Saturday, December 17, 2011

श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२

      ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
       ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
         अथ प्रथमो अध्यायः ।

         ॥ अर्जुनविशादयोगः ॥

          धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय  ॥ १-१ ॥
अन्वय  :  हे संजय ! धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत ?
अर्थ   :  संजया ! धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले ?
विवरण  :  येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.  
    भगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार ? युद्धच करणार ना ? मग असे कां विचारावे ? परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपल्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे.  याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -
धर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा
    लोके श्रुता दृश्यते चापि पार्थ ।
महाश्रावं जीवितं चाप्यनित्यं
    संपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥
न चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्
    प्रयच्छेरंस्तुभ्यं अजातशत्रो ।
भैक्षचर्यामन्धकवृष्णिराज्ये
    श्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥
अल्पकालं जीवितं यन्मनुष्ये
    महास्त्रावं नित्यदुःखं चलं च ।
भूयश्च तद् यशसो नानुरूपं
    तस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥
    हे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.
पापानुबन्धं को नु तं कामयेत
    क्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः ।
यत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्
    यत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥
कृपः शल्यः सौमदत्तिर्विकर्णो
    विविंशतिः कर्णदुर्योधनौ च ।
एतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्
    यद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥
लब्ध्वापीमां पृथ्वीं सागरान्तां
    जरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या ।
प्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्
    नैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥
अमात्यानां यदि कामस्य हेतोः
    एवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् ।
अपक्रामेः स्व प्रदायैव तेषां
    मा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥
    पापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील ? युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे ? राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.
[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]
    धृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना ? असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’  बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.
भाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :
    धृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.


सञ्जय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥
अन्वय  :  तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥
अर्थ   :   संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;
विवरण  :  येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.

 

Wednesday, December 14, 2011

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश
( काय आहे यात)


सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥
    सर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ?) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.
    सामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे -
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकच ग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥
की अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम.
    भारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला.
    गीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे  या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ  यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं । एको देव देवकीपुत्र एव । एको मंत्र तस्य नामानियानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे.
    प्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे.
    पण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे ? कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां ? डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे -  (सविस्तर ऐकायचे असल्यास इथे पहा)
    भगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला ? संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय ? तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा । हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा.
    गीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव.
    धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality  - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे.

Sunday, July 31, 2011

रामायणाची रचना कशी झाली ?

        महर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि ? मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही ! आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला.
        पुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें ? या वरून मी काय समजावे ? इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. "तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर." ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.
      प्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी.
       महर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार ? इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो ? हा प्रश्न पडतोच.
    महर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते. 

रामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च ।
सभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥
हसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् ।
तत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥
स्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने ।
सत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥
ततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः ।
पुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥


श्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥     योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥


*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है । वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है। मलेशिया में "हिकायत सिरी राम" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है । थाईलैंड में रामकथा को "रामकियेन" या "रामकीर्ती" कहा जाता है । यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है । वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं । जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है । इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र । वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं। बर्मा में "रामायागन" नाम से रामकथा लिखी गई । बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं। रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ । ] 

Thursday, July 28, 2011

श्री विष्णु सहस्रनाम - श्लोक ८


श्री विष्णु सहस्रनाम  श्लोक ८


ईशानः प्राणदः प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः  ।

हिरण्यगर्भो  भूगर्भो माधवो  मधुसूदनः  ।।

(६४) ईशानः :  - पंच महाभूतांचे नियंत्रण करणारा. या संज्ञेने असे सुचवायचे आहे की ईश्वर या विविधतेने नटलेल्या जगाचे स्वतःच केलेले नियम अमलांत आणणारा नियंता आहे. जेव्हा त्याची इच्छा शक्ती 'कार्य नियंता ' ह्या भूमिकेतून प्रतीतीस येते तेंव्हा तो ' ईशान ' स्वरूपांत कार्य करतो. तोच परमेश्वर आहे असाही या संज्ञेचा अर्थ होतो.

(६५) प्राणद:  - (प्राणान् ददाति इति प्राणदः) :  - सर्व प्राणीमात्रांना प्राण देतो तों प्राणद. तत्वज्ञानाप्रमाणे सजीव शरीरातील जीवनाचा निर्देश ( व्यक्तता ) ज्याचेमुळे होतो त्याला ' प्राण ' असे संबोधिले जाते. जगातील सर्व सजीवांच्या सर्व हालचाली ज्या एका जीवनाच्या स्त्रोतापासून होत असतात त्यालाच प्राणद असे म्हटले जाते. तैतिरीय उपनिषद् म्हणते (२-७) जर तो सर्वत्र नसेल तर कोण सजीव राहू शकेल? कोण श्वासोच्छ्श्वास करू शकेल ?

(६६) प्राण:  - ( प्राणिति इति प्राणः ) :  - जो धारण करतो ( जीव ) तो प्राण, व अशातर्‍हेचा ' प्राण ' ज्याचे मध्ये कार्यकारी आहे तो प्राणी. ह्या ठिकाणी शरीरातील प्राण म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वर असे सूचित केले आहे. तोच नित्य आहे, अनंत आहे. येथे असाही अर्थ होईल की 'जो वायूलाही जीवनदायी शक्ति देतो तो परमेश्वर प्राणद आहे कारण वातावरणातील सर्व चैतन्य धारण करण्याची शक्ति त्याचेपासूनच निर्माण झाली आहे. कठोपनिषदांत परमेश्वराची व्याख्या तो प्राणाचा प्राण आहे, (प्राणस्य प्राणः) अशी केली आहे.

(६७) ज्येष्ठः :  - जो सर्वांपेक्षा वृद्ध आहे तो ज्येष्ठ. [1] अवकाशाची संकल्पना प्रत्यक्षात येण्याचाही आधी ते अनंत अस्तित्वात होते. वृद्ध ह्या शब्दाचा तमभाव दर्शविणारी दाखविणारी ही संज्ञा आहे. आपल्या शास्त्रामध्ये चिरपरीचित असलेल्या 'सनातन' शब्दाने सूचित होणारा अर्थ ह्याही संज्ञेला लागू पडतो.

(६८) श्रेष्ठः :  - सर्वाहून अधिक गौरवास्पद असा. ह्या ठिकाणी पुन्हा 'श्रेयः' ह्या शब्दाचे तमभावाचे रूप[2] वापरले आहे.

(६९) प्रजापतिः :  - सर्व प्रजेचा (सजीव प्राण्यांचा ) पति ( स्वामी ). प्रजा म्हणजे संतती व त्यांचा स्वामी अगर पिता. म्हणून ह्या संज्ञेने जगातील सर्व सजीव प्राण्यांचे पितृत्व त्याचेकडे जाते. व सर्वप्राणी त्याचीच मुले आहेत असे सुचविले जाते. सर्वप्राणीमात्रांचा उत्पत्तीकर्ता तोच आहे.

(७०) हिरण्यगर्भः :  - जो हिरण्यमय ब्रह्मांडाच्या गर्भात रहातो तो. उपनिषदांत म्हटले आहे ' हे सर्व त्यानेच व्याप्त आहे.[3] संस्कृतमध्ये हिरण्यमय विश्व हा एक वाक्प्रचार आहे. यातील सुवर्णवाचक शब्दाने सर्व आनंददायक व सर्व सुखदायक गोष्टींचा निर्देश केला जातो. या सर्व आनंददायक गोष्टींनें अंतर्भूत असलेला तों हिरण्यगर्भ. या संज्ञेचा आणखी एक अर्थ असा करतां येईल की ' तो स्वतः सृष्टिकर्ता असल्यामुळे त्यालाच सर्व जडचेतन सृष्टिचे गर्भस्थान [4] (उत्पत्तिस्थान) मानले जाते.

(७१) भूगर्भः :  - जो या पृथ्वीचे गर्भस्थान आहे तो भूगर्भ. म्हणजेच त्याचेपासूनच सर्व सृष्टिची उत्पत्ति झाली आहे. मातेच्या गर्भस्थानांत असलेला गर्भ ज्याप्रमाणे माता अत्यंत प्रेमाने व स्वतःच्या जीवनशक्तिने सतत वाढविते, पोसते त्याप्रमाणे ह्या ब्रह्मांडाचा अत्यंत लहान भाग असलेले जगत् त्या परमेश्वराकडून अत्यंत प्रेमाने धारण केले जाते, पोषिले जाते. आणखी एक अर्थ - या दिव्य सृष्टिचा (भू) भर्ता ( रक्षणकर्ता - गर्भ ) असा होतो.[5]

(७२) माधवः :  - मा - माया - महालक्ष्मी. तिचा पति ( धवः ) मायेचा पति किवा स्वामी. किवा छांदोग्य [6] उपनिषदांत वर्णन केल्याप्रमाणे 'मधुविद्येच्या' सहाय्याने ज्याचे ज्ञान प्राप्त होते तो माधव. या संज्ञेचा अर्थ असा होईल की 'जो मौनी आहे ( शांत आहे ) जो शरीर मन व बुद्धिचे बदलत्या जगातील व्यापार साक्षीत्वाने पहातो तो माधव. दुसर्‍या शब्दात ज्या साधकाने आपले मन स्थिर करून व योग साधनेने आपले अंतःकरण शुद्ध केले आहे त्या साधकांस प्रतीत होतो तो माधव'.[7]

(७३) मधुसूदनः :  - ज्याने मधु राक्षसाचा निःपात केला तो. श्रीविष्णुनें मधु व कैटभ या दोन राक्षसांचा वध केला. त्या संबंधी महाभारतामध्यें आलेली कथा गूढार्थपूर्ण आहे. वेदांमध्ये कर्माचे फल म्हणजेच 'मधु' असे म्हटले आहे. ही कर्मे वासना निर्माण करतात. ह्या वासनांचा नाश परमात्म्याच्या सत्यस्वरूपाचे चिंतन केले असता होतो. म्हणून परमेश्वरांस 'वासनांचा' नाश करणारा 'मधुसूदन' असे म्हटले आहे.

