Showing posts with label अण्णांची पत्रे.. Show all posts
Showing posts with label अण्णांची पत्रे.. Show all posts

20 February, 2009

या देवी सर्वभूतेषु

या देवी सर्वभूतेषु

:

प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते. प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, श्रीसद्‌गुरू, अध्यात्मग्रंथ इत्यादि. ज्यांना आपण ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्य मानतो. त्यांच्या शब्दावर आपला सहजच मोठा विश्वास बसतो. त्यांचे शब्द आपल्याला सत्य वाटतात. वेदतुल्य वाटतात.


श्रद्धाकेंद्रे अनेक असतात. व्यक्ति व्यक्ति समाज राष्ट्र यांच्या स्तरावर भौतिक जीवनांत ती भिन्न भिन्न सगळ्यांचे ध्येय एकच. ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव. आणि ते ध्येय गांठण्याचा निश्चित मार्गही पण एकच. तो म्हणजे नामसाधन. नामस्मरण. या साधनाची प्रक्रिया पण सामान्यतः एकच आहे. म्हणून अध्यात्म जीवनांत श्रद्धेचे स्थान एकच. आपले श्रीगुरू.


या क्षेत्रांतील महाजनांमध्ये श्रीसद्‌गुरूचे स्थान श्रेष्ठतम. त्यानंतर क्रमांक म्हणजे सगळे आत्मसाक्षात्कारी संत.


संत सद्‌गुरु भेटणं कठीण. महाकठीण. "पूर्व जन्मी सुकृते थोर केवी । ती मज आजि फळासी आली ॥" असे खुद्द श्रीगुरूज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, मग आपला काय पाड नां ? बरं भेटले तर त्यांच्यावर श्रद्धा बसणे आणखी कठीण. एवढ्यानीही झालं नाही. श्रद्धा बसली आपली, तरी त्यांची कृपा होणे कठीण. श्रीगुरुंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून सबीज नाम मिळणे त्याहून कठीणच. श्रीगुरूंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून नाम मिळणे. पण आपल्या संपर्कात, सान्निध्यात, आपल्याजवळ देणार्‍या जीवींचा भक्तिप्रेमभाव, श्रद्धा, त्याचे अंतःकरण ते जाणतात. आणि मगच त्याच्यावर कृपानुग्रह करतात. आता अशा कसोटीला उतरून नाम जरी मिळाले तरी, सुरुवातीची श्रद्धा, पुढे शेवटपर्यंत टिकवणे हे पण अति महत्त्वाचे. अत्यंत प्रयासाने, कष्टाने, त्याआड येणार्‍या सर्व गोष्टी निर्भयपणे बाजूस सारून ती श्रद्धा जोपासावी लागते, टिकवावी लागते.


श्रीगुरुंवरील अर्थात निवृतिमार्गावरील श्रद्धेला प्रवृत्ति मार्गातील अनेक धोके असतात. अध्यात्ममार्गातील या श्रद्धेचा मुख्य शत्रु म्हणजे देहभाव. देह भावांतच सुख वाटले तर श्रद्धा तेथेंच विसंबते. कारण जेथें सुख तेथें श्रद्धा हा सामान नियम. आपले सुख, पैसा, लौकिक, व्यवहार इत्यादि ठिकाणी विभागलेले. हे प्रवृत्तितील सुख सहज अनुभवता येते. थोड्या श्रमाने, प्रयत्‍नाने सहज हाती येते (आले असे वाटते) त्यामुळे अध्यात्माकडील श्रद्धा कमी पडते.


श्रद्धा हा मनाचा स्थायीभाव आहे. श्रद्धा ही भावनामय असते. देहभावाला चिकटलेल्या मनाच्या कल्पना श्रीगुरुवरील श्रद्धेच्या आड येतात. त्यासाठी देहभावातून हळूहळू आत्मभावाकडे पाऊले टाकणें फार आवश्यक.


मनाची संकल्पशक्ति आणि बुद्धीची भावनाशक्ति यांचा सुंदर समन्वय साधला की मग श्रद्धा वाटते, ती सूक्ष्म पण बळकट होते. सगळ्या शंकासुरांना तोंड देऊन त्यांचे निर्दळण करते मग ही श्रद्धास्वरूपी महालक्ष्मी - महाकाली - महासरस्वति. "या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता । नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः" ॥" मग परमपदाचे, भगवद्‌साक्षात्काराचे ध्येय श्रद्धा आणि नामसाधना यांतून साकार होतेच होते. म्हणून सद्‌गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या सबीजनामाचे नित्य, अखंड स्मरण असावे.


अण्णा -

16 February, 2009

आनंदे निर्भर डुल्लतसे

आनंदे निर्भर डुल्लतसे

:

अमृताभक्तिप्रेमसुख प्राप्त झाले कीं मनुष्य अंतिम पारमार्थिक ध्येय (भगवद्‌प्राप्ती व भगवत्‌सेवाप्रेम) साध्य करतो. तो जन्ममरणाच्या फेर्‍यातून सुटतो. अमर होतो. भक्त स्वतःच अंगेकरून अमृतस्वरूप सत्वगुणाचा पुतळा बनतो आणि तो तृप्त, शांत, कृतार्थ होतो.


भक्तिप्रेमसुख हे नुसत्या पौरुष प्रयत्‍नाने मिळत नाही. मानवी प्रयत्‍नाने मिळवता येते त्याला भक्तिशास्त्रकार "यत्‌प्राप्य" म्हणतात. आणि ज्या गोष्टींची प्राप्ति होणे, हे मानवी प्रयत्‍नांच्या जोडीने, ईश्वराच्या कृपेवरच अवलंबून असते. त्यासाठी "यत्‌ लब्ध्वा" असा शब्दप्रयोग करतात. खरे तर त्या कृपाळू, दयाघन भगवंताच्या कृपेशिवाय कांहीच मिळत नाही. आत्मसाक्षात्कार, सगुण भगवंताच्या रुपांत ईश्वराचा साक्षात्कार, आणि सायुज्यता मुक्तिच्याही मस्तकावर किरीटासारखी विराजमान होणारी भक्तिप्रेमा हे केवळ ईशकृपेनेच, श्रीगुरुकृपेनेच मिळतात. "यं एव एष वृणुते तेन लभ्यः" असंच कठोपनिषदकारांचेही सांगणे आहे.


विश्वरूप अर्जुनाच्या विनंतीस अनुसरून प्रकट केले भगवंतानी. पण अर्जुन केव्हा पाहूं शकला ते ? तर अर्जुनावर कृपादृष्टि होऊन त्याला जेव्हा दिव्यचक्षू मिळाले तेव्हा ना ? अशी त्या कृपावंत भगवंताची विशेषकृपा झाल्यावांचून, मायेच्या अतीत असणार्‍या परमसत्यस्वरूप परमात्म्याचे अत्यंत निरूपाधिक स्वरूप कधीच जाणतां येत नाही; अनुभविता येत नाही. भक्ताचार्य नारद म्हणतात "भगवंताची अत्यंत उत्कट प्रेमभावाने, निष्काम भक्ति कराल तर तुमची पात्रता एवढी वाढेल कीं तो भक्तिप्रेमाच्या भुकेचा पभूच स्वतः प्रयत्‍न होऊन आपले स्वरूप दाखवतो, आणि संवित्‌ज्ञान, मुक्ति आणि मुक्तीला लाभ आणणारे परम भक्तिप्रेमसुख भरभरून देतो.


ही परम प्रेमस्वरूप भक्ति आचरण्यास, भाषाभेद, वर्णभेद, वंशभेद, जातीभेद आणि कोणतेही भेद न मानता सर्वांनाच आचरण्यास पूर्ण मुभा आहे. "या रे या रे लहान थोर । याति भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी॥" तुकोबारायांची ग्वाही आहे - "सकळांसि येथे आहे अधिकार ।"


असा प्रेम प्रेमस्वरूप भक्ति करणारा भक्त हा सिद्ध होतो. व्यवहारांत सिद्ध याचा अर्थ सिद्धि प्राप्त झालेला. म्हणजे तरी काय ? तर जग रहाटीवेगळा कांहीतरी चमत्कार करून दाखविता येण्याचे सामर्थ्य. मंत्र - तंत्र, जप - जाप्य, तसेच अघोरी साधना यामुळे प्राप्त होते. अशा माणसाभोंवती नेहमीच गर्दी असते, त्यची वाखाणणी प्रशंसा होते, पण अंती नरकावस्था.


भक्ति शास्त्रकारांनी सिद्ध शब्दाचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. सिद्ध होणे म्हणजे परम प्रेमरूपभक्तिने संपन्न होऊन हरिप्राप्ति साधणे. अशा भक्ताला भगवंत हेच साध्य प्राप्त झालेले असल्याने अन्य कांही साध्य उरतच नाही. आणि त्यामुळे तो तृप्त होतो. गंगा सागराला मिळाली की तिचा पुढचा प्रवासच खुंटतो ना ? अगदी तसंच भक्ताच. मग तो सगळा उर्वरीत काळ परमानंदात, भक्तिप्रेमसुख अनुभविण्यांत, भगवद्‌सेवेत घालवतो.


आता हा अनन्य भक्त पूर्ण तृप्त होतो तरी कसा ? तर अंतःकरणाचे सर्व भाव, विचार व चिंतन एका भगवंताकडे वळविल्यानंतर मन, बुद्धि, इंद्रिये यांची धावच कमी होते. आणि शेवटी हरि-साक्षात्कार झाल्यावर तर काय "परं दृष्ट्वा निवर्तते ।" मग भक्त पूर्ण शांत, तृप्त व समाधानाने सर्वांगाने अलंकृत होतो. "सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार । आनंदे निर्भर डुल्लतसे ॥" सर्व आशा आकांक्षा लय पावतात. द्वेष, मत्सर, क्रोध, दुःख अस्तंगत होतात.


असा भक्त अमृतस्वरूप होतो, म्हणजे अमृतासारखाच गोड, मधुर, सर्वांना हवा हवासा वाटणारा व सर्वजनप्रिय होतो. रज-तम गुणांचा निरास झाल्याने, शुद्ध सत्त्वगुणांचा पुतळा होतो. त्यच्या अंगकांतीद्वारे बोलण्यात चालण्यात वागण्यात विलक्षण आनंद प्रेमळपणा प्रकटतो. त्याच्या भोवतालचे वातावरण मांगल्याने भरून जाते. पराशांतीचे साम्राज्यच त्याचे रूपानें नांदत असते. अमृत म्हणजे अमर. यालाच मोक्ष, निर्वाण म्हणतात. पण हा भाग्यवान भक्त मोक्ष मिळूनही हरिनाम गाण्याकरितां, भगवद्‌सेवेसाठी, भक्तिप्रेम सुखासाठी पुनः पुनः जन्म घेण्यास भीत नाही. तर उलट प्रतिज्ञापूर्वक या प्रेमभक्ति सेवेसाठी जन्माला येतो.


अण्णा -

20 January, 2009

आनंदानुभूति

आनंदानुभूति

:

'आनंदं ब्रह्मणो विद्वान", ब्रह्म आनंदस्वरूप आहे. का आनंदस्वरूप आहे ? हा विद्वानांच्या वादाचा विषय आहे. परंतु या ब्रह्माच्या अनुभवांत आनंद आणि केवळ आनंदच आहे. हे खास आनंदाचे मुख्य लक्षण म्हणजे भितीचा अभाव. ब्र्ह्मानुभावाच्या या आनंदानुभूतीत देहभावाचा अभाव असतो. तेथे जीवाशिवाचे सामरस्य, ऐक्य असते. जेथे द्वैत म्हणजे दोनपणा आहे/दोन आहेत तेथेच भिती असते. म्हणून ब्रह्मानंदाचे दुसरें लक्षण अभय आहे. ब्रह्मसंस्पर्श ज्याला झाला तो आनंदाच्या डोही आनंदतरंग होऊन राहतो.


या ब्रह्माचे दुसरे एक लक्षण ते अव्यय आहे. व्यय म्हणजे खर्ची पडणे, कमी होणे, नाहीसे होणे. व्यय याचा आणिक एक अर्थ - तो जुना होतो का ? त्याचा बदल् व्ययाकडे असतो का ? त्याला देश काल वस्तूचे बंधन आहे का ? तर वरील कोणताही अवगुण भगवंताला नाही, म्हणून परब्रह्म अव्यय आहे.


भगवंत/देव अनंत आहे. दिन प्रतिदिन तो वाढलेलाच अनुभवास येतो. या वाढत्या चढत्या साक्षात्कार सुखाचा आनंदपण देवाप्रमाणेच चढता वाढता असतो. आणि त्याला कारणभूत आहे श्रीसद्‌गुरूंकडून मिळालेले नाम. 'अठरा पुराणांच्या गोष्टी । नामाविण नाही गोष्टी ॥' जगातील सारसर्वस्व म्हणजे फक्त एक भगवंताचे नाम. तुकोबाराय म्हणतात, "सार सार सार । विठोबा नाम तुझे सार ॥" "नाम तेचि रूप" या साक्षात्कारी संतांच्या वचनाप्रमाणे नाम हे ब्रह्मबीज आहे. नाम हेच देव असल्याने त्याच्या स्मरणात कधी व्यय नाही, खर्च नाही. ज्या ज्या वेळी नामाचे स्मरण होते त्या त्या वेळी नामाची एकच असलेली जमेची बाजू सातत्याने वाढतच राहते. जाणून अगर न जाणून जरी नामाचा आठव झाला, तरी आपले सद्‌गुरू आपणास देवाचीच खूण दाखवत असतात. नाम व रूप एकच आहे. आपल्या प्रचीतीत सतत वाढ होते. "नाम आठवितां रूपी प्रगट पै झाला " हाच सोनियाचा अमृतस्वरूप आनंददिन.


या देवाच्या अनुभवात सातत्य पाहिजे. एकदा दिसलेले रूप पुनः पुनः दिसावयास हवे. "तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग ॥" कटीवर हात ठेवलेला, पीतांबरधारी, गळा वैजयंतीमाळा, कस्तुरी मळवट, चंदनाची उटी, समचरण, समदृष्टी, सुंदर सावळे सुकुमार विठ्ठल पुनः पुनः दिसला पाहिजे. सातत्य हा देवाच्या स्वरूपाच्या सत्यानुभवाचा निकष आहे. या साठी चित्तात स्मरण, परेत नाम आणि डोळ्यांनी रूप एकाच वेळी झाले पाहिजे. स्मरण झाले पाहिजे, नाम आले पाहिजे आणि स्वरूप पाहिले - पाहतां आले पाहिजे.


कोणत्याही साध्यासाठी साधनाची नितांत गरज असतेच. साधना शिवाय साध्य शक्यच नाही. साधन व साध्य एका अर्थाने एकरूपच असतात. साधनात साध्य हे सामावलेले असतेच जसे दुधांत लोणी असतेच. पण तापवणे, विरजणे, घुसळणे ह्या प्रक्रिया खेरीज ते हातीं येत नाही. तसेच साध्य साधनाचे. साधनाची सुखात म्हणजे साध्याची पहिली पायरीच होय. "ज्या क्षणी अनुग्रह त्या क्षणीच मुक्तता" या वाक्याचा अर्थ हाच आहे. एकाच दिवसांत कोणी सावकार, श्रीमंत झाला नाही. आणि शाळेत जाऊन पहिल्याच दिवशी कोणी पंडित होत नाही. अगदी तसेच या देवाच्या आत्मसाक्षात्काराचे. भगवत्‌साक्षात्काराचे ध्येय गाठण्यासाठी सातत्याच्या साधनाचीच नितांत गरज आहे. साधकाला आपल्या उभ्या जीवनांत साधनेशिवाय दुसरे कांहीच मूल्यवान वाटता कामा नये.


साधनाचा उगम आपल्या सद्‌गुरूंकडून मिळालेल्या सबीज नामात आहे. या नामाचे निरंतर साधन करून अध्यात्माचे शिखर आपल्या शिष्याने गांठावे हीच श्रीगुरूंची आस. शिष्य शिष्यच न राहतां तो गुरुबोधाकार कधी होईल ? गुरुत्वास कसा पोहोंचेल अशीच वाट सद्‌गुरु पाहात असतात.


अण्णा -

09 January, 2009

अवीट गे माये -

अवीट गे माये -
:
शुद्ध पवित्र अशा भक्तिमार्गाचा अर्थ अगदी साधा सोपा आणि सरळ आहे. भक्ति अमृतस्वरूप, म्हणजे उज्ज्वल अशी हरिभक्ति. अंतःकरणाने उपास्याशी, भगवंताशी, श्रीगुरुंशी एकरूप होऊन पर भक्ति झाली तर हे दिव्य अमृत प्राप्त होते. आणि हे भक्तिपदतीर्थामृत भक्ताचे जीवन सुशांत व सुमंगल करते.

एकदा भगवद्‌भक्ति हे साध्य ठरविल्यावर साधन काळात भक्त निष्ठेने, नेमाने, अनेकविध भक्ति-उपाय अवलंबितो. या अमृतस्वरूप रसमय भक्तिमार्गाचे वैशिष्ठ्य म्हणजे अंतिम ध्येय साधल्यावरही भक्त भक्ति करणे बंद करीत नाही, तर उलट अधिकाधिक प्रेमाने, उत्साहाने, आनंदाने अविरत, अविश्रम, अखंड भक्तीच करत राहतो.

मात्र साधना भक्ति व सिद्ध भक्ति यात महदंतर आहे. मग असा सिद्धभक्त भगवंतावाचून अन्य दुसरे काहीच बोलत नाही, चिंतीत नाही, पहात नाही व जाणत नाही. कारण त्याला आंत व बाहेर एकच सर्वत्र, सर्वव्यापी, सर्वेसर्वा, सर्वज्ञ विश्वेशराचीच प्रतीति येत असते. "आंत हरि बाहेर हरि । हरीने घटीं व्यापिले । बाहेरि भितरि तुजच मी देखे ॥" असा त्याचा अनुभव असतो. "हरिः सर्वेषु भूतेषु भगवान्‌ अस्ति ईश्वरः । इति भूतानि मनसा कामैस्तैः साधु मानयेत्‌ ॥ असं भागवतकारांच पण म्हणणं आहे. अशा सर्वात्मक भावाने, भावनेने देवाचे पूजन, अर्चन, गुणनाम स्वरूपसंकीर्तन करण्याएवढा अमूप आनंद अन्य कशातही मिळत नाही ह्यात नवल ते काय ? पण अशा भक्ताची, वैष्णवांची सर्वतोपरी नुसती साथसंगत लाभली तरीसुद्धा आभाळात मावणार नाही एवढा आनंद मिळतो.

अशा वैष्णवाचे संगतीने काय होते ? तर प्रतिक्षणी नवतेजाने चित्तात हरिनाम स्फुरणे हेच अमृतस्वरूप आहे. भागवतकार म्हणतात अशा वैष्णवाचं अमृतपान करणे, परस्पर वैष्णवांनी परस्परांना अमृतपान देणे हे प्रत्यक्ष स्वर्लोकीच्या अमृतालाही लाजेने मान खाली घालायला लावणारे आहे. केव्हढे हे श्रेष्ठ अमृतपान ? "यदि भवति मुकुंदे भक्तिः आनंदसांद्राः । विळुढति चरणाग्रे मोक्षसाम्राज्यलक्ष्मीः ॥" या अमृतपानापुढे मोक्षलक्ष्मीसुद्धा तुच्छ.

वेदांत अध्यात्म शास्त्राच्या मते निर्वाण, मोक्ष हेच अंतिम प्राप्तव्य आहे; परंतु भक्तिशास्त्रकारांच्या मते, अशा अमृतभक्तिचे मूल्य त्या मोक्षाहून कितीतरी जास्त मोलाचे आहे. या पराभक्तीच्या भक्तिप्रेमामृतापुढे लौकिक पारलौकिक सुखेच काय पण मुक्ति कःपदार्थ वाटते. तुलसीरामदासजी म्हणतात, "मुक्ति निराद री, भक्ति लुभाने" भक्तिप्रेमाचे हे अमृतकुंभ, मुक्तिपेक्षापण आनंददायक. मोठे रसाळ शांति पुष्टी तुष्टि प्रदान करणारे असे मधुरतम आहेत.

अमृत शब्दाचा आणखी एक अर्थ शास्त्र संमत आहे. तो म्हणजे "यज्ञ करून जे शेष राहते तेच अमृत", 'यज्ञशेषमधामृतम्‌', यज्ञशेष प्रसादान्न. भगवंताच्या भोजनातील, श्रीगुरुंच्या भोजनातील शेष भाग, उच्छिष्ट ह्याला पण भक्तिशास्त्रकारांनी अमृतच म्हटले आहे. ते सेवन करण्यार्‍याला नित्य ब्रह्मपदाचीच प्राप्ती होते, असं गीतापण छातीठोकपणे सांगते "यज्ञाशिष्ट अमृत भुजः यान्ति ब्रह्म सनतनम्‌ ।"

यज्ञ म्हणजे आपल्या सर्वस्वाचा त्याग करणे व स्वामित्व सोडणे. हे सर्वस्वाचे समर्पण जाणीवेने, स्वेच्छेने, 'इदं न मम' असे म्हणत सोडावयाचे. या अमृतस्वरूप भक्तिमार्गात कामना, इच्छा, अपेक्षापूर्तीसाठी जे देवतापूजन घडते त्यास सकामभक्ति असे म्हणतात. अशी भक्ति श्रेष्ठ भक्ताचार्यांना गौण कनिष्ठ हलकी वाटते. भक्ति आराधना करायची ती जगदीश्वर परमात्म्याची, परब्रह्मस्वरूप श्रीगुरूंची, आणि ती कोणत्याही ऐहिक, पारलौकिक लाभाची, सुखाची इच्छा मनात न ठेवता करावयाची असते. म्हणजे मगच ती अशी सर्वतोपरि, सर्वांगानी अमृतस्वरूप होते.

अशी ही अमृतस्वरूप परमप्रेमाभक्ति भगवंतासाठीच, श्रीगुरूंसाठीच. एकदा या अमृताभक्तीची गोडी लागली की मग ती कधीच सुटत नाही, सुटणार नाही, आणि तिचा कधीच वीट येणार नाही. "वीटे ऐसे नाही सुख । अवीट गे माये विटेना ॥ असा श्रीगुरुज्ञनोबा माऊलीचा या भक्तिप्रेमसुखामृताचा निर्वाळा.

खरोखरी आनंदस्वरूपी अमृतसागरांत, दिव्यतेजाने उन्मेषित होणारी चैतन्यवेळ म्हणजेच ही निर्मळ, निष्काम, नितळ, पारदर्शक, नित्यनूतन अनन्यभक्ति आहे.

ही परमप्रेमस्वरूप भक्ति अंतर्बाह्य अमृताने नुसती सदैव ओथंबणारी अमृतवल्लीच आहे. प्रत्येक मनुष्यमात्राने ही भक्ति साध्य करावी, आणि सच्चिदानंद भगवंताशी, श्रीगुरूंशी समरस होऊन अखंड अमृतसागरांत मुक्तपणे विहार करावा. मुक्तपणे या अमृतपानाचा रसास्वाद घ्यावा हा ज्ञानोबारायांचा आग्रह आहे.

त्या भाग्यवान गोपांगना अमृतपानाने तृप्त असूनसुद्धा पुन्हा भगवंताच्या वेणूचा भाग्योदय पाहून हेवा करत. केवढी भक्ति, केवढी तृतता, केवढी धन्यता ? पण रसामृत सेवन करून पुनः तृप्तीला भूक लागली म्हणावयाच्या. असा हा भक्तिप्रेमरस केवळ गोड, अमृतमय आणि अवीट.
अण्णा -

25 December, 2008

जडातून सूक्ष्माकडे

जडातून सूक्ष्माकडे

:

भगवंताचा साक्षात्कार नित्यनवा आहे, First hand आहे, second hand नव्हे. सर्व सामान्यतः सेकंड हँड देवच लोकांना माहीत आहे, असतो. दुसर्‍यांच्या अनुभवावरून आपण देवाची कल्पना करत असतो. 'उपनिषदांत असे सांगितले आहे", "गीतेत तसे सांगितले आहे" हेच सर्वसामान्यपणे बोलतात, बोलले जाते. अर्जुनाने विश्वरूपाचे वर्णन केले. आपण अनुभवलेल्या विश्वरूपाचे त्याने वर्ण न केले. त्याला आलेला अनुभव हा सर्वतोपरी first hand, नित्यनवा होता. यशोदेला आलेला विश्वरूपाचा अनुभवपण नित्यनवाच होता. आपला देवाचा नित्यनवा अनुभव सर्व संतांनी लिहून ठेवला. त्यांचे नुसते लिखाण वाचल्याने, त्यांच्या केवळ शब्दार्थाने आपल्याला जो आनंद होतो तो जर अमर्याद, अलौकिक, अगदी आगळा वेगळा असतो, तर प्रत्यक्ष भगवंताचा अनुभव किती श्रेष्ठ नाही का ?


देवच देवाला पाहू शकतो. आत्मारामालाच आत्मारामाचे दर्शन होते. जनक राजाच्या दरबारांत पंडितांची चर्चा चालू होती. त्य चर्चेत याज्ञवल्यांनी तेथे जमलेल्या सर्वच्या सर्व पंडितांना हरवले. शेवडी जनक राजाशी त्यांचा वाद सुरूं झाला. "कुंभारांनी केलेल्या मडक्याला कुंभाराचे ज्ञान होते कां ?" असा प्रश्न जनकांनी विचारला. प्रश्न अति महत्त्वाचा आहे. जो परमार्थप्रेमी आहे, परमार्थ पाहण्याची ज्यांना तीव्र तळमळ आहे, त्यांच्यापुढे हा प्रश्न आलाच पाहिजे. "होय, कुंभाराला जाणण्याची शक्ति घटाला आहे. [कुंभार म्हणजे परमात्मा, घट म्हणजे जीव] या आपल्या देहांतच असणार्‍या आत्म्यालाच परमात्मा जाणण्याची शक्ति, युक्ति, बुद्धि आहे. "ती किमया आत्मस्वरूपाशिवाय इतर कोणालाच नाही" असे याज्ञवल्क्यांनी जनकराजास मोठे छान, खरे खरे अचूक उत्तर दिले.


आत्मारामाच्या या क्रियेला dichotomy हा शब्द तत्त्ववेत्यांनी वापरला आहे (म्हणजे एकाचे दोन होणे). एकाचे असे दोन होण्याचे सामर्थ्य फक्त आत्मारामातच आहे. आता एकाचे दोन होतात म्हणजे "आत्मा निम्मा निम्मा झाला" असे वाटण्याचीच शक्यता जास्त नाही कां ? पण ते तसे नव्हे. dichotomy म्हणजे पाहणा व दिसणारा दोघें एकच एक असतात. म्हणूनच स्वप्नांतूनपण अद्वैताचा अनुभव येतो. एकाचे दोन होणे, म्हणजे आरशांत आपण आपल्याला पाहिल्यासारखे नव्हे. आरशातील प्रतिबिंब विकृत असते (उजव्याचे डावे तर डाव्याचे उजवे). जशाचे तसे दिसण्याचे सामर्थ्य फक्त एका आत्मारामातच आहे. हे स्व-स्वरूपाचे ज्ञान कुणाला होते ? आत्म्याचा अनुभव केवळ आत्मारामालाच.


हा आत्मसाक्षात्कार मग कोणाला ? देहाला की आत्मदेवाला ? "मी देव पाहिला" आपण सहज बोलून जातो. त्यांनी देव पाहिला, असेही आपण सहज बोलून जातो.


हा देह जड आहे, तर आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे ? बरं शब्दांनी सांगायच झालं तर एका खसखशीच्या दाण्याचे १००० भाग करावेत व त्यातील १/१००० श भागाची विभागणी पुनः १००० भागांत करावी (त्याला 'रेणू' म्हणतात). आत्मा त्यापेक्षांही सूक्ष्मातिसूक्ष्म आहे. अशा सूक्ष्मतम आत्मारामाचे ज्ञान या जड देहाला कसे होणार ? जडाला सूक्ष्माचे ज्ञान होणे कधीच शक्य नाही. जडाने जडाला जड माध्यमांतूनच जडाचेच ज्ञान होते. सूक्ष्म कळणार नाही.


पण या जड देहात एक चैतन्य आहे,. एक शक्ति आहे, एक आनंद आहे. त्याला मग तुम्ही काहीही नाव द्या. याला आत्मा असं शास्त्रकार म्हणतात. सारांश काय तर जड इंद्रियांना देव कळत नाही. मग मनाला कळतो कां ? तर मनाचा डोळा पण देव पाहू शकत नाही. मन पण जडच आहे; तर आत्मचक्षूच आत्मारामाला, देवाला जाणूं शकतात, पाहू शकतात.


बुद्धीला देवाचं ज्ञान होऊं शकतं का ? बुद्धिला गुरुदेव 'lower intellect' खालच्या पातळीची बुद्धि अस म्हणत असत. या बुद्धीला फक्त देवाचे अस्तित्व कळते. तेवढाच या बुद्धीचा उपयोग. म्हणून आपल्या बुद्धीने देवाच्या महामंदिराच्या दरवाजापर्यंत जाता येते. म्हणून मनाने बुद्धीने कळणार नाही, वाचेने सांगता येणार नाही.


मग इंद्रियांना दिसत नाही, बुद्धीला कळत नाही, मनाला कल्पना/ आकलन करता येत नाही, असा हा देव आहे तरी कशावरून ? देव हे काय गौडबंगाल, किमया, जादू आहे ? तर देवाचा साक्षात्कार हे 'intuitive apprehension' आहे. ते प्रतिभ दर्शन आहे, इंद्रियजन्य, बुद्धिगम्य अगर मानसिक नाही, तर प्रज्ञा दर्शन आहे. याला लागणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभ शक्ति. त्याला आत्मदृष्टि, आत्मशक्ति असे पण म्हणताता. गुरुदेव त्यालाच intuition असं म्हणत.


मग नामाचा काय उपयोग ? नामाने काय होते ? तर नामाने देवाला जाणण्याची ही आपल्यतीलच गुप्त, निद्रित असणारी शक्ति नामस्मरणाने जागृत होते. याच शक्तिला योगशास्त्रांत कुंडलिनी म्हणतात. भक्तिशास्त्रांत प्रेमभाव म्हणतात, तर माधुर्यभावांत याच शक्तीला राधा असें म्हणतात.


अण्णा -

18 December, 2008

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं

उद्धरेत्‌ आत्मनात्मानं


देवकार्य, धर्मकार्य वा समाजकार्य यात "मम" म्हणणर्‍यांचा वाटा मोठा असतो, पण "मम"च्या जागी "इदं न मम" अशा भूमिकेवर येणं हे फार मोठं सौभाग्य, महत्‌भाग्य. श्रीगुरुज्ञानोबारायांनी dichotomisingचा, अध्यात्मातील अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत अनुभवांतून, आपल्या साहित्यांत जागोजागी मांडला आहे. म्हणजे एक आत्मारामच स्वतः आपल्याला आपल्यातच विभागून आपल्यालाच पाहतो, अनुभवतो, भक्तिप्रेमाचा आनंद अनुभवतो. आता माया धरून बसलेला आत्माच बाहेर येऊन परमात्मस्वरूपाने नटतो, दर्शन देतो. असा हा आत्मा - भगवंतच. मग रूप, रस, गंध, नाद, स्पर्श (पण अगदी अतिंद्रिय) अनुभवाने साधकासमोर आविष्कृत होतो. देह, मन व बुद्धि सुद्धा जड असल्याने त्यांना आत्मदर्शनाची शक्ति नाही तर हे दर्शन होण्यासाठी प्रज्ञा लागते. तो प्रज्ञेचा अधिकार, सन्मान आहे.

अशी प्रज्ञा परिणत होण्यासाठी साक्षात्कारी संतांच्याकडून नाममंत्राची, सबीजनामाची, बीजाक्षराच्या अनुग्रहाची मोठीच आवश्यकता असते. असा अनुग्रह लाभला, साधकाने, सत्‌शिष्याने सबीजनामाचा स्वीकार केला, एवढ्याने संपत नाही तर सुरुवात होते. श्रीसद्‌गुरुवचनावर अविचल श्रद्धा ठेवावी. नेमाने निष्ठापूर्वक पालन, संकल्प-विकल्प, एवढच काय, ध्यानविरहित होण्यासाठी सतत स्वतःचे स्वतःच आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण करीत राहिले पाहिजे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हेंच सांगते - "उद्धरेत्‌ आत्मन्‌ आत्मानं" त्यासाठी कथनी, करनी व रहनी यात एकवाक्यता फार फार मोलाची. ह्या त्रयीने अवघे जीवन व्यापलं पाहिजे.

यासाठी साधकाने, संसाराकडे विश्वस्त अगर साक्षी या नात्याने पहावे, म्हणजे मग संसाराचाच परमार्थ होतो. "दुःखांत सुख पाहावे", संसार दुःखमय आहे, तो भयग्रस्त आहे, तो मुळांत खोटा नाशवंत आहे, हे मनांत दृढ धरून मग संसार करावा म्हणजे तो बाधक नाही तर साधकच होतो. लाभ-तोटा, सुख-दुःख, यश-अपयश याकडे साक्षित्वाने पाहावे व निष्ठेने परमार्थ आचरावा. त्यातलं वर्म आहे - "मी देह नव्हे तर आनंदघन आत्माराम आहे" याची सतत आठवण असावी. 'जीवभावाचा शिवभाव करावा' त्यासाठीं काय करावे लागते ? सदा नामस्मरण करावे. 'देवा बरे झाले' असे अनुभवावे, खरे खरे सुख मिळते, खरी खरी शांती लाभते.

ज्ञान म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता, ब्रह्मसूत्र, अकारादि प्रकरणादि ग्रंथ, भाष्य, टिका, वार्तिके, दर्शने, पुराणग्रंथ, संतसाहित्य यांचे शाब्दिक ज्ञान नव्हे. या शब्दज्ञानाला मग कांहीच मूल्य नाही कां ? तर आहे. या शाब्दिक ज्ञानाने काय होईल ? तर या शब्दज्ञानावर विश्वास असल्यास भगवंताच्या केवळ अस्तित्वाची खात्री होईल. फार फार तर साक्षात्काराच्या महाद्वारापर्यंत जाता येईल. पण आत्मसाक्षात्काराच्या गाभार्‍यात प्रवेश होणार नाही. म्हणून शब्दज्ञान हे ज्ञानच नव्हे, कां तर 'ज्ञान' ही एक परमविकसित अवस्था आहे. प्रत्यक्षानुभूती आहे. भगवंत बोलण्याची गोष्ट नाही तर तो प्रज्ञेनी अनुभवायचा आहे.

जी गोष्ट ज्ञानाचे तीच भक्तीची. भक्ति निष्काम असावी. एकनिष्ठ - अव्यभिचारी असावी. ही शुद्ध भक्तीची ठळक लक्षणे आहेत. अशा शुद्ध भक्तीची परिणती आत्मसाक्षातकारांत दर्शन, स्पर्शन, संभाषणादि अनुभूतीत होते. ही आवडीप्रमाणे सगुण किंवा निर्गुण अशा दोन्ही स्वरूपांत होते. प्रेमळ भक्ताला सगुणाचे प्रेमाबरोबर निर्गुणाचे ज्ञान असतेच, पण सगुणाचे विलक्षण प्रेम असते. भक्ति स्वयंफलरूप आहे म्हणून ती ज्ञानस्वरूपही आहे.

मग आपण काय करावे ? तर नामसाधना, नामस्मरण. दीर्घकाल, निरंतर व सत्कारयुक्त करीत राहावे. याने काय साधते ? तर हळूं हळूण् जीवभावाचा क्षय होतो व कमी होत होता त्याचाच मग शिवभाव होतो. देहबुद्धीची आत्मबुद्धि होते. या नामस्मरणांत निष्ठेबरोबर आर्जवाची मोठीच गरज आहे. आई लेकराला जेवायला घालताना किती आर्जव करते, तसेच नाम घ्यावे. अशा नामस्मरणाने भगवंत खुणा दाखवत असतो. त्या खुणा आपण ओळखाव्यात. तुकोबारायांच्या शब्दांत सांगायचे तर, "ओळखा रे वस्तू उघडा ज्ञान दृष्टी". आपण डोळे उघडे ठेवावेत, तो दाखवतो त्या खुणा ओळखाव्यात, या आनंदाच्या खूणा ओळखून नाम घेत राहावे.

अण्णा -

15 December, 2008

रसो वै सः

रसो वै सः
:
तुकोबाराय भक्ताचार्य. निर्व्याज, निरंजन, दिव्य अशी भक्ति कशी प्राप्त करावयाची ? तर भक्ति म्हणजे खरोखरी अगदी नवीन, वेगळे असे काहीच करावयाचे नाही. फक्त आपल्या अंतःकरणाचे सर्वभाव आणि विचार हे एका भगवंताकडे वळवायचे. असं सर्वभावांनी, सर्वस्वी त्याच्याशी लगटून, त्याचेच होऊन राहणे हीच मंगलभक्ति.

अशी ही भक्ति परमप्रेमस्वरूप तर आहेच, पण अमृतास्वरूपाची सुद्धा आहे. भक्ताचार्यांनी भक्तीला उद्देशून 'रूप' आणि 'स्वरूप' असे म्हटले आहे. या दोन शब्दांत काही फरक आहे ? का एकाच अर्थाचे ? सामान्य व्यवहारांत हे दोन्ही शब्द एकार्थाचे वापरले जातात; पण भक्ति हे शास्त्र आहे. 'रूप' शब्दाने वस्तूचा रंग, आकार, उंची, भारमान, काठिण्य आदि बाह्य गुणांचा बोध होतो; तर त्या वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे 'स्वरूप' या पदाने सुस्पष्ट होत असते. साधक भक्ति साधना करू लागला की त्याच्या आचार, विचार व उपासनेचे दर्शन इतरेजनांस/सर्वांना जाणवते. पण या परम प्रेमलक्षण भक्तीची सुधा (अमृत) जो प्रत्यक्ष भक्त चाखत असतो, त्यालाच त्याची अवीट गोडी कळते; इतरेजनांना नाही. पराभक्ति हे अमृत आहे. आणि ही भक्ति साध्य करून घेतलेला भक्त हा अमृतमयच नाही तर अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे काय ? जे मृत, नष्ट होत नाही ते अमृत. आत्मा/परमात्मा हाच एकमेव अमृत, अविनाशी आहे. म्हणून अशी भगवंताची परमप्रेमस्वरूपा भक्ति करणारा हा परमात्मस्वरूप, अमृतस्वरूप होतो.

अमृत म्हणजे मोक्ष, आपल्या समग्र भाव भावना, विचार व क्रियाव्यवहार यांचे शुद्धीकरण, उदात्तिकरण, आणि अध्यात्मिकरण करीत करीत साधकाला अपूर्णतेतूनच परीपूर्ण परमात्म्याकडे सुखरूपपणे घेऊन जाणारी प्रभावी शक्ति म्हणजे ही निष्काम, एकप्रवाही, परमप्रेमस्वरूप, अमृता भक्ति होय.

खरं सांगायचं तर अमृत म्हणजे अनुभवगम्य आनंदरस आहे. मात्र हा केवळ भौतिक, द्रवपदार्थ, रसायन नाही. तसेच सागर मंथनातून काढलेले (देव-दैत्यांनी) अमृतपण नाही. रस हा केवळ उपमेय भाव आहे. रस म्हणजे ब्रह्मरस, तथा भगवंताच्या परमानंदाचे अनुभवगम्य रसायन. भगवंत वस्तुतः रसमय आहे. भक्ताला अमृतरसपानाचे भाग्य लाभते. मग तो सर्वथैव आनंदातच राहतो, आनंदच होतो. आणि म्हणून द्रवीभूत ब्रह्मज्ञान, ब्रह्मरस म्हणजेच दुसरे तिसरे कांही नसून परमप्रेमस्वरूप भक्तिच.

या पराभक्तिच्या अमृतपानाने मत्त होऊन हरिनाम गात भक्त विश्वसंचार करतात आणि आपला स्वानुभवच जगाला सांगतात. नुसता सांगतात एवढेच नाही तर "सेवितो हा रस, वाटितो आणिका" अशा अवघ्या विश्वाला पाजतात.

भगवंत इतका रसमय, "रसो वै सः" की त्याच्यामुळे साहित्यातील असो वा स्वयंपाकातील असो सर्व रसांना रसत्व लाभते. तो रसराज आहे. मग त्याचे रूप, त्याचे नाम, त्याच्या लीला, त्याचे चरित्र केवढे रसाळ. नाम तर अमृताहूनी गोड त्या नामातून गळणारा रस अखंड सेवन करावयाचा, अमृतपान करायचं एवढंच भक्ताच काम.

अण्णा -


13 December, 2008

वृक्ष नामबीजाचा

वृक्ष नामबीजाचा
.
परमार्थात सद्‍गुरूंची किती आवश्यकता आहे ते उपनिषदांपासून ज्ञानेश्वरमहाराज तुकोबारायांपर्यंत सार्‍यांनी एकमुखाने सांगितले आहे. आत्मज्ञान हे अत्यंत गहन असल्यामुळे (राजविद्या राजगुह्यं) ते केवळ स्वतःच्या बुद्धिबळावर प्राप्त होणे शक्य नाही. त्यासाठी ज्याने ते करून घेतले आहे, अशा आत्मज्ञानी श्रीगुरूची मोठी आवश्यकता आहे. कठोपनिषदांत असे अगदी सुस्पष्ट व ठामपणे म्हटले आहे. पारमार्थिक अज्ञानाची काळोखी रात्र श्रीगुरुकृपेच्या सूर्योदयावांचून उजळत नाही.

श्रीगुरू हा सत्‌शिष्याने - साधकाने परीश्रमपूर्वक साधनबाग फुलवणारा उपायन वसंत आहे. एका मूळसिंचनाने लता वेली वृक्षाच्या शाखापल्लवांना टवटवी यावी, त्याप्रमाणे एक गुरुभक्तिने, गुरुसेवेने (म्हणजे गुरुपदिष्टित साधनाने) साधक 'पूर्णकाम' कृतकार्य होतो; असा खुद्द श्रीगुरुज्ञानेश्वर माऊलीचा निर्वाळा आहे. गुरुकृपा ही आत्मानंदाच्या भांडारगृहाची एक किल्लीच आहे. प्लेटो सारख्या पाश्चात्य तत्त्वज्ञानेंही "गुरुमुखांतून लाभणारे जीवनज्ञान व पुस्तकातील निर्जीव ज्ञान यांची तुलनाच होऊं शकत नाही" असे म्हणून श्रीगुरूची आवश्यकता प्रतिपादिली आहे.

'सद्‌गुरू शिष्यासाठी काय करतात ?' दूरध्वनीच्या उपमेने हे छान स्पष्ट करून सांगता येईल. आपल्याला दूरवर कोणाशी बोलावयाचे असेल तर आपण क्रमांक फिरवितो, आणि एक्सचेंजच्या द्वारा तो क्रमांक जोडला जातो. हेंच कार्य श्रीसद्‌गुरु करतात. ते देव व भक्त यांची गांठ घालून देतात. विजेच्या पॉवर हाऊसची उपमा देऊन असे म्हणता येईल कीं, श्रीसद्‌गुरु म्हणजेच साक्षात्कारी संत. हे विजेच्या मुख्य तारांप्रमाणे असून आपण सर्वजण त्या तारांच्या उपशाखांना लावलेल्या विजेच्या दिव्यांप्रमाणे आहोत. मुख्य तारांतून विद्युतप्रवाह आला कीं सर्व दिवे एकदम प्रकाशतात. त्याचप्रमाणे साक्षातकारी संतांच्या अंतःकरणांत भरून राहिलेला भगवंताच्या चित्‌प्रकाशाचा झोत त्यांच्याशी संबद्ध झालेल्या त्या साधकांच्या - शिष्यांच्या अंतःकरणांत चित्‌प्रकाश उत्पन्न करतो.

जेथें देव जागा झाला आहे, त्याच्याशी संलग्नता साधली कीं देव अगदीं हमखास संपडतोच. यासाठीं नादाच्या निनादाचा (resonance) दृष्टांतहि चांगलाच लागू पडतो. सुरात लावलेल्या सतारीची एक तार छेडली, तर दुसर्‍या बाकीच्या तारा आपोआपच वाजू लागतात. त्याप्रमाणे आत्मानंदाचा दिव्य झणत्कार ज्यांच्या ठिकाणी झणाणत असतो, त्यांच्या संगतीने, तो त्याच्या सत्‌शिष्यालाही प्राप्त होतो.

"अंतरीं गेलियां अमृत । अवघी काया लखलखीत॥" या न्यायाने ज्याच्या अंतरीं स्वरूपस्थिती बाणली असा साक्षात्कारी सहजच गुरूत्वाला पोहोचतो. ज्याच्याकडे पाहिले असतां भगवंताकडे पाहिल्याचे समाधान मिळते तो संत, तो श्रीगुरू. हे श्रीगुरु आपल्या शिष्याला त्याच्या ठिकाणींच गुप्त रूपांत असलेल्या स्वात्मानंदाची स्वानुभवाच्या पातळीवर ओळख करून देतात.

श्रीगुरू स्वतः भगवत्‌नामाचा प्याला भरभरून आपण तर पितातच व आपल्या सत्‌शिष्यालाही पाजतात. "सेवितो हा रस, वाटतो आणिका ।" असं तुकोबारायपण म्हणतात. नामस्मरणांत भाव फार महत्त्वाचा. भगवंताला पण हा अंतःकरणातील भाव फार फार प्रिय. आणि हा भाव निर्माण होण्याचे साधन म्हणजे नामस्मरण. "सार, सार, सार नाम, विठोबा नाम तुझे सार"

असे नाम श्रेष्ठ कां ? तर हे नाम भगवंताच्या रूपाचा - आनंदाचा अनुभव आणून देते म्हणून. नाम हे तेल असून त्यांत मनाची वात चांगली भिजवली असतां भगवंताच्या रूपाची ज्योत श्रीगुरुकृपादृष्टी काडीने पेटते. नाम हे सगुण व निर्गुण या भगवंताच्य दोहीं स्वरूपाचे साक्षी असून स्वानंदाचा प्रकाश नामधारकाच्या जीवनांत पसरविणारी दिव्य स्वयंभू ज्योतच आहे. अशा नामाचाच श्रीगुरुंकडून मिळालेल्या नामाला दिव्य नाम अगर सबीजनाम असे म्हणतात. अशा सबीज नामाचे रुपांतर पारमार्थिक अनुभवाच्या वृक्षांत होते.

श्रीगुरू नाम-बीज देतात. पोते भरून खाण्यासाठी फुकट दाणे देत नाहीत. ते बीज नाम साधनेच्या शेतांत पेरून, राबून, मशागत निगराणी करून स्वतःच पिकवावी लागते. असे दिव्य नाम पूर्वजन्मींचे सुकृत असल्याशिवाय थोडेच मिळते ?
अण्णा -

11 December, 2008

अमला भक्ति

अमला भक्ति
:
श्रीगुरुजवळ काय मागावे तर "अवीट पदपद्माची अमला भक्ति दे मला." हे सद्‌गुरुराया, तुझ्या पदकमली रमून जाणारी, अवीट गोडी असलेली, अशी ती अमला भक्ति तेवढी मला द्या. अमला भक्ति = शुद्धभक्ति, परमश्रेष्ठ भक्ति असाच तिचा अर्थ आहे. अशी ही अमला भक्ति भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ज्याचे मन, बुद्धी, काया, आणि वाचा पूर्ण शुद्ध झालेली असते, जो आनंद, समाधान, प्रसन्नता यांचाच जणू प्रत्यक्ष मूर्तिमंत आकार असतो. स्वतः भगवंताचा, सद्‍गुरूंचा दास म्हणवून घेण्यातच ज्याला कृतार्थता वाटत असते असा भक्त जी भक्ती करतो तीच अमला भक्ती.
" मुखी अमृताची वाणी । देह देवाचे कारणी । सर्वांग निर्मळ । चित्त जैसा गंगाजळ ॥ " असा असून जो भक्तीच करतो ती अमला भक्ती. अशा भक्ताच्या ठायी मग विवेक, वैराग्य, ज्ञान अगदी सहजपणाने प्रकट होतात. त्या शिवाय त्याच्या ठिकाणी रसमयता, आनंद हा त्या भक्ताचा उल्लेखनीय विशेष असतो. श्रद्धा, निखळ भक्तीप्रेमभाव त्याच्या ठिकाणी ओसंडून वाहात असतो बघ. तो सदा सर्वदा समर्पितच होऊन गेलेला असतो. ही सर्व लक्षणं तर अतिश्रेष्ठ भागवतांची सामान्य लक्षणं आहेत.
असा भक्तभागवत मग देवाजवळ, श्रीगुरुंजवळ अशा अमला भक्तीशिवाय दुसरं काय मागणार ? नामदेवासारखे श्रेष्ठ भक्तराज काय मागतात बघ ! "देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हा जन्मा ॥" असा लडिवाळ हट्ट भक्तच फक्त आपल्या देवाकडे, श्रीगुरुंकडे करू शकतात. भगवंताशी, श्रीगुरूमाऊलीशी अशा भक्ताचे एक अतूट, अत्यंत सुंदर, नितांत रमणीय, परमविशुद्ध आणि ऋजु असेच नाते जमून गेलेले असते. भक्तिप्रेम - प्रेमभक्ति या पलीकडे त्याला कांही कळत नाही. तो काही पाहात नाही आणि अनुभवीत सुद्धा नाही. याला 'संयोगदीक्षा' असं भक्तिशास्त्रकार म्हणतात. "मिळोनि मिळतची असे । समुद्री गंगाजळ जैसे । मी होवोनी मज तैसे । सर्वस्वे भजती ॥" अशी त्या भक्ताची अवस्था होऊन गेलेली असते. भक्त भगवंताला सर्वार्थानी, सर्वांगानी समर्पित होतो. आणि पहा भगवंत तर त्याचा स्वतःहून अंकित होऊन राहतो. अशा त्या भगवंतालाही प्रिय असण्यार्‍या अमला भक्तीची प्राप्ती होऊन, तद्‌द्वारा अमलानंद (म्हणजे परमपवित्र, परमश्रेष्ठ आनंद) आपल्याला प्राप्त व्हावा अशीच मागणी भक्त भगवंताजवळ, श्रीगुरुरायांजवळ करत असतो. समुद्रावर समुद्राची लाट आनंदाने, अत्यानंदाने क्रीडा करते. आकाशात वारा अगदी मुक्तपणे वाहात असतो, तसेच भक्ताचे असणे म्हणजे भगवत्‌ सत्तेतील आनंदक्रीडाच असते.
परमरसाने अमृतरसाने रसना ओलावली, मनाची वृत्ती आनंदकंदाच्या चरणी राहिली, या विश्वातील सगळी मांगल्ये एकत्र येतात, आनंदजळाचीच वृष्टी होते, मग अशाने सगळीच्या सगळी, अगदी सगळीच्या सगळी इंद्रिये ब्रह्मरूप होतात, त्यांना सर्व क्रियाकर्मामध्ये एका स्व-स्वरूपाची, आत्मस्वरूपाचीच प्रचिती येते, त्याच्याजवळ प्रत्यक्ष देवच नांदत असतो.
अशी अमला भक्ती लाभलेला भक्त सहजच स्वरूपज्ञानी असतोच. ज्ञान, कर्म, योग त्याच्या ठिकाणी सहजच नांदू लागतात. तो तत्त्वज्ञ, भक्त आणि जीवनमुक्तही असतो. थोडक्यात सांगायचे तर तो परमार्थाचे भूषणच होऊन गेलेला असतो. भगवंतानी स्वमुखाने अशा भक्ताचे वर्णन केले आहे. झाडाच्या फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या जशा एकाच झाडाच्या असतात; सूर्यकिरणे अनंत असली तरी ती जशी एकाच सूर्याची असतात, तसेच प्राणीमात्र भिन्न भिन्न असले तरी त्यांच्या अंतर्यामी एकच एक परमात्मा भरून राहिलेला असतो.
भक्त हा स्वरूपज्ञानी असतोच. रामकृष्ण म्हणत "मूल वृद्ध होण्याचे नाकारीत असेल तर ती विकृतीच मानावी लागेल. बीजाचा अंकुर, अंकुराचे रोपटे, रोपट्याचा वृक्ष असाच विकास झाला पाहिजे. तसाच भक्त हृदयाचा पण विकास झाला पाहिजे आणि भक्तीने तो होतोच होतो. सर्वत्र भरून राहिलेले, विलसत असलेले चैतन्य हे आपल्या उपास्य दैवताचे, श्रीपांडुरंगाचे खरे व्यापक स्वरूप आहे हे त्याला ओळखता येते. सर्व रूपानी सर्वत्र एक आपला पांडुरंगच नटला आहे असा व्यापक अनुभव त्याचा असतो. "जेथे तेथे देखे, तुझीच पाऊले । विश्व अवघे कोंदाटले ॥ अशा व्यापक स्वरूपावर आरूढ झाल्यावर पुन्हा त्याचे नामाचा उच्चार, स्मरण, चिंतन नित्य व्हावे हेही मागणे भगवंताजवळ असतेच.

अण्णा -

30 July, 2008

आसक्ति - आनंदकंदाची

आसक्ति - आनंदकंदाची


आपल्या हृदयातील भक्तिप्रेम भावनेचा परमोच्च भाव म्हणजेच एकांतभक्ति होय. हिलाच कोणी अद्वैतभक्ति अथवा पराभक्ति असेही म्हणतात. अशी भक्ति करता करता मग भक्ताला सर्व लौकिक सुखे, सुखकल्पना व जीवनव्यवहार नीरस वाटू लागतो. एका भगवंतावाचून दुसरे काहीही आवडेनासे होते. भक्त मग आपला सर्व जीव प्राण एकवटून हरि प्राप्तीसाठी झटतो, तळमळतो. जरा एक क्षणभरसुद्धा श्रीहरीचे विस्मरण झाले तर तो कासावीस होतो, अगदी व्याकूळ होतो.
"ना अरत्र ना परत्र" म्हणजे लौकिक व्यवहाराविषयी उदासीनता आणि श्रीहरि प्राप्ति तर अद्याप झालेली नाही अशा, 'ना हा कांठ ना तो' अशा अवस्थेत दिवस कष्टाने कंठित असताही जो हरिस्मरण एक क्षणभरही सोडीत नाही, अशा भक्तास अचानकपणे आवडत्या देवाच्या स्वरूपात साक्षातकार होतो.
ईश्वरस्वरूप भक्ताला तृप्त करून, त्याच्यावर आनंदघनाचा अमृतवर्षाव करून अप्ल काळात अंतर्धान पावतो, आणि नंतर त्या सच्चिदानंदकंद परमात्म्याचा प्रत्यय चराचर स्वरूपांत सृष्टींत अणूरेणूत अव्यक्तपणे येऊ लागतो. ज्ञानदृष्टीने ही ब्राह्मीस्थिती, तर भक्तियोगाच्या दृष्टीने हीच एकांतभक्ति, पराभक्ति, अद्वैतभक्ति होय. या अनुभवाच्या स्थितीत भक्त व देव यंतील अंतरच लोपते. त्यांचे मुलभूत ऐक्य प्रकटते, विलसूं लागते. ही परमोच्च भक्ति प्रत्येक भक्ताने आत्मसात करावी असा नारदासारख्या भक्ताचार्यांचा प्रेमळ आग्रह आहे.
भक्तीचा अपार महिमा येवढ्याने संपत नाही बघ. ही परमप्रेमस्वरूपा भक्ति, कर्म, योग व ज्ञान या अध्यात्म मार्गापेक्षा अधिकतरा आहे. आता ही अधिकतरा कोणत्या बाबतील आहे ? तर परमविरहावस्था आणि विरोधी भक्ति.
पराभक्तीच्या प्रकर्षाने प्रकट होणार्‍या, आणि अखिल जीवन व्यापणार्‍या एका स्थिर प्रत्ययी महाभावाला - आनंदभावाला भक्तिशास्त्रकारांनी एक वेगळेच विशेषण जाणीवपूर्वक योजले आहे. ते म्हणजे आसक्ति. सक्त म्हणजे जोडले जाणे, वज्रलेप होणे. या व्युत्पत्तीनुसार आसक्ति म्हणजे "आपल्या आवडत्या विषयाबद्दल मनास वाटणारी अनिवार्य ओढ, आणि या ओढीमुळे मनुष्य त्या विषयाशी विचारांनी व भावनांनी आसक्त होणे." प्रत्येक मनुष्यमात्राचा आवडता विषय वेगळा वेगळा असतो. अनन्य भक्ताचा एक आनंदकंद भगवंतच आवडता विषय असतो. म्हणजे आसक्ति ही भगवंताशी जोडली गेल्यावर तिचे सुद्धा उन्नयन होते. तो श्रीहरीशी अतूटपणे जोडला जातो.
नाहीतरी एरव्ही साधारणपणे वाईट गोष्टींची सवय दर्शविण्यासाठी 'आसक्ति' हा शब्द योजला जातो. जसा व्यसनासक्ति, द्युतासक्ति, धनासक्ति, सत्तासक्ति इत्यदि. अशा माणसाला आपल्या आवडीच्या गोष्टीबद्दल आत्यंतिक ओढा असतो. तत्पूर्ततेसाठी तो वाटेल तेवढे कष्ट व साहस सोसतो. परंतु भगवंत हाच एक मात्र आवडीचा (आनंदाचा) विषय होतो व त्याच बरोबर परमभक्ति प्रेमाने ओथंबलेली अत्युत्कट भावधारा हृदयांत सतत उचंबळते, तेव्हा त्याच आसक्तिस मान्यप्रद "भक्ति" असे म्हणतात.
भगवंतच्या ठिकाणी चित्त आसक्त होणे ही गोष्ट भक्तिशास्त्राने अत्यंत प्रशंसनीय म्हणून वर्णिलेली आहे. ती भक्तिप्रेमाची एक अत्युच्च कोटी आहे. सामान्य आसक्त मनुष्याच्या ठिकाणी स्व-आवडीबद्दल, व्यसनाबद्दल जी एकनिष्ठता, क्रियाशीलता, तडफ, उत्साह इतकंच काय जशी निर्लज्जता असते, अगदी तशीच एकाग्रता, प्रयत्‍नशीलता भगवत्‌ प्राप्तीसाठी भक्ताच्या ठिकाणी असावी हेच "आसक्ति" या शब्दामागील प्रयोजन भक्तिशास्त्रकारांना अभिप्रेत आहे.
असे झाल्यावर भक्ताची काय अवस्था होते पहा - "आता मज एक विठ्ठलाचा छंद । लौकिक संबंध दूर ठेला ॥ विठ्ठलावाचून न बोले वचन । न देखे नयन दुजे काही ॥ मज रात्रंदिन विठ्ठलाचे ध्यान । वाटे जीवप्राण विठ्ठलचि ॥"
ब्राह्मीभाव प्राप्त झाल्यावर, ज्या सर्वात्मभावात ज्ञानी, योगी पुरुष असतो, त्याच शिखरोच्च अवस्थेत भक्त भक्तियोगाने, प्रेमाने अवस्थित असतो. पण त्यानंतर सुद्धा "आई मला निर्विकल्प समाधीचा निश्चेष्टपणा नको, तर मला तुझ्या सृष्टीत मुक्तपणे नाचूं दे, गाऊं दे, भजन पूजन करूं दे" असेच श्रीरामकृष्ण परमहंस विनवीत असत. अशा देवभक्त सापेक्ष द्वैतभावाला बाळगून तो भक्त काही विशेष्ट स्नेहसंबंध विविध नातेसंबंध स्विकारून त्या आनंदघनाशी आमरण अतूट नाते जोडतो.

अण्णा

12 July, 2008

तुझा विसर न व्हावा.

तुझा विसर न व्हावा.
भक्ति म्हणजे भगवंताविषयी परमप्रेम भाव. ही भक्तिप्रेमभावना मोठी उत्कट हवी. अखंड आणि क्षण प्रतिक्षण वर्धमान होत जाणारी अशी 'भक्तिप्रेम भावधारा' असली पाहिजे. थोडासा भाव, थोडेसेच पूजन, भजन , वाचन, श्रवण एवढ्याने भागत नाही. तर मग किती हवा तो भाव ? तर सर्वच्या सर्व अंतःकरणच या भक्तिप्रेम भावाने अंतर्बाह्य व्यापून गेले पाहिजे. आणि त्याच बरोबर आपले मन-बुद्धि ह्या एका भगवंताच्याच विचारात आत्मीयतेने रस घेणारी झाली पाहिजे. असे होण्यासाठी त्या सावळ्या सुकुमार, आनंदचिद्‌घन भगवंताबद्दल परम आदर, तसाच निःस्वार्थी निष्काम 'भक्ति-प्रेम-अनुराग' असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर काय होईल ? तर सुरुवातीच्या चार दिवसानंतर उत्साह, ओढ, अधिरता, तळमळ, उत्कटता पार सर्वच मावळून जाईल. श्रीज्ञानोबाराय म्हणतात, "वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता । तैसी निच नवी भजता । श्रद्धा दिसे ॥" नारद म्हणतात, "प्रतिक्षणं वर्धमानम्‌" भगवद्‌भक्ति प्रेमयुक्त झाल्यावाचून उत्कट, एकाग्र, अव्यभिचारी आणि चिरस्थायी होऊंच शकत नाही, आणि अशी भक्ति झाल्यावर ती अत्यंत उत्कट प्रेमभक्ति ही एक त्या भगवंताची/परमेश्वराची शक्तिरूपा होते. मग अशा भाग्यवान थोर महाभागवाताच्या निकट कृपाकटाक्षात, छायेत, आश्रयाला जे जे येतील ते ते सुद्धा मोठेच भगवद्‌भक्त होतात.
भक्ति ही दिव्य, भव्य आणि उदात्त आहे. कोणतेही लाभ हेतु अथवा लौकिक आशा अपेक्षा न ठेवता श्रीहरीची निष्काम, उत्कट, मधुरभक्ति सातत्याने चढत्या वाढत्या प्रमाणात करणे हेच निष्कलंक, निरागस, निरामय भक्तीचे द्योतक आहे.
ही अत्यंत विशुद्ध निष्काम भक्ति सदा सर्वदा अहैतुकी असते. जरासाही लाभ हेतू न ठेवता, अंतःकरणापासूनच उसळणार्‍या अकृत्रिम भक्तिप्रेमा पोटीच ती प्रकटते, आकाराला येते आणि क्रियारूप होते.
अशा भक्ताला दर्शनावाचून अन्य काहीच कामना नसते. एकच कामना - 'तो मज व्हावा, तो मज व्हावा । वेळोवेळा व्हावा पांडुरंग । 'नृसिंह भगवंताने जेव्हा प्रसन्न होऊन भक्त प्रह्लादास कोणताही वर मागण्यास सांगितले, तेव्हा त्याने तत्काळ चोख उत्तर दिले "स्वामिन्‌ कृतार्थोस्मि, वरं न याचे ॥ " तो म्हणाला, "हे प्रभो, आपल्या (इतरांना अलभ्य अशा) दर्शनानेच मी कृतार्थ् व पूर्णतृप्त झालो आहे, आता आपल्या पुण्यस्मरणावाचून अन्य कोणतेही वरदान मला नको. आपले तुकोबाराय हेच सांगतात "हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥"
अशा निरपेक्ष, निर्मम, निर्मळ भक्तीनेच तो मोठा जगदीश्वर परमात्मा प्रसन्न होऊ शकतो. अशा भक्ति प्रेम योगात एक केवळ एक त्या आनंदघन रामाचेच चिंतन उरते. अखंड एकमेव भगवत्‌ चिंतनासाठी मन एकाग्र व्हावयास हवे. आणि भगवत्‌ स्वरूपावर मन एकाग्र करणे, त्या केवळ आनंद स्वरूपाचेच चिंतन करणे किती कठीण् आहे याची कल्पना नाम-चिंतन करावयास सुरुवात केली म्हणजेच कळते, की ते किती भरकटते ? कोठे कोठे जाते ? कशा कशाचे चिंतन करते ?
मग यावर उपाय काय ? मन स्थिर करण्यासाठी योग व ज्ञान या मार्गात अनेक उपाय कथन केले आहेत, पण ते सर्वच्या सर्व अति रुक्ष आहेत. भक्तिमार्गात एकच उपाय आहे, व तो मोठा रम्य आणि अमोघ आहे. भगवंताची दृढ उपासना म्हणजे त्याचे नामस्मरण.
भक्तिमार्गात, तत्त्वचर्चा व शास्त्राभ्यास यापेक्षा आचारावर व भावनाप्रवाहावर अधिकाधिक भर दिला आहे. उपासकाने, भक्ताने आपल्या सर्वच्या सर्व भाव भावना भगवत्‌ केंद्रित, श्रीगुरुकेंद्रित व संबंधित करावयाच्या. मग सगळ्याच्या सगळा आचार श्रीहरि प्रित्यर्थ, त्या आनंदकंदासाठीच करावयाचा अशा सर्व भावभावना व सर्व आचार भगवत्‌ केंद्रित् होणे हीच भक्ति होय.
अशा प्रकारे चित्त, भाव, भावना आचार अतूटपणे वासुदेवाच्याच ठिकाणी जोडले जाणे, आसक्त होणे हाच श्रेष्ठ असा भक्तियोग आहे. हा साध्य झाला की मग पूर्ण वैराग्य, भगवंताचे समग्रज्ञान, त्याचे दर्शन व अचल अशी वासुदेव स्वरूपता या सर्व गोष्टी सहजच प्राप्त होतात आणि भक्त हा भगवंताशी मूळच्या तन्मयतेला, तदाकारतेला, तद्‌रूपतेला तल्लीनतेला प्राप्त होतो.

अण्णा -

05 July, 2008

अनंत रूपें अनंत वेषें

अनंत रूपें अनंत वेषें

ज्ञानदेवादि सगळे भागवत सांप्रदायातील वैष्णव हे बहुतांशी अद्वैती आहेत. त्यांना सगुणाचे प्रेम आहे व निर्गुणाचे ज्ञान आहे. सगुण आणि निर्गुण एकच आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे व अनुभव पण आहे.
चराचर सृष्टिला व्यापून असणार्‍या चेतन तत्त्वावर/चैतन्यावर त्यांची नितांत निष्ठा आहे. या चेतन तत्त्वालाच प्राचीन तत्त्ववेत्यांनी ब्रह्म, आत्मा, परमात्मा, परतत्त्व वगैरे नामांनी संबोधले आहे. ह्या विश्वाच्या अणुरेणूत असलेल्या चेतनाला अनुस्मरूनच 'देव' ही संकल्पना आकाराला आली.
भक्तगणांनी आपल्या आवडीनुसार या देवाला नानाविध रूपे आणि नावे दिली आहेत. पण मुळात देव ही वस्तू त्या एका अरूप अशा परतत्त्वाचीच दर्शक आहे. हा देव सर्वत्र आहे. म्हणूनच "जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत ॥" ही भागवत धर्माची शिकवण उपनिषद तत्त्वाला अनुसरणारीच आहे.
त्याच बरोबर भूतमात्र आणि भगवंत यांच्यातील परस्पर असणारा अन्योन्य संबंध हा एक अखंड असा चिंतनाचा विषय झाला आहे. अगदी अनादि कालापासून. आपल्या अवती भवतीच्या चराचर सृष्टीला नाम-रूप आहे. परतत्त्व ब्रह्म मात्र अरूप आहे. तरीही त्यांच्या परस्परांत आंतरीक नाते आहे. हे ब्रह्मच जगदाकाराने आकाराला येते. भक्तांसाठी हे आत्मतत्त्वच भगवंत म्हणून सगुण साकार होते. म्हणजे आता ब्रह्म, भगवंत आणि विश्व दिसावयास वेगळी असली तरी तत्त्वतः एकच एक आहेत. ह्यांच्यातील नाते शोधणे, ओळखणे, अनुभवणे आणि जपणे म्हणजेच भक्तीसाधना होय.
अध्यात्म शास्त्रकार जीवमात्राच्या ठायी असणार्‍या आत्मरूप चेतनतत्त्वाला "जीवात्मा", तर सर्वव्यापी अशा त्याच एक तत्वाला, मूलभूत तत्वाला "परमात्मा" असं म्हणतात. अगदी अनादि कालापासून जीवात्म्याला परमात्म्याची ओढ लागलेली आहे. या तीव्र ओढीतूनच अनेक साधनमार्ग निर्माण झाले. हे मार्ग आत्मज्ञानाने उजळले जातात. त्याचे राजमार्ग होतात. मग वाटचाल सोपी होते. सगळ्या संतांनी या मार्गावरून चालता चालता मुक्काम तर गाठलाच, पण त्याचबरोबर पायवाट सोपी केली. नुसती सोपीच नाही तर राजमार्ग केला, आणि हा राजमार्ग म्हणजे नामसाधना. भक्तिप्रेमयुक्त नामस्मरण.
आपल्या अवती भवतीचे विश्व दृश्य आहे, साकार आहे. त्याला एक विशिष्ट रूप आहे. तात्कालिक आहे. अस्थायी आहे. पण या विश्वामागील चेतन शक्तितत्त्व मात्र दृश्य नाही. त्याला रूप रंग आकार नाही. पण तरी ते चिरंतन आहे, स्थायी आहे. असे ते शाश्वत, अविनाशी आहे. म्हणून हा विश्वव्यापार अखंड अव्याहत सुरू आहे. कोणतीही शक्ति म्हटली की तिला रूप रंग आकार नसतोच. ती अरूप असते, अदृश्य असते. मात्र तिचा प्रभाव तेवढा सातत्याने जाणवत असतो. तिचे कार्य प्रत्यक्षात दिसत असते. त्यावरून दिसत नसली तरी तिचे अस्तित्व मानावेच लागते. या शक्तीचा अनुभव आपल्याला जाणवतो. या शक्तीला माध्यम लागते. महाभागवत, महावैष्णव, महात्म्यांच्या माध्यमांतून ही शक्तीच कार्यान्वित होते, कार्य करत असते.
सगळ्या संतांना विश्वामागील या चेतनाशक्तीचे सतत स्मरण असते. महामानवांची समग्र जाणीवच या चेतनाशक्तीने व्यापलेली असते. त्यांना या शक्तीचा अखंड ध्यास असतो. त्यामुळे तिचा अविरत शोध घेणं, घेत राहाणं, आणि शोध लागल्यावर सुद्धां अखंड स्मरणात राहाणं हेच त्यांचे जीवन आहे. हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे. याच "अरूप" चेतनतत्त्वाची, शक्तीचीच रूपे, अनंत रूपे ते आपल्या अवती भवती न्याहाळत असतात. ज्ञानराज सांगतात, "अनंत रूपें अनंत वेषें देखिले म्या त्यांसी । बाप रखुमा देवीवरु, खूण बाणली कैशी ॥". अनंत रूपांनी, आकारांनी, नामांनी, वेषांनी एच भगवंत नटला आहे. तो नटनाट्य कुशल कान्हा आहे.
अण्णा -

26 June, 2008

"मी" कोण ?

