11 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ४० वा

तटित्त्वन्तं भक्त्या तिमिर-परिपन्थि-स्फुरणया
स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।
तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं
निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ॥ ४०॥


हे आई जगज्जननी ! माझ्या देहातील मणिपूरचक्र हें तुझेंच चक्र आहे. तुझ्या या मणिपूरचक्रांत भगवान् सदाशिव हे मेघेश्वररूपानें वास्तव्य करीत आहेत. कोणी त्यांना अमृतेश्वर असेही म्हणतात. तेथें त्यांच्या वामभागीं तूं अमृतेश्वरी या रूपाने अथवा सौदामनीदेवी या रूपाने विराजमान झालेली आहेस. तुझ्यासह त्या मणिपूरचक्रांत विराजमान असलेल्या अमृतेश्वराची मी भक्तिपूर्वक उपासना करीत आहे. ते मेघेश्वर महादेव हे 'तटित्वात्' आहेत. तटित् म्हणजे विद्युल्लता. मेघामध्ये जशी विद्युल्लता शोभावी तशी तूं सौदामनीदेवी अमृतेश्वराच्या सान्निध्यांत शोभत आहेस. तूं त्यांची शक्तिच आहेस. विद्युलतेनें युक्त असलेला मेघ हा वृष्टि करण्यास उद्युक्त असतो हें प्रसिद्धच आहे. विद्युल्लतेचें स्फुरण म्हणजे प्रकाश हा 'तिमिरपरिपन्थि' म्हणजे अंधकाराचा नाश करीत असतो. विद्युत् ही क्षणभरच प्रकाशत असते, पण तूं मात्र अमृतेश्वराच्या सान्निध्यांत नित्य स्थिररूपानें विराजमान झालेली आहेस. तामिस्रलोकस्वरूप असलेल्या मणिपूरचक्रांतील तिमिराचा नाश तुझ्याचमुळें होत असतो. तूं आपल्या अंगावर धारण केलेल्या अनेक रत्नजडित अलंकारांतील रत्नांच्या कांतीनें अमृतेश्वररूपी मेघामध्यें जणुं कांही इंद्रधनुष्यच निर्माण झालेलें आहे असे वाटतें. ढगांमध्ये दिसणारे इंद्रधनुष्य हें देखील वृष्टीचें द्योतक असतेंच. आई ! तुझ्या सान्निध्यांत असलेले मेघनाथ हे श्याम म्हणजे कृष्णवर्ण आहेत. मेघाचा कृष्णवर्ण देखील मेघ वृष्ट्युन्मुख असल्याचेंच सूचित करीत असतो. तुझें मणिपूरचक्र हें एक त्या अमृतेश्वराचें मुख्य मंदिर आहे. असें हे तुझ्याच सामर्थ्यामुळे समर्थ असलेले श्रीमेघनाथ हे हर म्हणजे अग्नि आणि मिहिर म्हणजे सूर्य यांच्या योगाने पतप्त झालेल्या त्रिभुवनाला अमृताची-जलाची वृष्टि करून शांत करीत आहेत. तात्पर्य, आई ! प्रलयकालीन अग्नि-सूर्याच्या तापाने तप्त झालेल्या त्रिभुवनाला शांत करणारे भगवान् अमृतेश्वर हे तुझ्याच सामर्थ्याने संपन्न असून ते तुझ्याच मणिपूरचक्रांत तुझ्यासह वास्तव्य करीत आहेत. मी तुम्हां उभयतांची भक्तिभावानें उपासना करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर श्लोक तीनप्रमाणें यंत्र काढून त्यांत श्रींच्या जागी ठं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मध, दूध, पायस आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. तें यंत्र उशीत घालून झोपावे. इष्ट वस्तूचे स्वप्नांत दर्शन घडेल. 



10 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३९ वा

तव स्वाधिष्ठाने हुतवहमधिष्ठाय निरतं
तमीडे संवर्तं जननि महतीं तां च समयाम् ।
यदालोके लोकान् दहति महति क्रोधकलिते
दयार्द्रा या दृष्टिः शिशिरमुपचारं रचयति ॥ ३९॥


हे आई जगजननी ! माझ्या देहांतील स्वाधिष्ठानचक्र हें तुझेंच आहे. कारण त्याची तूं अधिष्ठात्री देवता आहेस. आई ! त्या तुझ्या स्वाधिष्ठानचक्रामध्यें असलेल्या अग्नितत्त्वाच्या ठिकाणी संवर्ताग्नीच्या रूपानें भगवान् सदाशिव निरंतर तन्मयतेनें वास्तव्य करतात. त्यांना तेथें संवर्तेश्वर असें म्हणतात. त्यांच्या वामभागीं सर्वश्रेष्ठ अशी तूं समया, समयांबा अथवा समयादेवी या नांवानें विराजमान झालेली आहेस. मी तुम्हा दोघांचीही "ईडे" म्हणजे स्तुति करीत आहे. आई ! संवर्ताग्नीच्या रूपाने स्वाधिष्ठानचक्रांतील अग्नितत्त्वाच्या ठिकाणी ज्या वेळेला भगवान् शंकर हे प्रलयाग्नीच्या रूपाने अधिष्ठित होतात त्या वेळीं त्यांचा आलोक म्हणजे प्रकाश किंवा ज्वाला क्रोधाने वाढू लागतात. भगवान् शंकर हे त्या वेळेला संहाराच्या अवस्थेंत असतात. म्हणून त्यांचा प्रक्षोभ होत असतो. प्रक्षुब्ध झालेल्या सदाशिवस्वरूप संवर्ताग्रीच्या ज्वाळा लोकांचा जेव्हां दाह करूं लागतात त्याच वेळेला आई ! तुझी दयार्द्र दृष्टि भक्तजनांना शीतोपचार करीत असते. तुझ्या कृपापूर्ण दृष्टीनें होणाऱ्या शीतल उपचारामुळे तुझ्या भक्तांना प्रलयाग्नीच्या ज्वालाही थंडीच्या दिवसांत अग्नीजवळ बसून शेकावें त्याप्रमाणें सुखदायक वाटतात. तात्पर्य, स्वाधिष्ठानचक्रामध्यें विराजमान असलेल्या संवर्तेश्वररूपी भगवान सदाशिवांशीं सर्वस्वीं अभिन्न - एकरूप असलेली तूं समयांबा पराशक्ति, मी तुझें स्वाधिष्ठान चक्रांत ध्यान करीत आहें. मी तुझें भक्तिपूर्वक स्तवन करीत आहें.

श्लोक तेराप्रमाणे सोन्याच्या पत्र्यावर चतुष्कोण काढावा. त्यांत वरच्या ओळींत ठं पं पः हीं अक्षरे लिहावींत. खालच्या ओळींत दोन दोन अक्षरांच्या खालीं ष आणि सं ही अक्षरे लिहावींत. बारा दिवस यंत्राची पूजा करावी. रोज एकशेआठ वेळां या श्लोकाचा जप करावा. दूध, पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. हें यंत्र धारण केल्यास वाईट स्वप्ने पडण्याचें थांबते व दुःस्वप्न-दोष टळतो.

09 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३८ वा

समुन्मीलत्संवित्कमल-मकरन्दैक-रसिकं
भजे हंसद्वन्द्वं किमपि महतां मानस-चरम् ।
यदालापादष्टादश-गुणित-विद्या-परिणति-
र्यदादत्ते दोषाद् गुणमखिलमद्भ्यः पय इव ॥ ३८॥


आई जगज्जननी ! हें माझ्या हृदयाच्या सान्निध्यांत असलेलें अनाहतचक्र हें तुझेंच आहे. यालाच संवित्कमल असें म्हणतात. कांहीं विद्वान् संवित्कमल शब्दानें वक्षस्थलामध्यें असलेलें निराळेंच अष्टदलकमल घेतात; पण तें बरोबर नव्हे. क्रमाने षट्चक्रांचे वर्णन चालू असतां क्रमप्राप्त अनाहतचक्र सोडून मध्येंच दुसऱ्या चक्राचा निर्देश आचार्य करणार नाहीत. हें कमल बारा पाकळ्यांचें आहे. याच्या प्रत्येक दलांत एक एक आदित्यदेवता विराजमान झालेली आहे. द्वादश आदित्यांचा प्रकाश या ठिकाणी सदैव विलसत असतो. ज्ञानाचे - आत्मज्ञानाचेंही तेंच स्थान असल्यामुळें त्याला संवित्कमल असें म्हणतात. "समुन्मीलत्" म्हणजे उत्तम रीतीनें विकसित होणाऱ्या या संवित्कमलांतील मकरंदाचा - पुष्परसाचा प्रामुख्याने आस्वाद घेण्यामध्यें रसिक म्हणजे तत्पर असलेले असे दोन हंस तेथें आहेत. एक हंस आणि एक हंसी. मानसरोवरामध्ये जसे राजहंस असावेत त्याचप्रमाणे योगीजनांच्या अथवा भक्तजनांच्या मानस म्हणजे अंतःकरणरूपी सरोवरामध्यें संचार करणारे ते जसे कांहीं हंसच आहेत. हे दोन हंस म्हणजे एक साक्षात् भगवान् सदाशिव आणि दुसरी प्रत्यक्ष तूंच आदिमाया महाशक्ति. तुम्हा दोघांना या अनाहतचक्रामध्ये हंसेश्वर आणि हंसेश्वरी असे म्हणतात. त्यांचें स्वरूप 'किमपि' म्हणजे अनिर्वचनीय आहे. त्या राजहंसांच्या एकमेकांशी होणाऱ्या संवादांतूनच अठरा विद्यांची परिणति म्हणजे विकास झालेला आहे. या अठरा विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचप्रमाणे या चारी वेदांचे चार उपवेद. आयुर्वेद, धतुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद म्हणजे शिल्पशास्त्र. तसेंच शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छन्दःशास्त्र ही सहा वेदांची अंगें आणि पूर्वोत्तर मीमांसाशास्त्र (मीमांसा आणि वेदान्त), न्यायशास्त्र, पुराण आणि धर्मशास्त्र. चौसष्ट कला आणि तंत्रशास्त्र वगैरे इतर विद्या या सर्वांचा या अठरा विद्यांतच अंतर्भाव होतो. राजहंस ज्याप्रमाणें एकत्र मिसळलेले दूध आणि पाणी यांचें पृथक्करण करतात त्याचप्रमाणे आई ! राजहंसस्वरूप असलेले तुम्ही दोघे देखील भक्तजनांच्या गुणदोषांचे पृथक्करण करून दोष बाजूला सारतां आणि गुणांचे ग्रहण करतां ! शंकरांनी लोकांना ताप देणारे विष कंठांत घातलें आणि आह्लाद देणारा चंद्र मस्तकावर धारण केला ! आई, मी तुम्हा दोघांना मनःपूर्वक भजत आहे.

कांहीं लोक या संवित्कमलामध्यें असलेल्या परमेश्वराला तो अग्नीच्या ज्वालेप्रमाणे असल्यामुळें ज्वालेश्वरमहादेव असें म्हणतात, तर त्यांच्या अर्धागीं विराजमान असलेल्या परमेश्वरीला ज्वालेश्वरीदेवी असें म्हणतात. नारायणोपनिषदांतही या अभिप्रायाने वर्णन केले आहे. "तस्य मध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थिता । नीलतोयदमध्यस्था विद्युल्लेखेव भास्वरा ॥" कंठस्थानाच्या खालीं वीतभर आणि नाभिप्रदेशाच्या ऊर्ध्वभागी हृत्कमलाचा निर्देश केलेला आहे. त्याच्यामध्ये वह्निशिखा म्हणजे अग्नीची ज्वाला दिसते. या ठिकाणी वह्निशिखा शब्दाने शुषुम्ना नाडी विवक्षित आहे. ती अग्नीच्या ज्वालेप्रमाणेंच दिसत असते. अत्यंत सूक्ष्म असते. उभी असते. पाण्यानें भरलेल्या ढगांत जशी वीज चमकावी त्याप्रमाणें ती भास्वर म्हणजे तेजस्वी दिसते. त्याच ठिकाणी साधकाला आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. "ज्वालमालाकुलं भाति विश्वस्यायतनं महत्" तें आत्मतत्त्व चोहोंकडून प्रकाशसमूहानें व्यापलेले दिसतें. विश्वाचे म्हणजे ब्रह्मांडाचे आयतन म्हणजे आधारभूत आहे. त्यालाच 'महत्' म्हणजे परब्रह्म असें म्हणतात. संवित्कमलामध्यें असलेल्या प्रकाश पुंजांत अग्निज्वालेप्रमाणें दिसणारी जी अत्यंत सूक्ष्म सुषुम्न नाडी आहे तिच्यांतच परमात्मतत्त्वाचा साक्षात्कार होत असतो. कारण तो तेथेंच प्रकटरूपानें आहे. "तस्याः शिखाया मध्ये परमात्मा व्यवस्थितः" असे त्याचें वर्णन केलेले आहे. त्यालाच नारायण असेंही म्हटलेले आहे. "नारायणः पर ब्रह्म तत्त्वं नारायणः परः । नारायणः परं ज्योतिरात्मा नारायणः परः" "स ब्रह्मा स शिवः सेन्द्रः सोक्षरः परमः स्वराट्" अशीं त्याला अनेक नांवें दिलेलीं आहेत. त्यालाच प्रकृतस्थलीं हंस असें म्हटले आहे. तो परमात्मा आपल्या शक्तीसह तेथें विराजमान असल्यामुळें त्याच्या शक्तीला हंसी असें म्हटलेले आहे. याप्रमाणें हृत्कमल, संवित्कमल आणि अनाहतचक्र ही तिन्ही कमलें वक्षस्थलींच असल्यामुळें त्यांचा व त्यांतील तत्त्वांचा एकरूपानें निर्देश केला गेला आहे. तात्पर्य, हंस आणि हंसी या रूपाने प्राणिमात्रांच्या हृदयांत शिवशक्तितत्त्व हें विराजमान झालेले आहे, ही गोष्ट निर्विवाद होय. याच अभिप्रायाने योगानुशासनांतही या हंसाच्या जोडीचे मोठे सुंदर वर्णन केलेलें आहे -

"अनुपममनभूति-स्वात्मसंवेद्यमाद्यं
वितत-सकल-विद्यालापमन्योन्यमुख्यम् ।
सकल-निगम-सारं सोऽहमोंकार-गम्यं
हृदृयकमल-मध्ये हंसयुग्मं नमामि ॥"

भूतमात्रांच्या हृत्कमलामध्यें विराजमान असलेल्या हंसाच्या जोडीला मी नमस्कार करतो. ती हंसाची जोडी मोठी अनुपम आहे. तिला उपमा देण्यासारखे या जगांत दुसरें कोणीच नाहीं. केवळ स्वतःच्या अनुभवानें स्वतःच जाणता येतें.  तें हंसाचें जोडपे सर्व विश्वाच्या अगोदरचें आहे. त्यांचे एकमेकांशी होत असलेले आलाप म्हणजे संभाषण हेंच सर्व विद्यांच्या रूपाने परिणत झालेलें आहे. त्या दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण हें सांगतां येत नाहीं. दोघेंही एकरूप असल्यामुळें त्यांचा अंगागीभाव हा अनिर्वचनीय झालेला आहे. ते सर्व वेदांचे सारभूत; आहेत. "सोऽहं" हे त्यांचें स्वरूप आहे. सोऽहं यांतील सकार शक्तिस्वरूप आहे, तर हकार हा शिवस्वरूप आहे. या शिवशक्तीच्या तादात्म्याचेंच दुसरें रूप "हंसः" असें आहे. अशा रीतीनें सोऽहं आणि हंसः ही दोन्ही एकरूपच आहेत. सोऽहं यांतच अभिव्यक्त होणारा ॐकार हाच त्या हंसांची ओळख करून देऊं शकतो. माते जगज्जननी ! ही हंसाची जोडी म्हणजे तादात्म्यभावापन्न शिवशक्तिस्वरूप तूंच आहेस. हृत्कमलवर्ती हंस आणि हंसेश्वरीरूप तुम्हां दोघांना मी भक्तिभावानें भजत आहें. मी तुमचा आश्रय करीत आहें. मी तुमच्या चरणी प्रेमपूर्वक प्रणाम करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्यांत कं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. अकरा उडदाचे वडे, तांबूल, नारळ, आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. तें यंत्र धारण करण्यास द्यावें. अथवा जल अभिमंत्रून प्रोक्षण करावे. लहान मुलांची सर्व अरिष्टे टळतील.

08 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३७ वा

विशुद्धौ ते शुद्ध-स्फटिक-विशदं व्योमजनकं
शिवं सेवे देवीमपि शिव-समान-व्यवसिताम् ।
ययोः कान्त्या यान्त्याः शशि-किरण-सारूप्यसरणे-
र्विधूतान्तर्ध्वान्ता विलसति चकोरीव जगती ॥ ३७॥


आई जगज्जननी ! कंठस्थानीं असलेल्या या षोडशदलात्मक विशुद्धिचक्राची अधिष्ठात्री देवता तूंच आहेस. तुझ्या या विशुद्धिचक्रामध्ये शुद्ध स्फटिकापमार्गे स्वच्छ असलेले भगवान् सदाशिव हे व्योमतत्त्वाचे जनक आहेत. व्योम म्हणजे आकाश. आकाशतत्त्व हे आत्मतत्त्वापासून अभिव्यक्त झालेले आहे. भगवान सदाशिव हे आत्मतत्त्वस्वरूपच आहेत. विशुद्धिचक्रामध्यें त्यांना व्योमेश्वर असे म्हणतात. आई ! मी त्यांची सेवा करीत आहे. त्याचप्रमाणे " शिवसमान-व्यवसितां त्वां देवीं अपि सेवे" विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय, निग्रह आणि अनुग्रह इत्यादि सर्व कार्यें श्रीशंकराप्रमाणेच तूं आपल्याकडेही घेतलेली आहेस. तूं या विशुद्धिचक्रांतील देवी आहेस, मी तुझीही उपासना करीत आहें.

आई ! या विशुद्धिचक्रांत व्योमेश्वराच्या सान्निध्यांत विराजमान असलेली व्योमेश्वरी आहेस. चंद्राच्या किरणाप्रमाणें आह्लाद आणि प्रकाश देण्याचे जिचे सामर्थ्य आणि स्वभाव आहे ती तुम्हां दोघांची कांति भक्तांच्या अंतःकरणांत प्रसरण पावूं लागली असतां भक्तांचे जग हे अंतःकरणानें अधिक निर्मळ होतें. त्यांच्या अंतःकरणांतील अज्ञानरूपी तिमिर पार मावळून जातो. आणि चकोर पक्ष्याची स्त्री ज्याप्रमाणें चंद्राच्या प्रकाशाकडे पाहून आनंदित होते त्याचप्रमाणे तुझे भक्तही विशुद्धिचक्रामध्यें शिवशक्तिस्वरूपानें विराजमान असलेल्या तुम्हां दोघांकडे पाहून आनंदित होत असतात. आई ! मी तुम्हां दोघांनाही अनन्य चित्तानें भजत आहे.

चांदीच्या पत्र्यावर हे यंत्र काढून पूजा करावी. गूळ, नारळ आणि केळे यांचा नैवेद्य दाखवावा. पांच हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे अथवा पाणी अभिमंत्रून प्यावें. ब्रह्मराक्षसाची बाधा निवृत्त होईल.

07 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३६ वा

तवाज्ञाचक्रस्थं तपन-शशि-कोटि-द्युति-धरं
परं शम्भुं वन्दे परिमिलित-पार्श्वं परचिता ।
यमाराध्यन्भक्त्या रवि-शशि-शुचीनामविषये
निरालोकेऽलोके निवसति हि भालोकभवने ॥ ३६॥


छत्तीस श्लोकांपासून एक्केचाळीस श्लोकांपर्यंत आपल्या शरीरातील मूलाधारादि पदचक्रामध्ये शिवशक्तिस्वरूप श्रीत्रिपुरसुंदरीचे निरनिराळ्या रूपाने वास्तव्य असल्याचें वर्णन केले आहे. ही सहा चक्रे म्हणजे शरीरांतर्गत एक श्रीचक्रच होय अशा भावनेनेंही त्यांची उपासना केली जाते. या श्लोकांचे कांहीं विद्वानांनीं पुष्कळ विस्तृत विवेचन केलेले आहे. आम्ही मात्र ग्रंथविस्तारभयास्तव संक्षेपाने आवश्यक तोच अर्थ देत आहो. यांत एक विशेष लक्षांत घेण्यासारखा आहे तो असाः भूमध्यप्रदेशांतील द्विदल आज्ञाचक्र हें मनस्तत्त्वाचें आहे. येथील मनस्तत्त्व हें आत्मतत्त्वस्वरूप मानलेले आहे. " तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः सम्भूतः आकाशाद्वायुः" या श्रुतिवचनाप्रमाणें क्रमशः उत्पन्न झालेलीं पंचमहाभूततत्त्वें ही खालच्या चक्रांत सांगितलेली आहेत. त्यांत उपनिषदांतील उत्पत्तिकम आणि लयक्रम सोडून मणिपूरचक्रांत जलतत्त्वाचा व स्वाधिष्ठानचक्रांत अग्नितत्त्वाचा निर्देश केला आहे तो केवळ योगप्रक्रियेला आणि तांत्रिक प्रक्रियेला अनुलक्षून केलेला आहे. याच दृष्टीने नवव्या श्लोकांतही चक्रांचा क्रम बदललेला दिसेल. ही विसंगति टाळण्याकरितां कांहीं विद्वान् मणिपूरचक्राचें ठिकाण उपस्थाच्या मुळाशी मानतात व स्वाधिष्ठानचक्राचे ठिकाण नाभिस्थानाजवळ मानतात. पण हा स्थानविपर्यय बहुसंख्य योग्यांना व तांत्रिकांनाही मान्य असल्याचे दिसत नाहीं. आतां आपण क्रमाने या साही श्लोकांचा अर्थ पाहूं.

हे आई जगज्जननी ! माझ्या शरीरांत जी मूलाधारादि सहा चक्रे आहेत त्यांची अधिष्ठात्री तत्त्वतः तूंच आहेस म्हणून तीं सर्व चक्रे तुझीच आहेत ( श्लोक ९ पहा). त्यांतील माझ्या भूमध्यस्थानी असलेलें तुझें जें द्विदल आज्ञाचक्र आहे त्यामध्ये भगवान् शंभुनाथ हे तुझ्यासह विराजमान झाले आहेत. त्यांना परशंभुनाथ अथवा महाशंभुनाथ असेंही म्हणतात. आणि तुला त्या ठिकाणी चित्परांबा अथवा परचिदंबा असेंही म्हणतात. तेथें ते शंभुनाथ इतके तेजस्वी आहेत कीं, त्यांना पाहून तपन म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र हे कोट्यवधि संख्येनें एकत्र झाले असतां जो प्रकाश आणि जो आह्लाद प्रतीतीस येईल तो प्रकाश आणि तो आह्लाद त्यांच्याकडे पाहून प्रतीतीस येतो. असें तेज त्यांनी धारण केलेलें आहे. परात्पर चित् शक्तिस्वरूप असलेल्या तुझ्या स्वरूपाशी त्यांच्या देहाचा वामभाग संमिलित झालेला आहे. भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांची आराधना केली असतां तो भक्त अशा उत्तम लोकाला प्राप्त होतो कीं, त्या ठिकाणी चंद्र, सूर्य आणि अग्नि यांच्याही प्रकाशाला प्रवेश नाहीं. तेथें शुद्ध चित्तत्त्वाशिवाय दुसरा कोणताच प्रकाश नाहीं. त्याच्याच प्रकाशामुळे सर्व कांहीं प्रकाशत आहे. "न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं, नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः । तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥" असें त्याचें मुंडकोपनिषदांत वर्णन केलेले आहे. याच अभिप्रायाने त्याला "निरालोक" असें म्हटलेले आहे. तसेंच तो लोक "अलोक" म्हणजे विजन अर्थात पूर्ण एकान्त स्वरूपाचा आहे. तेथें पोहोचणारा हजारों लाखों लोकांमध्ये एखादा विरळाच असतो. आई ! तुझा भक्त तुझ्याच कृपेने त्या "भालोकभुवने" म्हणजे प्रकाश आणि आनंद यांचे स्थान असलेल्या अनिर्वचनीय आल्हाददायक अशा  स्थानांत तो सदासर्वकाळ विराजमान होऊन रहातो. तात्पर्य, आज्ञाचक्रांत अभिन्न शिव- शक्तिस्वरूप असलेल्या परशंभुनाथ आणि श्रीचित्परांबा देवी त्रिपुरसुंदरी यांच्या उपासनेचा केवढा हा प्रभाव आहे !

गंगा आणि यमुनास्वरूप असलेल्या इडा आणि पिंगला या दोन नाड्या मूलाधारचक्रापासून उगम पावतात आणि आज्ञाचक्रांत त्यांचा संगम होतो म्हणून या ठिकाणाला प्रयागराज असे म्हणतात. तेथून पुढें वरणा आणि असि या दोन माझ्या उगम पावून सहस्रदल कमलाकडे जावयास निघतात. वरणा आणि असि या दोन नाड्यांच्या मध्यभागी असलेल्या प्रदेशास वाराणसी असें म्हणतात. वाराणसी म्हणजेच काशी. या काशीक्षेत्राची अधिष्ठात्री देवता भगवान् विश्वनाथच आहेत. त्यांनाच शंभुनाथ असे म्हणतात. त्यांच्या अर्धांगीं चित्‌शक्तिरूप परांबा विराजमान झालेली आहे. प्राणप्रयाणसमयी जे कोणी भ्रूमध्यप्रदेशांत या शिवशक्तीचें स्मरण करतात त्यांना भगवान् शंकर तारकमंत्राचा उपदेश करतात. मृत्यूनंतर त्यांना या लोकाच्या उत्तरार्धांत सांगितलेल्या शिवलोकाची प्राप्ति होते. असाही एक अभिप्राय या श्लोकाचा लक्षांत घेण्यासारखा आहे.

सोन्याच्या पत्र्यावर वर्तुळ काढून त्या वर्तुळांत एकाखाली एक दुं दुं दुं अशी तीन बीजें लिहावींत. त्या तिन्ही बीजांच्या पुढें क्रमाने ठ, ष आणि श अशीं अक्षरे लिहावींत. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. उडदाचे वडे आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करावा. ते यंत्र धारण करावे अथवा पाणी मत्रून प्यावयास द्यावे. नाना प्रकारचे कठीण रोग दूर होतील.

06 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३५ वा

मनस्त्वं व्योम त्वं मरुदसि मरुत्सारथिरसि
त्वमापस्त्वं भूमिस्त्वयि परिणतायां न हि परम् ।
त्वमेव स्वात्मानं परिणमयितुं विश्ववपुषा
चिदानन्दाकारं शिवयुवति भावेन बिभृषे ॥ ३५॥


हे आई जगजननी ! भ्रूमध्यप्रदेशी असलेल्या आज्ञाचक्रांतील मनस्तत्त्व म्हणजे मन तूंच आहेत. कंठस्थानीं असलेल्या विशुद्धिचक्रांतील आकाशतत्त्वही तूंच आहेस. हृदयाच्या जवळ असलेल्या अनाहत नांवाच्या संविच्चक्रांतील "मरुत' म्हणजे वायुतत्त्वही तूंच आहेस आणि उपस्थाच्या सान्निध्यांत असलेल्या स्वाधिष्ठानचक्रातील "मरुत्सारथि" म्हणजे अग्नितत्त्वही तूंच आहेस. वायु हा अग्नीचा मित्र असल्यामुळें त्याला मरुत्सारथि असें म्हटले आहे. मरुत म्हणजे वायु आणि सारथि म्हणजे साहाय्य करणारा. वायुचे साहाय्य असल्याशिवाय अग्नि प्रदीप्त होत नाहीं, हे तर प्रसिद्धच आहे. आई ! नाभिस्थानीं असलेल्या मणिपूरचक्रांतील आप म्हणजे जलतत्त्वही तूंच आहेस आणि मूलाधारचक्रांत असलेलें पृथ्वीतत्त्वही तूंच आहेस. मूलाधारचक्र हें गुदस्थानीं असल्याचें पूर्वी सांगितलेलेच आहे. तात्पर्य, पृथ्वी, जल, तेज, वायु आणि आकाश ही पंचमहाभूतें तूंच आहेस, "एवं त्वयि परिणतायां" याप्रमाणे पंचमहाभूतांच्या रूपाने तूं परिणाम पावली असतां "न ही परं" तुझ्यापेक्षा या जगांत निराळें असे कांहींच नाहीं.

"हे शिवयुवति ! त्वं एव स्वात्मानं विश्ववपुषा परिणमयितुं भावेन चिदानन्दाकारं बिमृषे" हे पार्वती ! तूंच स्वतःच्या रूपाला विश्वरूपानें परिणत करण्याकरितां अगदीं मनांतून मोठ्या हौसेनें चिदानन्दाकाराला "बिभृषे" म्हणजे धारण करतेस. चित् म्हणजे शक्तितत्त्व आणि आनंद म्हणजे शिवतत्त्व - या दोन्ही तत्त्वांच्या रूपाने तूंच नटतेस. अर्थात् शक्तीही तूंच आहेस आणि शिवही तूंच आहेस. सर्व कांहीं तूंच आहेस. कार्यही तूंच आहेस आणि कारणही तूंच आहेस. त्याचप्रमाणे सर्व कार्याचें व कारणांचे अधिष्ठानही तूंच आहेस. प्रकृतिरूपाने तूंच परिणत होतेस आणि अधिष्ठानरूपाने तूं निर्विकार रहातेस. आई ! तुला मी नमस्कार करतो.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. दूध पायस आणि मध यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करून हे यंत्र धारण करावे. रोज एक हिरडा अभिमत्रून सेवन करावा. यानें क्षयरोग जातो.

04 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३३ वा

स्मरं योनिं लक्ष्मीं त्रितयमिदमादौ तव मनोः
निधायैके नित्ये निरवधि-महाभोग-रसिकाः ।
भजन्ति त्वां चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः
शिवाग्नौ जुह्वन्तः सुरभि-घृत-धाराहुति-शतैः ॥ ३३॥


" हे नित्ये निरवधिमहाभोगरसिकाः एके तव मनोः आदौ स्मरं योनिं लक्ष्मीं इदं त्रितयं निधाय चिन्तामणिगुणनिबद्धाक्षवलयाः शिवाग्नौ सुरभिघृतधाराहुतिशतैः जुह्वन्तः त्वां भजन्ति" असा या श्लोकाचा अन्वय आहे. आई जगज्जननी ! तूं अनादि आणि अनंत असल्यामुळें तुला नित्या असें म्हणतात. तुझे कांहीं भक्त निरवधि म्हणजे निःसीम, अनंत आणि अपरिच्छिन्न असा "महाभोग" म्हणजे निरतिशय आनंद, ज्याच्या शतांशाने ब्रह्मदेवाच्याही आनंदाची तुलना करतां येणार नाही असा महान आनंद, त्या आनंदाचा रसास्वाद घेण्यांत रसिक म्हणजे तत्पर असलेले तुझे ज्ञानी भक्त तुझ्या पंचदशाक्षरी मंत्राच्या आरंभी "स्मर" म्हणजे काम अर्थात् कामबीज ऐं अथवा क्लीं हे अक्षर तसेंच "योनि" म्हणजे भुवनेश्वरी बीज अर्थात् ह्रीं हें अक्षर आणि लक्ष्मी म्हणजे श्रीं हें बीज अशा तीन बीजांचे पल्लव जोडतात. अर्थात् ही तीन बीजाक्षरें त्या मंत्राच्या आरंभीं योजून तुझा जप करीत असतात. हा जप करतांना त्यांनीं चिंतामणिरत्‍नाच्या मण्यांची तयार केलेली माळ आपल्या हातांत धारण केलेली असते. आपल्या हृत्कमलरूपी वेदीवर स्थापन केलेल्या शिवशक्तिस्वरूप अग्नीमध्ये मंत्ररूपी कामधेनूच्या तुपाच्या धारा - शेकडों हजारों धारा आहुति म्हणून अर्पण करीत करीत ते "त्वां भजन्ति" म्हणजे तुझी उपासना करीत असतात. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी अर्थ आहे.

मागील श्लोकांत श्रीविद्येमध्यें घटक असलेल्या पंधरा अक्षरांचा निर्देश केला. या पंधरा अक्षरांत ककार हें पहिलें अक्षर असल्यामुळें या मंत्राला कादिविद्या म्हणतात हेही सांगितलें. त्याचप्रमाणे ही अक्षरें सर्व अक्षरप्रपंचाचे व सर्व तत्त्वांचें मूळ असल्याचा निर्देश केला. अक्षरप्रपंचांतून आणि तत्त्वप्रपंचांतून सर्व नामरूपात्मक विश्वप्रपंच निर्माण होत असल्यामुळें ही अक्षरें सर्व विश्वाची मूलभूत अक्षरें होत, हेही आपण पाहिले. ही पंधरा अक्षरें षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीचेच रूप असल्याचेंही आपण पाहिले. श्रीमंत्र, श्रीयंत्र, मातृकाप्रपंच, तत्त्वप्रपंच शब्दप्रपंच, विश्वप्रपंच, पिंड आणि ब्रह्मांड या सर्वांचा परस्परसंबंध, साम्य आणि ऐक्य या सर्व गोष्टींचा विचार केला. असा हा विश्वव्यापी मूलमंत्राचा महिमा लक्षांत घेतल्यानंतर त्या मंत्राच्या जपाचें फल निर्दिष्ट करणें हे क्रमप्राप्तच आहे. प्रस्तुत लोकाच्या मिषानें मूल विद्येचाच फलनिर्देश केला जात आहे.

यावर कोणी असे विचारील कीं, या श्लोकात पल्लवित मंत्रांचा निर्देश आहे. मूलमंत्राचा फलनिर्देश यात नाहीं. पण ही शंका बरोबर नाही. पल्लवित मंत्राच्या फलनिर्देशांतच मूलमंत्राचाही फलनिर्देश सामावलेला आहे. मुळमंत्रामध्यें घटक असलेल्या केवळ ही या बीजमंत्राच्या किंवा त्या बीजमंत्रांतही घटक असलेल्या केवळ "ईं" या बीजमंत्राच्या जपानेंही सर्व ऐश्वर्याची सुखें ज्याच्यावरून ओवाळून टाकावीत अशा नित्यनिरतिशय आनंदाचा लाभ होतो असें सांगितलें आहे. तेथें मूलपंचदशाक्षरी मंत्राचे फळ काय निराळें सांगावयास पाहिजे ? तें तर कैमुतिकन्यायानेंच सिद्ध होत आहे. यावर प्रश्न असा येईल कीं, जर निरवधिक सौख्याचा लाभ मूलपंचदशाक्षरी कादिविद्येनेंच प्राप्त होत असेल तर मग या श्लोकांत कांहीं लोक तीन बीजांचें पल्लव जोडून या मंत्राचा जप करतात असें वर्णन का केलें यावर "रुचिवैचित्र्य" हेंच उत्तर आहे. "भिन्नरुचिर्ही लोकः" हा लोकस्वभाव प्रसिद्धच आहे. ब्रह्मा, विष्णु, महेश, इंद्र, चंद्र, कुबेर, सूर्य, यमदेव, कामदेव, कार्तिकस्वामी, दुर्वास, मनु, अगस्ति आणि अगस्तिऋषींची पत्नी श्रीलोपामुद्रा, त्याचप्रमाणे नंदिराज या सर्वांनी श्रीविद्येच्या मूलमंत्रानेच आपले मनोरथ सिद्ध करून घेतलेले आहेत. हे सर्व श्रीविद्येचे द्रष्टे मानले जातात. आचार्यपुरस्कृत कादिविद्येचें द्रष्ट्टत्व श्रीदक्षिणामूर्तिदेवाकडे आहे. या सर्व देवांच्या व ऋषिमुनींच्या वैभवावरून त्यांनीं पुरस्कारिलेल्या मंत्राचे व अनुष्ठिलेल्या जपाचें माहात्म्य लक्षांत घ्यावे. याप्रमाणे प्रस्तुत मूल मंत्रांत संपूर्ण फल देण्याचें सामर्थ्य असतांना पल्लव, संपुट इत्यादि कल्पना केवळ रुचिवैचिन्यमुलक आहेत असेंच म्हणावे लागतें.

कांहीं लोक मागील  श्लोकांत लोपामुद्रापुरस्कृत हादिविद्या सांगितली आहे व या  श्लोकांत कामदेवपुरस्कृत कादिविद्या सांगितली आहे असें वर्णन करतात. हादिमंत्र आणि कादिमंत्र हे दोन्ही मंत्र पंचदशाक्षरीच आहेत. हादिमंत्र हा मोक्षफलदायी आहे तर कादिमंत्र हा भोगफलदायी आहे असा फलभेदही ते कल्पितात. आमच्या मते श्रीललितामहात्रिपुरसुंदरीचा कोणताही मंत्र उपासकाला अभीष्ट फल देण्याला समर्थ आहे. भोग किंवा मोक्ष हा फलमेद उपासकाच्या इच्छेवर अवलंबून आहे. याच अभिप्रायाने सप्तशतीमध्यें "आराधिता सैव नृणां भोगस्वर्गापवर्गदा " असे म्हटलेले आहे. आराधना करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे भोग म्हणजे ऐहिक सुखे, स्वर्ग म्हणजे पारलौकिक सुखें आणि मोक्ष म्हणजे दुःखाचा जेथे लेशही स्पर्श करूं शकत नाहीं असें नित्य आणि निरतिशय सुख, हें सर्व कांहीं ती जगन्माता देवी भवानी आपल्या भक्ताला देते असें वर्णन केलेले आहे. राजा सुरथ आणि समाधि नांवाचा वैश्य दोघांनींही देवीमाहात्म्य ऐकले, एकच अनुष्ठान केलें पण दोघांनाही फळें मात्र निरनिराळी मिळाली. प्रसन्न झालेल्या देवीनें वर मागा असें म्हटल्याबरोबर समाधिवैश्यानें अध्यात्मज्ञान वरले व तो मुक्त झाला. सुरथ राजानें मात्र चित्तांत वैराग्य नसल्यामुळे राज्यच मागितले. मरेपर्यंत राज्य भोगले आणि मेल्यानंतरही तो पुन्हा सावर्णि नांवाचा मनु राजाच झाला ! तात्पर्य, मंत्र आणि देवता समर्थ असली तरी फलभेद हा उपासकाच्या अधीनच असतो. याच न्यायाने महात्रिपुरसुंदरीस्वरूप असलेली कादिविद्या ही एक भोगैश्वर्यच देते आणि हादिविद्या ही मोक्ष देते असा फलभेद मानणे हें शास्त्रसंगत आणि युक्तिसंगत होऊं शकत नाहीं, ही गोष्ट लक्षांत घ्यावी.

मागील  श्लोकांत हादिविद्या सांगितली आहे असें म्हणणार्‍यांच्या मतानें मागील श्लोकांतील शिव शब्दाचा अर्थ ह, शक्ति शब्दाचा अर्थ स आणि काम शब्दाचा अर्थ क असा आहे. बाकीची सर्व अक्षरें मागील  श्लोकांत सांगितल्याप्रमाणेच समजावींत. याप्रमाणें पंधरा अक्षरांचा हादि मंत्र तयार होतो. चालू श्लोकांत स्मर शब्दाने क, योनि शब्दाने ए आणि लक्ष्मी शब्दाने ई अशीं ही तीन अक्षरे घ्यावींत व हादिविद्येतील पहिली तीन अक्षरे काढून त्यांच्या जागी तीं योजावीत म्हणजे या श्लोकाने कादिविद्येचाच निर्देश केला असें म्हणतां येतें.

"निरवधि-महा-भोग-रसिकाः" आचार्यानी साधकांना हें जें विशेषण दिले आहे तें मोठे मार्मिक आहे. "भुज्यते इति भोगः" या व्युत्पत्तीप्रमाणे भोग शब्दाचा अर्थ सुख आणि दुःख असा होतो. दुःख हा कधींच इच्छेचा व मिळविण्याचा विषय होऊं शकत नाही. ते अनपेक्षित रीतीनें पुढें येतें व भोगावे लागतें. घटपटादि इष्ट पदार्थ हे जरी इच्छेचा आणि मिळविण्याचा विषय होत असले तरी अंतत सुख हाच इच्छेचा व मिळविण्याच्या प्रयत्नाचा विषय मानावा लागतो. या दृष्टीने प्रकृतस्थलीं भोग शब्दाचा अर्थ सुख असाच करावा लागतो. भोगाला निरवधि आणि महा ही दोन विशेषणें दिलेली असल्यामुळें या ठिकाणी निरवधि-महाभोग शब्दानें नित्यनिरतिशय निजानंदरूपी सुखच घ्यावे लागतें. सामान्य मानवाच्या आनंदापासून तो ब्रह्मदेवाच्या आनंदापर्यंत विषयजन्य सर्व सुखें ही निरवधि आणि महा या विशेषणांना पात्र होत नाहींत. कारण तीं सर्व सुखे विषयजन्य असल्यामुळें नाशिवंत असतात व नित्य आणि निरतिशय सुख त्यांच्यापेक्षां निराळेंच असतें. त्याच सुखाला अपवर्ग म्हणतात. "अपवृज्यन्ते सांसारिकदुःखानि यत्र स अपवर्गः" जेथे सर्व सांसारिक दुःखे निराळी होतात, सुटतात, मावळतात ती अवस्था म्हणजेच अपवर्ग होय. तात्पर्य, निरवधि-महाभोग शब्दाचा अर्थ अपवर्ग म्हणजे मोक्ष असाच होतो. या अपवर्गसुखाचे रसिक म्हणजे उत्कंठेने आस्वाद घेणारे भक्त असा हा निरवधि-भहाभोग-रसिक या शब्दाचा अर्थ झाला. हे भक्त परम विरक्त असल्यामुळे कोणत्याही विषयवैभवाची अपेक्षा न करतां कादिविद्येनें श्रीललिता महात्रिपरसुंदरीची उपासना करीत असतात.

"चिन्तामणि-गुण-निबद्धाक्ष-वलयाः" चिंतामणि रत्‍नाप्रमाणे इष्ट फल देणाऱ्या, त्याचप्रमाणे गुणनितबद्ध म्हणजे रेशमाच्या दोऱ्यात गोंवलेल्या अथवा सोने, चांदी, तांबे इत्यादि निर्मल धातूंच्या तारेंत गांठलेल्या, अक्ष म्हणजे मण्यांची, वलय म्हणजे माला त्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली असते. अक्षमाला या शब्दाचा एक निराळा अर्थ अभिप्रेत आहे. अक्ष म्हणजे अपासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. यांत क्ष हा माळेतल्या मेरूच्या मण्याप्रमाणें सर्वांच्या वर ठेवून अ  पासून ळ  पर्यंत पन्नास वर्ण उलट्या आणि सुलट्या क्रमाने योजले म्हणजे शंभर संख्येची अक्षमालाच तयार होते. स्फटिक, विद्रुम (पोवळें), मौक्तिक, रुद्राक्ष, पद्याक्ष अथवा पुत्रवंती यांच्या मण्यांची माळ केल्यानंतर त्या माळेंतील मण्यांवर अक्षमालेंतील वर्णांची स्थापना करावयाची असते. याला मालासंस्कार असें म्हणतात. अशी ही संस्कारसंपन्न माला जपाचे फल त्वरित प्राप्त करून देणारी असते. अशा तऱ्हेची अक्षमाला ज्यांनीं आपल्या हातांत धारण केलेली आहे असे भक्त असा याचा अर्थ झाला.

आई त्रिपुरसुंदरी ! तुझे हे भक्त आपल्या संवित्कमलामध्यें अंतर्हृदयावकाशामध्यें मंगलमय वेदिका अथवा स्थंडिल निर्माण करून तेथें तुझें आवाहन करतात. मूर्धस्थानी असलेल्या सहस्रदलकमलांतील पूर्णचंद्रबिंबामध्ये तूं विराजमान झालेली असतेस. तेथून तुला ते आपल्या हृत्कमलामध्यें आणतात. तेथें तुझी स्थापना करतात. त्यांची इष्ट व उपास्य देवता तूं, तुलाच ते अग्नि कल्पून सन्निरोधन अवकुंठन त्याचप्रमाणे जातकर्मादि संस्कारही तें तुझ्या ठिकाणी करीत असतात. याप्रमाणे संस्कारसंपन्न उपास्यदेवतारूपी अग्नीमध्यें कामधेनूच्या दुधापासून तयार केलेल्या मंत्ररूपी पवित्र घृताच्या शेकडो आहुति ते अर्पण करीत असतात. या त्यांच्या मानसउपासनेमध्यें "ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्" असा सर्व यागाचा थाट असतो. याला तंत्रशास्त्रांत "अन्तर्याग" असेंच नांव दिलेलें आहे. याप्रमाणे उपास्थदेवतेशी सर्वस्वीं समरस झाले ते शेवटीं उपास्यदेवतारूपच होतात. श्रीललितामहात्रिपुरसुंदरीस्वरूपच ते होतात. ही अवस्था निरवधिमहाभोगस्वरूप असल्यामुळें त्यांतच ते तन्मय होऊन रहातात. आई ! तुझ्या जपाचा हा केवढा महिमा आहे !

पहिल्या श्लोकांतील यंत्राप्रमाणेच या श्लोकाचें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. त्यांत क्लीं या बीजाऐवजी श्रीं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मुगाची खिचडी मुगदळ आणि मध याचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्धयंत्र धारण करावे. विपुल धनाचा लाभ हें त्याचें फळ सांगितले आहे. 

03 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३२ वा

शिवः शक्तिः कामः क्षितिरथ रविः शीतकिरणः
स्मरो हंसः शक्रस्तदनु च परामारहरयः ।
अमी हृल्लेखाभिस्तिसृभिरवसानेषु घटिता
भजन्ते वर्णास्ते तव जननि नामावयवताम् ॥ ३२॥


देवता ही मंत्रमय असल्यामुळें तंत्रशास्त्रांत मंत्रालाच प्राधान्य असतें. मागील  श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरी देवीच्याच आग्रहावरून लोककल्याणाकरिता शंकरांनी हें सर्व तंत्रामध्ये श्रेष्ठ असलेलें महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र भूतलावर प्रकट केलें असें सांगितलें. आतां त्या तंत्रातील प्रधान अंग असलेल्या मंत्रालाच या श्लोकामध्ये निर्दिष्ट करीत आहेत. मंत्र हा अत्यंत गोपनीय असल्यामुळें प्रत्यक्ष अक्षरांनी मंत्राचा निर्देश न करतां तो परोक्षपद्धतीनेंच केला जात आहे. व्यवहारामध्यें देखील पुष्कळांना प्रत्यक्ष नांवानेंच केलेला व्यवहार रुचत नाहीं. दादासाहेब, बाबासाहेब असें म्हटलें म्हणजे बरे वाटते. हाच देवांचाही स्वभाव आहे. "परोक्षप्रिया इव ही वै देवाः" हें श्रुतिवचन प्रसिद्धच आहे. परोक्षपद्धतीनें व्यवहार केल्यास मुख्य नांवाची गुप्तताही राखली जाते व देवतांचाही संतोष होतो. अशा अभिप्रायानें आचार्य मोठ्या युक्ती या श्लोकांत श्रीविद्येचा निर्देश करीत आहेत.

पंचदशीविद्या, षोडशीविद्या, कादिविद्या, हादिविद्या असे श्रीविद्यामंत्राचे संप्रदायभेदानें अनेक भेद आहेत. आपआपल्या संप्रदायाप्रमाणे आपल्याला अभीष्ट असलेल्या मंत्राचा उद्धार अनेक विद्वानांनी या श्लोकांतून केलेला आहे. मंत्रातील अक्षरांची आनुपूर्वी ही प्रत्यक्ष गुरुमुखांतूनच अवगत करून घ्यावयाची असते. अधिकारी गुरूंच्या मुखांतून प्राप्त झालेल्या मंत्राक्षरांत एक प्रकारचा अनिर्वचनीय प्रभाव असतो यांत शंकाच नाहीं. भगवापूज्यपाद श्रीमान् आद्य शंकराचार्य हें आपले श्रीविद्यातंत्राचे गुरूच आहेत असें आपण समजू या. जगाचेच गुरु आहेत ते. आणि आपण तर त्यांच्याच शब्दांच्या आधारे श्रीमहात्रिपुरसुंदरीचे स्वरूप पहात आहोंत. आतां आपण आपल्या इष्टदेवतेचें मंत्रमय स्वरूप त्यांच्याच शब्दानी पाहूं.

या  श्लोकांत "शिवः शक्तिः" इत्यादि शब्दांनी श्रीविद्येतील एका एका अक्षरांचा उल्लेख केलेला आहे. हे शब्द शास्त्रीय परिभाषेनें क्वचित् साक्षात, क्वचित् लक्षणेने तर क्वचित् लक्षितलक्षणेनें मंत्रातील घटक अक्षरांचा बोध करून देतात. जशा चंद्राच्या कला सोळा आहेत त्याचप्रमाणें श्रीविद्येच्या देखील सोळा कला आहेत. याच अभिप्रायाने श्रीविद्यातंत्राला चंद्रकलाविद्यातंत्र असेंही नांव आहे. या सोळा कलांपैकी "दर्शा" नांवाची पहिली कला, तिची अधिष्ठात्री देवता त्रिपुरसुंदरीच आहे. ती कला शिवतत्त्वात्मक असल्यामुळें प्रकृत स्थळी शिव शब्दाचा अर्थ ती "दर्शा" नांवाची कला असा करतात. दर्शाकलेचें प्रकृतिभूत अक्षर क आहे म्हणून श्लोकांतील शिव शब्दाने क हेंच अक्षर समजावे. त्याचप्रमाणे शक्ति हा शब्द "दृष्टा" नांवाच्या दुसऱ्या कलेचा वाचक आहे. दृष्टाकला ही शक्तितत्त्वात्मक असल्यामुळें शक्तितत्त्वाचे प्रकृतिभूत अक्षर ए आहे. तेंच श्रीविद्यामंत्रातील दुसरें अक्षर होय. काम शब्द हा "दर्शता" नांवाच्या तिसऱ्या कलेचा वाचक आहे. या तिसऱ्या कलेची देवता कामच आहे. दर्शताकलेचें बीजभूत अक्षर ई असल्यामुळें तेंच या मंत्रातील तिसरे अक्षर होय. क्षिति शब्दाचा अर्थ पृथ्वी असा आहे. पृथ्वीतत्त्वाचें बीज ल हें प्रसिद्धच आहे. तेंच प्रस्तुत मंत्रातील चौथें अक्षर होय. अथ शब्द हा मागील चार अक्षरांचा एक खंड पूर्ण झाल्याचे सुचवीत आहे. प्रत्येक खंडाच्या शेवटी ह्रीं बीज असतेंच. ह्रीं बीजासह चार अक्षरांच्या या खंडाला अग्रिखंड असें म्हणतात. या खंडांत ह्रीं या बीजासह पांच अक्षरें होतात. या पांच अक्षरांच्या समूहाला वाग्भवकूट असें म्हणतात.

श्लोकांतील अथ शब्दानंतर दुसऱ्या खंडाला आरंभ होतो. दुसऱ्या खंडातील पहिला शब्द रवि आहे. दुसरें खंड सूर्यतत्त्वाचें आहे. याला सूर्यखंड असेंच म्हणतात. ज्याप्रमाणें श्रीचक्र हें "सोमसूर्यानलात्मकं" या वचनाप्रमाणें त्रिखंड म्हणजे सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचे आहे. त्याचप्रमाणें श्रीमंत्र देखील त्रिखंड अर्थात् अग्नि, सूर्य आणि सोम या तीन तत्त्वांचा आहे. रवि शब्दाने सूचित होणारें सूर्यतत्त्वाचे 'ह' हें अक्षर या मंत्रातील सहावें अक्षर होय "शीतकिरण" या शब्दाचा अर्थ चंद्र असा आहे. "सकारश्चन्द्रबीजं" असा शास्त्रसंकेत आहे. या संकेताप्रमाणें शीतकिरण या शब्दाचा अर्थ स हें अक्षर समजावे. सकार हा या मंत्रातील सातवे अक्षर होय. स्मर म्हणजे कामदेव. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तेंच या मंत्रातील आठवे अक्षर होय. "हंस" म्हणजे सूर्य. तो ह या अक्षराचा अधिपति आहे. म्हणून लोकातील हंस शब्दाने हकार समजावा. हकार हा या मंत्रातील नववें अक्षर होय. त्याचप्रमाणे शक म्हणजे इंद्र. " लकार इन्द्रबीज " या शास्त्रीय संकेताप्रमाणे शक्र शब्दाचा अर्थ ल असा झाला. लकार हा श्रीमंत्रांतील दहावे अक्षर होय. याला पहिल्या खंडाप्रमाणें ह्रीं हें बीजाक्षर जोडले म्हणजे दुसरा खंड पूर्ण होतो. दुसऱ्या खंडांत सहा अक्षरे आहेत. या दुसऱ्या खंडाला कामराजकूट असें म्हणतात.

"तदतु च" म्हणजे आणि त्यानंतर. "परा-मार-हरयः" परा शब्दाचा अर्थ या ठिकाणी चंद्रकला असा आहे. चंद्राचे बीजभूत अक्षर सकार आहे. स हें अक्षर आपल्या उपास्यदेवतेच्या पंचदशाक्षरी मंत्रातील बारावें अक्षर होय. याचप्रमाणे "मार" म्हणजे कामदेव. तो सर्वांना मारतो अथवा त्याच्यापायी सर्व मरतात म्हणून त्याला 'मार' असे नांव दिलेले आहे. कामराजाचे प्रकृतिभूत अक्षर क आहे. तें या मंत्रातील तेरावें अक्षर होय. तसेंच हरि या शब्दाचा अर्थ इंद्र असा आहे. इंद्राचें बीजभूत अक्षर ल आहे. तेंच आपल्या या मंत्रातील १४ चौदावे अक्षर होय. त्याच्या पुढें ह्रीं हें बीज जोडले म्हणजे मंत्राचा तिसरा खंड पूर्ण होतो. या खंडाला सोमखंड अथवा चंद्रखंड असें म्हणतात. या तिसर्‍या खंडाला शक्तिकूट असेंही म्हणतात. शेवटच्या ह्रीं या बीजासह एकंदर पंधरा अक्षरें होतात. "अवसानेषु तिसृभिः हृल्लेखाभिः घटिताः ते अमी वर्णाः हे जननि तव नामावयवतां भजन्ते" वर सांगितल्याप्रमाणें पहिल्या खंडांत चार अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. दुसऱ्या खंडांत पांच अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे, आणि तिसऱ्या खंडांत तीन अक्षरे व शेवटीं ह्रीं हें बीज आहे. "अवसानेषु" म्हणजे प्रत्येक खंडाच्या शेवटीं 'हृल्लेखाभिः' म्हणजे ह्रीं या बीजांनी, "घटिताः" म्हणजे युक्त असलेले, "ते अमी वर्णाः " म्हणजे ते हे वर्ण अर्थात ही अक्षरे, "जननि" हे मातोश्री ! तुझ्या मंत्रात्मक नामाच्या अवयवांचें रूप धारण करीत आहेत. असा या श्लोकाचा सरळ अन्वयानुसारी अक्षरार्थ आहे.

ह्रीं हें बीज मंत्रशास्त्रांत फार महत्त्वाचे मानले आहे. हें बीज सर्वमंत्रांची जणुं कांहीं प्राणशक्ति आहे. ह्रीं हे बीज मंत्राच्या सामर्थ्याचे उद्‌बोधन करीत असतें. ह्रीं या बीजाने मंत्रामध्ये चैतन्य निर्माण होत असते ! ह्रीं हें बीज नसेल तर मंत्रराशि निर्जीव होतो. हृदयामध्ये जशी प्राणांची ज्योत विलसत असते, त्याचप्रमाणे ह्रीं हें बीज मंत्रांतील प्राणज्योतच आहे. आकाशांत जशी विद्युलेखा चमकते त्याचप्रमाणें ह्रीं हें बीज साधकाच्या हृदयांत प्रकाश देणारे आहे म्हणूनच ह्रीं या बीजाला हृल्लेखा असे म्हणतात.

"हृदि लेखेव जागर्ति प्राणशक्तिरियं परा ।
हृलेखा कथ्यते तस्मान्मायैवाचिन्त्यवैभवा ॥
अनया रहिताः सर्वे निर्जीवा मन्त्रराशयः ।
अतस्तु सर्वमन्त्राणामियमुद्‌बोधनी मता ॥ "

असें मंत्रशास्त्रांत ह्रीं या बीजाचें वर्णन केले आहे. विश्वाची उत्पत्ति, स्थिति आणि संहार या तिन्ही अवस्था ह्रीं बीजांत सामावलेल्या आहेत. त्याचें प्रामुख्याने कर्तुत्त्व श्रीत्रिपुरसुंदरीकडेच असल्यामुळें तिला ह्रींकारी असे म्हटलेले आहे. " ह्रींकारी ह्रींमती हृद्या" ही तिचीं नांवेच आहेत. फार काय सांगावे, ह्रीं हें तिचेच स्वरूप होय. याच अभिप्रायाने तिला त्रिशतीमध्ये "ह्रींषींशरीरिणी" असे म्हटलेले आहे. श्रीत्रिपुरसुंदरी ही माया अथवा महामायास्वरूप असल्यामुळें ह्रीं या बीजाला मायाबीज असें म्हणतात. त्रिपुरसुंदरी ही सर्व भुवनांची अधिष्ठात्री असल्यामुळें तिला भुवनेश्वरी असेंही म्हणतात. आणि याच अभिप्रायाने ह्रीं या बीजाला भुवनेश्वरीबीज असेंही म्हटले आहे. असें हे ह्रीं बीज अत्यंत महत्त्वाचें असल्यामुळें या मंत्रातील तिन्ही खंडांच्या शेवटीं ह्रीं या बीजाचा प्रयोग झालेला आहे.

या पंचदशाक्षरी श्रीविद्यामंत्रांतील पहिली चार अक्षरे अग्निखंड म्हणून मानली जातात. त्यानंतर ह्रीं हें बीज आहे. त्याच्यापुढील पांच अक्षरे सौरखंड म्हणून ओळखली जातात. सूर्य हा त्यांचा अधिष्ठाता आहे. अग्निखंड आणि सूर्यखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं या बीजाला रुद्रग्रंथि असे म्हणतात. दुसऱ्या खंडाच्या शेवटींही ह्रीं बीज आहेच. या ह्रीं बीजापुढील तीन अक्षरे हा या मंत्रातील तिसरा खंड होय. या तिसऱ्या खंडाला सौम्यखंड अथवा चांद्रखंड असें म्हणतात. सौरखंड आणि चांद्रखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला विष्णुग्रंथि असें म्हणतात. तिसऱ्या खंडापुढे असलेल्या ह्रीं बीजानंतर आणखी एक अक्षर आहे. ते फारच महत्त्वाचे आहे, तें गुरुमुखानेंच जाणावे असें सांगितलेले आहे. त्या अक्षरासह आपल्या उपास्यदेवतेचा - श्रीत्रिपुरसुंदरीचा मंत्र हा सोळा अक्षरांचा होतो. म्हणूनच या मंत्राला षोडशीविद्या असें म्हणतात. हें अक्षरही स्वतंत्र मंत्रस्वरूप आहे. या अक्षराचा अंतर्भाव न करतां राहिलेल्या पंधरा अक्षरांच्या मंत्राला पंचदशीविद्या असें म्हणतात. षोडशीविद्येंतील सोळाव्या अक्षराला चंद्रकलाखंड असें म्हणतात. सौम्यखंड आणि चंद्रकलाखंड यांच्यामध्ये असलेल्या ह्रीं बीजाला ब्रह्मग्रंथि असें म्हणतात. याप्रमाणे " त्रिखंडो मातृकामन्त्रः सोमसूर्यानलात्मकः" मातृका म्हणजे माता त्रिपुरसुंदरी, तिचा हा मंत्र त्रिखंड म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांचा आहे ही गोष्ट लक्षांत घ्यावी. त्रिखंड या विशेषणाने आणखी एक विशेष सूचित केला जात आहे. तो म्हणजे ज्ञानशक्ति, इच्छाशक्ति आणि क्रियाशक्ति. त्याचप्रमाणे जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति. तसेच विश्व, तैजस आणि प्राज्ञ या चैतन्याच्या तीन अवस्था. तमोगुण, रजोगुण आणि सत्त्वगुण. त्याचप्रमाणें स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा विविधरूपाने श्रीयंत्राचे व श्रीमंत्राचें त्रिखंडत्व पहाता येतें.

वर चौथे खंड म्हणून चंद्रकलाखडाचा उल्लेख केलेला आहे. हें खंड तिन्ही खंडांच्या पलीकडचे आहे. तें सर्वातीत आहे. अवस्थात्रयातीत, गुणत्रयातीत देहत्रयातीत, कूटत्रयातीत खण्डत्रयातीत इत्यादि शब्दानी त्याचें वर्णन करतात. वस्तुतः तें वर्णनातीत आहे. "सत्यं ज्ञानमननं", "नित्य विज्ञानमानन्द" अशा शब्दांनी उपनिषदे ज्याचे वर्णन करतात तेंच तें श्रीविद्येचें चतुर्थ खंड होय. त्याला तुरीयखंड असें म्हणतात. हें शुद्धचित्स्वरूप असल्यामुळें याला 'चिदेकरस' असेंही म्हटलेले आहे. तिला पराकला असे म्हणतात. परा म्हणजे सर्वश्रेष्ठ आणि कला म्हणजे तत्त्व. चन्द् धातूचा अर्थ आनंद देणे किंवा प्रकाशणें असा आहे. "चन्दयति अथवा चन्दति इति चन्द्रा" जी सर्वांना आनंद देते, प्रकाश देते अथवा आपल्या स्वतःसिद्ध प्रकाशाने प्रकाशते ती चन्द्रा. "चंद्रा चासौ कला च चन्द्रकला." तात्पर्य, सर्वांना आनंद देणार, प्रकाश देणार आणि स्वतःसिद्ध प्रकाशानें प्रकाशित असलेले असें जें अनिर्वचनीय तत्त्व तेंच चंद्रकला या शब्दाचा अर्थ होय. या चंद्रकलेलाच महात्रिपुरसुन्दरी असें म्हटलेले आहे. श्रीसूक्तामध्ये तर चंद्रा हेंच नांव श्रीमहात्रिपुरसुंदरीला दिलेले आहे. "चन्द्रा हिरण्मयीं लक्ष्मीं" "चन्द्रा प्रभासां यशसा ज्वलन्तीं" इत्यादि. असो

चंद्र जसा सोळा कलानी पूर्ण असतो त्याचप्रमाणे श्रीललितामहात्रिपुरसुंदरी ही सोळा कलांनी पूर्ण आहे. त्रिपुरसुंदरीकला, कामेश्वरीकला, भगमालिनी- कला इत्यादि पंधरा कलांची पंधरा नांवे आहेत. सोळावी कला ही स्वतः श्रीमहात्रिपुरसुंदरीच होय. ज्योतिःशास्त्रामध्यें चंद्राच्या पहिल्या कलेला प्रतिपदा हें नांव दिले आहे. दुसऱ्या कलेला द्वितीया व तिसऱ्या कलेला तृतीया याप्रमाणें सर्व तिथींची नावे ही चंद्राच्या कलांचीच नांवे होत. या तिथि एकंदर सोळा आहेत. पंधराव्या तिथीला पौर्णिमा आणि सोळाव्या तिथीला अमावास्या असें म्हणतात. प्रतिपदेपासून पूर्णिमेपर्यंत चंद्राची एक एक कला रोज वाढत असते व पूर्णिमेच्या दिवशीं आपल्याला पूर्ण चंद्राचे दर्शन घडते. सोळावी कला त्यांतच सामावलेली असल्यामुळें सोळा कलांचा पूर्णचंद्र पूर्णिमेला दृग्गोचर होत असतो. त्यानंतर क्रमाक्रमानें रोज एक एक कला ऱ्हास पावते. सोळावी कला ही कधींच ऱ्हास पावत नसते. कारण ती नित्य आणि सच्चिदानन्दस्वरूप आहे. " दर्शाद्याः पूर्णिमान्ताश्च कलाः पञ्चदशैव तु । षोडशी तु कला श्रेया सच्चिदानन्दरूपिणी । " (सुभगोदयतन्त्र)

वस्तुस्थिति अशी आहे कीं, चंद्राच्या कला किंवा चंद्र हा ऱ्हासही पावत नाहीं आणि वृद्धिंगतही होत नाहीं. चंद्र हा तत्त्वतः सदासर्वकाळ परिपूर्ण स्वरूपांतच असतो. महात्रिपुरसुंदरीचें अधिष्ठान असलेल्या मुर्धस्थानच्या सहस्त्रदलकमलांतील चंद्रमंडलाचें स्वरूपही असेंच मानलेले आहे. यावर कोणी असें विचारील कीं, चंद्र जर सदासर्वकाळ पूर्णरूप आहे तर मग त्याच्या कलांची वृद्धि आणि ऱ्हास का दिसतात ? यावर उत्तर असें कीं, चंद्रमंडल हें आप्य म्हणजे जलीय आहे. सूर्यमंडल हें तेजोमय आहे. सूर्यमंडळ आणि चंद्रमंडल ही दोन्ही मंडलें एका नक्षत्रामध्यें आली म्हणजे चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. कारण तें आपल्या दृष्टीने सूर्यमंडळाच्या आड गेले असतें. अर्थात् आपली दृष्टि आणि चंद्रमंडल यांच्यामध्ये समरेषेत सूर्यमंडल मध्येंच आलेले असतें. त्यामुळें चंद्रमंडल आपल्याला दिसत नाहीं. त्या काळाला आपण अमावास्या असें म्हणतो. अमा म्हणजे एकत्र, सह, बरोबर. आणि वास्या म्हणजे रहाणे. अर्थात् सूर्य आणि चंद्र यांचें ज्या काळीं एकत्र रहाणें घडते त्या काळाला अमावास्या असें म्हणतात तें अगदीं बरोबर आहे. यालाच ज्योतिषशास्त्रांत दर्श असें म्हणतात.

दर्शाच्या दिवशीं आपली दृष्टि आणि चंद्रबिंब यांच्यामध्ये सूर्यमंडळ आलेले असल्यामुळें आपल्या दृष्टीला चंद्रबिंब दिसत नाहीं. आपल्या दृष्टीला तें दिसलें नाहीं म्हणून ते नाहीं असें कसें म्हणतां येईल ? मोठ्या पर्वताच्या पलीकडे समरेषेत असलेला छोटा पर्वत आपल्याला दिसला नाहीं. म्हणून तो नाहीं असे म्हणतां येत नाहीं. तो त्या मोठ्या पर्वताच्या आड असतोच. चंद्राला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास साठ घटकांचा अवधि लागतो, तर सूर्याला एका नक्षत्रांतून दुसऱ्या नक्षत्रामध्ये जाण्यास तेरा दिवस लागतात. .प्रतिपादेपासून सूर्यमंडळ रोज थोडें थोडे बाजूला होत असतें. रोज सूर्यमंडळाचा पंधरावा हिस्सा बाजूला होत असतो. पंधरावा हिस्सा म्हणजेच एक कला. सूर्याचा जेवढा भाग बाजूला होत असतो तेवढाच तो चंद्रविबामध्यें प्रतिबिंबित होत असतो. तीच आपण शुक्लपक्षामध्यें प्रतिपदेच्या दिवशीं अथवा द्वितीयेच्या दिवशीं चंद्राची कोर म्हणून पहातो. याप्रमाणें सूर्याची रोज एक एक कला चंद्रबिंबामध्यें प्रतिबिंबित होत असते व कलेकलेने चंद्र वाढला असें आपण म्हणत असतो. पौर्णिमेच्या दिवशी चंद्रमंडल आणि सूर्यमंडल यांच्यामध्यें पूर्ण व्यवधान असल्यामुळें आपल्याला पूर्णचंद्र पहावयास सांपडतो. अशा रीतीनें आपल्या दृष्टीच्या आड येणाऱ्या सूर्यमंडलाच्या गतीचा हा खेळ आहे. तात्पर्य, चंद्रबिंब हें नेहमींच पूर्ण असतें, तथापि वर सांगितलेल्या कारणामुळे कळांची बुद्धि आणि ऱ्हास हे औपचारिक स्वरूपाने मानले जातात. चंद्राची सोळावी कला ही नेहमींच सर्व कलांमधून अनुस्यूत असतेच. लाक्षणिकदृष्ट्याही तिला वृद्धि-ऱ्हासांचा संपर्क नाहीं म्हणून ती कला नित्य मानली जाते.