 ---------------------------------------------------------------
[1]     वृद्धः ज्यायात् ज्येष्ठः
[2]   श्रेयः श्रेय श्रेष्ठः
[3]    इशावास्यमिदं सर्वम्
[4]   हिरण्यगर्भः समवर्त्तताग्रे  ।। 
[5]    तैत्तिरिय ब्राह्मणामध्ये ( ३-१-२ ) ही दिव्य पृथ्वी श्रीविष्णुची पत्नी आहे असे म्हटले आहे.
[6]    मधुविद्यावबोधत्वात् धवत्वद्वा श्रियोऽनिशम्  । मौनात् ध्यानाच्चयोगाच्च विद्धिभारत माधवम्  ।
[7]   हे भारत, तू माधवास मौन (मा), ध्यान (ध), व योग (व) यांचे सहाय्याने जाणून घे.

Tuesday, July 26, 2011

महर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी

       तपस्वी वाल्मीकि महर्षि वाल्मिकींनी ’रामायण’ नामक महाकाव्य रचले. रामायण महाकाव्याची कुणी पुराणात गणती करीत नाहीत. सद्यकालीन उपलब्ध रामायणात कितीतरी प्रक्षिप्त भाग आहे असे बरेच तज्ञांचे मत आहे. या विद्वानांचे विश्लेष पाहता असे दिसून येते की प्रक्षिप्त भाग काढला तर मूळ काव्यात श्रीराम हा विष्णुचा अवतार या अर्थाने श्रीरामाचे चरित्र सांगितलेले नाही. एका थोर विभूतीचे चरीत्र या दृष्टीने वाल्मिकी महर्षिंनी ते ग्रथित केलेले आहे. इतर पुराण ग्रंथांमध्ये आढळणारे मंगल वंदनपर श्लोक यात आढळत नाहीत. मग वाल्मिकीने हे महाकाव्य कशाकरिता रचले असावे ? एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का ? असेल तर ती कोण ? असे महर्षिंनी नारदमुनिला विचारले. यावरून लोकांनी आपल्या जीवनात कसे आचरण करावे यासाठी एका आदर्श व्यक्तिचे चरीत्र त्यांच्यापुढे असावे या हेतूने ’रामायण’ महाकाव्य रचले असावे याचे शक्यता दाट आहे. 

        पण एवढे महान काव्य रचण्यास फार मोठी प्रतिभा असावी लागते. प्रतिभा काही अशी-तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी तपस्याबळ पाठीशी असावी लागते. आपण एका वाक्यात वाचतो, ऐकतो की वाल्मिकीने फार मोठी तपस्या केली. फार मोठी म्हणजे किती, कशी हे स्वतः तपाचरणात असणारेच जाणू शकतात. रामायणात तपस्येचे वर्णन आढळतेच, पण पुढे हेही म्हटले आहे की त्या तपोबलाने ते ब्रह्मपदाला पोचले. मग सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार हे निश्चित. आपल्या सिद्धीने त्यांनी दशरथाच्या आधीपासून रामचरीत्र कसे घडले ते सर्व पाहिले, ऐकले असणार हे संभवनीय आहे. रामायणात उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने त्यांना अशा प्रकारची दृष्टी दिली. आता तप प्रेरणेस देखील काहीतरी निमित्त लागतेच. पद्मपुराण, अध्यात्म रामायण इतरत्र साहित्यातून महर्षिंच्या पूर्व चरीत्राबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. महर्षिंच्या पूर्व चरीत्रासाठी आपण अध्यात्म रामायणातील त्यांनी स्वमुखे श्रीरामास निवेदन केलेले वर्णन पाहू. महर्षि श्रीरामाला म्हणतात – “अहं पुरा किरातेषु किरातैः सह वद्धितः । जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतं सदा ॥ (अ.रा. ६.६५). मी आधी रानटी होतो. दुष्कर्मात रत असे. जन्माने द्विज असलो तरी आचरणाने शूद्रच होतो.” शास्त्रात शूद्राची एक व्याख्या सापडते ती अशी – शुचा अभिदुद्रुवे इति शूद्रः – जो स्वतः दुःखी असतो आणि इतरंनाही दुःख देतो, त्यांना रडवतो त्याला शूद्र म्हणावे. यावरून असे दिसते की मनुष्य जन्माने कोणत्याही वर्णाचा असो (जातीचा नव्हे, हल्ली जात हा वर्णाला पर्यायी शब्द वापरला जातो) , त्याचे आचरण हीच खरी त्याच्या वर्णाची ओळख. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण, पूर्वायुष्यातील आचरणामुळे शूद्र आणि तपस्येनंतर स्थित्यंतर पावल्याने परत ब्राह्मण. केवळ ब्राह्मणच नव्हे तर महर्षिपद, ब्रह्मपद पावलेला. 

       फार प्राचीन काळी एका गहन अरण्यात एक युवक राहात असे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने सोपा असा वाटमारीचा धंदा अवलंबिला होता. कोणी वाटसरू दिसला की त्यावर हल्ला करायचा आणि त्यांच्याकडे असेल नसेल ते लुबाडायचे, प्रसंगी कधी हत्याही होत असे. एकदा संयोग असा की देवर्षी नारद चालले होते आणि त्या युवकाने त्यांच्यावर झडप घातली. देवर्षि म्हणाले – मला लुटण्यास तू का प्रवृत्त होत आहेस ? लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय ? आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय ? तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही ? सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल ? “जपतां उलटे नाम वाल्मिकी । बने ब्रह्मसम विदित लोकिं की ॥ (रामचरितमानस २.१९४) 

       श्रीरामाला महर्षि आपली कथा सांगताहेत. म्हणतात – “अहं यथोपदिष्टं तौः तथा अकरवमञ्जषसा । जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ ? अंगावर वारूळे उठे पर्यंत ?) परीणाम काय झाला ? वाटमार्यािचा मुनि झाला, ब्रह्मसम झाला. म्हणून तर वाल्मीकि रामायणात प्रथम श्लोकांत त्यांचा उल्लेख “तपस्वी” म्हणून आला आहे.

Sunday, July 24, 2011

श्लोक ७ वा
अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षः प्रतर्दनः  ।
प्रभुतस्त्रिककुब्धाम पवित्रं मंगलं परम्  ।।


(५५) अग्राह्यः :  - ज्याचे ज्ञान इंद्रियांचे सहाय्याने होऊ शकत नाही तो 'अग्राह्य ' आहे. तो इंद्रिय ज्ञानाचा विषय नाही तर सर्व प्राणीमात्रांना आपापल्या इंद्रियाने होणारे सर्व ज्ञान ज्याला होते तो प्रत्यक्ष ज्ञाता आहे. स्वतः ज्ञाता कधीच ज्ञेयविषय होऊ शकत नाही. इतर इंद्रियगम्य वस्तूप्रमाणे 'सत्य' हे इंद्रियांचे सहाय्याने ज्ञात होत नाही. सर्वकालामध्ये सर्व प्राणीमात्रांना सर्व इंद्रियांचे द्वारा सर्व विषयांचे ज्ञान ज्याला होते असा तो एकमेव ज्ञाता आहे. इंद्रियज्ञानाचा ज्ञाता तो असतो इतकेच नव्हे तर मनातील भावना व बुद्धीतील विचार जाणणाराही तोच आहे.
    याप्रमाणे इंद्रियांनी तो समजत नाही, मनाला तो भासत नाही व बुद्धिला ज्ञात होत नाही उपनिषदांमध्ये म्हटले आहे “मनासहित शब्द तेथे पोहोचू न शकल्याने परत फिरतात व तोच परमेश्वर आहे” ( यतोवाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह) म्हणूनच तो अग्राह्य आहे, इंद्रियातीत व विचारातीत आहे. केनोपनिषद स्पष्टपणे व ठासून सांगते “ज्याला नेत्र पाहू शकत नाहीत परंतु नेत्र ज्याच्यामुळे पाहू शकतात तेच ब्रह्म (महाविष्णु) आहे असे तू समज. तू इथे ज्याचे पूजन करतोस ते नव्हे.”

(५६) शाश्वत:  -(शश्वत् भवतीति शाश्वतः) :  - जे सर्व कालामध्ये जसे आहे तसेच रहाते ते शाश्वत - जे शाश्वत आहे ते तीनही कालामध्ये विकाररहितच असते. म्हणजेच ते कालबंधना पलिकडे आहे. ते परमसत्य ज्ञान स्वतःच सर्व कालाला प्रकाशित करते व जो प्रकाशक आहे तो प्रकाश्य वस्तूकडून कधीच परिणाम पावत नाही. ते विकाररहित सत्य म्हणजेच 'श्रीविष्णु '.


(५७) कृष्णः :  - संस्कृत भाषेतील कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा रंग. ज्या सत्याचे बुद्धिने थोडेसे ज्ञान होते परंतु परमार्थतः त्याची प्रतीती येत नाही ते सत्य विशिष्ठ कृष्णपटलाने झाकले आहे असे मानले जाते.
    मूळ (२)  'कृष्' ह्या धातुचा अर्थ आहे 'सत्ता' किवा 'अस्तित्व' व ’ण’ शब्दाचा अर्थ आहे आनंद. हा उल्लेख महाभारतातील उद्योग पर्वात (७०-५) आलेला आहे. म्हणून कृष्ण (कृष्+ण) म्हणजे सत्ता व आनंद अर्थात कृष्ण हे नांवच अत्यंत श्रेष्ठ परमानंदाचे द्योतक आहे. त्याच्या कृष्णवर्णामुळेही त्याला 'कृष्ण' असे संबोधिले जात असे. “माझा वर्ण काळा असल्यामुळे हे अर्जुना मला कृष्ण असे संबोधिले जाते.” असा उल्लेख महाभारताचे शांती- पर्वात आहे. (३४३)
    महाभारतात आपल्याला असे आढळते की श्रीकृष्ण स्वतःच अर्जुनास समजावून सांगतात की - जेव्हा पृथ्वीचे कवच अत्यंत कठीण होते तेंव्हा मी स्वतःच कृष्ण वर्णाचा लोहाचा नांगर होऊन ही भूमी नांगरतो. - कृषी देवता (३)
    वरील अर्थाखेरीज कृष्ण ह्या शब्दाचा जो आपल्या भक्तांना आकर्षून घेतो तो असाही अर्थ होतो. ( आकर्षणात् कृष्णः) सत्य हे प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षून घेते. व त्याचा प्रतिकार ही होऊ शकत नाही. टीकाकारांनी या अर्थाचे विवरण फार आकर्षक शैलीने व समर्पक रितीने केले आहे. व त्यांचा निष्कर्ष असा की जे भक्त त्याचे ध्यान चिंतन करतात त्यांच्यां हृदयातील पाप  नाहीसे करतो, तो कृष्ण.
    सत्यामध्ये अशी एक आकर्षण शक्ति असते की जी मनुष्याचा अहंकार अगर अहंकेन्द्रित सर्व वासना आपल्याकडे ओढून घेते. या दृष्टीकोनातून पाहिले असतां कृष्ण ही एक सामान्य कृषीदेवता रहात नाही तर मनुष्यांच्या मनोभूमीमध्ये खोल रूजलेल्या दुष्ट पापवृत्ती खणून ती मनोभूमी अत्यंत निरामय आनंद रूजविण्यास तयार करणारी थोर देवता ठरते. व त्या आनंदाचेच सत्य हे एक स्वरूप आहे.


(५८) लोहिताक्षः :  - लाल डोळे असलेला. पुराण वाङ्ग्मयात अनेक ठिकाणी परमेश्वराचे वर्णन ' रक्तकमलाप्रमाणे डोळे असलेला ' असे केलेले आढळते. साधारणतः लाल डोळे क्रोध दर्शवितात. परमेश्वराने दुष्टतेचा नाश करण्याकरतां अनेक अवतार धारण केलेले आहेत. जे परमसत्याकडे दुर्लक्ष करून ऐहिकतेमध्येच रममाण होणारे व खलप्रवृत्तीचे मानव असतात त्यांचेवर परमेश्वराचा कोप होतो.


(५९) प्रतर्दन:  - ( तर्दहिंसांयाम्) :  - मूळ धातू तर्द ह्या शब्दाचा अर्थ विनाश. त्याचे पूर्वी लागलेला 'प्र' हा उपसर्ग आधिक्य दाखविणारा आहे. त्यामुळे 'प्रतर्द ' ह्या शब्दाचा अर्थ होतो पूर्णनाश. प्रलयाचे वेळी रूद्र स्वरूपात अवतीर्ण होऊन जो सर्वांचा विनाश घडवून आणतो तो प्रतर्दन ' श्रीविष्णु'.


(६०) प्रभूतः :  - ह्या पदाचा अर्थ होतो जन्मतःच परिपूर्ण अगर नित्य परिपूर्ण. तो परमात्मा स्वभावतःच परिपूर्ण असल्याने अंतिम सत्य स्वरूपांत किवा अवतार धारण केलेले असतानाही त्याचा जो अविष्कार होतो तोही परिपूर्ण असतो. विशेषतः परमेश्वराने आपला मुख्य व दिव्य अवतार असा जो ' श्रीकृष्णावतार ' त्यामध्ये आपली सर्वज्ञता व सर्व सामर्थ्य प्रकट केले आहे. त्यामुळे तो पूर्णअवतार मानला जातो.


(६१) त्रिककुब्धाम :  - जो तीन विभागांचा (ककुभ) आधार (धाम) आहे तो त्रिककुब्धाम. साधारणता टीकाकार ह्या शब्दाचे विवरण करताना ' उर्ध्व, मध्य व अध' ह्या तीन स्तरांचे सर्व विभाग असे करताना दिसतात. वेदांताच्या भूमिकेवरून विचार करतां हे तीन स्तर म्हणजेच जाणिवेचे जागृत, स्वप्न व सुषुप्ति हे तीन स्तर असे म्हणता येईल. व चवथी अवस्था तूर्यावस्था ही ह्या तीनही अवस्थांचा आधार आहे व परमेश्वर ह्या सर्व अवस्थांचा आधार आहे.


(६२) पवित्रम् - जो अंतःकरणाला शुद्धता अगर पावित्र्य देतो तो. जे भक्त त्याचे ध्यान करतात त्याचे अंतःकरणास शुद्धि देणारा परमेश्वर पवित्र या नावांने ओळखला जातो.
    किवा पवि म्हणजे वज्र. जो आपल्या भक्तांचे इंद्राच्या वज्रापासून रक्षण करतो ( त्रायते) तो पवित्र. वज्र हे आयुध दधिची नामक ऋषींच्या अस्थिंपासून केले असे त्याचे वर्णन आहे. इंद्र हा इंद्रियांचा राजा (इंद्रियाणा राजा) आहे. वेदांता प्रमाणे इंद्र म्हणजेच मन होय. मनातील उलट सुलट विचार संभ्रम, बौद्धिक तडजोड ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे आपल्याच मनातील संकल्प विकल्पाने घडवून आणलेला आपलाच मनोबलाचा नाश, हे एक इंद्राचे (मनाचे) आयुध आहे व ते अल्पकाळातच साधकाच्या तपश्चर्येचा नाश घडवून आणते.
    पूर्ण भक्ति, निश्चयपुर्वक केलेले ध्यान व श्रीविष्णुवरील दृढश्रद्धा यांच्या सहाय्याने ह्या मनवज्रापासून साधकाचे रक्षण होते म्हणून परमेश्वराचे 'पवित्र' हे नाव सार्थ ठरते.

(६३) परं मंगलम् - मंगल हे दुष्टप्रवृत्तींपासून होणारे दुःख तर नाहीसे करतेच इतकेच नव्हे तर सद्गुणांपासून होणारा आनंदही मिळवून देते. परं मंगलं म्हणजेच श्रेष्ठतम मंगल आहे व ते फक्त परमेश्वरच असणे शक्य आहे. ज्याचे (४) स्मरणामुळे सर्व अशुभांचा नाश होतो. व सर्व शुभ संकल्पांनी हृदय भरून जाते तो परमेश्वर स्वतःच परममंगल आहे. उपनिषत् सांगते जे ब्रह्म केवळ स्मरण केले असतां मनुष्याच्या हृदयातील सर्व अशुभांचा नाश करते ते आम्हास परममंगल कारक होवो.
-----------------------------------
१    यत् चक्षुषानपश्यति येन चक्षुंषि पश्यति  ।

      तदेव ब्रह्मत्वं विद्धि न इदं यदिदमुपासते  ।।

२    कृषीर्भूवाचक शब्दो नश्च निर्वृत्ति वाचकः  ।

      तयौरैक्यं परंब्रह्म कृष्ण इत्यभिधियते ।।

३    कर्षामि पृथिवीं भूत्वा कर्षणाय अयसो हलः ।

४    अशुभानि निराचष्ठे तनोति शुभ संततिम् । स्मृतिमात्रेण यत् पुंसां ब्रह्म तन्मंगलं विदुः ।।




सौ. उषा गुणे.

Sunday, November 7, 2010

श्रीमद् भागवत - स्कंध अकरावा - अध्याय पहिला (भाग - १)


