05 March, 2012

श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२

      ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
       ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
         अथ प्रथमो अध्यायः ।

         ॥ अर्जुनविशादयोगः ॥

          धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय  ॥ १-१ ॥


अन्वय  :  हे संजय ! धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत ?


अर्थ   :  संजया ! धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले ? 

विवरण  :  येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.   


         भगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार ? युद्धच करणार ना ? मग असे कां विचारावे ? परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपण्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे.  याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -


धर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा
    लोके श्रुता दृश्यते चापि पार्थ ।
महाश्रावं जीवितं चाप्यनित्यं
    संपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥
न चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्
    प्रयच्छेरंस्तुभ्यं अजातशत्रो ।
भैक्षचर्यामन्धकवृष्णिराज्ये
    श्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥
अल्पकालं जीवितं यन्मनुष्ये
    महास्त्रावं नित्यदुःखं चलं च ।
भूयश्च तद् यशसो नानुरूपं
    तस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥


       हे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.


पापानुबन्धं को नु तं कामयेत
    क्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः ।
यत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्
    यत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥
कृपः शल्यः सौमदत्तिर्विकर्णो
    विविंशतिः कर्णदुर्योधनौ च ।
एतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्
    यद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥
लब्ध्वापीमां पृथ्वीं सागरान्तां
    जरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या ।
प्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्
    नैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥
अमात्यानां यदि कामस्य हेतोः
    एवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् ।
अपक्रामेः स्व प्रदायैव तेषां
    मा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥


    पापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील ? युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे ? राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.
[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]


       धृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना ? असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’  बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.


भाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :
       धृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.

सञ्जय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥


अन्वय  :  तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥


अर्थ   :   संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;
विवरण  :  येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.

 

26 February, 2012

महर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी

       तपस्वी वाल्मीकि महर्षि वाल्मिकींनी ’रामायण’ नामक महाकाव्य रचले. रामायण महाकाव्याची कुणी पुराणात गणती करीत नाहीत. सद्यकालीन उपलब्ध रामायणात कितीतरी प्रक्षिप्त भाग आहे असे बरेच तज्ञांचे मत आहे. या विद्वानांचे विश्लेष पाहता असे दिसून येते की प्रक्षिप्त भाग काढला तर मूळ काव्यात श्रीराम हा विष्णुचा अवतार या अर्थाने श्रीरामाचे चरित्र सांगितलेले नाही. एका थोर विभूतीचे चरीत्र या दृष्टीने वाल्मिकी महर्षिंनी ते ग्रथित केलेले आहे. इतर पुराण ग्रंथांमध्ये आढळणारे मंगल वंदनपर श्लोक यात आढळत नाहीत. मग वाल्मिकीने हे महाकाव्य कशाकरिता रचले असावे ? एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का ? असेल तर ती कोण ? असे महर्षिंनी नारदमुनिला विचारले. यावरून लोकांनी आपल्या जीवनात कसे आचरण करावे यासाठी एका आदर्श व्यक्तिचे चरीत्र त्यांच्यापुढे असावे या हेतूने ’रामायण’ महाकाव्य रचले असावे याचे शक्यता दाट आहे. 

        पण एवढे महान काव्य रचण्यास फार मोठी प्रतिभा असावी लागते. प्रतिभा काही अशी-तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी तपस्याबळ पाठीशी असावी लागते. आपण एका वाक्यात वाचतो, ऐकतो की वाल्मिकीने फार मोठी तपस्या केली. फार मोठी म्हणजे किती, कशी हे स्वतः तपाचरणात असणारेच जाणू शकतात. रामायणात तपस्येचे वर्णन आढळतेच, पण पुढे हेही म्हटले आहे की त्या तपोबलाने ते ब्रह्मपदाला पोचले. मग सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार हे निश्चित. आपल्या सिद्धीने त्यांनी दशरथाच्या आधीपासून रामचरीत्र कसे घडले ते सर्व पाहिले, ऐकले असणार हे संभवनीय आहे. रामायणात उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने त्यांना अशा प्रकारची दृष्टी दिली. आता तप प्रेरणेस देखील काहीतरी निमित्त लागतेच. पद्मपुराण, अध्यात्म रामायण इतरत्र साहित्यातून महर्षिंच्या पूर्व चरीत्राबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. महर्षिंच्या पूर्व चरीत्रासाठी आपण अध्यात्म रामायणातील त्यांनी स्वमुखे श्रीरामास निवेदन केलेले वर्णन पाहू. महर्षि श्रीरामाला म्हणतात – “अहं पुरा किरातेषु किरातैः सह वद्धितः । जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतं सदा ॥ (अ.रा. ६.६५). मी आधी रानटी होतो. दुष्कर्मात रत असे. जन्माने द्विज असलो तरी आचरणाने शूद्रच होतो.” शास्त्रात शूद्राची एक व्याख्या सापडते ती अशी – शुचा अभिदुद्रुवे इति शूद्रः – जो स्वतः दुःखी असतो आणि इतरंनाही दुःख देतो, त्यांना रडवतो त्याला शूद्र म्हणावे. यावरून असे दिसते की मनुष्य जन्माने कोणत्याही वर्णाचा असो (जातीचा नव्हे, हल्ली जात हा वर्णाला पर्यायी शब्द वापरला जातो) , त्याचे आचरण हीच खरी त्याच्या वर्णाची ओळख. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण, पूर्वायुष्यातील आचरणामुळे शूद्र आणि तपस्येनंतर स्थित्यंतर पावल्याने परत ब्राह्मण. केवळ ब्राह्मणच नव्हे तर महर्षिपद, ब्रह्मपद पावलेला. 

       फार प्राचीन काळी एका गहन अरण्यात एक युवक राहात असे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने सोपा असा वाटमारीचा धंदा अवलंबिला होता. कोणी वाटसरू दिसला की त्यावर हल्ला करायचा आणि त्यांच्याकडे असेल नसेल ते लुबाडायचे, प्रसंगी कधी हत्याही होत असे. एकदा संयोग असा की देवर्षी नारद चालले होते आणि त्या युवकाने त्यांच्यावर झडप घातली. देवर्षि म्हणाले – मला लुटण्यास तू का प्रवृत्त होत आहेस ? लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय ? आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय ? तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही ? सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल ? “जपतां उलटे नाम वाल्मिकी । बने ब्रह्मसम विदित लोकिं की ॥ (रामचरितमानस २.१९४) 

       श्रीरामाला महर्षि आपली कथा सांगताहेत. म्हणतात – “अहं यथोपदिष्टं तौः तथा अकरवमञ्जषसा । जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ ? अंगावर वारूळे उठे पर्यंत ?) परीणाम काय झाला ? वाटमार्यािचा मुनि झाला, ब्रह्मसम झाला. म्हणून तर वाल्मीकि रामायणात प्रथम श्लोकांत त्यांचा उल्लेख “तपस्वी” म्हणून आला आहे.

22 February, 2012

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश
( काय आहे यात)


सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥
    सर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ?) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.
    सामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे -
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकच ग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥
की अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम.
    भारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला.
    गीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे  या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ  यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं । एको देव देवकीपुत्र एव । एको मंत्र तस्य नामानियानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे.
    प्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे.
    पण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे ? कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां ? डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे -  (सविस्तर ऐकायचे असल्यास इथे पहा)
    भगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला ? संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय ? तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा । हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा.
    गीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव.
    धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality  - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे.

31 January, 2012

रामायणाची रचना कशी झाली ?

        महर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि ? मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही ! आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला.
        पुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें ? या वरून मी काय समजावे ? इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. "तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर." ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.
      प्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी.
       महर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार ? इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो ? हा प्रश्न पडतोच.
    महर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते. 

रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।
सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥
हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।
तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥
स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।
सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥
ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।
पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥


श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥     योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥


*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है । वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है। मलेशिया में "हिकायत सिरी राम" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है । थाईलैंड में रामकथा को "रामकियेन" या "रामकीर्ती" कहा जाता है । यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है । वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं । जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है । इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र । वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं। बर्मा में "रामायागन" नाम से रामकथा लिखी गई । बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं। रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ । ] 

10 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०७

श्लोक १०७
शंखभृन्नन्दकी चक्री शारङ्ग्धन्वा गदाधरः 
रथाङ्गपाणीरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुधः  ।।
(९९) शङ्खभृत् :  - पांचजन्य नावाचा दिव्य शंख धारण करणारा. पांचजन्य शद्बाचा अर्थ होतो जो पाचापासून निर्माण झाला आहे (पांच ज्ञानेंद्रिये) तेच मन याअर्थी घ्यावयाचे, व मन हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. आपल्या शास्त्राचे मतानुसार आपल्यामधील अहंकार तत्व आपल्यातील आत्मस्वरूप नारायणाचे हातातील शंख आहे.
(९९) नंदकी :  - भगवंताचे हातातील तलवारीचे नांव आहे नंदक. म्हणून या संज्ञेचा अर्थ होतो जो नंदक तलवार धारण करतो व ती चालवितो तो नंदकी. तसेच नंदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. शास्त्रानुसार भगवंताच्या पवित्र हातातील दिव्य हे स्र म्हणजेच विद्या होय. ज्याच्यामुळे भक्त आपल्या अंतःकरणातील आत्मस्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो.
(९९) चक्री :  - जो सुदर्शन नावाचे चक्र धारण करतो तो. सु-दर्शन म्हणजे जो दिव्य दृष्टि देतो तो. शास्त्राचे मतानुसार हे चक्र मनुष्याच्या मनाचे प्रतिक आहे.
(९९) शारङ्ग्धन्वा :  - जो आपल्या शारंग नावाच्या अमोघ धनुष्याने अचूक लक्षभेद करतो तो. आपल्या शास्त्रानुसार श्रीनारायणाचे हे धनुष्य अहंकाराचे प्रतिक मानले आहे. व अहंकार तत्व हे सर्व ज्ञानेंद्रियांचे शिखर आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीनारायणाच्या हातातील सर्व आशिर्वादात्मक साधनांचे भक्ती व आदरानें स्मरण केले आहे.
(९९) गदाधरः :  - ज्याने हातामध्ये कौमोदकी नावाची सुप्रसिद्ध दा धारण केली आहे तो गदाधर. ही गदा आनंद व सौंदर्य पसरविते. गदा मनुष्यातील बुद्धितत्वाचे प्रतीक आहे.
(९९) रथांगपाणीः :  - परंपरागत अर्थ आहे ज्याने रथाचे चाक हातामध्ये शस्त्राप्रमाणे धारण केले आहे तो. म्हणजेच या श्लोकामध्ये वर्णन केलेले चक्र. व तो चक्री होय. परंतु इतर कांही जण या संज्ञेचे दुसरेही विवेचन करतात. परंतु भक्तीकाव्यामध्ये पुनरूक्ती हा काही दोष होत नाही व ते अगदी नैसर्गिकच आहे.
(९९) अक्षोभ्यः :  - निंदाव्यंजक शद्बांनी किती निंदा केली अगर कुणीही कुठलेही अपमानकारक कृत्य कितीही वेळां केले तरी जो क्षुब्ध होत नाही असा. बाह्य जगतातील कुठल्याही घटनेने ज्याची अंतरीक शांनी व निरवता कधीच ढवळली जात नाही तो नित्यशांत अक्षोभ्य होय. या संज्ञेने भगवंताची अपार क्षमाशीलता चे मनुष्यावरील अगाध प्रेम, करुणा व दया सुचविली आहे.
(१०००) सर्वप्रहरणारयुधः :  - ज्याला युद्ध करण्याकरतां व प्रहार करण्याकरतां सर्व आयुधांची, शस्त्रांची उपलब्धता आहे असा. कुठलाही शत्रु त्याला आश्चर्यचकित करूं शकत नाही, म्हणून तो सर्व विजयी आहे. त्याचे जवळ कुठल्याही बलाढ्य शस्त्राला प्रतिकार करू शकेल असे समर्थ स्र उपलब्ध आहे म्हणून तोच नेहमी विजयी ठरतो.
'' श्री सर्वप्रहरणायुधः नमः इति''
श्रीकृष्णाय परब्रह्मणे नमः

डॉ. सौ. उषा गुणे.

06 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०६

श्लोक १०६
आत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः 
देवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः  ।।
(९८) आत्मयोनिः :  - जो स्वतःच स्वतःचे उपादान कारण आहे. जो स्वयंभू, मूलभूत कारण आहे असा श्रीनारायण.
(९८) स्वयंजातः :  - जो विश्वाचा स्वामी असल्यामुळे त्याला व्यक्त होण्याकरतां दुसरे कुठलेही निमित्तकारण आवश्यक नसते असा. या विविधतेच्या जगात प्रत्येक कार्याकरता तीन कारणांची आवश्यकता असते. घट निर्मितीमध्ये उपादान कारण माती, निमित्त कारण आहे चक्र व कर्ता आहे कुंभार. श्रीनारायणाच्या या निर्मिती विश्वामध्ये या तीनही कारणस्वरूपांत तोच व्यक्त झालेला असतो. जसे मनुष्यास पडणारे स्वप्न विषय, त्यातील विषय. व पहाणारा सर्व तोच असतो. [1]
(९८) वैखानः :  - जो पृथ्वीचे खनन करतो. अध्यात्मिक मूल्ये नष्ट करणार्‍या असूरी प्रवृत्तीच्या भयानक हिरण्याक्ष राक्षसाला मारण्याकरतां पृथ्वीची दृढ घनता आपल्या दातांनी खणून भगवंत पाताळात पोहोचले व त्याचे सूक्ष्मरूप ओळखून त्यांनी त्या राक्षसास नष्ट केले. त्याचप्रमाणे आत्मप्रकाश आपल्या आतपर्यंत (अंतरंगात) पोहोचला तर अहंकार नष्ट होईल व शरीर मन बुद्धिच्या दुष्ट आसक्तीतून आपली सुटका होईल.[2]
(९८) सामगायनः :  - जो स्वतः सामगायन करतो तो.
(९८) देवकीनन्दनः :  - कृष्णावतारामध्ये जो देवकीचे पोटी जन्मला तो. जन्मापासून देवकी त्याला केवळ दुरूनच पाहूं शकली. तो गोकुळांत असल्यानें त्याच्या बाललीला, क्रीडा लांबूनच अनुभवू शकली व त्यात तिने आनंद मानला म्हणूनच तो देवकीनन्दन.
(९९) स्रष्टा :  - जो सृष्टी उत्पत्ती करतो तो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही आपले कार्य करण्याकरतां लागणारी शक्ति व कौशल्य त्या परमात्म्या नारायणापासूनच प्राप्त करतो.
(९९) क्षितिशः :  - क्षिती म्हणजे पृथ्वी, तिचा स्वामी. श्रीनारायण हा भूमातेचा पति असल्याने तिचा रक्षणकर्ता, पालनकर्ता व पोषणकर्ता आहे. येर्थ क्षिती म्हणजे जड प्रकृती किवा माया असाही अर्थ होतो व तो नारायण लक्ष्मीपति होय.
(९९) पापनाशनः :  - ज्याचे ध्यान केले असता सर्व वासना पाप नष्ट होते असा. जेव्हा भक्त त्याच्या प्रेमामध्ये समर्पित होऊन आपली सर्व कर्तव्य कर्मे करतो तेंव्हा त्याच्या सर्व वासना नष्ट होऊन जातात. व नवीन निर्माणच होत नाहीत. वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या कर्मयोगाचे हेच मूलतत्व आहे. आत्मस्वरूप नारायणाचे ध्यान केले असतां सर्व पापे नाहीशी होतात व कायमची दूर केली जातात.
डॉ. सौ. उषा गुणे.



[1]   हेच ९८, ९८ या संज्ञांनी सुचविले आहे.
[2]  अहं = जीव. हिरण्य = सोने. अक्ष = डोळा, दृष्टि. सोन्याचा डोळा (दृष्टि) असलेला म्हणजेच इंद्रियांकडून मिळणार्‍या विषसुखाकडेच ज्याची दृष्टि आहे असा. केवळ भगवंतच त्याचा पूर्ण नाश करू शकतात.

