Showing posts with label Gita. Show all posts
Showing posts with label Gita. Show all posts

05 March, 2012

श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२

      ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
       ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
         अथ प्रथमो अध्यायः ।

         ॥ अर्जुनविशादयोगः ॥

          धृतराष्ट्र उवाच ।
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय  ॥ १-१ ॥


अन्वय  :  हे संजय ! धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत ?


अर्थ   :  संजया ! धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले ? 

विवरण  :  येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.   


         भगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार ? युद्धच करणार ना ? मग असे कां विचारावे ? परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपण्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे.  याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -


धर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा
    लोके श्रुता दृश्यते चापि पार्थ ।
महाश्रावं जीवितं चाप्यनित्यं
    संपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥
न चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्
    प्रयच्छेरंस्तुभ्यं अजातशत्रो ।
भैक्षचर्यामन्धकवृष्णिराज्ये
    श्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥
अल्पकालं जीवितं यन्मनुष्ये
    महास्त्रावं नित्यदुःखं चलं च ।
भूयश्च तद् यशसो नानुरूपं
    तस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥


       हे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.


पापानुबन्धं को नु तं कामयेत
    क्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः ।
यत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्
    यत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥
कृपः शल्यः सौमदत्तिर्विकर्णो
    विविंशतिः कर्णदुर्योधनौ च ।
एतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्
    यद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥
लब्ध्वापीमां पृथ्वीं सागरान्तां
    जरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या ।
प्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्
    नैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥
अमात्यानां यदि कामस्य हेतोः
    एवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् ।
अपक्रामेः स्व प्रदायैव तेषां
    मा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥


    पापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील ? युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे ? राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.
[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]


       धृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना ? असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’  बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.


भाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :
       धृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.

सञ्जय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥


अन्वय  :  तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥


अर्थ   :   संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;
विवरण  :  येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.

 

22 February, 2012

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश

भगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश
( काय आहे यात)


सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः ।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥
    सर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ?) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.
    सामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे -
ये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः ।
दुर्द्यूतहेलनकच ग्रहणादिभिस्तान् ।
कृत्वा निमित्तमितरेतरतः समेतान् ।
हत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥
की अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम.
    भारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला.
    गीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे  या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ  यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं । एको देव देवकीपुत्र एव । एको मंत्र तस्य नामानियानि । कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे.
    प्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे.
    पण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे ? कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां ? डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे -  (सविस्तर ऐकायचे असल्यास इथे पहा)
    भगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला ? संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् । केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय ? तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ? ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा । हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा.
    गीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव.
    धृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality  - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे.