28 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४६

विस्तारः स्थावरः स्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् 
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः  ।।
(४२) विस्तारः :  - विस्तृत - प्रलयाचे वेळी नामरूपात्मक संपूर्ण विश्व त्याचेमध्ये सहजतेते समाविष्ट होवूं शकते इतका व्यापक त्याचा विस्तार असल्याने त्यालाच 'विस्तार' अशी संज्ञा दिली गेली आहे. तसेच परमात्म्यामध्येच सर्व विश्व विस्तार पावते म्हणजेच प्रकट होते. परमात्मा स्वतःमध्येच सर्व विश्वाचे प्रकटीकरण करतो.
(४२) स्थावरः स्थाणुः :  - जो दृढ व स्थिर आहे असा. स्थावर - अचंचल. ह्या संज्ञेने त्याचेमध्ये कुठलीही हालचाल, चंचलता नाही असे सुचविले जाते कारण तो सर्वव्यापी आहे. स्थाणु - स्थिर. या संज्ञेचा अर्थ असा होतो की एकाद्या देशाच्या सीमा दाखविणार्‍या खांबाप्रमाणे तो स्थिर आहे. या दोन्ही संज्ञा मिळून हे एकच नाम झाले आहे. तो परमात्मा एकाचवेळी दृढ (अचंचल) आहे व स्थिरही आहे. केवळ सर्वव्यापीच नाही, तर त्याच्यामध्ये चंचलता नाही व कसली गतीही नाही. (स्थिर) अर्थात् दोन्ही संज्ञा मिळून श्रीविष्णु सर्वव्यापी आहे असे सुचविले आहे.
(४२) प्रमाणम् : प्रमाण. - सर्व बौद्धिक वादविवादामध्ये व सर्व शास्त्रीय प्रक्रीयांमध्ये अंतर्भूत असलेले पायाभूत तत्व म्हणजेच 'प्रमाण' होय व ते चैतन्यच त्याचा आधार आहे. सर्व धर्माचा अध्यक्ष तो भगवान् नारायण आहे म्हणूनच तो स्वतःच सर्व प्रमाणांच्या मागचे तात्त्विक सत्य आहे.
(४२) बीजमव्ययम् :  - अक्षयबीज. त्याचेपासून सर्व विश्वाची उत्पत्ति होत असल्यानें तोच सर्व विश्वाचे शाश्वत व अपरिवर्तनीय असे कारण (बीज) आहे. ज्याचेवाचून विश्वाचे अस्तित्व असूच शकत नाही असे जगताचे 'मूलकारण' असाही या संज्ञेचा अर्थ होईल. तोच सर्वांचे शाश्वत मूल आहे.
(४३०) अर्थः :  - सर्वाकडून जो पूजिला जातो, आवाहन केला हातो तो. श्रीविष्णूची सर्वजण इच्छा करतात. कारण त्याचे स्वरूप आनंदमय आहे. अगदी लौकीक सुखाच्या मागे धावणारा मनुष्यही त्याचेचकडे जात असतो कारण शेवटी त्याला आनंदाची इच्छा (अर्थ) असते. आणि परमात्मा स्वतःच सुख स्वरूप असल्याने सर्वांचा 'अर्थ' तोच आहे.
(४३) अनर्थः :  - ज्याचेमध्ये कुठलीही अपूर्णता नाही अजून मिळवावयाचे काही नाही, म्हणून तो अन्-अर्थ आहे. तो पूर्ण काम (सर्व इच्छा पूर्ण असलेला) असल्यानें त्याला कांही इच्छा नाही. जोपर्यंत वासना असतात तोपर्यंत इच्छा प्रकट होत राहतात. ज्याचे ठिकाणी सर्व वासना संपलेल्या आहेत अशा परमात्म्या कोणतीच इच्छा नाही व ती अवस्था म्हणजे आत्मस्वरूपाचे ज्ञान.
(४३) महाकोशः :  - ज्याचेभोवती मोठे कोश आहेत असा. आपल्यामधील आत्मतत्व अन्नमय कोशादि पांच कोशांमधून कार्य करते, तसेच भगवान् श्री नारायण स्वतः जगदीश्वर असल्यानें तो त्या विश्वव्यापी कोशाने आवृत्त झालेला आहे. म्हणूनच त्या परमेश्वराला महाकोश असे म्हटले आहे.
(४३) महाभोगः :  - तो परम सुखरूप (भोग) व आनंदरूप आहे.. भक्तांना सर्व सुखाची प्राप्ती त्याचेकडून होत असते व ते परमसुख असते. जे भक्त अनन्यतेने त्याला शरण असतात त्यांचेकरतां सर्वाच्च सुख देणारा तो स्वतःच महाभोग आहे असे ही संज्ञा सुचविते.
(४३) महाधनः :  - पूर्णानंदाच्या सर्वश्रेष्ठ धनाने पूर्ण आहे असा. जेशरणागत भक्तांना कृपा स्वरूपाने प्राप्त होणारे सर्वश्रेष्ठ 'धन' तोच आहे. व हे धन देणाराही तोच श्रीविष्णु आहे.

24 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४५

ऋतुः सुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः 
उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः 
(४१) ऋतुः :  - भगवान् श्रीविष्णु कालाचे आधिपती असल्याने तेचच ऋतुचेही संचालन करतात.
(४१) सुदर्शनः :  - पूर्ण भक्तिमय अंतःकरण झाल्यास भक्तांना जो सुलभतेने दर्शन देतो तो सुदर्शन. किवा ज्याच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या सर्व लौकीक चिंता नाहीशा होतात तो.
(४१) कालः :  - जो प्रत्येक प्राणीमात्रांमधील गुण व अवगुण यांची गणना करतो व त्या प्रमाणे फलप्रदान करतो तो 'काल' श्रीविष्णु होय.[1] तसेच भगवत् गीतेत म्हटले आहे 'मी गणना करणारांमध्ये  काल आहे.[2] 'काल' ही मृत्यु देवतेची संज्ञा आहे. या दृष्टिने पाहता सर्व शत्रूना जो मृत्यू स्वरूपात प्रकट होतो तो काल भगवान् विष्णु होय.
(४१) परमेष्ठि :  - जो आपल्या अपार महिम्याचाही केंद्रस्थित आहे असा परमेष्ठि श्रीविष्णु. किवा जो हृदयाकाशामध्ये असल्याने अनुभवास अत्यंत सुलभ आहे तो.[3]
(४२०) परिग्रहः :  - ग्रहण करणारा. आपल्या भक्तांनी दिलेली अगदी सामान्य वस्तू, एकादे पान फूलही जो अत्यंत [4] समाधानानें ग्रहण करतो तो. कांही टीकाकार ह्या संज्ञेचा विस्तारित अर्थ असा करतात की 'सर्व भक्तांचा जो एकमेव आश्रय आहे तो परिग्रह श्रीविष्णु होय.
(४२) उग्रः :  - भयकारी, जे अत्यंत निंदनीय व दुष्ट आहेत अशांच्या हृदयांत भीती निर्माण करतो तो उग्र[5] किवा उपनिषदांमध्ये निर्देशित केल्याप्रमाणे, ' ज्याच्या भीतीने अग्नि जळतो, ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाशतो, ज्याच्या भीतीने इंद्र, वायु, मृत्यु आपापले कार्य करण्यास प्रवृत्त होतात तो श्रीमहाविष्णु उग्र आहे.
(४२) संवत्सरः :  - वर्ष. जो सर्व प्राणीमात्रांचे वस्तीस्थान आहे असा. कालाच्या विशिष्ठ विस्तारामध्ये प्राणी जगतात [6] आणि अनुभव ग्रहण करतात म्हणून तो संवत्सर- वर्ष आहे. (संवयति)
(४२) दक्षः :  - कार्यकुशल. जो ब्रह्मांडाच्या उत्पत्ति स्थिती लयाचे कार्य अत्यंत सहजतेने, कौशल्याने, मेहेनतीने व प्रतिज्ञापूर्वक करतो तो 'दक्ष' श्रीविष्णु.
(४२) विश्रामः :  - विश्रांतीचे स्थान, शांत अवस्था. ज्या अवस्थेमध्ये गेले असतां संसाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिंना पूर्ण विश्रांतीचा लाभ होतो व शांतता वाटते ती सर्वश्रेष्ठ आत्मस्थिती म्हणजे 'श्रीनारायणच' होय.
(४२) विश्वदक्षिणः :  - जो अत्यंत कुशल असून तत्पर आहे असा. सर्व कार्य प्रवृत्त सजीवांच्या ठिकाणी असलेली कार्यप्रवृत्ती व कार्यकौशल्य हे त्याचेच प्रकटन आहे. कारण तोच ह्या सर्व कर्तृत्वाचा व कौशल्याचा उगम आहे. तोच या सर्व विश्वाचा कर्ता, पालनकर्ता व रक्षणकर्ता असल्याने अर्थातच सर्व प्राणीमात्रांचा अधिक्षक व नियंता आहे.



[1]   कलयति इति कालः
[2]   कालः कलयतामहम्
[3]   परमे व्योम्नि प्रतिष्ठितः । (कठोपनिषत्)
[4]  पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भक्त्या प्रयच्छति । तदहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः  ।। (गीता ९-२६)
[5]  भयादस्याग्निस्तपति भयात्तपति सूर्यः  । भयादिन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावतिपंचमः  ।। (कठ २-५-३)
[6]  सम्यक् वसन्ति भूतानि यस्मिन् इति संवत्सरः 

20 June, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ४४

वैकुण्ठः पुरुषः प्राणः प्राणदः प्रणवः पृथुः 
हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः  ।।
(४०) वैकुण्ठः :  - मनुष्यांची अयोग्य मार्गात इतस्ततः होणारी गती कुंठीत करणारा तो 'वैकुंठ'. महाभारतात असा उल्लेख आहे की 'मी पृथ्वीला जलतत्वाशी संयोजित केले, [1] आकाश व वायु यांना जोडले व वायूला अग्नि बरोबर जोडून ठेवले त्यामुळे मला वैकुंठ हे नाम प्राप्त झाले.
(४०) पुरुषः :  - जो सर्व शरीरांत (पुरींमध्ये) रहातो तो पुरुष.[2] बृहदारण्यक उपनिषदांत म्हटले आहे की जो सर्वांच्या पूर्वीचा असून अग्नि रूपाने सर्व पाप त्याने नाहीसे केले (औषत्) म्हणून त्याला पुरूष म्हटले जाते. अर्थात् तोच सर्व सजीवांमध्ये सर्व काल सर्व ठिकाणी राहतो व प्रेरणा देतो.
(४०) प्राणः :  - जो प्राण स्वरूपांत सर्व सजीवांमध्ये राहून त्यांच्या इंद्रिंयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असतो तो. विष्णुपुराणांत तोच श्रीविष्णु पंच प्राणांचे स्वरूपांने सर्व शरीराला चालना देतो असे म्हटले आहे. प्राण स्वरूपाने तोच हालचाल घडवितो.
(४०) प्राणदः :  - या संज्ञेचे दोन अर्थ होतात (१) जो प्राण अर्पण करतो तो व (२) जो प्राण हरण करतो तो. कारण 'द' या मूळ क्रियापदाचे देणे किवा तोडणे असे दोन अर्थ होतात. म्हणून परमात्मा विष्णूच सर्व जीवांना उत्पत्तिचेवेळी प्राणदान करतो व प्रलयाचे वेळी प्राणांची हालचाल थांबवितो.
(४०) प्रणवः :  - ज्याचे सर्व देवांकडून नमन (प्रणमन) केले जाते किवा स्तुति केली जाते तो 'प्रणवः'. सनतकुमार असे उदघोषित करतात की [3]'त्या परमात्म्याचे सर्व देव नमन पूजन करतात व स्तवन करतात, म्हणून तोच प्रणव आहे. ह्या सत्याचे प्रतिपादन वेदांमध्ये '''' ह्या प्रतिकाने केलेले आहे. अर्थातच काराला प्रणव म्हटले आहे. व तो परमात्माच कारस्वरूप विष्णु आहे.
(४०) पृथुः :  - जो विस्तारलेला आहे तो. ज्याचा विस्तार अनंत जगताच्या आकाराने, स्वरूपाने प्रकट झाला आहे असा. अर्थात् तो सर्व व्यापी आहे. पुराणांचे मते तो पूर्वी वेन राजाच्या पुत्राच्या रूपाने पृथुच्या रूपाने जन्मास आला व त्याने ह्या भूमीवर सर्व समृद्धी आणली तोच श्रीविष्णु नारायण होय.[4]
(४१) हिरण्यगर्भः :  - वेदांतामध्ये ही संज्ञा सृष्टिकर्ता या अर्थी उपयोजिली आहे. (ब्रह्मदेव) व ती परमात्मा नारायणाची 'सृजनशक्ती' सूचित करते. ज्यामधून सर्व व्यक्त जग प्रकट होते, उत्पन्न होते त्या सृष्टिकर्त्यास ह्या ठिकाणी हिरण्य-गर्भ असे म्हटले आहे. अर्थात ह्या संज्ञेने असे सूचित होते की सृष्टिकर्त्याची (ब्रह्मदेवाची) संपूर्ण सृजनशक्ती ही त्या परमात्मा नारायणाच्याच शक्तिचे प्रकटन आहे.
(४१) शत्रुघ्नः :  - शत्रुंचा नाश करणारा. भगवंत देवांच्या सर्व शत्रूंचा नाश करतो याचाच अर्थ असा की भगवंतास पूर्ण शरणागत असलेल्या साधकांच्या मनांतील सर्व अनिष्ट विकार नाहीसे करतो तो शत्रुघ्न 'श्रीमहाविष्णु'.
(४१) व्याप्तः :  - सर्वव्यापी. कार्य हे कारणांखेरीज असू शकत नाही व कारण हे कार्यामध्ये नेहमीच अतंर्भूत व सुसंगत असते. अर्थातच हे विश्व ज्या अनंतापासून उत्पन्न झाले आहे त्या अनंतानेच व्याप्त झालेले असणार. म्हणूच जो सर्वव्यापी आहे तोच श्रीविष्णु होय.
(४१) वायुः :  - जो प्राणवायूच्या रूपानें सर्व ठिकाणी, सर्व सजीवांना चेतनता देतो तो. अर्थातच तो केवळ वायू नव्हे तर त्या वायू मधील चैतन्यदायी शक्ति होय.
(४१) अधोक्षजः :  - महाभारतात म्हटले आहे, 'माझी शक्ति केव्हांही [5]अधोमुख होन वहात नाही म्हणून मी अधोक्षज म्हणून ओळखला जातो.
     तसेच जो ज्ञानेंद्रियांच्या शक्तिने प्राप्त हो शकत नाही तो अधोक्षज असाही अर्थ हो शकतो. किवा असा अर्थ होईल की अध (पृथ्वी) व अक्ष (आकाश) यांच्याखाली (मध्ये) राहून त्यांना आधार देतो तो भगवान् श्रीविष्णु 'अधोक्षज' होय.



[1]    मयासंश्लेषिता भूमिरद्भिर्व्योम चवायुना । वायुञ्चतेजसा सार्ध वैकुंठश्च ततोमम  ।।
[2]   पुरीशयनात् पुरुषः ।
[3]  प्रणवन्ति ह्यमुं देवास्तस्मात् प्रणव उच्यते ।
[4]  अत्र तु प्रथमो राज्ञां पुमान् प्रथयिता यशः । पृथुनमि महाराज्ञो भविष्यति पृथुश्रवाः ॥
[5]   अधो न क्षीयते जातु यस्मात् तस्माधोक्षजः । (महा. उद्योग ७१.१०)