07 May, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (२) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (२)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

"भगवंता ! एखाद्या मनुष्याकडे पाहून हा बद्ध, हा मुक्त हे कसे बरे जाणावे ? जसे एखाद्याकडे बघितल्यावर हा जपानी दिसतोय, हा आफ्रिकेतला असावा, हा तर नक्कीच ऑस्ट्रेलियन असणार हे ओळखता येते तसे मुक्ताला ओळखता येईल का ? बद्ध व मुक्त यांतील वैलक्षणे कोणती ?" सांगतो, ऐक. एकाच शरीरात आत्मा तर असतोच पण "मी" ची उपाधी लावून घेतलेला जीवात्माही तिथेच वास करतो. एका झाडावर दोन पक्षी बसावेत त्यासमान एका शरीरात या दोघांचे वास्तव्य असते. एक चिदानंदस्वरूपी एकधर्मिणि आहे. त्याचा एकच धर्म आहे. कारण त्याच्या विश्वात 'अन्य' नाहीच. त्याच्या विश्वातील सर्वकाही त्याच्या अधीन असते. अर्थात् त्याचा तोच 'नियंता' असतो. . पण दुसरा आपल्याला वेगळा मानत असतो. आपण बद्ध आहोत. आपले सर्व व्यवहार कोणा अज्ञात पराशक्तिच्या नियंत्रणेनुसार घडतात आणि म्हणून आपल्याला 'नियम्य' मानत असतो. असे एकाच शरीरात ज्ञानस्वरूप, कर्मफलभोगरहित, ज्ञानानंदाच्या शक्तिने पुष्ट असा नित्यमुक्त परमात्मा असतो आणि कर्मफलरूप सुख-दुःख भोगणारा नित्यबद्ध जीवात्माही असतो. आता परमात्मा अहंकार (देहाभिमान) धारण करीत नसल्यामुळे, इंद्रिय-विषय विकारांनी रहित असल्यामुळे अविकृत राहतो. त्याचे ठिकाणी कर्म, कर्माचा कर्ता, कर्मफलाचा भोक्ता या सगळ्यांचा अभाव असतो. पण नियम्य जीव नियंता परमात्म्याच्या अधीन असल्यामुळे देहांत राहून सर्व कर्मांचा 'मी कर्ता' असा अभिमान धारण करीत असल्यामुळे मी कृश, मी लठ्ठ, मी सुखी, मी दुःखी इत्यादि विकारांनी लिप्त राहतो.

भगवंताला उद्धवाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह दिसले. 'मग जीवात्म्याने बद्धच राहायचे का ? हा देह-अभिमान जाणार कसा ? आणि एकाच शरीरात हे दोघे राहात असून एक नित्यमुक्त, सदा आनंदी आणि दुसरा नित्यबद्ध, दुःखाने पीडित; असे कां ?

भगवान म्हणतात - दुःखरहित नित्य आनंदाचा अनुभव घेत असणारा सर्वज्ञ, सच्चिदानंद, सर्वव्यापी श्रीहरि शरीरात राहूनही त्याला शरीराभिमान नसल्यामुळे 'मी या शरीरात राहणारा' असे म्हणवीत नाही. त्याकरिता त्याला देहगत दुःख (वा सुखही) नाही. जसे स्वप्नातून उठलेला जागृतपणी दुःखादिकांचा अनुभव घेत नसतो कारण तो स्वप्न जगतातील दृष्यांशी संलग्न (identified) झालेला नसतो, तद्‍वत्. पण जीव शरीराशी बांधल्या गेल्यासारखा देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी झाल्याने स्वप्नातल्याप्रमाणे सुखी दुःखी होतो. मग उपाय काय ? शरीरात राहूनही देहाभिमानापासून विरक्त होणे. मग शरीराने भले झोपी जावो, उठून बसो, दृष्य पाहो, अन्नसेवन करो - हे सर्व गुणप्रभावित इंद्रियांकडून घडते - त्याच्याशी संग कशासाठी ? वायु जसा सर्वत्र गमन करीत असता सुगंध-दुर्गंधापासून असंग, अलिप्त राहतो तसे देह, विषय यांपासून अलिप्त राहण्याचा - वैराग्याचा, त्यागवृत्तिचा अभ्यास करावा. वैराग्याने मन अविचल झाले की सर्व शंका पार झाल्याच - 'न व्यतिक्रियते बुधः'. मग कोणी निंदा करो वा कोणी पूजा करो - हे सर्व व्यवहार देहाचे, शरीराचे. माझे त्याच्याशी तादात्म्य नसल्यामुळे 'माझे' नव्हेत. मग कुठे झाले सुख आणि कुठे राहिले दुःख. वैराग्य दृढ झाले की अविद्येचे आवरण जाणारच. मग असा जीव काय करतो ? 'विचरेत् जडवन् मुनि’ मुनि आहे खरा पण कधी कधी इतर संसारी लोकांच्या दृष्टीत तो एक विकारशून्य, संस्कारशून्य, परिणामशून्य जड मूढ व्यक्ति. उदाहरणासाठी पहावे 'जडभरत - (भागवत. स्कंध ५, अध्याय ९)

05 May, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)
:
आत्मा बद्ध का मुक्त ? जीव बद्ध का मुक्त ? मनात प्रश्न उठतो तेव्हांच जाणवते की मी काही मुक्त नाही. माझ्यावर कोणा अज्ञात शक्तिचे नियंत्रण आहे. मला सदा कसले ना कसले तरी भय असतेच. या पृथ्वीतलावरील कोणाचेही नसेना का ? ईश्वराचे तरी आहेच. माझ्यावर शासन करणारा कोणीतरी आहे. सामान्यतः मनुष्याचे जीवन फारफार तर शंभर सव्वाशे वर्षाचे. पण लोकपाल, दिक्‍पालांचे एक कल्प आहे. ब्रह्मदेवाचे दोन परार्ध आहे. कितीही का असेना पण मर्यादित आहे. मर्यादा घालणारा 'कोणीतरी' आहे. 'कोणीतरी' दुसरा म्हटले की द्वैत आले. द्वैत म्हणजे भेद. भेद कोणाशी ? 'ब्रह्माशी, परमात्म्याशी, आत्म्याशी. 'यदा हि एवैष एतस्मिन् अंतरं कुरुते । अथ तस्य भयं भवति' (तैत्ति उप. २-७). मनुष्य (जीव) जेव्हां आत्म्यामध्ये थोडेसेही अंतर, छिद्र, भेददर्शन करतो - भेद करणे हेच अंतर करणे आहे - अल्पही भेद पाहतो, तेव्हां भेददर्शन करणार्‍या आत्म्यालाच भय होते. भय असल्यास कसला मुक्त ? बद्धच तो. म्हणून तर दैवी संपत्तीत (गीता अध्याय १६) 'अभयं' पहिल्या क्रमांकावर आहे.


हा विचार करून उद्धव [भागवत स्कंध ११] दहाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंताला म्हणतो - "आपण म्हणता एकच आत्मा गुणांचा संबंध आला असता नित्यबद्ध होतो आणि मोक्ष नित्य असल्यामुळे (पारतंत्र्यरहित) तो नित्यमुक्तही असतो. मला हे जरा गोंधळात टाकणारे वाटते. जरा मला स्पष्ट स्पष्ट समजेल असे सांग पाहू." भगवंताच्या नित्य सहवासातले अर्जुन व उद्धव यांसारख्या श्रेष्ठ भक्तांनाही भगवंत जे सांगतात ते व्यामिश्रेणेव वाटते, तर अध्यात्म्यात 'पडलेल्या' आमच्यासारख्यांना संतमहात्मे जे सांगतात ते कसे समजावे ?

साधन करीत असताना जसजशी दोन-चार पावले योग्य दिशेने पडतात तेव्हां साधकाला वाटते - This world is a big chaos - हा संसार एक प्रचंड मोठा गडबडगुंडा आहे - असाच प्रत्यय यायला लागतो. साधकाला अपेक्षित असते ते watertight division. एक तर मी मुक्त तरी आहे वा बद्ध तरी आहे. भगवंत व संत तेच सांगतात. 'तू मुक्तच आहेस. पण तू आपल्याला गुणांच्या (मायेच्या) प्रभावामुळे मर्यादित (conditioned) करून घेतले आहेस. गुणांच्या प्रभावाखाली असलेल्या इंद्रियांचे मर्यादित्व (limitation) तू मानतोस. मग त्यापलीकडील तुला काही दिसत नाही, जाणवत नाही, उमजत नाही. थोडक्यात मुक्त आहेसच, पण मायेच्या आवरणामुळे (conditioned by trigunas) बद्धही आहेस."

भगवान् पुढे म्हणतात - उद्धवा ! जेव्हां कोणामध्ये सात्त्विकतेचे विपुल दर्शन व्हायला लागते., त्याच्या शांत चित्तामुळे त्याच्या सत्त्वगुणाची उन्नत अवस्था होऊन त्याच्या आचरणात गुणांचा अभाव दिसायला लागतो, तेव्हां इतर लोक म्हणतात, "तो मुक्त आहे". अर्थात् असे म्हणणारे स्वतः रजोगुण, तमोगुणाच्या प्रभावाखाली असून सदा सुख-दुःख अनुभवीत असतात म्हणून ते बद्ध होत.

"बद्धोमुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तु्तः" - पण एक लक्षात घे. बद्ध, मुक्त यांची व्याख्या मीच केली आहे. खरे सांगायचे तर कोणी बद्धही नाही वा कोणी मुक्तही नाही. गुणांच्या संगाने बद्ध वा मुक्त म्हटले जाते. आणि गुण तर मायेचे आहेत. म्हणून 'न मे मोक्षो न बंधनम्' - माझ्या (परमात्म्याच्या) स्वरूपभूत जो जीवात्मा आहे त्याला न बंधन आहे, ना तो मुक्त आहे. देहाशी तादात्म्य पावून देहाभिमानी ('मी' चा प्रादुर्भाव) उत्पन्न झाल्यास मायेचे अविद्यारूपी आवरण पडते आणि लगेच सुख, दुःख, मोह, शोक इत्यादि संसार सुरू होतो. थोडक्यात संसृतिचा परिणाम अविद्या आणि त्यामुळे संसार. पण मुळात ही संसृतिच (माया) वास्तविक आहे का ? ती केवळ आभासमय आहे. जसे स्वप्न व त्यात दिसणारे सर्व दृष्यजगत् बुद्धिमुळे भासमान होते. ते काय खरे असते का? म्हणजे विद्या अविद्या दोन्हीही खर्‍या नव्हेत. मानलेल्या. तसेच जीव (देहाभिमानी) मी बद्ध, मी मुक्त 'मानतो' एवढेच. हा जीव अविद्येमुळे बद्ध 'मानून' त्याच्या प्रभावाखाली असेपर्यंत "मी" चे अस्तित्व वेगळे मानतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर "मी" जेव्हां आत्म्यापासून अविभाज्य होतो, म्हणजेच विद्येची प्राप्ति होते, तेव्हां तोच "मी" आपल्याला मुक्त मानतो.
(क्रमशः)