21 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २० वा

किरन्तीमङ्‌गेभ्यः किरण-निकुरुम्बामृतरसं
हृदित्वामाधत्ते हिमकर-शिलामूर्तिमिव यः ।
स सर्पाणां दर्पं शमयति शकुन्ताधिप इव
ज्वरप्लुष्टान् दृष्ट्या सुखयति सुधाधारसिरया ॥ २०॥


"हे जननि ! किरणनिकुरुम्बामृतरस किरन्तीं हिमकर-शिलामुर्तिं इव यः त्वां हृदि आधत्ते सः शकुन्ताधिपः इव सर्पाणां दर्पं शमयति, सुधाधारसिरया दृष्ट्या ज्वरप्लुष्टान् सुखयति च" हे आई जगज्जननी, तूं आपल्या देहांतून किरणांचा समुदाय हाच कोणी अमृतरस. या अमृतरसाला चोहींकडे शिंपडित आहेस. चन्द्रकांतरत्नाप्रमाणे तुझी मूर्ति अत्यंत स्वच्छ आहे. जणुं कांहीं चंद्रकांतरत्नाचीच ती घडविलेली आहे ! आई ! तुझ्या या स्वरूपाला "अमृतेश्वरी" असें नांव आहे. तुझ्या या अमृतेश्वरीरूपाचें जो कोणी भक्त आपल्या हृदयामध्ये चिंतन करतो, त्याची उपासना करतो, तो सर्व पक्ष्यांचा राजा असलेल्या गरुडाप्रमाणें सर्पांचा दर्प शमवितो. त्याला पाहून सर्प घाबरतात व दाही दिशांना पळून जातात. त्याच्या दृष्टीनें सर्पविषाची बाधा नाहीशी होते. एक दिवसाआड, दोन दिवसांआड येणाऱ्या थंडी-तापांना व इतरही ज्वरबाधांना त्याची दृष्टि जणुं कांहीं अमृताच्या धारेला स्रवणारी "सिरा" म्हणजे प्रणालीच बनते. अमृताचा ती पाटच बनते. आई ! अमृतेश्वरीरूपानें केल्या जाणाऱ्या तुझ्या उपासनेचा हा केवढा प्रभाव आहे ! या उपासनेनें साधक हा गरुडासारखा प्रभावी होत असल्यामुळें या साधनाला "गरुडध्यानयोग" असे तंत्रशास्त्रांत नांव दिलेले आहे.

"षण्मासध्यानयोगेन जायते गरुडोपमः ।
दृष्ट्या कर्षयते लोकं दृष्ट्‍वैव हरते विषम् ॥
दृष्ट्या चातुर्थिकादींश्च ज्वरान्नाशयते क्षणात् ॥ "

याप्रमाणें चतुःशतीमध्यें या ध्यानाची फलश्रुति सांगितलेली आहे. 


हें यंत्र भस्मावर लिहावे. विधिपूर्वक देवतेची पूजा करून एक हजार वेळां या श्लोकाचा जप करावा. या भस्माने सर्पविष उतरेल. हे भस्म सर्पावर टाकल्यास सर्पाला मुर्च्छा येते. साधकाने हा मंत्र म्हणतच भस्माचा प्रयोग करावा.

अमृतेश्वरीरूपानें श्रीत्रिपुरेश्वरीची पूजा करून या श्लोकाचा रोज हजार वेळां जप करावा. पंचेचाळीस दिवस अनुष्ठान करावे. हा मंत्र सिद्ध होतो व साधकाला कधींही विषबाधा होत नाहीं.

मयुरताम्र आणि पुन्नागताम्रमिश्रित केलेल्या सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र लिहून वर सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करून यंत्र सिद्ध करावे. तें यंत्र आंगठीत बसवून धारण करावे. साधकानें वरचा श्लोक म्हणत त्या हाताने सर्पदंश झालेल्या मनुष्यावर - गाय, म्हैस, घोडा इत्यादि प्राण्यांवरही जल शिंपडावे. विषबाधा निवृत्त होईल.

No comments: