01 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३० वा

स्वदेहोद्‌भूताभिर्घृणिभिरणिमाद्याभिरभितो
निषेव्ये नित्ये त्वामहमिति सदा भावयति यः ।
किमाश्चर्यं तस्य त्रिनयन-समृद्धिं तृणयतो
महासंवर्ताग्निर्विरचयति निराजनविधिम् ॥ ३०॥


तादात्म्यभावनेनें इष्टदेवतेची उपासना करणें याला अहंग्रहोपासना असें म्हणतात. ही इतर सर्व साधनांपेक्षां साधकाला सत्त्वर फलप्राप्ति करून देत असते. या दृष्टीने या श्लोकांत आचार्य महात्रिपुरसुंदरीच्या तादात्म्यभावनेनें केल्या जाणाऱ्या उपासनेचा महिमा वर्णन करीत आहेत. आई त्रिपुरसुंदरी ! तूं नित्या म्हणजे आदि आणि अंत यांनी रहित आहेस. त्याचप्रमाणे निषेव्या म्हणजे नित्य उपासना करण्यास योग्य आहेस. तुझ्या देहांतून अर्थात् चरणकमलापासून प्रकट झालेल्या किरणांना देवताच म्हणतात. घृणि शब्दाचा अर्थ किरण असा आहे. त्या देवता किरणासारख्या प्रकाशमान असल्यामुळें त्यांना किरण असें म्हटलेले आहे. या देवता श्रीत्रिपुरसुंदरीचा देहच असलेल्या श्रीचक्रामध्ये विराजमान झालेल्या आहेत. श्रीचक्रवर्णन पहा. तुझ्या भोंवतालीं विराजमान असलेल्या त्या देवता तुझी नित्य सेवा करीत आहेत. त्या सर्व देवतांसह सच्चिदानंदस्वरूप असलेली तूं, जो कोणी साधक तादात्म्यभावनेनें "सोहमस्मि" म्हणजे तो सच्चिदानंद आत्माच मी आहे. या भावनेप्रमाणे "त्वमहमस्मि" म्हणजे तूंच मी आहें अशा तादात्म्यभावनेनें तुझी उपासना करील तो पूर्ण समृद्ध होईल. त्रिनयन म्हणजे भगवान् सदाशिव. नयन म्हणजे मार्ग अर्थात् प्राप्तीचे साधन. सूर्य, चंद्र आणि अग्नि ही शंकरांच्या प्राप्तीचीं तीन साधने आहेत म्हणून शंकरांना त्रिनयन असे म्हणतात. अथवा इडा, पिंगला आणि सुषुन्ना या तीन मार्गांनींच योगी लोक सदाशिवतत्त्वाचा साक्षात्कार करून घेत असतात. म्हणूनही शंकरांना त्रिनयन असे म्हटलेले आहे. अथवा सूर्य, चंद्र आणि अग्नि हे त्यांचे तीन नेत्र आहेत म्हणूनही त्यांना त्रिनयन असें म्हणतात. त्रिनयन म्हणजे शंकर. त्यांची समृजि देखील तो साधक कस्पटाप्रमाणे तुच्छ मानतो. "महासंवर्ताग्नि" म्हणजे कल्पांतकाळाचा प्रळयाग्नि त्याला नीरांजनविधि करतो. तो स्वतःलाच नीरांजनदीपाप्रमाणें त्याच्यावरून ओवाळून घेतो यांत आश्चर्य काय आहे ? तात्पर्य, हे आई ! अत्यंत भक्तवत्सल असलेल्या तुझी तादात्म्यभावनेने उपासना केली असतां तो तुझ्या कृपेने शंकरापेक्षांही अधिक समृद्ध होतो ! प्रत्यक्ष तूंच तो होतो !

सोन्याच्या पत्र्यावर हें यंत्र काढून शहाण्णव दिवस त्याची आराधना करावी. रोज या श्लोकाचा एक हजार जप करावा. मध, व गूळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. यंत्र धारण करावे. फल अणिमाद्यैश्वर्यसिद्धि, परकायप्रवेश, अग्निस्तंभन. 

No comments: