30 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३१

अमृतांशूद्भवो भानुः शशबिंदुः सुरेश्वरः 
औषधं जगतः सेतु सत्यधर्मपराक्रमः  ।।
(२८) अमृतांशूद्‍भवः :  - चंद्र आपल्या प्रसादयूक्त किरणांनी सर्व वनस्पती व फळांना आवश्यक असा रस स्वाद पुरवितो (पोषण करतो) म्हणून त्याला संस्कृतमध्ये 'अमृतांशू' म्हटले जाते. अमृतमंथनाचे वेळी क्षीरसागरातून सर्वप्रथम चंद्र उदभवला असे पुराणांत वर्णन केले आहे. भगवान विष्णु क्षीरसागरांत निरंतर आपल्या शेष शय्येवर पहुडले आहेत त्यामुळे त्यांनाच प्रत्यक्ष चंद्राचे (अमृतांशूचे) उगमस्थान म्हटले आहे. मानवाचे दृष्टीनें चंद्र ही मनाची (मति) देवता आहे असे मानले जाते. जेव्हा आपल्या मनांत सत् (सुर) व असत् ( असुर) यांचे द्वंद्व किवा मंथन सुरूं होते तेंव्हा त्याच्यामधून विवेक बुद्धिरूपी चंद्रमा उदित पावतो. सूर्य ही शक्तिची देवता आहे तर चंद्र ही क्षेत्राची (प्रकृतीची) देवता आहे. व ज्या उगमापासून ह्या क्षेत्राची झाली आहे तो 'अमृतांशूद्भव' आहे 'श्रीविष्णु'.
(२८) भानुः :  - स्वयं प्रकाशी. जो सूर्यरूपाने सूर्यमालेच्या मध्यवर्ती राहून सर्व जगतावर आपल्या प्रकाशाच्या सहाय्याने कृपा करतो तो श्रीविष्णू - भानु होय.
(२८) शशबिंदुः :  - चंद्रावरील कलंक. साध्यानजरेने पाहिले असतांही तो चंद्रावर सशाच्या सावलीप्रमाणे दिसतो. हा कलंकही चंद्राच्या सौंदर्याला शोभून दिसतो. (सौंदर्यबिंदू). असा सौंदर्यबिंदू धारण करणार्‍या चंद्राच्या स्वरूपांत स्वतः भगवान् विष्णुच सर्व जगाचें 'सोम' रूपाने पोषण करीत आहे.[1]
(२८) सुरेश्वरः :  - (सुर - देव) सुरेश्वर म्हणजे देवांचाही देव. सु = संपत्ती, र = देणारा अशीही सुर ह्या शब्दाची फोड होते. अर्थात् सुर म्हणजे उदार दाता व त्याच्या ईश्वर. जो सर्व दानी व्यक्तिंच्या दयार्द्रतेला प्रेरणा देतो व त्यांचे दातृत्व परिपूर्ण करतो तो सुरेश्वर. भगवान् श्रीविष्णु.
(२८) औषधम् :  - औषधी. संसारातील सर्व तापदायक व्याधी, दुःखावरील त्वरीत दुःखहारक अशी दिव्य औषधी श्री नारायणच आहे. प्रत्यक्ष शारीरिक व्याधींच्या पूर्ण निराकरणाचे औषध या दृष्टीनेही ही संज्ञा चुकीची ठरत नाही. शारीरिक व्याधीही मनाच्या विसंगतीतून उत्पन्न होतात. व जेव्हा मनुष्यांचा अहंभाव पूर्ण शरणागत होतो तेंव्हा भक्तांच्या शारीरिक दुःखाचेही श्रीनारायण खरोखरीच प्रत्यक्ष औषधी होऊन हरण करतो.
(२८) जगतस्सेतुः :  - सेतु म्हणजे पूल किवा बंध. पाण्यातील लंाबच्या बेटाला मुख्य भूभागाशी जोडण्याकरतां घातलेल्या बंधाला सेतू म्हणतात. प्रभु रामचंद्रांनी असा सेतु बांधला व ते लंकेला गेले. जगतसेतु ही संज्ञा असे दर्शविते की परमेश्वर स्वतःच असा एक बंध आहेत ज्याच्यावरून साधकाला आपली अहंकेंद्रित अपूर्णता पार करून अत्यंत आनंदपूर्ण अनंताच्या प्रदेशात जाता येते.
(२८) सत्यधर्मपराक्रमः :  - जो सत्य व धर्म यांचे करता पराक्रम स्वरूप (सामर्थ्य स्वरूप) झाला आहे असा, किवा जो स्वतःच साक्षात् सत्य, धर्म, व पराक्रम आहे असा. थोडक्यात परमेश्वर स्वतःच सत्य व धर्म (पवित्रता) यांच्या स्थापने करतां असत्य व अधर्माशी झुंज घेतो व ते नष्ट करतो.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]   ( गामाविश्यच भूतानि धारयाम्यह मोजसा । पुष्णामि चौषधीः सर्वाः सोमोभूत्वा रसात्मक: (गीता १५-११) – तो स्वतःच जड प्राकृतिक जगत्‌ही झाला आहे व तोच चंद्र होऊन सर्व वनस्पतिंचे पोषण करतो आहे.

26 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ३०

ओजस्तेजोद्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः 
ऋद्धः स्पष्टाक्षरो मंत्रः चंद्राशुर्भास्करद्युतिः  ।।
(२७) ओजस्तेजोद्युतिधरः : - जो शारिरिक चैतन्यशक्ति (ओज), बुद्धिजे तेज व सर्व सौंदर्य (द्युति) धारण करतो तो (धरः) आपल्याला ज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वाच्या तीन पातळयांचे पूर्णत्वच या संज्ञेनें दर्शविले आहे. निरोगी शरीरातील सर्व तत्वांचे व घटकांचे पूर्ण साम्यत्व व तेजस्विता ओज स्वरूपामध्ये निदर्शनास येते. हे आपल्यातील चैतन्य (ओज) जेव्हा रक्षण करून, नियमित व शिक्षित करून ध्यान मार्गाकरतां वापरले जाते तेव्हां तेच बुद्धिमध्ये 'तेज' रूपाने रुपांतरीत होते. (तेजस्), व व्यक्तिमत्वाचे समग्रत्व साधले जाते. ज्या व्यक्तिनें आपले ओज अशा तर्‍हेने उन्नत केले आहे त्याच्या उज्ज्वलेतेला आपल्या शास्त्रात 'तेज' असे म्हटले आहे. ज्यावेळी एकादा योगी सूज्ञतेने आपले जीवन आखून घेऊन समर्पित वृत्तीनें ध्यान मार्ग आक्रमतो तेंव्हा त्याचे ठिकाणी 'ओज' व 'तेज' एकत्रित येते. व योग्य कालानंतर तोच दिव्य साक्षात्कारी संत 'बुद्ध' म्हणून ओळखला जातो. त्याचे भोवती तयार होणारे अंत्यंत शांत मनोहारी वातावरण, प्रेम व करूणा, पूर्णता ज्ञान व सामर्थ्य यांचा प्रभाव यालाच दिव्यतेची प्रभा (द्युतिः) असे म्हटले जाते. गीतेतील १० व्या अध्यायात गीताचार्य भगवान् आपल्या आत्मस्वरुपाबद्दल स्वतःच सांगतात, ' मी बलवंतामधील बल आहे व तेजस्वी जनांमधील तेज आहे. ' (बलं बलवतां अस्मि तेजस्तेजस्विनामहम् - गीता १०-३६)
     कांही टीकाकार या तीन संज्ञा अलग मानतात परंतु शंकराचार्य तिचे एकत्र विवेचन करतात.
(२७) प्रकाशात्मा :  - तेजोमय आत्मा. तो सर्व हृदयामध्ये आत्मतत्वाने विराजित आहे व त्याचा जाणीव स्वरूपाने अनुभव येतो. सर्व प्राणीमात्रांच्या तीन अवस्थांमधील सर्व अनुभवांचे सर्व वेळी प्रकाशन करणारा जो प्रकाश स्त्रोत आहे (ज्ञानस्वरूप) तो प्रकाशआत्मा होय. तोच सर्व विश्वाचा आत्मा व परमात्मा महाविष्णु होय.
(२७) प्रतापनः :  - जो स्वतःस औष्णिक शक्तिचे स्वरूपांत व्यक्त करतो तो. हीच औष्णिक शक्ति प्रत्येक सजीव प्राणीमात्राचे भोवती असतेत्या वातावरणास जीवनदायी शक्ति प्रदान करते. गीतेमध्येही साक्षात् गीताचार्यांनी यास पूरक विधान केलेले आढळते की, ' भगवान् स्वतःच सत्यस्वरुप असून चंद्र व सूर्य यांचे ठिकाणी असलेले प्रकाश व  उष्णता या स्वरूपात व्यक्त दशेला येतात, व त्यांच्याच उष्णतेमुळे कठीण अशा पृथ्वीतलास उष्णता मिळून सृजनाची शक्ति प्राप्त होते.
(२७) ऋद्धः :  - जो नित्य सर्व समृद्धिनें युक्त आहे असा. तो स्वतः लक्ष्मी-पति असल्याने सर्व ऐश्वर्याचा तोच स्वामी आहे. सर्व विश्वातील वैभव सामर्थ्य व सौदर्य ही त्याचीच व्यक्त दशेला आलेली रूपे आहेत अर्थात तो स्वतःच परिपूर्ण वैभव आहे.
(२७) स्पष्टाक्षरः :  - जो स्पष्ट ध्वनी प्रतिकांनी निर्देशित केला जातो तो. परमात्म्याचे ते प्रख्यात ध्वनीप्रतीक [1] अक्षर आहे   'ॐ' , गीतेमध्ये उल्लेख आहे, जो माझे '' हे अक्षर जपत व माझे स्मरण करत देहत्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. संस्कृत भाषेमध्ये क्षर या शद्बाचा अर्थ होतो विनाशी, व अक्षर शद्बाचा अविनाशी. हे सर्व जग विनाशी असले तरी ते परिपूर्ण निर्विकार सत्याची व्यक्त अवस्था आहे परंतु आपली जाणीवेची साधने म्हणजे शरीर-मन-बुद्धी ही अपूर्ण आहेत. ज्याला जाणीव होते तो अहकार ह्या जगाच्या विविधतेचा अनुभव केवळ इंद्रिय विषय (संवेदना), भावना, व विचार याच स्वरूपांत घेवू शकतो. ह्या अपूर्ण साधनांमधून डोकावणारा अहंकार त्या पूर्ण सर्वसमावेशक दिव्य सत्याचा अनुभव कधीच घेवू शकत नाही. ज्यावेळी तो अहंकार पूर्ण निवेदित अवस्थेला (शरण) जातो, मन स्तब्ध व शांत अवस्थेप्रत जाते तेंव्हाच आपल्याला त्या परमतत्वाचे 'स्पष्ट' 'अक्षर स्वरूपांत' ज्ञान होते. यावरून हे स्पष्ट होते की त्या अक्ष स्वरूपांत प्रतीत होणारा महाविष्णु म्हणजेच 'स्पष्टक्षर ' होय.
(२८०) मंत्रः :  - जो स्वतःच वेदामधील मंत्रस्वरूप आहे असा. वेदामधील उद्घोषित मंत्र हे असे साधन (वाहन) आहे की जे आपल्याला सरळ त्या साक्षात् परमतत्वाच्या अनुभवापर्यंत नेऊ शकते. कित्येक वेळां हे मंत्र व त्यांचे ध्येय एकाच नावांने ओळखले जातात. ज्याचे योग्य तर्‍हेने मनन केले असतां तारतो (रक्षण करतो) तो मंत्र (मननात् त्रायते इति मंत्रः) आपण या उपनिषदातील मंत्राच्या सहाय्याने त्या परमेश्वराचे परमतत्व जाणू शकतो म्हणून त्यालाच 'मंत्र' म्हटले आहे.
(२८) चंद्रांशुः :  - चंद्राचा किरण. चंद्राकिरणांचा वनस्पतींवर परिणाम होत असतो हे भारतामध्ये वैदिक काळापासून ज्ञात होते 'मी चंद्रकिरणरूपी सोम होऊन सर्व वनस्पतींमध्ये पोष तत्त्वे भरतो [2] असे श्री वासुदेवाने गीतेमध्ये सांगीतले आह. अशा प्रकारे परमेश्वर त्या त्या जीवांच्या जीवनशक्तीचे पोषणकरून त्यांचे धारण करतो. हा जरी ह्या संज्ञेचा तात्विक अर्थ असला तरी चंद्राचे सौदर्य आपल्या मनात जी शांतता व संतोष निर्माण करते ते खरोखर त्या परमात्म्याच्या शांततेचे प्रतिबिंबच आहे.
(२८) भास्करद्युतिः :  - सूर्याचे तेज. सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू असून अनंत काळापासून सर्वशक्तिंचा आदीस्त्रोत आहे. पृथ्वीवरील प्राणीमात्रांस शक्ति व जीवन त्यापासून प्राप्त होते. सूर्यावाचून जीवन अशक्यच आहे. परंतु त्याचवेळी जीवनांत कुठलाही अधिक्षेप न करतां स्वतः स्वतःच्याच ठिकाणी राहून सूर्य सर्व जीवनांस आश्वासन व आशीर्वाद देतो. त्याच्याचप्रमाणे जो परमात्मा अलिप्त राहून केवळ स्वतःच्या अस्तित्वमात्रे करून सर्व प्राणीमात्रास आशीर्वाद देतो तोच 'जीवनसूर्य' आहे, तोच आत्मा व तोच महाविष्णु होय.
डॉ. सौ. उषा गुणे.


[1]  ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरनमानुस्मरन्  यः प्रयाति त्यजन्देहं सयाति परमां गतिम्  ।।
[2]   (पुष्णामि चौषधीः सर्वासोमोभूत्वा रसात्मकः गीता १५-१३)

22 April, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक २९

सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसुः ।
नैकरूपो बृहद्रुपः शिपिविष्टः प्रकाशनः  ।।
(२६) सुभुजः :  - ज्याच्या भूजा अत्यंत सुंदर आहेत असा. ही संज्ञा केवळ स्थूल शरीरातील हातांचे सौदर्य वर्णन करण्याकरता योजिलेली नाही, तर जे हात आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरतां, व त्यांना अभयदान व वरदान देण्याकरतां सतत कार्यरत असतात त्यांच्या सौदर्याचे वर्णन करण्याकरतां वापरली आहे, म्हणूनच तो सुभुज आहे.
(२६) दुर्धरः :  - दीर्घकालपर्यंत ध्यान चिंतन करणार्‍या योग्यांनाही ज्याचे संपूर्ण आकलन होत नाही तो दुर्धर. त्या परमात्म्याचा हा ’साक्षात्कार’ मन, बुद्धिच्या अतीत आहे म्हणून मन व बुद्धिने त्याचे आकलन होत नाही.
(२६) वाग्मी :  - जो आपले सामर्थ्य वर्णन करण्यात वाक्चतुर आहे असा. ह्या संज्ञेचा पूर्ण अर्थ केवळ वाचेचे प्रभुत्व दर्शविण्याकरतां नाही. जगतांतील सर्व शारीरिक सामर्थ्य, संपूर्ण विश्वातील वैभव, सर्व हृदयांचे सौंदर्य, सर्वांच्या बुद्धिची शक्ति ही सर्व त्याचेच वैभव गातात. पुन्हा सर्व धर्म ग्रंथामधून तोच सर्व जीवांना मायेच्या झंझावाता पलीकडील असलेले त्याचे आश्रय स्थान बोलून दाखवितो व तेच साध्या शब्दात व समर्पक सूचनांनी सर्व संत, साधु ऋषी व विचारवंतांनीही सांगितले आहे.
(२६) महेन्द्रः :  - जो इन्द्राचाही स्वामी आहे असा. सर्व देवांचा देव. तत्वज्ञानामध्यें मनाला इंद्र - म्हणचे इंद्रियांचा राजा म्हटले आहे. ह्या मनाचाही स्वामी तो महेन्द्र, परमात्मा होय.
(२६) वसुदः :  - वसु म्हणजे समृद्धि. ती सर्वांना प्रदान करणारा तो वसुदः. ही समृद्धि बाह्य व आंतरिक समाधान अशा दोन्ही स्वरूपाची असते. एकदा त्याला अनन्य भावाने शरण गेले म्हणजे मनुष्य कार्यातील यश, प्रेमपूर्ण हृदयाचे सौंदर्य, संयमित मन व चिंतनशील बुद्धिने समृद्ध होतो.
(२७०) वसुः :  - वसु ह्या शब्दाला तीन अर्थ आहेत. (१) वसु - धन, समृद्धि. (२) वसु - आच्छादन (३) वसु - सूर्य. या अर्थाप्रमाणे तो बाह्य समृद्धिच्या रूपाने व्यक्त होतोच आणि ही समृद्धि प्रदान करणारा, सर्व विश्वाचे भरण पोषण करणारा सूर्य नारायण ह्या रूपानेही तोच व्यक्त होतो. तसेच ज्यांचे जवळ खरी भक्ती नाही व दुष्ट प्रवृत्तीमुळे ज्यांची मनोभूमी तयार झालेली नाही अशा व्यक्तींच्या आकलनापासून ज्याने स्वताःला झाकून घेतले आहे, जो आवृत्त झाला आहे तो वसु होय.
     तसेच 'वसति इति वसुः' जो सर्व चराचर सृष्टिमध्ये वस्ती करतो रहातो तो वसु किवा 'वासयति इति वसु' जो सर्व स्थावर जंगम वस्तुंना आपल्यामध्ये वसती करावयास लावतो तो वसु. गीता व उपनिषदांमध्येही असे वर्णन आहे की, ते अनंततत्त्व आपल्या ईश्वरभावाने सर्वांमध्ये अंतर्भूत होऊन राहते व शुद्ध सर्वातीत भावाने सर्व विश्वाचा आधार आहे. यस्तु सर्वाणि मूतानि आत्मन्येवानुपश्यति । सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुजुगुप्सते ।।(इश-६) तसेच गीतेमध्ये - सर्व भूतस्थमात्मानं सर्व भूतानिचात्मानि । ईक्षते योग युक्तात्मा सर्वत्र समदर्शनः  ।।
(२७) नैकरूपः :  - जो व्यक्तदशेमध्ये अनंत आकार धारण करतो तो जागृत अवस्थेमध्ये एकविध असलेले मन अनेकविध होऊन स्वप्न जगतातील अनेक चित्रविचित्र वस्तू प्रदान करते. श्रीविष्णु हे ह्या विश्वाचे एकच सर्वश्रेष्ठ असे कारण आहे आणि सर्व कार्येही त्याच कारणापासून व्यक्त झालेली अनेक रूपे आहेत. सर्व भक्त आपल्या सुपरिचित पारंपारिक प्रार्थनेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ही कल्पना सुंदर रितीने वर्णिलेली आहे.
' जलं विष्णुस्थलं विष्णुः विष्णुराकाशमुच्यते ।
स्थावरं जंगम विष्णुः सर्व विष्णुमयं जगत्  ।।
     आपल्या भेदयुक्त शरीर - मन-बुद्धिच्या सहाय्याने त्याचेकडे पाहिले असता आपल्याला अनेकतत्व दिसते (नैकरूप) परंतु साधनातीत होऊन पाहिले असतां अंतिम सत्याचे 'एकतत्वच' अनुभवास येते.
(२७) बृहद्‌रूप:  - असीम अमर्याद् - सर्वव्यापी. ज्याचे रूप संपूर्ण विश्वाचे व्यापक रूप हेच ज्याचे ’रूप’ आहे, त्यामुळे तो सिव्हासारखाच व्यापक आहे.  ऋग्वेदातील पुरूष सूक्तांमध्ये य्षींनी केलेले असे वर्णन आहे की ' तो उत्तम पुरूष विष्णु केवळ विश्वाएवढाच मर्यादित नाही तर तो त्यास व्यापूनही दहा अंगुळे उरून राहिला. ''अत्यतिष्ठत् दशांगुलम्.''
(२७) शिपिविष्टः :  - शिपि हे यज्ञपशुला दिएलेले नाव आहे. निष्काम भावनेनें केलेल्या सर्व यज्ञ कर्मामध्ये अर्पण केलेल्या सर्व हवनास जो पवित्र करून घेतो तो असे ही संज्ञा सुचविते. मूळ धातू 'शि' ह्याचा अर्थ आहे 'जल' व ते पिणारे 'शिपि' सूर्यकिरण. म्हणूनच शिपीविष्ट या संज्ञेनें सूर्यामध्ये अधिष्ठित असलेले परमतत्व दर्शविले आहे. तोच सूर्य जगताला शक्ति व तेज प्रदान करीत असतो. भगवत् गीतेत श्रीकृष्ण स्वतःच सांगतात सूर्यचंद्राचे ठिकाणी जे तेज व शक्ति प्रतीत होते ती शक्ति व तेज माझेच आहेत असे तू जाण.
यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलम्  यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकम्  ।।
(२७) प्रकाशनः :  - जो सर्व प्रकाशित करतो तो. सर्वव्यापी ज्ञान स्वरूप असल्याने सर्व प्राणीमात्रांचे साधनांमधून प्रतीत होतो. सर्वांच्या हृदयातील जाणीवशक्तिच्या रूपाने सृष्टित सर्व ठिकाणी, सर्व वेळी घडणार्‍या सर्व घटनांचे ज्ञान त्यालाच होत असते, म्हणूनच तो सर्ववित्, सर्वज्ञ आहे. सर्व अनुभवांचे तोच प्रकाशन (ज्ञान) करून देतो. ज्याप्रमाणे एकच सूर्य जगतातील सर्व वस्तू प्रकाशित करतो त्याप्रमाणे ते परमतत्व अनुभव क्षेत्र व अनुभव क्षेत्रज्ञ या दोहोंचे प्रकाशन करतो.
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः 
क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत  ।। गीता १३-३३
डॉ. सौ. उषा गुणे.