"मी" कोण ?

आपल्या सर्वांच्या ठिकाणी "मी" म्हणून जे स्फुरण होते, त्यालाच शास्त्रकार जीव असे म्हणतात. या जीवाला "मी म्हणजे कोण" हे यथार्थ समजत नाही. "मी" म्हणजे देहस्वरूप, कर्मकर्ता, सुख-दुःखवादी फलभोक्ता, अज्ञानी, अपूर्ण, शब्दादी (विषय) भोगावर ज्याचे सुख अवलंबून आहे असा, जन्म-मरण भोगणारा, असे आपल्याला समजत असतो. त्याचे हे सर्वच ज्ञान विपरीत असून स्व-स्वरूपाचा यथार्थ विचार न केल्यामुळे आहे. आपल्याला आपल्या स्व-स्वरूपाचा यथार्थ योग्य विचार नसणे यालाच अज्ञान असे म्हणतात.
पण श्रुती-संतांनी दाखविलेल्या सन्मार्गांनी विचार केला तर जीवाचे हे स्वरुपाचे अज्ञान नाहीसे होऊन त्याला, आपल्या स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते.
विषय, देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अहंकार या सर्वांचा देहात समावेश आहे. मी म्हटल्याबरोबर विचार न करता, मनुष्य आपल्या देहाकडे बोट दाखवून जरी "मी" असे म्हणत असला तरी तो आपल्याला अनेकानेक प्रसंगी देहाहून निराळा समजतो असे दिसून येते.
"माझा देह" असा जेव्हा तो आपल्या देहाचा उल्लेख करतो, तेव्हां तो आपल्याला देहाहून अगदी निराळा समजत असतो. तो 'मी डोळा' असे म्हणत नाही, तर माझा डोळा, माझे मन, माझी बुद्धी असेच म्हणत असतो. कारण 'माझा' ही षष्ठी विभक्ति आपल्याहून सर्वथैव भिन्न असलेल्या पदार्थाचा आपल्याशी काही संबंध दाखवायचा असल्यासच उपयोगात आणली जाते.
जागेपणी ज्या देहाचा आपण "मी" म्हणून निर्देश करतो, तो देह ज्यावेळी अंथरुणावर पडलेला असतो तेव्हा आपण त्या देहावर मीपणा ठेवीत नाही. सुषुप्तीत तर देहाला आपण विसरतोच. म्हणूनच "मी म्हणजे देह" असे समजणे हे काही स्व-स्वरूपाचे यथार्थ ज्ञान नव्हे, तर ते अगदी विपरीत ज्ञान [म्हणजे अज्ञान] आहे.
देहाच्या बाहेरील गोष्टीशी व्यवहारीक संबंध आला असता, मनुष्य देहावर मीपणा ठेवून व्यवहार करतो. बाहेरील गोष्टींशी व्यवहार बंद पडला की मग देहावरचा मीपणा आत असलेल्या इंद्रियांवर येऊन थडकतो. तरी तो मीपणा देहावरचा नसतो (यथार्थतः), कारण या सर्व पदार्थांचा "माझे" म्हणून आपण निर्देश करत असतो. "मी" म्हणून त्यांचा निर्देश करूच शकत नाही. जसे मी डोळा, मी कान, मी मन, मी बुद्धी असे आपण म्हणत नाही याचे कारण हेच की "मी" म्हणणारा जीव या सर्वांहून अगदी निराळाच आहे.
या प्रमाणे जीव हा या सर्व गोष्टींपासून अगदी निराळा आहे. जीव हा स्वसंवेद्य असून अन्याला जाणत असतो. पणे दुसरे पदार्थ आपल्या स्वतःला जाणत तर नाहीतच पण दुसर्‍यालाही जाणू शकत नाहीत. जसे घोडा "मी घोडा" आहे असे जाणत नाही व अन्यालाही जाणत नाही. पण जीव जाणतो. म्हणून जीव ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानाला उत्पत्ती नाश असू शकत नाहीत. कारण उत्पत्ती-नाश जाणण्याकरितां ज्ञान पाहिजेच ना ? "मला काही कळत नाही ?" हे कळण्यासही ज्ञानच लागते.
म्हणजेच ज्ञानरूप जीव उत्पत्ती-नाश रहित असा अविनाशीच आहे. अशा जीवाला अत्यंत दुःखरहित व अविनाशी सुखाची इच्छा असते. असे सुखच जर नसते तर ही सुखाची इच्छाच दुरापास्त. असे अविनाशी अखंड सुख जीवाहून जर वेगळे असते तर ते सुख अविनाशी म्हणताच येणार नाही. सुखाला अखंड तेव्हांच म्हणता येईल की जेव्हां ते नव्हते किंवा प्राप्त नव्हते असा अनुभव येणार नाही. असा अखंड सुखाचा अनुभव घेता येतो; कां तर जीव मुळातच सुखस्वरूप आहे.
सृष्टीतील एक नियम आहे - 'कोणतीही वस्तू आपल्या स्वरूपभूत धर्मांचा त्याग करू इच्छित नाही, किंवा तिला त्या धर्माचा कधी कंटाळा येत नाही'. जीवाला ज्या आनंदाची अपेक्षा आहे तो जीव मुळातच असा सत्-चित्-आनंद स्वरूप आहे. ह्या आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती श्रीगुरुकृपेने नामस्मरणाच्या द्वारा येते.

अण्णा -

18 June, 2008

आचार्य आणि संत

आचार्य आणि संत

संतांनी समाजाला धर्म, तत्त्वज्ञान आणि परमार्थ शिकविण्यासाठी वर्णप्राधान्य, आश्रमप्राधान्य इतकंच नाही तर वेषप्राधान्य ह्याला गौणत्व दिले. त्याचे पूर्ण खंडनही केले नाही, तसाच त्याचा आग्रहही धरला नाही. वेदमार्गाला कुठेही यत्‍किंचित बाध येऊं न देता, त्यांनी समाज आणि परमार्थाचे प्रबोधन करणारे आचार्यपद यांतील अंतर कमी केले.
आचार्यांनी समाज प्रबोधन केले, पण आपल्या स्थानावरून, आसनावरून. त्यामुळे काय होत होते ? काय झाले ? तर समाजातील व त्यांच्यातील अंतर यात एक कायमची दरी - दुरावा राहिला. याच्या नेमके उलट संतांनी खूप खाली उतरून, जन सामान्यात मिसळून - "तुम्ही आम्ही खेळीमेळी । गदारोळी आनंदे ॥" असे वागून समाजाला वर उचलले, व यामुळे समाजातील व संतांमधील अंतर कमी झाले.
ऋषी, मुनी, आचार्य ह्यांच्यात व समाजात अंतर वाटते. आजही "श्रीशंकराचार्य" म्हटले की आपल्यात व त्यांच्यात एक अंतर वाटते. आचार्य परंपरेत, त्या त्या काळात, काळानुसार ते अंतर गरजेचे - योग्य होते. पण संतपरंपरेतील संत आपल्याला अगदी जवळचे वाटतात. उदाहरण द्यावयाचे तर ऋषी, मुनी आचार्य लेकराला पित्यासारखे तर संतमहात्मे माय-माऊली सारखे वाटतात. शंकराचार्य माऊली असं कुणी भजन करत नाही, पण "श्रीगुरुज्ञानेश्वरमाऊली" म्हणून हांक मारतांना, भजन करतांना एक मायेची, प्रेमाची अत्यंत जवळीक भावते.
पूर्वी ऋषी, मुनी, आचार्य यांच्या अधिकाराच्या कक्षा असायच्या. कुणीही आपल्याला एकदम ऋषी, मुनी अगर आचार्य म्हणवू शकत नव्हते. शंकराच्यार्यांच्या पीठावरील व्यक्ती संन्याशीच असावी लागते असे काटेकोर बंधन. आणि ह्या बंधनामुळे, कक्षेमुळे काय झाले ? तर "ह्या दृष्टीने आपण अनधिकारी आहोत" असा न्यूनगंड समाजात निर्माण होऊन समाज परमार्थापासून, साधनमार्गापासून, आत्मज्ञानापासून वंचित व दूर राहिला. ही जाणीव नेमकी संतांना आली. आणि म्हणूनच संतांनी सर्व देशात, सर्व कालात, सर्व समाजात, वर्णात, आश्रमात, जाती जमातीत, धर्म पंथात, स्त्री पुरुष अशा सगळ्याच्या सगळ्या स्तरांत अवतार घेतले.
यामुळे काय झाले ? संतांनी सामान्य, तळागाळातल्या समाजाशी इतकी कांही जवळीक केली, तीपण केवळ समाजाच्या कल्याणासाठीच, की सामाज मानसांत संतांबद्दल एक वेगळीच अंतरीची, जिव्हाळ्याची आपलेपणाची ओढ निर्माण झाली. समाजानी त्यांना ऋषी, मुनी, आचार्य इतकेच काय पण देवापेक्षाही 'आपल्या गळ्यातले ताईत बनवले'.
जरा संतचरित्रे वाचली तर अगदी सहज असं लक्षात येईल कीं, कोणत्याही अनुकूल प्रतिकूल बाह्य परीस्थितीत ते संत झाले. अशी एक परीस्थिती माणसाला बोट करून दाखविताच येणार नाही की 'काय करावे, माझी परीस्थिती "तशी" नसल्याने मला संत होता येत नाही'.
अत्यंत श्रीमंत सत्ताधीश, एका किल्ल्याचे किल्लेदार अशा, जनार्दन स्वामींसारखे राहून संत होता येतं. नाथांचे गृहवैभव संतत्त्वाच्या आड येत नाही. "तुम्हा घरी गायी म्हशी । आम्हा घरी उंदीर घुशी ॥" अशी आपल्या श्रीतुकोबारायांची गरीबी, तरी ते संत झाले. त्यांनी असं नामस्मरण व भजन केलं की त्यांचे 'सदेह' वैकुंठगमन झाले. संतत्त्वासाठी वय, वर्ण, लिंग, आश्रम कांही आड येत नाही, आलं नाही, आणि येणार पण नाही.
अशा प्रकारे सर्व देश, काल, परीस्थिती, वय आणि स्तर यात परमार्थ करता येतो, संत होता येते हे संतांनी आपल्या जीवनांत प्रत्यक्ष आचरून दाखविले. आम्ही मात्र (खोटी) कारणं सांगत बसतो. संतांनी आपल्याला आहे त्या परीस्थितीतून परमार्थ करून भगवंताकडे जायला शिकविले. त्यामुळे समाजाला संत जन्मदात्या मातेपेक्षाही जवळचे वाटतात.

अण्णा -

10 June, 2008

संतपरंपरा

संतपरंपरा


ह्या चिंतनाला अक्षरस्वरूप देण्याआधी प्रथमतः अखिलगुणनिधान, सच्चिदानंदघन, करुणावरुणालय, भक्तवत्सल, प्रेमळजनप्रांजळ अशा रुक्मिणीप्राणसंजीवन श्रीपांडुरंगाच्या चरणांवर माथा ठेवतो.
चिंतन करताना श्रीमहाविष्णुचा अवतात "सखा माझा ज्ञानेश्वर" असं आपल्या श्रीजनाबाई ज्यांचा उल्लेख करतात, महाकैवल्यतेजोनिधी असे श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज यांचे जाज्वल्य, स्वयंभू अधिष्ठान, शब्दशक्तीचा सातत्याने पुरवठा करत असते.
या चिंतनाच्या मागे ऋषी, मुनी, आचार्य आणि संतपरंपरा यांचा प्रकाश आहे. अण्णा फक्त गोमुख - दगडाचे. ह्या सगळ्या परंपरांतील महात्मे, मनुष्यमात्राला प्रबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी झालेले ईश्वर शक्तीचेच अवतार आहेत.
सत्ययुग व त्रेतायुगात ऋषी व मुनी परंपरा प्राधान्य. आचार्य परंपरेचा प्रारंभ झाला द्वापारयुगातच. पण आता त्यानंतर ह्या कलियुगात प्रधान रूढ परंपरा म्हणजे संत परंपरा. ऋषी, मुनी, आचार्य ह्या जुन्या सनातन वैदिक औपनिषदिक तत्त्वज्ञान यांचा विचार आचार करणार्‍या परंपरा असल्या तरीसुद्धां आता त्या घोर कलियुगात आपल्यामध्ये परमार्थिक बी रुजवणारी मुख्य उपकारण असणारी संतपरंपराच आहे.
सांप्रदायिक चाकोरीचा आग्रह अट्टाहास प्रकाशित केला, 'यारे यारे लहान थोर' हा ज्यांचा उदार दृष्टिकोन 'येति भलते नारी नर' असा आवांका लोककल्याणाचा आणि "करावा विचार । न लगे चिंता कोणाची ॥" ही आश्वासकता ती संतपरंपरा. संतांनी परमार्थाच्या "सूक्ष्म-दुस्तर" वाटा मोडल्या आणि राजमार्ग रूढ केला, सर्वांसाठी खुला केला. हे करतांना त्यांनी ऋषी, मुनी आणि आचार्य या परंपरेचाच आधारभूत पाया म्हणून उपयोग केला. आपले श्रीतुकोबाराय काय म्हणतात - "वेदमार्गे मुनि गेले । त्याचि मार्गे चालिलो ॥". आपली ज्ञानराज माऊली - "व्यासांचा मागोवा घेतू । भाष्यकारांते वाट पुसतु ॥" अशी साक्ष. तुकोबारायांनी या सगळ्याचा सुंदर समन्वय साधला. "वाचा बोलो वेदनीति । पण करूं संतीं केले तें ॥" म्हणजेच औपनिषदिक वैदिक तत्त्वज्ञान. प्रमेय सिद्धांत समाजात रुजवतांना, देश-काल मानानुसार पद्धतीत थोडा बदल केला. पण हा बदलसुद्धा दार्शनिक दृष्ट्या, तत्त्वदृष्ट्या न करता तपशीलात केला. त्यांत सुलभता, सर्वंकशता आणली.
जरा विचार केला तर जेवढी जवळीक संतांची वाटते तेवढी "ऋषी, मुनी, आचार्य" यांची नाही वाटत. काय गंमत आहे पहा - मत्स्य, कच्छप, वराह हे अवतारच, पण ह्या अवतारातील भगवंताची कोणी उपासना करतं का ? नंतर नारसिंह, वामन , परशुराम, राम, कृष्ण. पण ह्यातदेखील प्राधान्येकरून उपासना 'राम कृष्णाचीच' नाही कां ?
राम अवतार उपास्य खरे पण ह्या अवतारांत प्रभूंचे राजेपण अवतार समाप्तीपर्यंत आहेच आहे. पण कृष्णावतार पहा. ह्या अवतारांत आपले मूळ अनादि स्वरूप तसंच्या तसं ठेवून गवळ्या घरी अवतार घेतला. समाजात इतके मिसळले कीं ह्या गवळ्यांच्या पोरांशी खांद्याला खांदा लावून खेळले. खेळतांनाही वेळ आली तर त्यांचा डाव त्यांना द्यावा. कृष्णावर डाव आला की पेंद्याने म्हणावे, "खाली वाक, मी आत तुझ्या पाठीवर बसणार रे". कृष्णाने खाली वाकावे, पेंद्याला येथून तेथवर वाहून न्यावे व डाव द्यावा.
एवढेच काय - 'पाहतां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥' - कुठे जगत नियंता परमात्मा व कुठे ही गवळ्यांची मुलं ! त्यांचं उच्छिष्ट खावे, ब्रह्मांडनायकांनी ? त्यामुळे भगवान कृष्ण अगदी सामान्य जीवालाही आपालाच वाटतो. खेळीमेळी खेळगडी वाटतो. तसंच संतांच. कुठे भगवतकृपा पात्र पुण्यवंत संत व कुठे सामान्य जीव. तत्त्वतः खूपच अंतर. पण तरीही संत समाज कल्याणासाठी खाली उतरतात, सोपं करून सांगतात. आणि सोपं काय ? तर "नाम". आणि ज्या लोकांना वर उचलतात - आपल्यासारखंच करतात. हे संतपरंपरेचे कौशल्य.
अण्णा -

18 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानेश्वरी महिमा - २

श्रीज्ञानदेवांसारखे वैष्णव नेहमीच अतिशय विनयाने पण तेवढ्याच आत्मविश्वासाने, श्रवणातून ब्रह्मरसाचा आस्वाद कसा घ्यावा याचा परिचय करून देत असताना श्रोत्यांचा अनुनय करतात. "वक्ता तो वक्ता नव्हे । श्रोतेनविण ॥" यात वक्त्याचे समाधान आणि श्रोत्यांचे अवधान सतत उत्सुक आणि उत्साहपूर्ण आहे. संवादातील वातावरण सदैव ताजेतवाने आहे. तोंड भरून विचारावे असे अर्जुनासारख्या श्रोत्याला वाटते आणि कान ओसांडून वाहतील इतके बोलावे असे भगवान श्रीकृष्णाला वाटते; आणि वक्ता व श्रोता यांच्या परस्परामधील प्रेमामुळे, भक्तिमुळे कधी कधी विषयांतराचा, पुनरुक्तिचा तसाच पाल्हाळाचा भागही रुचीने बोलला - ऐकला जातो.
"चातकाचिये कणवे । मेघु पाणियेंसी धावें । तेथ चराचर आघवें । निवालें जेवि ॥" अशी वाचकांचीही अवस्था होते. स्वतः आत्मतृप्तीने निवून श्रीगुरु थांबलेले नाहीत तर त्यांनी वाचकांनाही स्वानंदसाम्राज्याच चक्रवर्तीत्व बहाल केलं आहे. "मने काये वाचा । जो सेवकु होईल इयेचा । तो स्वानंद साम्राज्याचा । चक्रवर्ती करी ॥"
हे चराचर विश्व म्हणजे मूर्त-अमूर्ताची सुंदर, सुरेख, नयनरम्य, लोभसवाणी क्रीडाच आहे. कधी अमूर्त प्रकट होते, तर कधी मूर्त अनंतात लपून राहते. एकदा का आपल्याला मूर्तामूर्ताच्या या खेळाची गोडी लागली, की मग ज्ञानेश्वरीच्याच काय पण साऱ्याच संतसाहित्यातील कोडी अलगद, हळूवारपणे आपोआप उलगडू लागतात, मग अरुपाचे रूप दिसते, रुपातील अरूपता जाणवते, आणि त्याचबरोबर रुपारुपांतील द्वैतही, भेदपण मावळून जातो.
श्रीज्ञानेश्वरीच्या सर्वांगी हा खेळ कसा छान रंगला आहे. अगदी पहिल्याच ओवीत वेदप्रतिपाद्य आद्यतत्त्व आणि स्वसंवेद्य आत्मरूप यांचे आपल्याला चर्मुचक्षूंनी न दिसणारे पण तत्त्वतः असणारे ऐक्य श्रीगुरुंनी अतिशय चपखलपणे दाखवले आहे, आणि पाठोपाठ लगेचच या आत्मस्वरूपालाच "देवा तूंचि गणेशु" म्हणून सावयव, सगुण साकार केलं आहे.
आपल्या डोळ्यांसमोर अशी आपल्या परिचयाची गणेशमूर्ती पुढ्यांत दिसते न दिसते तोंच तिला वाङ्‍मय गणेशाचे रूप उभे केले आहे. श्रीज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन आणि आध्यात्मिक रुपकांनी गणेशाचे रुपडे स्पष्ट होते. अठरा पुराणांची मणिभूषणे, षड्दर्शनांच्या भुजा, तर्कशास्त्राचा परशू, वेदांचा रसाळ मोदक असा गणराज साकार होतो. सगळे शब्दब्रह्मच मंगलमूर्तीस्वरूप होऊन जाते.
मूर्तास अमूर्त आणि अमूर्तास मूर्त करण्याची किमया हा श्रीज्ञानराजांच्या प्रतिभेचा, ऋतंभरा प्रज्ञेचा सहज विलास आहे. या सगळ्यामध्ये एकाच वेळी रुपाचे अरुप आणि अरुपाचे रूप होऊन जाते. श्रीज्ञानाईस यांत सगुण-निर्गुणाचे मूलभूत असलेले ऐक्यच अभिप्रेत आहे. या अभेद - अद्वैत सिद्धांताच्या बैठकीमुळे येथील भाषा सीमीत असलेली दिसली तरी अर्थाच्या अंगाने विस्तारतच जाणारी आहे. अशा वेळी श्रीज्ञानोबारायांच्या शब्दातील आशय पकडतांना, अर्थाला मनाची मिठी घालतांना जरी दमायला झाल्यासारखे वाटले तरी या दमण्यातही पूर्ण विसावा आहे. या विसाव्यातच आनंद आहे. समाधिसुख आहे.
अनंत अरूप संकल्पना श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या मनःचक्षूसमोर शब्दरूप घेत असतात आणि त्याचवेळी, प्रत्यक्षांतील रूपसंपन्न आकारांतील व्यापक अरुप चैतन्यतत्त्वही श्रीज्ञानोबारायांच्या अंतःचक्षूंना दिसत असते, आणि ही सगळीच रूपे त्यांनी शब्दबद्ध केली आहेत.
अरुपाला रूप आले, निराकार साकार झाले, निर्गुण सगुण झाले की त्याला नटवण्या सजवण्याची हौस ही भक्त भगवंताच्या - महाभागवतांच्या मनी जागी होत असते. म्हणून तर हा अक्षरांचा खेळ, अनुभवांतून - स्वानुभवांतून सतत कागदावर उतरत असतो.

अण्णा -

09 May, 2008

श्रीज्ञानेश्वरी महिमा

श्रीज्ञानेश्वरी महिमा
ज्ञानराजांच काव्य आत्मीय, आणि तसंच रसाळ व आस्वादक आहे. त्यांच सगळंच साहित्य त्या वलयात रमून जाण्यासारखं तर आहेच पण त्याचबोरबर गुंतून गुंग होण्यासारखं आहे. याच्या प्रभावामुळे, भक्तिभावामुळे कोठेतरी त्या माऊलीच्या परिवारातच जीव वावरत राहतो.
सगळ्याच संतमंडळाच्या आचार विचार उच्चारांनी आपण भारले जातो. त्यातून एक सूक्ष्म विचार-निवड, सत्य व अनृत वेगळं करण्याची दृष्टी प्राप्त होते. मग अभ्यास नकोसा होतो, आणि अधिष्ठानावरची नजर हालत नाही.
या संतसाहित्यात परब्रह्मस्वरूप अभिव्यक्त होत असले तरी त्याचे दर्शन सहजासहजी होत नाही. शब्द परिचय झाला, पाठ झाले, तरी त्यातला अर्थ आशय गळी उतरतोच असे नाही. संतांचे विचार आत्मारामाच्या अनुभवावर आधारलेले असतात. आपले श्रीतुकोबाराय म्हणतात, "अनुभवे आले अंगा । ते या जगा देतसे ॥"
आपल्याला शब्दार्थ कळला एकवेळ, तरी अनुभव नसतो म्हणून असे घडते. संतांचा अनुभव उत्कट तर असतोच आणि त्याबरोबरच प्रकट होण्यासाठी तो आतुरही असतो. अशी दिव्य भव्य उत्कटता आणि आतुरता, श्रीज्ञानराजांच्या सगळ्याच ग्रंथात विपुल आढळते. त्यामुळे त्यांच्या विभूतीमत्त्वाचा शोध घेतांना आपण मुग्ध होतो, स्तब्ध होतो.
श्रीगुरु माऊलीचे विभूतीमत्व असामान्य आहे, लोकोत्तर आहे, अद्वितीय आहे. त्याचबरोबर ते बहुकक्ष आहे. या चराचर विश्वातील एकही असा विषय नाही कीं तो ज्ञानोबारायांच्या ग्रंथात आला नाही. किंबहुना सगळ्याच संदर्भांना ज्ञानराजांच्या वाङ्‍मयीन स्पर्शाने अभूतपूर्व प्रतिष्ठा लाभली आहे.
आत्मनिष्ठा, अध्यात्म हा त्यांच्या रचनेचा, तसाच त्यांच्या विभूतीमत्वाचा गाभाच आहे. त्यातूनचे त्यांच्या विभूतीमत्वाचे अनेकानेक पैलू आकारास आले आहेत. हे सगळे पैलू जरी भिन्न भिन्न असले तरी एकात्म आहेत. त्यांची दृष्टीच चिन्मयी आहे. याच अलौकिकामुळे ते गगनालाही गवसणी घालतात. त्यांच्या अफाट कैवल्य स्वरूपाचा वेध घेण्यास जमिनीवरच उभ्या असलेल्या सामान्य माणसाचा अवाका अतिशय थिटा पडतो. तरीपण श्रीज्ञानदेवांच्याच "गीता जाणा रे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति प्रभूची ॥" या वचनाने बोट धरून - "ज्ञानेश्वरी जाणा हे वाङ्‍मयी । श्रीमूर्ति ज्ञानदेवांची ॥" असं म्हणता येतं. नुसत म्हणणे नाही तर ते अक्षरशः अगदी खरेच आहे. श्रीज्ञानेश्वरी आणि श्रीज्ञानेश्वर महाराज दोन नाहीत, तर या अक्षर रूपांनी खुद्द श्रीज्ञानोबारायच आहेत.
श्रीगुरु ज्ञानदेवांनी आपल्या सगळ्याच ओव्या - अभंगांतुन आत्मस्वरूपापासून परमात्म स्वरूपापर्यंत सगळीच "रूपें" रेखाटली आहेत. ही सगळी रूपे अरुपाची आहेत, अक्षराच्या पलिकडे असणार्‍या उत्तम पुरुषाची आहेत. शब्दांत न गवसणारे "अरूप" माऊलीच्या अभिव्यक्ति सामर्थ्यामुळे शब्दरूपाने स-रूप झाले आहे; साकारले आहे.
या सगळ्या साहित्याचा उद्देश केवळ कला म्हणून नाही, तर विवेकाची वाण फिटावी, आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा हाच आहे. पण आत्मविद्या हा एक असा मौजेचा विषय आहे कीं तो मौनात दडत नाही आणि बोलांत सांपडत नाही. भक्ति-प्रेमभावाला हेच परिणाम अगदी तंतोतंत लागू पडते. तुकोबाराय म्हणतात - "प्रेम नये सांगता, बोलता दाविता । अनुभवे चित्ता चित जाणे ॥"
आपल्या श्रीगुरु ज्ञानमाऊलीची तर प्रतिज्ञाच अशी आहे की "ऐंद्रिय जाणिवांच्या पलिकडचे आत्मस्वरूप शब्दांत मांडावयाचे, तेही इतक्या गोड शब्दांत कीं, ज्ञानेंद्रियांत गोड भांडण लागेल आणि अमृताच्यापण तोंडाला पाणी सुटेल". म्हणून श्रीज्ञानेश्वरी म्हणजे तर शब्दांचे वस्त्रालंकार धारण केलेली प्रत्यक्ष परब्रह्म मूर्तीच. हे शब्दांचे वस्त्रालंकार परमात्म्यास नुसते सजवत नाहीत, तसेच झाकत तर नाहीतच, पण त्याला, म्हणजे परब्रह्माला, इंद्रियग्राह्य करतात. अशा ग्रंथाची साथ संगत कायम राखावी.

