18 November, 2010

सौन्दर्यलहरी श्लोक ३४ वा

शरीरं त्वं शम्भोः शशि-मिहिर-वक्षोरुह-युगं
तवात्मानं मन्ये भगवति नवात्मानमनघम् ।
अतः शेषः शेषीत्ययमुभय-साधारणतया
स्थितः सम्बन्धो वां समरस-परानन्द-परयोः ॥ ३४॥


"हे भगवति त्वं सम्भोः शशिमिहिरवक्षोरुहयुगं शरीरं असि, अहं तव आत्मानं अनघं नवात्मानं मन्ये; अतः समरसपरानन्दपरयोः वां शेषः शेषी इति अयं सम्बन्धः उभयसारणतया स्थितः अस्ति." भगवती हें त्रिपुरसुंदरीचें विशेषण आहे. समग्र ऐश्वर्य समग्र धर्म, समग्र यश, समग्र श्री, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण वैराग्य या सहांच्या समुच्चयाला भग असे म्हणतात. या सहांचा समुच्चय जेथे पूर्णत्वानें विराजतो त्या व्यक्तीला भगवान किंवा भगवती असें म्हणतात. अथवा सर्व विश्वाची उत्पत्ति, प्रलय, प्राणिमात्रांची उत्पत्ति कोठून व कशी होते, सर्व प्राण्यांचा शेवट कसा व कोठे होतो, विद्या म्हणजे काय आणि अविद्या म्हणजे काय, हें सर्व साकल्याने जो जाणतो त्याला भगवान् असें म्हणतात. त्या देवतेला भगवती असें म्हणतात. " ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः । ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णा भग इतीङ्‍गना ॥" "उत्पत्तिं प्रलयं चैव भूतानामागतिं गतिम् । वेत्ति विद्यामविद्यां च स वाच्यो भगवानिति ॥" अशा या भग आणि भगवान या शब्दांच्या दोन व्याख्या प्रसिद्धच आहेत. श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या ठिकाणी या दोन्ही व्याख्या पूर्णपणें सार्थ होत असल्यामुळें तिला भगवती हें विशेषण दिलेले आहे तें सर्वस्वी योग्य आहे. हे सर्वैश्वर्यादिगुणसंपन्न माते जगज्जननी ! तूं भगवान् शंकर यांचेंच शरीर म्हणजे मूर्तस्वरूप आहेस. या शिवशक्तीच्या मूर्तस्वरूपांत सूर्य आणि चंद्र हे स्तनाप्रमाणें शोभत आहेत. शशी म्हणजे चंद्र आणि मिहिर म्हणजे सूर्य. आई ! शिवस्वरूपाशीं समरस झालेला तुझा देह "अनघ" म्हणजे अत्यंत शुद्ध, निर्दोष असून तो जेव्हां पहावे तेव्हां "नवात्मा" म्हणजे नव्या स्वरूपाचाच दिसत असतो. तारुण्याच्या तेजाने तो मुसमुसत असतो. आई जगज्जननी ! तुझ्याशी समरस झालेले परानंद म्हणजे भगवान् शंकर आणि त्यांच्याशी समरस झालेली "परा" म्हणजे परात्पर शक्तिस्वरूप तूं, या तुम्हां दोघांभध्यें परस्परांशी परस्परांचे एवढें तादात्म्य आहे कीं, त्यामुळें तुमचा तो तादात्म्यसंबंध तुम्हां दोघांकडेही सारखाच दिसतो. तुमच्या तादात्म्यांत अणुमात्रही भेद दिसत नसल्यामुळे तुम्हां दोघांमध्ये कोण मुख्य आणि कोण गौण, कोण प्रधान आणि कोण अंग हें कळतच नाहीं. एकदा भगवान् शंकर प्रधान आहेत तर तूं अंगभूत म्हणजे गौण आहेस. एकदा तूं मुख्य आहेस तर भगवान् सदाशिव हे अंगभूत आहेत. असे हे तुझें स्वरूप मोठे अनिर्वचनीय आहे.

या लोकांमध्यें "नवात्मानं" या शब्दांत श्लेष आहे. एकाच शब्दांत अनेक अर्थ विवक्षित असणें याला श्लेष असें म्हणतात. काव्यशास्त्रांत हा एक अलंकार मानला जातो. नवात्मा याचा एक अर्थ आपण वर पाहिलाच आहे. आतां दुसरा अर्थ आपण पाहूं. नवात्मा या शब्दांतील नव शब्द नऊ या संख्येचा वाचक आहे. आत्मा म्हणजे स्वरूप. ज्याचे स्वरूप नऊ संख्येने विभागलें गेले आहे तो नवात्मा. नवात्मा म्हणजे भगवात् सदाशिव. ज्यांचा निर्देश पहिल्या चरणांत शंभु या शब्दाने केलेला आहे. त्यांनाच महाभैरव अथवा आनंदभरव असें म्हणतात. या आनंदभैरवालाच नवात्मा असेंही तंत्रशास्त्रांत म्हटलेले आहे. कारण तंत्रशास्त्रांत आनंदभैरवाची नऊ रूपे मानलेली आहेत. " कालव्यूहः कुलव्यूहो नामव्यूहस्तथैव च । ज्ञानव्यूहस्तथा चित्तव्यूह स्यात्तदनन्तरम् । नादव्यूहस्तथा बिन्दुव्यूहः स्यात्तदननरम् । कलाव्यूहस्तथा जीवव्यूहः स्यादिति ते नव ॥" व्यूह शब्दाचा अर्थ शरीर किंवा मूर्ति असा आहे. कालव्यूह, कुलव्यूह, नामव्यूह, ज्ञानव्यूह, चित्तव्यूह, नादव्यूह, बिंदुव्यूह, 'कलाव्यूह आणि जीवव्यूह, अशीं महाभैरवाची नऊ रूपे आहेत.

कालव्यूह म्हणजे चंद्र, सूर्य आणि त्यांच्या निमित्ताने होणारे कालखंड. क्षण, लव, घटका, मुहूर्त, दिन, पक्ष, मास, ऋतु, अयन आणि संवत्सर यांपासून कल्पान्तकालापर्यंतचा सर्व काल महाभैरवाचेंच स्वरूप होय. नामव्यूहः म्हणजे ताजे संज्ञास्कंध. व्यूहालाच स्कंध असा पर्याय आहे. संज्ञास्कंध म्हणजे पदार्थांची सामान्यनामें आणि विशेषनामें. हेंही एक भैरवाचेच रूप आहे. ज्ञानव्यूह म्हणजे विज्ञानस्कंध. सविकल्पक ज्ञान, निर्विकल्पक ज्ञान इत्यादि सर्व ज्ञानांचे प्रकार यांत अंतर्भूत होतात. हेंही आनंदभैरवाचेंच रूप होय. चित्तव्यूहामध्यें मन, बुद्धि, चित्त, अहंकार आणि महत्तत्व यांचा अंतर्भाव होतो. नादव्यूहामध्ये परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीरूप, संपूर्ण अक्षरराशि अंतर्भूत होतो. बिंदुव्यूह म्हणजे षट्चक्रांचा समुदाय. कलाव्यूह म्हणजे मूळ मातृकासमूह अर्थात् अ पासून क्ष पर्यंतचे सर्व वर्ण. जीवव्यूह म्हणजे सुखदुःखांचे भोक्ते जीवात्मे. हे नऊही व्यूह आनंदभैरवाचेच देह मानले जातात. नामरूपात्मक, विश्वप्रपंच या नऊ व्यूहांचाच असल्यामुळें संपूर्ण विश्व हें आनंदभैरव भगवान् सदाशिव यांचाच देह होय ही गोष्ट सिद्ध झाली. याच अभिप्रायाने शंकरांना "नवात्मा" असें म्हटलेले आहे. जसे भगवान शंकर नवात्मा आहेत त्याचप्रमाणे भगवती त्रिपुरसुंदरी ही देखील नवात्माच आहे. पस्तिसाव्या श्लोकांत हा सिद्धान्त स्पष्टच मांडला आहे. श्रीचक्र हें नव- खंडात्मक आहे हें आपण पूर्वी पाहिलेच आहे. त्रिपुरसुंदरी ही श्रीचक्रस्वरूप आहे म्हणून तीही ही नवात्मा झालीच. संपूर्ण वर्णसमूह हें त्रिपुरसुंदरीचेच रूप आहे. तोही नऊ खंडांनी विभागला जातो. अवर्ग, कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग, यवर्ग, शवर्ग आणि या सर्वांच्या मूर्धस्थानी मेरूप्रमाणें असलेला क्ष असे हे वर्णराशीचे नऊ विभाग आहेत. याही अभिप्रायानें त्रिपुरसुंदरीला नवात्मा असें म्हटलें जातें इत्यादि पुष्कळ सूक्ष्म विचार नवात्मा या शब्दांत अंतर्भूत आहे.

तात्पर्य, भगवान् शंकर हे जसे नवात्मा आहेत तसेंच त्रिपुरसुंदरीही नवात्मा आहे. याच अभिप्रायाने शंकर शंकरी, भैरव भैरवी, महाभैरव महाभैरवी, आनंदभैरव आनंदभैरवी इत्यादि नामसादृश्यही या दोघांमध्ये असल्याचें दृष्टीस पडते. अशा रीतीनें नामदृष्ट्या आणि रूपदृष्ट्या एकमेकांशी पूर्णपणे समरस असल्यामुळें परानंद म्हणजे भगवान शंकर आणि परा म्हणजे श्रीत्रिपुरसुंदरी यांच्यांतील गौण मुख्य भाव हा संबंध दोघांकडेही सारखाच आहे. आई ! तुम्हां दोघांपैकी कोणाला मुख्य म्हणूं ? आणि कोणाला गौण म्हणूं ? तुम्हा दोघांनाही मी भक्तिपूर्वक प्रणाम करतो. या श्लोकाची यंत्रपूजापद्धति स्ल्लोक सत्तावीसमध्यें दिली आहे.

1 comment:

Unknown said...

Can you please translate it in Hindi or English।
Don't understand Marathi but this article seems to havebeen written well।to understand properly needs in Hindi or English