श्रीशुक उवाच ।
कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः ।
भुवोऽवतारयद् भारं जविष्ठं जनयन् कलिम् ॥ १ ॥
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकचग्रहणादिभिः तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥ २ ॥
भूभारराजपृतना यदुभिर्निरस्य ।
गुप्तैः स्वबाहुभिः अचिन्तयद्-अप्रमेयः ।
मन्येऽवनेर्ननु गतोऽप्यगतं हि भारं ।
यद्-यादवं कुलमहो अविषह्यमास्ते ॥ ३ ॥
नैवान्यतः परिभवोऽस्य भवेत् कथञ्चिन् ।
मत्संश्रयस्य विभवोन्नहनस्य नित्यम् ।
अन्तः कलिं यदुकुलस्य विधाय वेणु ।
स्तम्बस्य वह्निमिव शान्तिमुपैमि धाम ॥ ४ ॥
एवं व्यवसितो राजन् सत्यसङ्कल्प ईश्वरः ।
शापव्याजेन विप्राणां संजह्रे स्वकुलं विभुः ॥ ५ ॥ 
 या अध्यायातील पहिल्या पाच श्लोकात सांगितले आहे की जे लोक आपल्या व्यवहाराने दुष्ट दैत्य, दानव बनले होते त्यांचा श्रीकृष्णाने वध करविला. भुवोऽवतारयद् भारम् - पृथ्वीवरील भार हलका केला. कशा प्रकारे ? मग वर्णन येते की पाण्डवांच्या मनांत कोप निर्माण केला, त्यांना क्षुब्ध केले. कौरवांनी पाण्डवांशी द्यूत - छल करून त्यांच्या सर्व संपत्तीचे हरण केले, त्यांचा तिरस्कार केला, त्यांच्या पत्‍नीचे, द्रौपदीचे, केस धरून तिला फरफटत नेऊन अपमानित केले. त्या आधी त्यांच्यावर विषप्रयोग केले होते, त्यांना भस्मसात करण्याचा प्रयत्‍न केला होता. आता त्या सर्व कृत्यांची सीमा गाठली होती. हे सर्व भगवंतांनीच घडवून आणले. कां ? कारण असे केल्याशिवाय शांतिप्रेमी पाण्डव खवळणे अशक्य होते. आणि ते खवळल्याशिवाय दुष्ट कौरव (आणि त्यांचे समर्थन करणारे सर्वच) यांचा नाश करण्याचे सामर्थ्य आणखी कोणात नव्हते.
मन्ये अवनेः ननु गतो अपि अगतं भारम् - भारत युद्ध झाले. मग भार हलका झाला का ? पण भगवंताला अजून पूर्णपणे भार हलका झाला असे वाटेना. यादवांना बलाढ्य करून असंख्य दुष्ट मारले, पण आता यादवच शिरजोर झाले आहेत. कापूर खाऊन अग्नि वाढतो पण कापूर संपला की अग्नीही विझून जातो. त्याप्रमाणे यादवांनी संहार केला, आता त्यांच्या विनाशाची वेळ आली. कारण श्रीकृष्णाच्या कृपेने यादव बाहुबळाने वाढले होते. त्यांना शासन करणारा शास्ता उरला नाही. बल संपती वाढली की मग गर्विष्ठपणा कुकर्माला प्रवृत्त करतो. मग आता काय करावे ? अंतःकलिं यदुकुलस्य विधाय - अशावेळी सर्वात सोपे असते ते समूहामध्ये आपापसांतच संशय, कलह निर्माण करून, आपसांतच भांडणे लाऊन, त्यांनाच परस्पर एकमेकाशी जुंपून, त्यांची शक्ति क्षीण करून सर्वनाश घडवून आणणे. श्रीकृष्णांनी हेच केले.
शापव्याजेन विप्राणाम् - पण असे होण्यास काहीतरी निमित्त लागतेच. मग ऋषी-मुनींकडून शाप दिला गेला. बल संपत्तीने मद चढतो तेव्हां इतरांची टिंगल करण्यात काहीच गैर वाटत नाही. ऋषी-मुनींची यादवांनी खोड काढली आणि ते कपट जाणून ऋषींनी शाप दिला, वाग्‍वज्र सोडले - "हे मुसळ तुमच्या कुळाचा काळ होईल" (ती कथा पुढे येणारच आहे)
पण अशा शापाने कुलनाश कसा घडतो ? कोण्या तपस्व्याने शाप दिला (आणि विशेषतः शाप देणार्‍याचे बल माहीत असते तेव्हां तर) मनुष्य काय, अख्खा समाज हादरून जातो. माझा, आपला नाश होणार हा विचार (negative thought) आणि त्याचे भय हेच आपल्यामध्ये अशा गोष्टी घडवून आणते. Positive thoughts दृढ व्हायला तप करावे लागते. नदीच्या प्रवाहाच्या उलट पोहण्यासारखे असते ते. नकारात्मक विचार नदीच्या प्रवाहाप्रमाणे मनुष्याला उच्च अवस्थेपासून खाली ओढतात. सखल भागाकडे वाहणे हा जसा नदीचा स्वभाव तसेच मनुष्य स्वभावाचेही आहे. नकारात्मक विचार कोणा व्यक्तीचा, समाजाचा अथवा संपूर्ण राष्ट्राचाही विनाश घडवू शकतात.
इथे विचार करण्यासारख्या दोन गोष्टींचे दर्शन होते. तपाने मनःशक्ति संयत झाली की ती शक्ति काहीही घडवून आणू शकते. धारणेने मनःशक्ति एकवटली तर - येणें काही न निपजे । ऐंसे नाही ॥ (ज्ञानेश्वरी) पण केवळ मनाची शक्ति वाढविल्याने मन समचित्त होईल ? मनांत चराचराविषयी समभाव, प्रेमभाव स्थिर होईल ? कठीण आहे. त्याला परत आणखी विशेष प्रयत्‍नांची जोड लागते. विवेकाची जोड लागते. एवढे तपस्वी ऋषीमुनि. पण "माझी चेष्टा करतोस काय ?" या विचाराने देखील क्षुब्ध झालेच की ? असो. संयत मनाची वाग्‍वज्र सोडताच तसे घडवून आणण्याची ही शक्ति, मग असंयत, सदा भयाने, नकारात्मक विचारांनी ग्रासलेले मन त्याच नियमानुसार स्वनाश घडवून आणण्यास कारण होतेच.
आणखी थोडे चिंतन केल्यास कळून येते की आपल्या जीवनांत दोष आहेतच, पण ते दोषही विपरीत, उलट धारणा केल्याने दूर होऊ शकतात. मनांत काम उठला तर ब्रह्मचर्याचा संकल्प करावा, क्रोध आला तर लगेच ’मी क्रोधाला वश होणार नाही’ असा संकल्प करावा. लाचखोरीचा विचार आला - तर सावधान होऊन मनाला सांगावे, असे केल्याने नरकप्राप्ती निश्चितच. एकूण कामाच्या, लोभाच्या, क्रोधाच्या, अहिंसेच्या, असत्याच्या प्रत्येक विचारापुढे त्याच्या विपरीत संकल्प उभा करायचा. असे एक-दोनदा नाही, तर सतत. सद्‌गुणांची वृद्धी करीत, दुर्गुणांवर मात करीत सर्व दोषांची निवृत्ति होईपर्यंत. यालाच ’योग’ म्हणतात ना ? जर साधन केले नाही तर आपल्याच बेसावधपणामुळे, जडवून घेतलेल्या मूर्ख संवयींमुळे जे दोष निर्माण झाले आहेत ते सुटणार कसे ? आणि जरी आज दुःखमय परिस्थिती नसली तरी या सवयी, हे दोष उद्या नाहीतर परवा दुःख निर्माण करणारच.
आता कोणी म्हणेल, काम, क्रोध, लोभ सोडा हो ! संपूर्ण संसारच विक्षेपमय आहे त्याचे काय ? असेना. त्यावर मन शांतचित्त करणे हा उपाय आहेच की. पण आपले मन शांत राहावे यासाठी आपण किती प्रयत्‍न करतो ? ते सदा इकडे तिकडे भटकत राहून इंद्रियांना विषयात गुण्तवण्यात व्यग्र असते. मग विषय मनासारखा नसेल तर चिडचिड होते. निद्रा काळीच मन विश्राम पावते. एरव्ही ते सदा अशांतच असते. मग त्याला प्रयत्‍नपूर्वक शांत करण्याची गरज आहे. आपल्याला जर विक्षेपित होऊ नये असे वाटत असेल तर मनाचा विक्षेपित होण्याचा स्व-भाव आपल्यालाच बदलायला हवा.
यदुवंश व पाण्डव यांच्या साहाय्याने दुष्ट प्रवृत्तींचा विध्वंस - म्हणजेच तमोगुणी, रजोगुणी वृत्तींच्या अतिरेकास सात्विक वृत्तींचा आश्रय घेऊन विध्वंस करविला. सात्विक वृत्तींचा विक्षेप, धर्माचा, सदाचाराचा (आम्ही धार्मिक आहोत बरं का !) विक्षेपही शांत भावानेच नष्ट करावा लागतो.
पण श्रीकृष्णाने हे सर्व करायचे कां ठरविले ? त्यांच्याकडे सर्व प्रकारचे वैभव होते, भले मोठे कुटुंब होते, सत्ता होती, सर्व मान देत होतेच. सर्वकाही तर होते. पण परमात्माही जेव्हां जीवांशाने अवतरीत होतो तेव्हां त्यालाही या संसारापासून विरक्ति येतेच. त्यांनीही हाच विचार केला. बास झालं ! आता आपण आपल्या शांतिकुटीरात जावे हेच बरे. आपल्या साकेतधामास, वैकुंठास (हे सर्व शब्दच आहेत, हे असे कोणते स्थान नाही की जिथे आपण तिकीट काढून जाऊ शकू) जावे. भगवानही आपल्या मर्जीनेच येतात, आपल्या मर्जीनेच परत जातात. त्यांच्या कृपेनेच सर्व जीवांनाही असाच सुखदुःखमय प्रवास घडतो. पण प्रवासात आणि प्रवासाची अंतीम गती जीवाच्या संकल्पशक्तिने घडते असे दिसते. संकल्पानुसार भगवान मदत करतात एवढेच.