प्रतिपदा, द्वितीया इत्यादि तिथिक्रमानें १ दर्शा, २ दृष्टा ३ दर्शता ४ विश्वरूपा, ५ सुदर्शना, ६ आप्यायमाना, ७ आप्यायमाना, ८ आप्याया ९ सूनृता, १० इरा, ११ आपूर्यमाणा, १२ आपूर्यमाणा, १३ पूरयन्ती, १४ पूर्णा, १५ पूर्णमासी अशी सर्व तिचीची वेदामध्ये नावे दिलेली आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याही सोळा कला आहेत. त्रिपुरसुंदरी, कामेश्वरी, भगमालिनी नित्यक्लिन्ना, भेरूण्डा, वह्निवासिनी, महावजेश्वरी, रोद्री, त्वरिता, कुलसुंदरी नीलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वाला, मालिनी अशीं त्यांची क्रमशः नावें आहेत. सोळावी कला नामरूपातीत आहे. म्हणूनच तिला "सच्चिदानन्दरूपिणी" असें म्हटलेले आहे. तथापि उपासकांच्या कल्याणाकरितां तिचाही एकाक्षरी बीजभूत मंत्र तंत्रशास्त्रामध्ये निर्दिष्ट केलेला आहेच. तो मंत्र गुरुमुखानेच जाणावा. शकार, रेफ, ईकार आणि बिंदु यांचें क्रमशः समुच्चित स्वरूप म्हणजेच तो मंत्र होय. याच बीजाला श्रीविद्या असे म्हणतात. हें बीज आणि पंचदशाक्षरी श्रीविद्येतील तीन खंड मिळून हा मंत्र चार खंडांचा मानला जातो.

"त्रिखण्डो मातृकामंत्र" या ठिकाणी मातृका शब्दाचा अर्थ वर्णमाला अथवा मुळाक्षरे असाही करतात. त्रिपुरसुंदरीमंत्र हा पंधरा आणि सोळा अक्षरांचा आहे. संपूर्ण मंत्र त्रिपुरसुंदरीचें स्वरूप असल्यामुळें ही सोळा अक्षरे त्रिपुरसुंदरीच्या सोळा कलाच मानल्या जातात. प्रत्येक कला देवतास्वरूप आहे. त्यांची नांवे वर दिलींच आहेत. या मंत्रातील सोळा अक्षरांतच संपूर्ण वाक्प्रपंचाला कारणीभूत असलेली मुळाक्षरे समाविष्ट झालेलीं आहेत. या मंत्रातील पहिलें अक्षर क आणि तिसऱ्या खंडातील शेवटचे अक्षर ल मिळून कला हा प्रत्याहार तयार होतो. प्रत्याहार म्हणजे अनेकांचा थोड्यांत संग्रह करणें. कला शब्दाने क-पासून ळपर्यंतची सर्व व्यंजने संगृहीत होतात. व्यंजने ही परतंत्र असतात. स्वरावांचून त्यांचा उच्चार होत नाहीं. तेव्हां व्यंजनांचे पूर्ण उच्चार होण्यासाठीं स्वरही उपलब्ध व्हावेत म्हणून या मंत्रातील दुसऱ्या अक्षराच्या मागे असलेला अ आणि तृतीय खंडातील शेवटचा ल मिळून "अल्" प्रत्याहार मानतात. व्याकरणशाखाच्या दृष्टीने अल् प्रत्याहारांत अ-पासून ह पर्यंतचे सर्व वर्ण येतात. शंकरांच्या डमरूंतून प्रकट झालेल्या "अइउण्" इत्यादि सूत्रांत पहिलें अक्षर अ आहे तर शेवटचे अक्षर ल् हें व्यंजन आहे. गा अल् प्रत्याहारामध्यें अ-पासून ह-पर्यंत सर्व वर्ण समाविष्ट होतात ही एक प्रकारें वर्णमालाच तयार होते. या वर्णमालेचा मेरुमणि क्ष असल्यामुळें या वर्णमालेला अक्षमाला असे म्हणतात. असा हा त्रिखंडमंत्र संपूर्ण मातृका म्हणजे वर्णप्रपंचाचें अधिष्ठान आहे. या त्रिखंडांत नाद, बिंदु आणि कला यांचाही समावेश करतात.

अ पासून ह - पर्यंतच्या सर्व वर्णांना पृथक् पृथक् अधिष्ठात्री देवता आहेत व हे वर्ण नामरूपाने नटलेल्या विश्वप्रपंचाला कारणीभूत असलेली जी तत्त्वें आहेत त्या तत्त्वांचे बीजभूत वर्ण म्हणून मानले जातात. या दृष्टीने ह्या सर्व वर्णांचा षोडशकलात्मक श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या स्वरूपांतच अन्तर्भाव होतो. "षोडशेन्दोः कला भानोर्द्विर्द्वादश दशानले । ताः पचाशत्कला ज्ञेया मातृकाचक्ररूपिणी ॥" कला म्हणजे वर्ण किंवा अक्षर. श्रीविद्येंतींल पंधरा अक्षरे ज्याप्रमाणें सोम, सूर्य आणि अग्नि या तीन तत्त्वांत विभागली आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण मुळाक्षरे देखील या तीन तत्त्वांत विभागली गेली आहेत. सोळा अक्षरें चंद्राची आहेत तर चोवीस अक्षरें सूर्याचीं आहेत. अग्नितत्त्वाचीं दहा अक्षरें आहेत. ही सर्व श्रीचक्रांत दाखविलेली आहेत. याप्रमाणे आपली श्रीत्रिपुरसुंदरी देवता ही "मातृकाचक्ररूपिणी" म्हणजे वर्णसमुहस्वरूप आहे. अशा रीतीनें मंत्र, मातृका, श्रीचक्र, देहांतील चक्रे, पिंड आणि ब्रह्मांड यांच्यांतील शब्दप्रपंचाच्या व अर्थप्रपंचाच्या दृष्टीने असलेली एकरूपता लक्षांत घ्यावी. त्याचप्रमाणें सर्वोच्च तत्त्वस्वरूप असलेल्या श्रीमहात्रिपुरसुंदरीचेंही स्वरूप लक्षांत घ्यावे आणि गुरुमुखानें प्राप्त झालेल्या श्रीमंत्राच्या मननानें साधकाने सर्व दुःखांतून मुक्त व्हावें आणि आपलें जीवन धन्य करावे. अर्थमननाचें सामर्थ्य नसलें तरी साधकाने केवळ मंत्रजपानेंही सिद्ध व्हावें, धन्य व्हावें, कृतार्थ व्हावें असें सामर्थ्य या अक्षरांतही आहे. श्रीविद्येच्याच कृपेने श्रीविद्येच्या तत्त्वाचा साक्षात्कार व्हावयाचा असतो व ही कृपा अनन्यशरणागतीवरच अवलंबून असते. "यस्य वा पश्चिम जन्म यदि वा शंकरः स्वयम् ।  तेनैव लभ्यते विद्या श्रीमत्पञ्चदशाक्षरी ॥" ज्याची जन्ममरणपरंपरा शेवटाला येऊन पोंहचली असेल अथवा जो स्वयं शंकर असेल त्यालाच ही पंचदशाक्ष्री श्रीविद्या प्राप्त होऊं शकते. असा या मंत्राचा महीमा आगमतंत्रांत गाइलेला आहे. आम्ही स्थालीपुलाकन्यायानें वाचकांना या विषयाचे दिग्दर्शन मात्र केलेले आहे.

हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून पंचेचाळीस दिवस पूजा करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. नैवेद्य दहींभात आणि उडदाचे वडे. हे सिद्धयंत्र धारण केल्यास सर्व विद्या सिद्ध होतात. रसायनेंही सिद्ध होतात.

02 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३१ वा

चतुष्षष्ट्या तन्त्रैः सकलमतिसन्धाय भुवनं
स्थितस्तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः पशुपतिः ।
पुनस्त्वन्निर्बन्धादखिल-पुरुषार्थैक-घटना-
स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षिति-तलमवातीतरदिदम् ॥ ३१॥


आई त्रिपुरसुंदरी ! तुझें भक्तवात्सल्य किती वर्णन करावे ? भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला समर्थ असें हें श्रीविद्यातंत्र शंकरांना प्रकट करावयास तूंच भाग पाडलेस. शंकरांनींही पण तुझ्या आग्रहास्तव तें प्रकट केलें, अशा अभिप्रायानें स्तुति करीत आहेत. "पशुपतिः चतुःषष्ट्या तन्त्रैः सकलं भुवनं अतिसन्धाय पुनः त्वन्निर्बन्धात् इदं ते तन्त्रं क्षितितलं अवातीतरत्" असा या श्लोकाचा मुख्य अन्वय आहे. शंकरांनी चौसष्ट तंत्रांची रचना करून लोकांना सिद्धींच्या व काव्य फळांच्या नादी लावले. केवळ मोक्ष प्रतिपादन करणारा वेदान्तही सांगितला आणि ते स्वस्थ बसले. ज्या योगें धर्म, अर्थ आणि काम यांच्यासह परम पुरुषार्थाचा लाभ होईल, असे साधन प्रकट होणें आवश्यक होतें. आई जगज्जननी ! असें साधन प्रकट करण्याचा तूंच त्यांना आग्रह केलास तेव्हां त्यांनी पुन्हा साधकांना सकल पुरुषार्थांचा प्रामुख्याने लाभ होईल अशा योग्यतेचें तुझें एक स्वतंत्रच तंत्र या भूमंडलावर अवतरविले, प्रकट केलें. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी तात्पर्यार्थ आहे.

विशिष्ट प्रकारच्या निरनिराळ्या सिद्धि अथवा ऐहिक फलें सत्वर प्राप्त करून देणाऱ्या साधनांचा अथवा उपासनांचा मार्ग दाखविणाऱ्या शास्त्राला तंत्र असें म्हणतात. तंत्रशास्त्राचे आद्य प्रवर्तक भगवान् शंकरच आहेत. ही तंत्रे बुद्धीमध्ये काय फलांविषयी मोह निर्माण करतात. अद्‌भुत सिद्धि प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य तंत्रविद्येच्या नादी लागतो. पण शेवटीं त्यांत त्याचा नाशच होतो. याकरितां शहाणे लोक सिद्धींचा अथवा ऐहिक फळांचा मोह विवेकानें जिंकतात व तंत्र विद्येपासून दूर रहातात. बहुतेक तंत्रविद्या या अवैदिक असल्यामुळेंही विवेकी लोक त्यांची उपेक्षा करतात. एकंदर या तंत्रविद्या संख्येने चौसष्ट आहेत. तंत्रविद्यांना शंबरतंत्र अथवा शंबरविद्या असेही म्हणतात. शंबर शब्दाचा अर्थ मायावी अथवा जादूगार असा आहे.

वाचकांना कल्पना यावी म्हणून आम्ही या ठिकाणी कांहीं तंत्रविद्यांचा उल्लेख करीत आहोंत. १. महामायाशंबरतंत्र. या तंत्राच्या साधनानें साधक हा लोकांच्या डोळ्यांना घटाचा पट भासवितो तर पटाचा घट भासवितो. अत्तराला घासलेटाचा वास भासवील तर घासलेटाला अत्तराचा वास भासवील. रडण्याच्या आवाजाला सुस्वराचा भास निर्माण करील तर सुस्वर गायनाला रडण्याचा भास दाखवील. काट्यांची टोके गादीप्रमाणे मऊ असल्याचें दाखवील. तर पराची गादी कांट्याप्रमाणे टोचत असल्याची प्रतीति आणून देईल इत्यादि. यालाच मोहनतंत्र असेंही म्हणतात. २. यो गिनीजालतंत्र. स्मशानांत अपरात्री बसणे, प्रेतें उकरणें इत्यादि वाममार्गानें या तंत्रातील साधनांचे अनुष्ठान करावे लागतें. त्यानें योगिनी प्रसन्न होतात व वाटेल तें कार्य करता येतें. ३. तत्त्वशंबरतंत्र. यायोगे पृथ्वीचें जल आणि जलाची पृथ्वी याप्रमाणे भूततत्त्वांचें परिवर्तन करतां येतें. ४. सिद्धभैरवतंत्र. ५. बटुकभैरवतंत्र. ६. काळभैरवतंत्र ७. कालाग्निभैरवतंत्र. ८. योगिनीभैरवतंत्र. ९. महाभैरवतंत्र. १०. शक्तिभैरवतंत्र. या तंत्रांच्या साधकांना कापालिक असें म्हणतात. ११. बहुरूपाष्टकतंत्र. यांत ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी इत्यादि देवतांची तंत्रें येतात. १२. यमलाष्टकतंत्र. यांत ब्रह्मयामल, विष्णुयामल, रुद्रयामल, लक्ष्मीयामल, उमायामल, स्कंदयामल, गणेशयामल आणि जयद्रथयामल अशीं आठ यामले आहेत. १३. चंद्रज्ञानविद्यातंत्र. १४. मालिनीविद्यातंत्र. १५. महासंमोहनतंत्र. १६. वामजुष्टतंत्र. १७. महादेवतंत्र. १८. वातुलतंत्र. १९. वातलोत्तरतंत्र. २०. कामिकतंत्र. २१. हद्‌भेदतंत्र. २२, तंत्रभेदतंत्र. २३. गुह्यतंत्र. २४. कलावादतंत्र. २५. कलासारतंत्र. २६. कुंडिकातंत्र. २७. मतोत्तरतंत्र. २८. वीणातंत्र. २९. त्रोतलतंत्र. ३०. त्रोतलोत्तरतंत्र. ३१. पंचामृततंत्र. ३२. रूपभेदतं व इत्यादि. एकंदर तंत्रांची संख्या चौसष्टापेक्षांही अधिक भरते. यांतील कांहीं तंत्रे अवैदिक आहेत तर कांहीं तंत्रे अंशतः वैदिक व अंशतः अवैदिक आहेत. ही सर्व तंत्रे राजस व तामस असल्यामुळें सात्त्विक सत्प्रवृत्तीच्या दृष्टीने त्याज्यच आहेत.

यावर कोणी असें विचारील कीं, शंकरांनीं या तंत्रांचा उपदेश करून लोकवंचना कां केली ? यांत शंकरांचा दोष नाहीं का ? पण हा आक्षेप बरोबर नाही. समाजामध्ये अनेक स्वभावाचे लोक असतात. त्यांचे अधिकारही भिन्न भिन्न असतात. अशा स्थितींत अधिकारभेदानें उपदेश करणें अपरिहार्य असतें. कांहीं उद्योग न करतां पशुतुल्य जीवन व्यतीत करण्यापेक्षा कांहीं उपासना करून सिद्धि मिळविणे, इष्ट सुखे संपादन करणें हें केव्हांही ये योयच होय. अशा रीतीने बहुजनसमाजाला उद्योगाचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीनें शंकरांकडून तंत्रांचा उपदेश केला गेला. सिद्धींच्या आणि ऐहिक सुखाच्या लोभानें व मोहानें सात्त्विक आणि वैदिक मार्गानुयायी लोकही जर त्या तंत्रमार्मानें जाण्यास प्रवृत्त झाले तर त्यांत शंकरांचा काय दोष आहे ? दीपक, पाचक, रेचक, वामक, अवष्टंभक इत्यादि अनेक प्रकारची औषधें असतात. रोग्याने आपल्या रोगाचा, प्रकृतीचा व अवस्थेचा विचार करून त्यांतील योग्य ते औषध घ्यावयाचे असतें. भलत्याने भलते औषध घेतल्यास त्याचा परिणाम अनिष्ट होणार हें निश्चित. यांत औषधिशास्त्राचा किंवा तें शास्त्र सांगणाऱ्याचा काय दोष आहे ? ग्रंथालयांत अनेक विषयांचे ग्रंथ असतात. वाचकानें आपल्या अधिकाराप्रमाणें ग्रंथांची निवड करूनच ते वाचावयाचे असतात. भलत्याने भलते ग्रंथ वाचून काळाचा अपव्यय केल्यास त्यांत ग्रंथालयाचा किंवा ग्रंथकाराचा काय दोष आहे ? भोजनामध्ये राजशाही थाटाच्या विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, कुरडया, पापड, वडे, भजीं, कढी, आमटी, वरण, पांढरा भात, केशरीभात, मसालेभात, साजूक तूप, पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड, पुरी, लाडू, इत्यादि अनेक प्रकारचे पदार्थ असतात. खाणाऱ्यानें आपली शक्ति पाहूनच ते सेवन करावयाचे असतात. मोहाला आणि जिव्हालौल्याला बळी पडून एखाद्याने न सोसणारे पदार्थ खाल्ले आणि ते बाधले तर त्यांत भोजन घालणाऱ्याचा काय दोष आहे ? याच न्यायाने तंत्रमार्गाचा उपदेश शंकरांनीं करण्यांत त्यांनीं लोकवंचना केली असें म्हणतां येत नाहीं. ते तर परम दयाळू आहेत. अवैदिक मार्ग आणि वैदिक आणि अवैदिक असा मिश्र मार्ग सुजनांनी सोडून द्यावा असे स्वतः शंकरांनीच सांगितलेले आहे. "मिश्रकं कौलमार्गं च परित्याज्यं ही शांकरि" शंकर म्हणतात, हे पार्वती ! अवैदिक आणि वैदिक व अवैदिक अशा मिश्र स्वरूपाचा हा वाममार्ग - तंत्रमार्ग अखेर त्याज्यच आहे.

तंत्रवाङ्‌मयांत शुभागमतंत्र नांवाचा एक भेद आहे. शुभागमतंत्रांतील सर्व अंगें ही वेदमार्गानुसारी आहेत. वसिष्ठ, शुक, सनक, सनंदन आणि सनत्‌कुमार हे या तंत्रमार्गाचे पुरस्कर्ते आहेत. वासिष्ठसंहिता, सनकसंहिता, शुकसंहिता, इत्यादि त्यांची नांवे आहेत. या पांच संहितांना शुभागमपंचक असेंच म्हणतात. या सर्व ग्रंथांत श्रीचक्राधिष्ठीत श्रीविद्येचाच पुरस्कार केलेला आहे. यालाच नित्याषोडशिकातंत्र अथवा महात्रिपुरसुंदरीतंत्र असें म्हणतात. याचेंही मुख्य उपदेशक लोकहिततत्पर भगवान् श्रीसदाशिवच आहेत. तात्पर्य पशुपति म्हणजे भगवान् शंकर यांनी "तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः" म्हणजे भिन्नभिन्न सिद्धींच्या प्राप्तीसाठी रचली गेलेली अशीं चौसष्ट तंत्रे लोकांना उपदेशिलीं. या तंत्राच्या योगाने सर्व लोकांना सिद्धींच्या व काम्यफलांच्या नादी लावून (अतिसंधाय) ते स्वस्थ बसले. तेव्हां हे आई त्रिपुरसुंदरी ! तूंच त्यांना निर्बंध म्हणजे आग्रह केलास. तुझ्याच आग्रहावरून त्यांनीं चारी पुरुषार्थांची प्रामुख्याने प्राप्ति करून देण्यांत स्वतंत्र असलेलें तुझें हे तंत्र या भूतलावर प्रकट केलें. या तंत्रालाच महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र असें म्हणतात. तेंच तंत्र या सौंदर्यलहरीचा विषय आहे.

श्रीचक्र हेंच या श्वोकाचें यंत्र होय. या श्लोकांतील व बाविसाव्या श्लोकातील श्रीयंत्रांत मध्यवर्ति त्रिकोणांत असलेला बिंदु हा त्या त्रिकोणाच्या वरच्याच बाजूस असलेल्या बारक्या चतुष्कोणांत दाखविलेला आहे. श्रीचक्रलेखनांतही कौलचक्र आणि समयचक्र असे दोन भेद आहेत. कौलचक्रांत बिंदु हा मध्यवर्ती त्रिकोणांत असतो तर समयचक्रांत तो त्रिकोणाच्यावर असलेल्या चतुष्कोणांत दाखावतात.

हें श्रीयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. यंत्र हातावर ठेवून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. दुधाचा आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याने सर्व लोक आणि राजेही वश होतील.

01 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३० वा

स्वदेहोद्‌भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो
निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः ।
किमाश्चर्यं तस्य त्रिनयन-समृद्धिं तृणयतो
महासंवर्ताग्निर्विरचयति निराजनविधिम् ॥ ३०॥


तादात्म्यभावनेनें इष्टदेवतेची उपासना करणें याला अहंग्रहोपासना असें म्हणतात. ही इतर सर्व साधनांपेक्षां साधकाला सत्त्वर फलप्राप्ति करून देत असते. या दृष्टीने या श्लोकांत आचार्य महात्रिपुरसुंदरीच्या तादात्म्यभावनेनें केल्या जाणाऱ्या उपासनेचा महिमा वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! तूं नित्या म्हणजे आदि आणि अंत यांनी रहित आहेस. त्याचप्रमाणे निषेव्या म्हणजे नित्य उपासना करण्यास योग्य आहेस. तुझ्या देहांतून अर्थात् चरणकमलापासून प्रकट झालेल्या किरणांना देवताच म्हणतात. घृणि शब्दाचा अर्थ किरण असा आहे. त्या देवता किरणासारख्या प्रकाशमान असल्यामुळें त्यांना किरण असें म्हटलेले आहे. या देवता श्रीत्रिपुरसुंदरीचा देहच असलेल्या श्रीचक्रामध्ये विराजमान झालेल्या आहेत. श्रीचक्रवर्णन पहा. तुझ्या भोंवतालीं विराजमान असलेल्या त्या देवता तुझी नित्य सेवा करीत आहेत. त्या सर्व देवतांसह सच्चिदानंदस्वरूप असलेली तूं, जो कोणी साधक तादात्म्यभावनेनें "सोहमस्मि" म्हणजे तो सच्चिदानंद आत्माच मी आहे. या भावनेप्रमाणे "त्वमहमस्मि" म्हणजे तूंच मी आहें अशा तादात्म्यभावनेनें तुझी उपासना करील तो पूर्ण समृद्ध होईल. त्रिनयन म्हणजे भगवान् सदाशिव. नयन म्हणजे मार्ग अर्थात् प्राप्तीचे साधन. सूर्य, चंद्र आणि अग्नि ही शंकरांच्या प्राप्तीचीं तीन साधने आहेत म्हणून शंकरांना त्रिनयन असे म्हणतात. अथवा इडा, पिंगला आणि सुषुन्ना या तीन मार्गांनींच योगी लोक सदाशिवतत्त्वाचा साक्षात्कार करून घेत असतात. म्हणूनही शंकरांना त्रिनयन असे म्हटलेले आहे. अथवा सूर्य, चंद्र आणि अग्नि हे त्यांचे तीन नेत्र आहेत म्हणूनही त्यांना त्रिनयन असें म्हणतात. त्रिनयन म्हणजे शंकर. त्यांची समृजि देखील तो साधक कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो. "महासंवर्ताग्नि" म्हणजे कल्पांतकाळाचा प्रळयाग्नि त्याला नीरांजनविधि करतो. तो स्वतःलाच नीरांजनदीपाप्रमाणें त्याच्यावरून ओवाळून घेतो यांत आश्चर्य काय आहे ? तात्पर्य, हे आई ! अत्यंत भक्तवत्सल असलेल्या तुझी तादात्म्यभावनेने उपासना केली असतां तो तुझ्या कृपेने शंकरापेक्षांही अधिक समृद्ध होतो ! प्रत्यक्ष तूंच तो होतो !

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र काढून शहाण्णव दिवस त्याची आराधना करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. मध, व गूळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावे. फल अणिमाद्यैश्वर्यसिद्धि, परकायप्रवेश, अग्निस्तंभन.