11 January, 2009

मानसमणिमाला (१८)

मानसमणिमाला (१८)
:

हिंदी : हानि कुसंग सुसंगति लाहू । लोकहूँ बेद बिदित सब काहू ॥ बा. कां. १.६.८
गगन चढ‍इ रज पवन प्रसंगा । कीचहि मिल‍इ नीच जल संगा ॥ ९ ॥
साधु‍असाधु सदन सुक सारी । 'सुमिरहिं राम देहिं' गनि गारीं ॥ १० ॥
मराठी : हानि कुसंगी लाभ सुसंगमि । लोकी सकल विदित निगमागमिं ॥ प्रज्ञा. १.६.८
चढे पवनसंगति रज गगनीं । होइ चिखल नीचग-जल-मिलनीं ॥ ९ ॥
सज्जन-खल-गृहिं शुक साळुंक्या । राम वदति मुखीं शिव्या शेलक्या ॥ १० ॥
अर्थ : कुसंगतिने हानि व सुसंगतिने लाभ होतो हे सर्व लोकांत, वेद पुराणांत प्रसिद्धच आहे ॥ ८ ॥ पवनाच्या संगतीने धूळ आकाशांत चढते पण नीचगामी पाण्यात पडली तर चिखल बनते ॥ ९ ॥ साधू वा दुर्जनांच्या घरातील पोपट, मैना तोंडाने रामनामाचा उच्चार करतील किंवा वाईट शिव्या देतील हा संगतीचा परिणाम.

मनुष्याची जीवनदृष्टि घडविण्यामध्ये चांगली संगति अगर वाईट संगति या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव असतो. संत तुलसीदास या गोष्टीला खूपच महत्त्व देतात. त्यामुळे अनेक तऱ्हेने अनेक उदाहरणांमधून ही गोष्ट पुनः पुन्हा पटविण्याचा ते प्रयत्‍न करतात. स्वतःच्या बलानें काहीही न करू शकणारी माती (अवकाशातील धूलिकण) ऊर्ध्वगामी, गतीशील वाऱ्याच्या संगतीने थेट आभाळाला भिडते व सुंदर दृश्य निर्माण करते; परंतु तीच माती अधोगामी जलाच्या संगतीने ओला चिखल होऊन जमिनीला पकडून बसते. सज्जनांच्या घरातील पोपट मुखाने राम राम म्हणेल, आपले स्वागत करील, या बसा म्हणेल, जातांना जयगोपाल म्हणेल; कारण त्याच्या कानावर असेच शब्द पडत असतात. याच्या उलट परिस्थिती दुर्जनांच्या घरांत असल्याने तिथे मात्र अपशब्द, शिव्या, कर्कश आवाजच ऐकायला मिळेल. हा सर्व संगतीचा परिणाम आहे.
वरील उदाहरणांत जडमाती अगत अज्ञानी प्राणी यांच्यावर होणारा संगतीचा परिणाम दाखविला आहे व त्यांना संगतीची निवड आपल्या मतानें करता येत नाही. मनुष्याला निवडीचे स्वातंत्र्य निश्चितच आहे. अत्यंत दुर्दैवी, विरुद्ध परिस्थिती मध्येंही आपले सद्‌विचार, चांगुलपणा, देशप्रेम, ध्येयनिष्ठा स्वतःमध्ये प्रयत्‍नपूर्वक निर्धाराने टिकवून धरून इतरांनाही सत्‌प्रवृत्त करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे सत्‌संगतीचे साक्षात उदाहरण नाही का ?
गोस्वामी तुलसीदासांच्या काळांत तर क्रौर्य, अधमता यांचा नंगा नाच आजूबाजूला दिसत होता व सर्वमंगल, कल्याणकारी मूल्ये, संस्कृती नष्ट होण्याची वेळ आली होती. अशावेळीं स्वधर्मसेतु भगवान रामचंद्रांच्या उज्ज्वल चारित्र्याची, सत्‌संगतीची व आदर्शाची आवश्यकता होती ना !

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: