14 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक १३ वा

नरं वर्षीयांसं नयनविरसं नर्मसु जडं
तवापाङ्‌गालोके पतितमनुधावन्ति शतशः ।
गलद्वेणी-बन्धाः कुच-कलश-विस्रस्त-सिचया
हठात् त्रुट्यत्काञ्च्यो विगलित-दुकूला युवतयः ॥ १३॥


श्रीमहात्रिपुरसुंदरी ही स्वतः तर अत्यंत सुंदर आहेच, पण तिच्या कृपाकटाक्षाचा लेशही ज्याला लाभतो तो देखील सुंदर बनतो अशा अभिप्रायाने आचार्य वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! मनुष्य "वर्षीयांसं" म्हणजे कितीही वृद्ध असला, डोळयांनी पहावत नाहीं असा विद्रूप असला, मनोरंजक हावभाव विनोद वगैरे गोष्टींमध्ये तो जड म्हणजे अनभिज्ञ असला तरी देखील तो तुझ्या कृपाकटाक्षाच्या टप्प्यांत आला असतां अर्थात् तुझ्या कृपाकटाक्षाची त्याला प्राप्ति झाली असतां शेकडो तरुण स्त्रिया पाठीमागे धांवतात. त्यांची जणुं कांहीं तारांबळ उडते. वेणीबंध शिथिल होतात. खांद्यावरचे "सिचय" म्हणजे पदर खालीं पडतात. कंबरपट्टे निसटतात आणि त्यांना वस्त्राचेंही भान उरत नाहीं ! तात्पर्य, तुझ्या कृपाकटाक्षाला पात्र झाल्याबरोबर तुझा भक्त इतका आकर्षक बनतो कीं, त्याच्याकडे पाहून तरुण स्त्रियांचीही ही अवस्था होते मग इतरांना तो आकर्षक वाटेल यांत नवल काय ? आई, धन्य आहे तुझा कृपाकटाक्षमहिमा !



या श्लोकाचें यंत्र एक लंब चतुष्कोण काढून त्यामध्ये क्लीं क्लीं क्लीं अशा तीन बीजांच्या दोन ओळी एकाखालीं एक लिहाव्यात. त्या दोन ओळींत मध्ये थोडे अंतर सोडावे. त्या अंतरांत आपल्या साध्याचा उल्लेख करावा. हे यंत्र सोन्याच्या पत्र्यावर लिहून सहा दिवस आराधना करावी. नैवेद्य गुळ, नारळ आणि केळांचें मिश्रण. या श्लोकाचा एक हजार जप करावा. फल स्त्री वश होते.

No comments: