11 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ४० वा

तटित्त्वन्तं भक्त्या तिमिर-परिपन्थि-स्फुरणया
स्फुरन्नानारत्नाभरण-परिणद्धेन्द्रधनुषम् ।
तव श्यामं मेघं कमपि मणिपूरैक-शरणं
निषेवे वर्षन्तं हर-मिहिर-तप्तं त्रिभुवनम् ॥ ४०॥


हे आई जगज्जननी ! माझ्या देहातील मणिपूरचक्र हें तुझेंच चक्र आहे. तुझ्या या मणिपूरचक्रांत भगवान् सदाशिव हे मेघेश्वररूपानें वास्तव्य करीत आहेत. कोणी त्यांना अमृतेश्वर असेही म्हणतात. तेथें त्यांच्या वामभागीं तूं अमृतेश्वरी या रूपाने अथवा सौदामनीदेवी या रूपाने विराजमान झालेली आहेस. तुझ्यासह त्या मणिपूरचक्रांत विराजमान असलेल्या अमृतेश्वराची मी भक्तिपूर्वक उपासना करीत आहे. ते मेघेश्वर महादेव हे 'तटित्वात्' आहेत. तटित् म्हणजे विद्युल्लता. मेघामध्ये जशी विद्युल्लता शोभावी तशी तूं सौदामनीदेवी अमृतेश्वराच्या सान्निध्यांत शोभत आहेस. तूं त्यांची शक्तिच आहेस. विद्युलतेनें युक्त असलेला मेघ हा वृष्टि करण्यास उद्युक्त असतो हें प्रसिद्धच आहे. विद्युल्लतेचें स्फुरण म्हणजे प्रकाश हा 'तिमिरपरिपन्थि' म्हणजे अंधकाराचा नाश करीत असतो. विद्युत् ही क्षणभरच प्रकाशत असते, पण तूं मात्र अमृतेश्वराच्या सान्निध्यांत नित्य स्थिररूपानें विराजमान झालेली आहेस. तामिस्रलोकस्वरूप असलेल्या मणिपूरचक्रांतील तिमिराचा नाश तुझ्याचमुळें होत असतो. तूं आपल्या अंगावर धारण केलेल्या अनेक रत्नजडित अलंकारांतील रत्नांच्या कांतीनें अमृतेश्वररूपी मेघामध्यें जणुं कांही इंद्रधनुष्यच निर्माण झालेलें आहे असे वाटतें. ढगांमध्ये दिसणारे इंद्रधनुष्य हें देखील वृष्टीचें द्योतक असतेंच. आई ! तुझ्या सान्निध्यांत असलेले मेघनाथ हे श्याम म्हणजे कृष्णवर्ण आहेत. मेघाचा कृष्णवर्ण देखील मेघ वृष्ट्युन्मुख असल्याचेंच सूचित करीत असतो. तुझें मणिपूरचक्र हें एक त्या अमृतेश्वराचें मुख्य मंदिर आहे. असें हे तुझ्याच सामर्थ्यामुळे समर्थ असलेले श्रीमेघनाथ हे हर म्हणजे अग्नि आणि मिहिर म्हणजे सूर्य यांच्या योगाने पतप्त झालेल्या त्रिभुवनाला अमृताची-जलाची वृष्टि करून शांत करीत आहेत. तात्पर्य, आई ! प्रलयकालीन अग्नि-सूर्याच्या तापाने तप्त झालेल्या त्रिभुवनाला शांत करणारे भगवान् अमृतेश्वर हे तुझ्याच सामर्थ्याने संपन्न असून ते तुझ्याच मणिपूरचक्रांत तुझ्यासह वास्तव्य करीत आहेत. मी तुम्हां उभयतांची भक्तिभावानें उपासना करीत आहे.

सोन्याच्या पत्र्यावर श्लोक तीनप्रमाणें यंत्र काढून त्यांत श्रींच्या जागी ठं हें बीज लिहावे. पंचेचाळीस दिवस पूजा करावी. मध, दूध, पायस आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. तें यंत्र उशीत घालून झोपावे. इष्ट वस्तूचे स्वप्नांत दर्शन घडेल. 



No comments: