त होन जातो.
(३४) पद्मगर्भः :  - ज्याचे ध्यान हृदयकमळाचे मध्यभागी केले जाते असा.
(३४) शरीरभृत् :  - जो सर्व शरीरांचे भरण व पोषण करतो तो शरीरभृत्. ह्या संज्ञेचा असाही अर्थ होतो की जो अन्न व प्राण स्वरूपाने शरीराचे भरण पोषण करण्यास स्वतःच कारण स्वरूप होतो. हे एक स्पष्ट सत्य आहे की शरीराचे अस्तित्व साधारणपणे दृश्यस्वरूपाचा फारसा नाश न होता ५० वर्षापर्यंत टिकून रहाते. परंतु एकदा त्यातून जीवतत्व निघून गेले की ते शव आपला आकार टिकवू शकत नाही. इतकेच नव्हे तर केवळ ४८ तासानंतर तर ते मूळ स्वरूपांत राहू शकत नाही. आपल्या अध्यक्षतेनें जो शरीराचे धारण व पोषण करतो व ज्याच्या अनुपस्थ्तीने शरीर मृत होते, नाश पावते. तो शरीर धारण करणारा देहभृत् होय.
(३५०) महर्द्धि :  - ज्याचे जवळ महान् ऋद्धि म्हणजेच वैभव व सामर्थ्य आहे असा. हे वैभव व सामर्थ्य मिळून त्याचे ऐश्वर्य होते (ईश्वरत्व) ह्याचाच अर्थ असा की हे वैभव व सामर्थ्याचे ऐश्वर्य ज्याचे जवळ स्वभावतः नित्यच असते तो महर्द्धि.
(३५) ऋद्धः :  - ज्याचा विस्तार विश्वव्यापी आहे असा. अनंत वस्तूजातानें तयार झालेले हे विश्व हीच त्या परमेश्वराची व्यक्त दशा होय.
(३५) वृद्धात्मा :  - सर्वात पुरातन आत्मा. तो बुद्धिपर असल्यानें आत्म्यामध्ये कालाची संकल्पना नाही. परंतु वृद्धात्मा ह्या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ब्रंह्मांडाच्या पूर्वीही तो होता. कालाच्या निर्मीतीनंतरच आपण तो सर्व प्राणीमात्रांचा आत्मा असतो असे म्हणू शकतो व त्याचा निर्देश करू शकतो. तो सर्वांपेक्षा पुरातन पहिला आत्मा आहे. ह्याचाच अर्थ असा की ज्याचे पासून ही सर्व व्यक्त सृष्टि संभवते तो आत्मा.
(३५) महाक्षः :  - महान् चक्षु असलेला. ह्याचा अर्थ असा की तो परमात्मा आपल्या डोळयांनी केवळ सृष्टितील वस्तुजाताकडेच पाहू शकतो असे नाही तर त्या प्राणीमात्रांच्या खोल अंतरंगातील सर्व हालचाली आपल्या अतिसूक्ष्म दृष्टिने (x-ray) पांहू शकतो. कारण तोच सर्व प्राणीमात्रांच्या हृदयांत जाणीव रूपाने असल्यानें सर्वांचे sarva kaalaata प्रकाशन तोच करतो.
(३५) गरूडध्वजः :  - ज्याचे ध्वजावर गरूड प्रतिकरूपानें आहे असा. 'गरूडपक्षी' हा परमेश्वराचे वाहन समजले जातो. याचे कारण असे असावे की गरूड सतत आकाशांत खूप अुंचावर उडत रहातो परंतु जमिनीवरील अत्यंत लहानसे मातीचे ढेकुळही पाहूं शकतो. आपले भक्ष्य शोधून काढल्यावर आकाशातून तो वेगानें खाली झेप घेतो व ते घेऊन जातो. अशा तर्‍हेने वातावरण शुद्ध केले जाते त्याचप्रकारे भक्तांच्याही मनांत परमेश्वर कुठलेही अशुद्ध विचार राहू देत नाही. कारण त्याचे वाहनच मुळी 'गरूड' आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   परा, पश्यन्ति, मध्यमा व वैखरी या विचाराच्या चार अवस्था आहेत. आत्मशक्तिच्या सहाय्याने सुप्तावस्थेपासून क्रमशः व्यक्तदशेला येत येत वाणीच्या स्वरूपात बाह्य जगतात पूर्णपणे प्रकट होतात.

23 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३७

अशोकस्तारणस्तारः शूरः शौरिर्जनेश्वरः  ।
अनुकूलश्शतावर्तः पद्मी पद्मनिभेक्षणः  ।।
(३३) अशोकः :  - ज्याला कसलाही शोक नाही असा. ज्यावेळी मन अत्यंत क्षुब्ध व अस्वस्थ होते त्यावेळी अनुभवास येणार्‍या स्थितीला 'शोक' असे म्हणतात. वासना व आकांक्षा मधून मनाची क्षुब्धता, अस्वस्थता उत्पन्न होत असते. त्यामुळे 'अशोक' ह्या शद्बाचा असा अर्थ होईल की मनामध्ये सतत क्षुब्धता निर्माण करणार्‍या नकारात्मक वृत्ती ज्याच्याजवळ कधीही नसतात असा. ही संज्ञा पूर्णार्थाने येथे लागू होते. कारण परमेश्वर आत्मस्वरूपानें मन बुद्धि रूपी साधनांनी निर्माण केलेल्या बौद्धिक क्षुब्धतेच्या पलीकडेच असतो.
(३३) तारणः :  - जो इतरांना तरून जाण्यास मदत करतो तो. मन बुद्धिच्या क्षुब्धतेने अत्यंत पिडीत झालेल्या जीवाला आत्माच तारून नेतो. जेव्हा जीवात्म्यास परमात्म्याशी असलेली एकरूपता समजते तेंव्हा तो सहजच या क्षुब्धतेच्या पलीकडे जातो. विष्णु भागवतात म्हटले आहे,' आम्हास ह्या जन्म मरणाच्या संसारचक्रातून वाचविल असा तुझ्यावाचून कोण आहे?''.[1]
(३३) तारः :  - जो तारण करतो (वाचवितो) तो.[2] जो पुनर्जन्माच्या भयापासून सोडवितो, आणि जो भक्तांचे सतत रक्षण करणारा असतो तो 'श्री विष्णु.' भक्तही त्याला तारक असेच संबोधितात. वरील तीनही संज्ञा असे दर्शवितात की विष्णु हा आपल्या भक्तांना एकमेव तारणहार - रक्षणकर्ता आहे. तो आपले आपल्या शारीरिक दुःखापासून रक्षण करतो (अशोक) म्हणूनच आध्यात्मिक दुःखे दूर होतात. तो आपणांस संसार सागर पार करून जाण्यास मदत करतो (तारण) म्हणजेच तो आधिभौतिक दुःखापासून सोडवितो व तो आपल्याला पंचमहाभूतांच्या तडाख्यातून सोडवितो (तारः) ह्याचाच अर्थ आधिदैविक दुःखेही नाहीशी करतो. म्हणजेच नारायण आपल्या अभय हस्तानें सर्व दुःखापासून रक्षण करतो.
(३३) शूरः :  - शूरः आपल्यातील सर्व शौर्य व धैर्याचे उगमस्थान आपल्यातील चैतन्य. म्हणूनच ह्या विश्वाच्या स्वामीला येथे 'शूर' म्हटले आहे. जगातील दुष्ट प्रवृत्ती कितीही बलवान व योजनाबद्ध असोत त्या सर्व नष्ट करण्याचे सामर्थ्य त्याचेपाशी आहे.
(३४०) शौरिः :  - वसुदेवाच्या वडीलांचे नांव शूरसेन. शूरसेनाचा मूलगा वसुदेव व हेही आपण पाहिले आहे की वसुदेवाचा मुलगा वासुदेव. म्हणजेच भगवान् विष्णूंनी शूर घराण्यात अवतार घेतला आहे म्हणूनच त्याला 'शौरि' म्हटले गेले आहे.[3]
(३४) जनेश्वरः :  - जनांचा ईश्वर, स्वामी तो जनेश्वर. जे जन्म घेतात त्यांना 'जन' असे म्हटले जाते.[4] विश्वामध्ये जन्म पावणार्‍या सर्व प्राणीमात्रांचा तो स्वामी आहे असा या संज्ञेचा अर्थ होतो.
(३४) अनुकूलः :  - मनपूर्वक सदिच्छा बाळगणारा किवा सर्वांचा सुहृद. परमेश्वर स्वतःच प्रत्येक प्राणी मात्रातील जीवनतत्व असल्यामुळे साहजिकच तो प्रत्येकाचा अभयदाता सुहृद आहे. प्रत्येक व्यक्ति आपले जीवन आपल्या साध्याच्या व हेतूच्या अनुकूल असेच व्यतीत करत असते. म्हणूनच परमेश्वर एकाद्या खुन्याचे हेतू पूर्ण करण्याकरतां त्याला अनुकूल (त्याला मित्र) असू शकतो त्याचवेळी दुसरा कोणी मानवजातीचे हित करण्याच्या उद्देशाने कार्यरत असेल तर त्याचाही सहाय्यकर्ता मित्र असूं शकतो. अशा तर्‍हेने प्रत्येकाचाच मित्र व समर्पित संरक्षही असूं शकतो. तोच सर्व प्राणीमात्रांच्या वासना, आकांक्षा व्यक्त दशेला आणणारा सामर्थ्यशील शक्तिस्रोत आहे.
(३४) शतावर्तः :  - शत म्हणजे शंभर. परंतु येथे हा शद्ब 'असंख्य' ह्या अर्थी वापरला आहे. ' ज्याने असंख्य आकाराच्या श्रेणी (आवर्त) धारण केल्या आहेत' तो शतावर्त असा ह्या संज्ञेचा अर्थ होईल. सृष्टितील सर्व आकार हे त्याचेच आहेत कारण मूलतः हे सर्व विश्व म्हणजे मूर्त स्वरूपास आलेले परब्रह्मच होय. दुसरा अर्थ होईल, ' प्रकृतीच्या व उत्क्रांतीच्या नियमांचे पालन व रक्षण करण्याकरतां त्याने अनेक 'अवतार' (आवर्तन) धारण केले आहेत म्हणून तो शतावर्त. आणखी एक अर्थ होतो की , ' जो प्राणस्वरूपांने शरीरांतील असंख्य नाड्यांमधून आवर्तन (संचार) करतो तो शतावर्त श्रीविष्णु.
(३४) पद्मी :  - ज्याने हातामध्ये कमलपुष्प धारण केले आहे असा. भारतामध्ये कमळाला राष्ट्रीय पुष्प मानले जाते. आपल्या संस्कृतीमध्ये कमल हे आध्यात्मिक जीवनाच्या ध्येयांचे प्रतिक मानले जाते. ही प्रतिके अशा तर्‍हेनें ज्ञान देतात की परमेश्वर आपल्या हातातील शंख फुंकून जागृती आणतो व जर या उच्चस्तरावरील अंतर्नादाला लोकांनी प्रतिसाद दिलाच नाही तर तो आपल्या हातातील गदेनें कारूण्ययुक्त धक्के देऊन जागृती आणतो. तरीही एकाद्या व्यक्तिनें अगर समाजानें त्याच्या दयामय इशार्‍याकडे दुर्लक्ष केले तर त्याच्या हातात 'सुदर्शन चक्र' आहेच. तिचा उपयोग करून तो सर्व जगताचा प्रलय करतो व पुन्हा नवीन सृजन (कमल) करतो.
(३४) पद्मनिभेक्षणः :  - ज्याचे डोळे कमल पुष्पाप्रमाणे सुंदर आहेत तो. कमलनेत्र श्रीविष्णु.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   संसारचक्रमज कोऽतितरेत् त्वदन्यः  । (विष्णुभागवत ७-९-६)
[2]   तारयति इति तारः
[3]  शूरस्य गोत्रापत्यं पुमान् शौरिः
[4]   जननधर्मवान् जनः

19 May, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३६

स्कन्दः स्कन्दधरो धुर्योवरदो वायुवाहनः
वासुदेवो बृहत्भानुरादिदेवः पुरन्दरः ।।
(३२) स्कन्दः :  - भगवान् शंकरांचा धाकटा मुलगा 'सुब्रह्मण्य' ह्याचा उल्लेख स्कन्द या नांवाने केल्याचे आपणांस पुराणामध्ये आढळते. तसेच तो सत्‌शील देवांचा सेनापती असल्याचेही वर्णन आहे. त्याचाच अर्थ असा की सुब्रह्मण्याचे (स्कन्दाचे) द्वारा परमात्म्यांचा गौरव व्यक्त झाला आहे. म्हणून त्यालाच स्कन्द असे नांव पडले. साधकाच्या व्यक्तित्वाचे सर्व स्तर (घटक) एकरूप (एकाग्र) होणे ही स्थिती परमसत्याची प्रतीती येण्यास अत्यंत आवश्यक मानली जाते.
(३२) स्कन्दधरः :  - जो विस्कळीत झालेल्या धर्माचे पुनरूज्जीवन करतो ( आधार देतो ) तो स्कन्दधर, किवा जो सुब्रह्मण्याचे पितृस्वरूपांत व्यक्त झाला तो परमेश्वर - स्कन्दधर.
(३२) धुर्यः :  - जो सर्वांची धुरा वाहतो तो भगवान् विष्णु धुर्य आहे. विविधतापूर्ण अशा विश्वाच्या उत्पत्ति-स्थिती-लयाची सर्व जबाबदारी - धुरा जो स्वतः वहातो व जो हे कर्मचक्र अत्यंत बिनचूकपणे, कुठेही अडखळतां सहस्रावधि वर्षे चालू ठेवतो तो आहे श्री नारायण.
(३३०) वरदः :  - आपल्या निष्ठावान् भक्तांच्या इच्छा पूर्ण करून त्यंाना प्रसन्नतेने 'वर' प्रदान करतो तो 'वरद'. दुसरा अर्थ, जे अत्यंत निस्पृहपणे व शुद्ध विवेकबुद्धिनें त्याला पहाण्याला प्रयत्न करतात त्यांना जीवनांतील श्रेष्ठ 'वरदान' देतो तो वरद.
(३३) वायुवाहनः :  - जो वायुचे नियमन करतो, त्याला ताब्यात ठेवतो व त्याला गतीही देतो तो 'वायुवाहन'. [1] अंतरिक्षातील वायुच्या गती सात प्रकारच्या असतात व त्यांना 'सप्तमरूत' म्हणतात असे संस्कृत साहित्यात वर्णन येते. थोडक्यात वायुचे दुर्दम्य सामर्थ्य, गती व प्राण रक्षक शक्ति या सर्व त्याला मिळालेल्या परमात्म्याच्या उदार देणग्याच आहेत म्हणूनच श्री विष्णुचे हे नामानिधान - 'वायुवाहन'
(३३) वासुदेवः :  - जो एक समयावच्छेदेकरून 'वासु' ही आहे व देवही आहे तो वासुदेव. वासु म्हणजे जो सर्व सजीव प्राणीमात्रांच्या शरीरामध्ये शरीरामध्ये, स्थायिक होतो तो (जीव). देव म्हणजे प्रत्यय आणून देतो अगर प्रकाश देतो तो. अर्थात वासुदेव म्हणजे जो सजीवांच्या शरीरामध्ये जणूबद्ध झाल्याप्रमाणे रहातो. त्याचवेळी प्रत्येक अनुभव प्रकाशित करणार्‍या चैतन्य स्वरूपांतही उपस्थित असतो तो वासुदेव. परमेश्वराचे अस्तित्व जगतातील प्रत्येक[2] वस्तुमध्ये आहे व त्याच वेळी तो सर्व जगताचा आधारही आहे.
     दुसरा सरळ अर्थ असा होतो की - जो कंसाच्या कारागृहात वसुदेवाचा मुलगा म्हणून जन्माला आला तो वासुदेव. वृंदावनातील घनःश्याम कृष्ण. तो मायेच्या आवरणानें स्वतःस झाकून ठेवतो म्हणून तो वासुदेव. 'देव' या शब्दाचा अर्थ जो क्रिडा करतो, जो जिंकण्याची इच्छा करतो (विजिगिषु) जो संचालन करतो, जो प्रकाशतो, जो उत्पन्न करतो, जो गतीरूप आहे. महाभारतातील उद्योगपर्वात वर्णन आले आहे की 'सूर्यकिरणांच्या प्रकाशाप्रमाणे मी सर्वजीवांना व्यापून टाकतो म्हणून मला 'वासूदेव' असे म्हटले जाते. विष्णुपुराण म्हणते, 'तो सर्व ठिकाणी व सर्वांचे अंतर्यामी रहात असल्यानें त्याला वासुदेव असे म्हटले जाते. सर्व प्राणीमात्र त्या परमत्म्यामध्ये रहातात व तो सर्वांमध्ये रहातो म्हणून त्या सर्वव्यापक परमेश्वरास वासुदेव असे नामाभिधान मिळाले.
(३३) बृहद्‌भानुः :  - ज्याला असंख्य (बृहत्) किरणे आहेत असा. म्हणजेच जो सूर्यचंद्रांच्या किरणांद्वारे सर्व जगत् प्रकाशमान् करतो तो बृहद्भानु. महाभारत म्हणते - ज्याची किरणें चंद्र सूर्य व इतर ग्रहांना मिळतात व त्यांचे द्वारा तो सर्व विश्व प्रकाशित करतो म्हणून तो महान् (बृहत्) तेज धारण करणारा आहे.
(३३) आदिदेवः :  - जो सर्वांचा आदिस्त्रोत आहे तो परमात्मा. सर्वांचे पहिले (आदि) कारण तोच आहे व पहिला देवही तोच आहे.
(३३) पुरंदरः :  - पुरांचा नाश करणारा. ज्या सुसज्ज क्षेत्रामध्ये आपण असंख्य अनुभव घेत असतो त्या क्षेत्राला 'पुर' असे म्हटले आहे. आपण ज्या तीन पुरांमध्ये आपण आपले जगतातील असंख्य अनुभव गोळा करीत हिंडत असतो ती पुरे आहेत - जागृत - स्वप्न - सुषुप्ती. जेव्हा स्थूल सूक्ष्म व कारणदेहांच्या पलीकडे जान ज्यावेळी 'आत्मानुभव' घेतला जातो तेंव्हा ही तीनही पुरे भस्मसात् होतात, उध्वस्त होतात व नष्ट होतात. शिवपुराणामध्ये याच कल्पनेचा विस्तार केला आहे. आपण यावरून असे म्हणूं शकतो की त्याच परमात्म्यानें महेशाच्या स्वरूपांत तीनही पुरे नष्ट करण्याचे कार्य केले.[3]
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]  (१) अवहन (२) प्रवहन (३) विवहन (४) परमवहन (५) उद्ववहन (६) संवहन (७) परिवहन
[2]  वसनांत् सर्वभूतांना, वसुत्वाद्देव योनिषु । वासुदेवस्ततोज्ञेयो योगिभिस्तत्वदर्शिभिः ।। सर्वत्रासौ समस्तंच वसत्यत्रेति वै यतः  । ततःस वासुदेवेति विद्वद्भिः प्रकीर्थते ।।
[3]   त्रिपुरसंहार.