03 January, 2012

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०५

श्लोक १०५
यज्ञभृद्यज्ञकृत यज्ञी यज्ञभुग्यज्ञसाधनः 
यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यन्नमन्नाद एवच  ।।
(९७) यज्ञभृत् :  - यज्ञाचे अनुशासन करणारा. जो स्वार्थरहित समर्पित भावनेने केलेली सेवारूप सत्कर्मे (यज्ञ) करण्यामध्ये आपल्याला मदत करतो व पूर्णतेला नेतो तो यज्ञभृत् श्री नारायणच होय.
(९७) यज्ञकृत् :  - यज्ञ करणारा. किवा दुसरा अर्थ यज्ञ नष्ट करणारा. यज्ञ म्हणजे स्वार्थरहित मनाने भगवंतावरील पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने व आनंदाने केलेली सेवारूप सत्कर्मे.[1] भगवंत स्वतः सर्व सृजनकर्म याच यज्ञभावनेने करत असतो. व याच यज्ञाचा शेवटही विलयरूपाने तोच घडवून आणतो. म्हणूनच तो 'यज्ञकृत्' आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सज्जनांचा यज्ञ (सत्कर्मे) तो पूर्ण करतो व दुर्जनांचे कर्म नष्ट करतो म्हणून तो यज्ञकृत् आहे.
(९७) यज्ञी :  - सतत चालणार्‍या यज्ञांचा तो नित्य भोक्ता आहे असा. ज्याअर्थी सर्व यज्ञामध्ये सर्व क्रिया नारायण केंद्रित व नारायण समर्पित होतात त्याअस्र्थी तोच 'यज्ञी' आहे, यज्ञाचा भोक्ता आहे.
(९७) यज्ञभुक् :  - यज्ञाच्या अग्निमध्ये जे जे समर्पित केले जाते व ज्या ज्या देवतांना आदरांने व आनंदानें आवाहन केले जाते ते सर्व नारायणास जावून मिळते. कारण तोच सर्व देवतांचे रूप धारण करीत असल्याने त्याचे सर्व हविर्भाव नारायणासच समर्पित होतात.
(९८०) यज्ञसाधन :  - जो सर्व यज्ञ पूर्ण करतो तो. त्याच्याच कृपेने सर्व प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक केलेली सत्कर्मे अत्यंत सुयश प्राप्त करतात.
(९८) यज्ञान्तकृत् :  - जो यज्ञाचे शेवटी केले जाणारे कर्म म्हणजेच पूर्णाहूती जो पूर्ण करतो तो यज्ञान्तकृत्. यज्ञाचे शेवटी पूर्णाहूती देतांनां श्रीनारायणासच अनन्यतेनें व श्रद्धेनें आवाहन केले जाते या पूर्णाहुतीखेरीज यज्ञाची समाप्ती होत नाही. म्हणून श्रीहरिच पूर्णाहुतीरूप होतो. जेव्हा सर्व कर्मे त्याच्या सर्व साधनांसहित पूर्णपणे यज्ञांत समर्पित केली जातात तेंव्हाच आत्मस्वरूप नारायणाच्या दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडून येतो.
     कांही टीकाकार यज्ञान्त शद्बाचा पूर्णाहुती असा अर्थ करीत नाहीत. तर अन्त म्हणजे शेवटी मिळणारे फल. अर्थातच या संज्ञेचा त्यांनी दिलेला अर्थ होईल 'हरि समर्पित अशा निस्वार्थी, प्रेमळ सेवायुक्त कर्माचे फल देणारा तो परब्रह्मस्वरूप श्रीनारायण
(९८) यज्ञगुह्यम् :  - सर्य यज्ञामध्ये ज्या परमसत्याचा साक्षात्कार होतो तो आहे 'श्री नारायण'. देहकुंडामधील ज्ञानाग्नीमध्ये (जाणीवेमध्ये) सर्व विषय द्रव्यांचे हवन केल्यानंतर ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेच हे परमगुह्य होय. हा व्यष्टिमध्ये होणारा यज्ञ गीतेमध्ये 'ज्ञानयज्ञ' म्हणून संबोधिला आहे. वेदांमध्ये यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले आहे.[2]
(९८) अन्नम् :  - जो स्वतः अन्नस्वरूप झाला आहे तो श्रीनारायण. इंद्रियांचे विषय हा इंद्रिंयाचा आहार होय. (अन्न) ही संज्ञा क्रियापद स्वरूप समजल्यास प्रलयाचेवेळी सर्व विश्वाला जो खाऊन टाकतो तो नारायण. आपण झोपलो असता जसे आपले विश्व आपल्यामध्ये लीन होते त्याप्रमाणे प्रलयाचे वेळी सर्व विश्व त्याचेमध्ये विलीन होते. ज्याचेमध्ये सर्व नामरूपात्मक विश्व बीजरूपाने स्थित होते तो परमआत्मा नारायण अन्नस्वरूप आहे.
(९८) अन्नादः :  - जो अन्न खातो तो. केवळ बाह्य विश्वच नारायण स्वरूप नाही तर त्याचा आनंद घेणारा उपभोक्ता अहं  हाही नारायणस्वरूपच आहे. आपल्यामधील अनुभव घेणारा, इंद्रियांचे माध्यमातून कार्य करणारा जीवात्मा हा सुद्धा आत्मस्वरूप आहे, म्हणून आत्मा हाच एकाच वेळी अन्नही (भोग्य) आहे व अन्नाद (भोक्ता ) ही आहे. आपले जागृतावस्थेतील मनच स्वप्नावस्थेचा अनुभव घेणारा भोक्ता आणि भोग्य होते तसाच तो ’अन्नाद’ आहे.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्वध्वनेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ गेता ३.१० – सृष्टि उत्पत्तिचे सुरवातील प्रजापतीने (ब्रह्मा) यज्ञासह सर्व प्रजेची (मानवांची) उत्पत्ति केला. त्याने आदेश दिला याच (यज्ञाचे) सहाय्याने तुम्ही वृद्धि पावाल. हाच तुम्हाला कामधेनूप्रमाणे सर्व इष्टफल देवो.
[2]  वीनच उत्पन्न झालेल्या जिज्ञासारूपी अग्नीमध्ये आम्ही आमचे अज्ञान व निकृष्ट वासनारूपी द्रव्याचे हवन करून टाकतो त्यायोगे दिव्य अशा आत्मतेजाची प्राप्ती होते.