Wednesday, April 30, 2008

मानसमणिमाला (६)

मानसमणिमाला (६)
हिंदी : मज्जन फल पेखिअ तत्तकाला ।
काक होहिं पिक बक‍उ मराला ॥ १ ॥
सुनि आचरज करै जनि कोई ।
सतसंगति महिमा नहिं गोई ॥ २ ॥ बालकाण्ड.
मराठी: मज्जन फल तत्काल पहावे ।
बकेंहंस पिक काकें व्हावे ॥ १ ॥
ऐकुनि कुणि विस्मय ना माना ।
गुप्त संतसंगति महिमा ना ॥ २ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : साधुसमाजरुपी प्रयागात मज्जन केल्याचे म्हणजेच संतसंगतीचे फल तत्काल मिळते. अहो ! बगळा हंस होतो आणि कावळा कोकीळ होतो. हे ऐकून आश्चर्य वाटून घेऊ नका बरं ! कारण संतसंगतीचा महिमा, परिणाम कांही गुप्त नसतो !

संतसज्जनांच्या चरित्राचे अवलोकन केले, त्याचे खूप मनापासून चिंतन मनन केले म्हणजे त्यात गुडी मारली (मज्जन) तर त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत विचारावरही झाल्याखेरिज राहात नाही. जशी माणसाची विचारसरणी असते तसे माणसचे आचरण असते. व ही विचारसरणी बहुतांशी बाहेरच्या संस्कारांनीच होत असते. मातापिता, गुरुजन व मित्र-परिवाराच्या विचारांचा संस्कार मनुष्याचे मन ताबडतोब उचलते. त्यामुळे कदाचित्‌ दुर्वृत्तीचेही संस्कार मनुष्य उचलतो आणि त्याचे वर्तन दुर्वृत्त होते. मन सहजतेने अधोगामी होते व त्या दुष्कृत्यांतून मिळणार्‍या सहज सुलभ सुखोपभोगांत बुडून जाते आणि पुन्हा पुन्हा तीच साखळी चालूच राहते.
परंतु सुखामागून दुःखे येणार हे निश्चितपणे ठरलेलेच असते व अशा वेळी आपल्या दुष्कृत्याबद्दल शिक्षा भोगण्याची, पश्चात्ताप करण्याची पाळी येते. पण शिक्षा भोगून, पश्चात्ताप करूनही जर त्या दुष्प्रवृत्तीमधून बाहेर कसे पडावे हे समजले नाही तर जीवन फारच दयनीय होऊन जाईल. अशावेळीं मनुष्याला परमेश्वराच्या कृपेने संताच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला तर त्याच्या जीवनांत अमूलाग्र बदल होईल व त्याचे जीवन धन्य होईल. बिनु सत्‌संग बिबेक न होई । रामकृपा बिनु पाव न तेहि ॥
रामक्रुपा मागण्याकरितां देवाजवळ जाणे सोपे थोडेच आहे ? परंतु संतसंगती - सकल सुलभ सब दिन सब देशा - सादर सेवत शमवी क्लेशां ॥ - अशी असल्याने थोड्या प्रयत्‍नानें व स्वतःच्या सदिच्छेनें प्राप्त होऊ शकेल. पण या संतसंगतीचे फल मात्र अलौकिक, खरोखर अनिर्वचनीय असते.
संत तुलसीदास म्हणतात, अहो ! कावळासुद्धा मंजुल आवाजाचा होईल आणि अगदी दांभिक बगळा सुद्धां सत्वगुणी राजहंस होईल. आणि यांत आश्चर्य वाटण्यासारखे कांही नाही. कारण हा आहे सत्‌संगतीचा प्रभाव. !
संत आपल्या आचरणाने, उपदेशानें, प्रेमाने दुर्जनांच्या स्वभावातील दुष्टता, विकृत विचारसरणी नाहीशी करतात व त्यांना सन्मार्गावर आणतात. पुराण प्रसिद्ध वाल्या कोळी आदि कवी वाल्मीकि झाले आणि अहंमन्य कर्मठ रामेश्वर भट्ट तुकोबांचे निस्सीम भक्त झाले ! असा संतसंगतीचा परिणाम अगदी अनिर्वचनीय असतो आणि अगदी हमखास घडून येणारा असतो. म्हणून परमभक्त तुकोबाराय स्वतःच देवाजवळ मागणी करतात - नलगे मुक्तिसंपदा - संतसंग देई सदा - हेचि दान देगा देवा !
डॉ. सौ. उषा गुणे.

Tuesday, April 29, 2008

तत्सुखे सुखित्वं

तत्सुखे सुखित्वं

दर्शनाचे तीन प्रकार - १) स्वप्नात प्रभूचे दर्शन - साधारण दर्शन २) मंदिरांत, मूर्तीत दर्शन - मध्यम दर्शन ३) भगवंताचे अपरोक्ष दर्शन - उत्तम दर्शन.
द्रष्टा म्हणजे पाहणारा, भगवंताला पाहतांच भगवत्‌मय होऊन जातो त्याला "उत्तम दर्शन", अपरोक्ष साक्षात्कार असे म्हणतात. भगवंत जगात ओतप्रोत भरला आहे, असा अनुभव घेता घेता जो देवांत विलीन होऊन जातो तोच भगवंताचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. भगवंत सर्वव्यापक आहे.
तो मूर्तीत व मंदिरांत आहेच, पण तेवढाच तो नाही. दृष्टी जाईल तेथे तेथे भगवंत आहे, इतकंच काय पण मन जेथे जेथे जाईल तेथे तेथे पण तोच परमात्मा आहे. हेच भगवंताचे "उत्तम दर्शन". जो भगवंत माझ्यात आहे तो सर्वांमध्ये आहे. अखिल जगत भगवंतच आहे.
आपण जे जे कांही करतो ते देवासाठीच करतो अशी भावना असल्यावर त्या सर्व कर्माची परिणतता एका भक्तीतच होते. अशा तन्मय भक्तीने जीव कृतार्थ होतो. गोपी भक्ति मार्गाच्या आचार्या. त्यांचा आदर्श मन, डोळे यांच्यासमोर असावा.
सुखाचा साथी जीव आहे. दुःखाचा साथी भगवंत आहे. नेहमी ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. मनुष्य पैसे मिळविण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, कष्ट करतो, दुःख सोसतो, त्यापेक्षा जरा थोडे तरी प्रयत्न, कष्ट तो एका सच्चिदानंदस्वरूप देवासाठी करील, तर त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितच होईल.
श्रीकृष्ण तर न बोलावतांही गोपींच्या घरी जात असे. मग तो आपल्या घरीं कां बरे येत नाही ? आपल्या चित्तांत कां ठसत नाही ? याचा विचार कधीतरी आपल्या मनांत येतो का ?
श्रीठाकूरजींना लोणी फार प्रिय. लालाला लोणी फार फार आवडते. उत्तरेत एक वाक्‍प्रचार आहे "लालाको मख्खन भाये रे । कुछ और काम न आये रे ॥" लोणी सर्वाचे सार आहे. भगवंत पण साराचेही सार आहे. आपला भगवान बाळकृष्ण सारभोगी आहे. वैष्णवही सारभोगी असतात.
भक्ति हे प्रेमाच शास्त्र आहे. भक्ति हा पांचवा पुरुषार्थ आहे. परमप्रेमस्पद चिंतनात भान विसरते ती भक्ति. भगवंत हा प्रेमस्वरूप आहे. भक्तिमार्गात वेगळेपणा राहात नाही. विभक्त नव्हे तो भक्त. भक्ताला भगवंताचे, शिष्याला श्रीगुरुचे, रोग्याला औषध- पथ्यपाण्याचे ध्यान असावे. ध्यानाने तन्मयता वाढते, भक्ति-प्रेम भाव वाढतो. भगवंत अशा भक्ति-प्रेमाने ऋणी होतो. भक्ति-प्रेम भावांत हक्काची भावना अंतरात निर्माण करते.’स्व-सुख सुखित्वाला’ तिलांजली देऊन ’तत्सुख सुखित्वाचे’ संवर्धन हीच भक्ति. अशी भक्ति भगवंताने अण्णाला द्यावी हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
प्रभु रामचंद्रांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना सप्रेम भेट म्हणून पारितोषिके दिली, पण हनुमंताला कांहीच दिले नाही. म्हणून सीतामाईंना वाईट वाटले. त्या रामाला म्हणाल्या, "मारुतीला पण कांही द्या ना ? " श्रीराम म्हणाले, "त्याला मी काय देऊ ? त्यानेच माझ्यावर किती किती उपकार करून ठेवले आहेत". मारुतराय काय म्हणाले ? "सनमुख होई न सकत मन मोरा । " - म्हणाले, "प्रभू माझं मन कांही आपल्या पुढ्यात सन्मुख होत नाही, तेवढं करा". भक्ति-प्रेमात अपेक्षेचा भाव आला की भक्ति-प्रेम संपलेच. भगवंताने ही अपेक्षेची भावना अण्णाचे मनांतून तडीपार करावी. अपेक्षा असली तर भक्तिनें ती पूर्ण होते पण भगवंत मात्र हातातून निसटून जातो.
शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्ति-सूत्रात म्हटले आहे "तत्सुखे सुखित्वं प्रेमलक्षणम् " - अन्याच्या सुखांत सुख अनुभवणे हे खर्‍या भक्तिप्रेमाचे लक्षण आहे. दयाघन, कृपाळू भगवंताने हा बोध अण्णाला द्यावा हीच प्रार्थना -

अण्णा -

Thursday, April 10, 2008

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

प्रारब्ध कर्माचा क्षय ती भोगल्यानेच होत असतो, म्हणून जीवनमुक्तांनाही देह पडेपर्यंत प्रारब्धकर्म करावीं लागतात व त्याच बरोबर भोगावी लागतात, असा वेदान्ताचा सिद्धांत आहे. आणि त्याच बरोबर अनेक जीवनमुक्त संत महात्म्यांच्या चरित्रावरून तर या प्रमेयाला बळकटी येते. अधिकच.

हे उरलेले प्रारब्धकर्म जन-कल्याणसाठी, जन समाज प्रबोधनासाठीं, लोकांच्या मनांत परमार्थाचे ज्ञान ठसविण्यासाठी असते असे सामान्यतः दिसून येते. "प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला" - श्रीतुकोबाराय पण ग्वाहीपूर्वक सांगतात कीं - "तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरतां ॥" संतांच्या या कर्मयोगाने जगाची, समाजाची पारमार्थिक उन्नती होत असते.

’कां फोडीत पापताप । पोखीत तिरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥
तैसी बांधिली सोडीत । बुडालीं काडत ।
सांकडी फेडीत । आर्तांचिया ॥
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उधळती ।
आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥

वरील सुंदर ओव्यांत श्रीज्ञानराज माऊलींनी वर्णिल्याप्रमाणे देह पडेपर्यंत नराला नारायण करण्याचे व याच प्रकारे, याच मार्गांनी व्यक्तिमात्राला व त्यामुळे समाजाला स्वरूपसुखशांती प्राप्त करून देण्याचे व्रत संत आचरीत असतात. मानवाला आपल्या मूलभूत भगवत तत्त्वाचे, परमतत्त्वाचे सतत स्मरण देऊन, भगवंतस्वरूप होण्याचा मार्ग दाखविण्याचे महत्‌कार्य या संत माहात्म्यांकडून सतत, सहजतेने घडत असते. "सहज बोलणे हित उपदेश । करोनि सायास शिकविती॥". आणि साधन मार्ग काय म्हणाल तर एकच - "नामस्मरण".

म्हणूनच त्यांची ही थोरवी अनेक थोर थोर संत पुरुषांनी अगदी मुक्त कंठाने व प्रेम, कृतज्ञता व अत्यंत आदर या भावनांनी दाटलेल्या अंतःकरणाने गायिली आहे. तत्त्वज्ञ म्हणतात - They are the salt of the Earth. "हे महात्मे म्हणजे जगाला सुपीकता व रस देणारे मीठ होत" - ते नसतील तर जगांत सगुणांचे व शाश्वत सुखरुपतेचें पीक येणार नाही.

अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याचा मनुष्य सदा प्रयत्न करीत असतो. परंतु बहुतेकांना एकदेशी पूर्णतेचे आकर्षण वाटते. थोड्याच जणांना सर्वांगीण पूर्णतेचे आकर्षण वा ओढ असते. थोडेच प्रयत्न करतात. हीच नवजागृति किंवा परमार्थप्रवृत्ति.

परमार्थ साधनेने परमानंदाची प्राप्ती. परमानंदाने जीवनांतील अध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा तापत्रयाचा नाश. सर्वाभूतीं आत्मभाव, व त्या योगे विश्वात्मक भाव. मग "सर्वही सुखरूप असावेत" असा एकच एक जीवनहेतू उरतो. संकुचित स्वार्थाचे स्मरणही राहात नाही. मग भगवंतच खरा, इतर सर्व आभास असा निश्चय/अनुभव. या अनुभवाने विश्वाचे कोडे सुटतें आणि भक्तिप्रेमभाव, निर्भयता, आदर, देव-भक्तांचे ऐक्य, आणि ऐक्यातून होणारी "भक्तिप्रेमसुखसेवा" या भावनांबरोबर एकरूपता अनुभवत, भ्रांतीनाश होतो, संशयरहितता येते. या आत्मानंदरूप स्थितीने भावनांना, भक्तिला, प्रेमाला, भक्ति-भाव-प्रेमाला पूर्णत्व येते. त्याचबरोबर विश्वात्मक भावाने त्यांच्या क्रियाशक्तीच्या व्यापाराला (WILL) पण पूर्णता येते.

हीच मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता, धन्यता, स्वरूप सुखाची परमोच्च अवस्था. मग "याचि देही याचि डोळां । भोगिजे मुक्तिचा सोहळा ॥" असा शेवटचा दिवस गोड होतो. आपण केलेल्या नामसाधनेचें (नामस्मरणाचें) असे मधुर, रसाळ, परिपक्व महान फळ आलेले पाहून स्वतःचे स्वतःलाच मोठे कौतुक वाटते. मुक्तीशी लग्न लावून, साक्षात्कारी महात्मा, जीवनमुक्त अवस्थेतील आपले उरलेले जीवन भक्ति-प्रेम सुखाच्या खेळीमेळींत आनंद लुटत असतांना आपल्याला मिळालेला आनंद जगाला वाटत असतो.

"सेवितो हा रस, वाटी तो आणिका ।
घ्यावे होऊ नकां रानभरी ॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू ।
नका चडफडूं घ्यारें तुम्ही ॥ "
’देवाचा प्रसाद घ्या’ , ’आनंद व्हा’ हीच त्यांची तळमळ आणि आनंद होण्याचे साधन एकच - देवाचे "नाम".

अण्णा -

Sunday, April 6, 2008

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

प्रेमाची ऐसी जाती - लाभाविण प्रीति -

आज गुढीपाडवा - सर्व वाचकांना, त्यांचे कुटुंबिय व आप्तजणांना हे नववर्ष सुख, समृद्धि आणि अखंड नामाने युक्त असे जावो ही परमेश्वराकडे आणि श्रीमहाराजांकडे प्रार्थना -
सद्‍गुरूंनी सांगितले, ' तुम्ही फक्त नाम घ्या, आणखी काही करू नका. ' आपल्यापैकी बरेचजण त्यातील गर्भितार्थाकडे लक्ष न देता केवळ शब्दच - शब्दार्थच पाहतात असे बरेच वेळेस जाणवते. मला वाटते यामागचे थोडे शास्त्र पाहणे वावगे होणार नाही. नामाबद्दल भगवद्‍गीतेचा १७.२३ श्लोक सांगतो - ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः - परब्रह्माचा ॐ तत्‌ सत्‌ अशा तीन प्रकारे नाम निर्देश केला आहे. ह्याचा अर्थ नामरूपरहित परमात्म्याला प्रथम केव्हांतरी नाम दिले गेले असे नव्हे तर परमेश्वराचा व नामरूपाचा संबंध अनादि आहे एवढेच. यावरच्या श्रीज्ञानदेवकृत दोन-तीन ओव्या पाहिल्यास भाव जास्त स्पष्ट होईल.
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं ।
ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ ३३० ॥
कष्टले संसारशिणे । जे देवों येती गार्‍हाणे ।
तया ओ दे नांवे जेणें । तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
हे असो प्रजापती । शक्ति जे सृष्टी करिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ ३३५ ॥
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ठेवलेल्या नांवाने हांक मारली की हे आपले नांव आहे असे समजून ते 'ओ' देते. संसारात शिणलेले जीव आपल्या दुःख निवारणार्थ जेव्हां परमेश्वराचा धावा करतात, तेव्हां ज्या नांवाने हांक मारली असता मी धावून येतो ते ॐ हे संकेत रूप नाम हेच होय. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. ह्यावरून काय दिसते ? नाम व रूपरहित निर्गुण परमात्म्यास सतत स्मृतीत ठेवणे कठीण म्हणून त्याला (जीवाने) नाम व रूप दिले, जेणेंकरून त्या (नामाच्या) योगे परमात्म्याशी अनुसंधानाने जडणे सोपे होते. ब्रह्मदेवाने (हाही एक श्रेष्ठ जीवच) जेव्हां 'नामाचिये आवृत्ति' केली तेव्हां त्याच्यासमोर कोणते रूप असेल ते असेल पण त्या नामाने त्याला थोर मात्र केले. अर्थात्‌ नामाबरोबर रूपाचीही आवश्यकता आहे. आणखी महत्त्वाचे म्हणजे नाम व रूप असलेले जे काही मूर्त स्वरूप असेल त्याच्या महतीची देखील थोडीफार तरी कल्पना असणे आवश्यक आहे. कोणी abrakadabra म्हणून जप केला तर त्याला काहीच साध्य होणार नाही हे सर्वविदितच आहे. अशा मूर्त रूपाची भक्ति करणे, प्रेम करणे शक्य होते. ह्यासाठी अमूर्त ॐ ऐवजी मूर्त देवाचे नाम घेणे सोपे. बरे इतक्या देवांमध्ये रामच कां ? कारण परमेश्वराच्या अनेकअवताररूपांत 'राम' ह्या नामाने निर्देशित रूप अत्यंत आदर्श असे आहे. रामायणाची सुरुवातच पाहिली तर दिसेल की जेव्हां श्रीनारदांना श्रीवाल्मीकि मुनिंनी विचारले की, " या जगात गुणी, वीर्यवान, धर्माचे रहस्य जाणणारा, कृतज्ञ, सत्यवचनी, प्रतिज्ञापालक, सद्वर्तनी, सर्वहितैषी, विद्वान, शक्तिमान, सुंदर, विवेकी, संयमी, तेजस्वी, अनिंदक (केवढी गुणांची यादी ही - ही माझी नव्हे, रामायणात आहे सर्ग १ श्लोक २ ते ४) ह्या सर्व गुणांनी युक्त कोण आहे ?" सर्वज्ञ अशा श्रीनारदांनाच जर ह्याशिवाय दुसरे रूप आदर्श माहीत नाही तर दुसरी आदर्श व्यक्ति असणे शक्यच नाही - मग श्रीराम ही सर्वांत आदर्श मूर्ति ठरणे हेओघाने आलेच. श्रीरामरूप भगवंताचे नाम घेणे - नामाची आवृत्ति करणे - नामस्मरण करणे म्हणजे दिव्यशक्तियुक्त देवाच्या प्रतिकाचे सतत स्मरण - अनुसंधान करणे. गुरुदेव रानडे म्हणतात - Name is a symbol of God, carrying spiritual divine power, and therefore Namasmarana is the process of constant identification with the Infinite - नामस्मरण म्हणजे देवाशी एकरूप होण्याची प्रक्रिया.
आता जरा श्रींचे आजचेच (६ एप्रिल) प्रवचन पाहू. फक्त पहिली ओळच पहा. 'व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार.' 'चांगले वागणे' म्हणजे आदर्श डोळ्यासमोर आलाच. मी माझा लोभ, माझा राग, माझी विषयासक्ति हे सर्व कायम ठेवून "नाम घेत राहिल्याने आपोआप नाहिसे होतील" असे म्हणत त्यांच्या निवृत्तिबद्दल विचारही न करणे अशाने व्यवहारात चांगले वागणे जमू शकेल का ? पुढे म्हणतात - 'भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते.' हा संक्षिप्त उपदेश झाला. त्यावर चिंतन करा असे पुढे सांगावयाची आवश्यकता नाही. भगवंत म्हणजे सत्‌ चित्‌ आनंद - मी माझा लोभ, माझा राग, माझी आसक्ति कायम ठेऊन निरंतर समाधान, अबाधित आनंद स्थितीच्या प्राप्तीची कल्पनाही करू शकत नाही. समाधानात, आनंदात राहता आले तर भगवंत म्हणजे काय हेही कळते आणि एममेवाद्वितीयं असा भगवंत समजला, समत्व दृष्टी लाभली की 'मी' असा वेगळा राहातच नाही. श्रीरामाप्रमाणेच सद्‌गुरूंचे गुण सतत स्मरणात ठेवणे आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्‍न करणे हेही गरजेचे आहे. आधी एकच गुण पाहू - दुसर्‍यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून, दुसर्‍यावर लाभाविण प्रीति करणे. जो कोण संपर्कात येईल त्यावर श्रीमहाराजांनी निर्भेळ प्रेमाचा वर्षाव केल्याशिवाय का भक्तगण त्यांची एवढी भक्ति करायचे ? माझ्यापुरते म्हणायचे तर मी म्हणेन हा एकच गुण जरी अंमलात आणता आला तरी माझ्या ह्या जन्माचे सार्थक झाले, बाकीचे पुढच्या जन्मी बघू. 'नाम घ्या' हा श्रींचा core संदेश झाला. सर्वांगिण उपदेश लक्षात घ्यायचे म्हटले तर - नम्र व्हावे सर्वां भूता, परनारी राहो माता, आल्या अतिथा अन्न द्यावे. . . नामात मुरले पाहिजेच - पण त्याला नीतिची, सदाचरणाची, कर्तव्याची जोड देणे नितांत आवश्यक आहे हेही सांगितले. आणखी काही करू नका म्हणजे आपल्याला जे झेपणार नाहीत अशा इतर फंदात(उपासतापास, योग, ध्यानधारणा इ. साधने यांत) पडूं नका एवढाच त्याचा अर्थ.
एकोहम् -