अण्णा -

29 April, 2008

तत्सुखे सुखित्वं

तत्सुखे सुखित्वं

दर्शनाचे तीन प्रकार - १) स्वप्नात प्रभूचे दर्शन - साधारण दर्शन २) मंदिरांत, मूर्तीत दर्शन - मध्यम दर्शन ३) भगवंताचे अपरोक्ष दर्शन - उत्तम दर्शन.
द्रष्टा म्हणजे पाहणारा, भगवंताला पाहतांच भगवत्‌मय होऊन जातो त्याला "उत्तम दर्शन", अपरोक्ष साक्षात्कार असे म्हणतात. भगवंत जगात ओतप्रोत भरला आहे, असा अनुभव घेता घेता जो देवांत विलीन होऊन जातो तोच भगवंताचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. भगवंत सर्वव्यापक आहे.
तो मूर्तीत व मंदिरांत आहेच, पण तेवढाच तो नाही. दृष्टी जाईल तेथे तेथे भगवंत आहे, इतकंच काय पण मन जेथे जेथे जाईल तेथे तेथे पण तोच परमात्मा आहे. हेच भगवंताचे "उत्तम दर्शन". जो भगवंत माझ्यात आहे तो सर्वांमध्ये आहे. अखिल जगत भगवंतच आहे.
आपण जे जे कांही करतो ते देवासाठीच करतो अशी भावना असल्यावर त्या सर्व कर्माची परिणतता एका भक्तीतच होते. अशा तन्मय भक्तीने जीव कृतार्थ होतो. गोपी भक्ति मार्गाच्या आचार्या. त्यांचा आदर्श मन, डोळे यांच्यासमोर असावा.
सुखाचा साथी जीव आहे. दुःखाचा साथी भगवंत आहे. नेहमी ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. मनुष्य पैसे मिळविण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, कष्ट करतो, दुःख सोसतो, त्यापेक्षा जरा थोडे तरी प्रयत्न, कष्ट तो एका सच्चिदानंदस्वरूप देवासाठी करील, तर त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितच होईल.
श्रीकृष्ण तर न बोलावतांही गोपींच्या घरी जात असे. मग तो आपल्या घरीं कां बरे येत नाही ? आपल्या चित्तांत कां ठसत नाही ? याचा विचार कधीतरी आपल्या मनांत येतो का ?
श्रीठाकूरजींना लोणी फार प्रिय. लालाला लोणी फार फार आवडते. उत्तरेत एक वाक्‍प्रचार आहे "लालाको मख्खन भाये रे । कुछ और काम न आये रे ॥" लोणी सर्वाचे सार आहे. भगवंत पण साराचेही सार आहे. आपला भगवान बाळकृष्ण सारभोगी आहे. वैष्णवही सारभोगी असतात.
भक्ति हे प्रेमाच शास्त्र आहे. भक्ति हा पांचवा पुरुषार्थ आहे. परमप्रेमस्पद चिंतनात भान विसरते ती भक्ति. भगवंत हा प्रेमस्वरूप आहे. भक्तिमार्गात वेगळेपणा राहात नाही. विभक्त नव्हे तो भक्त. भक्ताला भगवंताचे, शिष्याला श्रीगुरुचे, रोग्याला औषध- पथ्यपाण्याचे ध्यान असावे. ध्यानाने तन्मयता वाढते, भक्ति-प्रेम भाव वाढतो. भगवंत अशा भक्ति-प्रेमाने ऋणी होतो. भक्ति-प्रेम भावांत हक्काची भावना अंतरात निर्माण करते.’स्व-सुख सुखित्वाला’ तिलांजली देऊन ’तत्सुख सुखित्वाचे’ संवर्धन हीच भक्ति. अशी भक्ति भगवंताने अण्णाला द्यावी हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
प्रभु रामचंद्रांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना सप्रेम भेट म्हणून पारितोषिके दिली, पण हनुमंताला कांहीच दिले नाही. म्हणून सीतामाईंना वाईट वाटले. त्या रामाला म्हणाल्या, "मारुतीला पण कांही द्या ना ? " श्रीराम म्हणाले, "त्याला मी काय देऊ ? त्यानेच माझ्यावर किती किती उपकार करून ठेवले आहेत". मारुतराय काय म्हणाले ? "सनमुख होई न सकत मन मोरा । " - म्हणाले, "प्रभू माझं मन कांही आपल्या पुढ्यात सन्मुख होत नाही, तेवढं करा". भक्ति-प्रेमात अपेक्षेचा भाव आला की भक्ति-प्रेम संपलेच. भगवंताने ही अपेक्षेची भावना अण्णाचे मनांतून तडीपार करावी. अपेक्षा असली तर भक्तिनें ती पूर्ण होते पण भगवंत मात्र हातातून निसटून जातो.
शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्ति-सूत्रात म्हटले आहे "तत्सुखे सुखित्वं प्रेमलक्षणम् " - अन्याच्या सुखांत सुख अनुभवणे हे खर्‍या भक्तिप्रेमाचे लक्षण आहे. दयाघन, कृपाळू भगवंताने हा बोध अण्णाला द्यावा हीच प्रार्थना -

अण्णा -

10 April, 2008

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

आनंदाचे लाडू घ्यारे तुम्ही

प्रारब्ध कर्माचा क्षय ती भोगल्यानेच होत असतो, म्हणून जीवनमुक्तांनाही देह पडेपर्यंत प्रारब्धकर्म करावीं लागतात व त्याच बरोबर भोगावी लागतात, असा वेदान्ताचा सिद्धांत आहे. आणि त्याच बरोबर अनेक जीवनमुक्त संत महात्म्यांच्या चरित्रावरून तर या प्रमेयाला बळकटी येते. अधिकच.

हे उरलेले प्रारब्धकर्म जन-कल्याणसाठी, जन समाज प्रबोधनासाठीं, लोकांच्या मनांत परमार्थाचे ज्ञान ठसविण्यासाठी असते असे सामान्यतः दिसून येते. "प्रारब्ध शेष उरले जननिश्चयाला" - श्रीतुकोबाराय पण ग्वाहीपूर्वक सांगतात कीं - "तुका म्हणे आतां । उरलो उपकारापुरतां ॥" संतांच्या या कर्मयोगाने जगाची, समाजाची पारमार्थिक उन्नती होत असते.

’कां फोडीत पापताप । पोखीत तिरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचे जैसे ॥
तैसी बांधिली सोडीत । बुडालीं काडत ।
सांकडी फेडीत । आर्तांचिया ॥
किंबहुना दिवसराती । पुढिलांचे सुख उधळती ।
आणित आणित स्वार्थी । प्रवेशिजे ॥

वरील सुंदर ओव्यांत श्रीज्ञानराज माऊलींनी वर्णिल्याप्रमाणे देह पडेपर्यंत नराला नारायण करण्याचे व याच प्रकारे, याच मार्गांनी व्यक्तिमात्राला व त्यामुळे समाजाला स्वरूपसुखशांती प्राप्त करून देण्याचे व्रत संत आचरीत असतात. मानवाला आपल्या मूलभूत भगवत तत्त्वाचे, परमतत्त्वाचे सतत स्मरण देऊन, भगवंतस्वरूप होण्याचा मार्ग दाखविण्याचे महत्‌कार्य या संत माहात्म्यांकडून सतत, सहजतेने घडत असते. "सहज बोलणे हित उपदेश । करोनि सायास शिकविती॥". आणि साधन मार्ग काय म्हणाल तर एकच - "नामस्मरण".

म्हणूनच त्यांची ही थोरवी अनेक थोर थोर संत पुरुषांनी अगदी मुक्त कंठाने व प्रेम, कृतज्ञता व अत्यंत आदर या भावनांनी दाटलेल्या अंतःकरणाने गायिली आहे. तत्त्वज्ञ म्हणतात - They are the salt of the Earth. "हे महात्मे म्हणजे जगाला सुपीकता व रस देणारे मीठ होत" - ते नसतील तर जगांत सगुणांचे व शाश्वत सुखरुपतेचें पीक येणार नाही.

अपूर्णातून पूर्णाकडे जाण्याचा मनुष्य सदा प्रयत्न करीत असतो. परंतु बहुतेकांना एकदेशी पूर्णतेचे आकर्षण वाटते. थोड्याच जणांना सर्वांगीण पूर्णतेचे आकर्षण वा ओढ असते. थोडेच प्रयत्न करतात. हीच नवजागृति किंवा परमार्थप्रवृत्ति.

परमार्थ साधनेने परमानंदाची प्राप्ती. परमानंदाने जीवनांतील अध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा तापत्रयाचा नाश. सर्वाभूतीं आत्मभाव, व त्या योगे विश्वात्मक भाव. मग "सर्वही सुखरूप असावेत" असा एकच एक जीवनहेतू उरतो. संकुचित स्वार्थाचे स्मरणही राहात नाही. मग भगवंतच खरा, इतर सर्व आभास असा निश्चय/अनुभव. या अनुभवाने विश्वाचे कोडे सुटतें आणि भक्तिप्रेमभाव, निर्भयता, आदर, देव-भक्तांचे ऐक्य, आणि ऐक्यातून होणारी "भक्तिप्रेमसुखसेवा" या भावनांबरोबर एकरूपता अनुभवत, भ्रांतीनाश होतो, संशयरहितता येते. या आत्मानंदरूप स्थितीने भावनांना, भक्तिला, प्रेमाला, भक्ति-भाव-प्रेमाला पूर्णत्व येते. त्याचबरोबर विश्वात्मक भावाने त्यांच्या क्रियाशक्तीच्या व्यापाराला (WILL) पण पूर्णता येते.

हीच मानवी जीवनाची सफलता, सार्थकता, कृतार्थता, धन्यता, स्वरूप सुखाची परमोच्च अवस्था. मग "याचि देही याचि डोळां । भोगिजे मुक्तिचा सोहळा ॥" असा शेवटचा दिवस गोड होतो. आपण केलेल्या नामसाधनेचें (नामस्मरणाचें) असे मधुर, रसाळ, परिपक्व महान फळ आलेले पाहून स्वतःचे स्वतःलाच मोठे कौतुक वाटते. मुक्तीशी लग्न लावून, साक्षात्कारी महात्मा, जीवनमुक्त अवस्थेतील आपले उरलेले जीवन भक्ति-प्रेम सुखाच्या खेळीमेळींत आनंद लुटत असतांना आपल्याला मिळालेला आनंद जगाला वाटत असतो.

"सेवितो हा रस, वाटी तो आणिका ।
घ्यावे होऊ नकां रानभरी ॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू ।
नका चडफडूं घ्यारें तुम्ही ॥ "
’देवाचा प्रसाद घ्या’ , ’आनंद व्हा’ हीच त्यांची तळमळ आणि आनंद होण्याचे साधन एकच - देवाचे "नाम".

अण्णा -

28 March, 2008

गुरु तेथे ज्ञान

गुरु तेथे ज्ञान
श्रीगुरुंची अनेकानेक रुपे-स्वरुपें पाहतां पाहतां श्रीगुरु अरुपातच विलीन होऊन राहतात. श्रीगुरु काय ? श्रीगुरु काय ? याची संकल्पना आठवू म्हटले तर शेवटी एवढेच जाणवते - "गुरु तेथे ज्ञान".
मूर्तिमंत आत्मस्वरूपातच गुरुंना पाहावे. ज्ञानाशी अगदी निकट संबंधीत म्हणून जरी श्रीगुरुच्या संदर्भात गणेश, शारदा यांची आठवण, रूपकें झाली, गुरुस्नेहभावावरून जरी आपण त्यांची मायमाऊलीशी तुलना केली, श्रीगुरुला अगदी चित्‌सूर्य म्हटले, तरी पण अखेरीस श्रीगुरुचे माहात्म्य वाचातीत आहे. आणि मग सरते शेवटी एकच तरणोपाय म्हणजे नतमस्तक होणे.
श्रीगुरु सामर्थ्याचे वर्णन करणे आपल्या शक्तिबाहेरचे काम. सूर्याला उटणे लावावे, कल्पवृक्ष टवटवीच्या फुलांनी शृंगारावा, कापराला अन्य सुगंधी द्रव्याने सुगंधीत करावे, चंदनाला लिंबाच्या खोडाची उटी लावावी, हे जसे, जितके हास्यापद आहे, तितकेच काय, पण त्याच्याहून जास्तच थट्टा म्हणजे श्रीगुरुचे शब्दांनी वर्णन करणे.
'विशदबोधविदग्धा', 'विद्यारविंदप्रबोधा', 'संसारतमसूर्या' अशी विशेषणे सुद्धा त्यांचे वर्णन करण्यास असमर्थच. पण ती त्यांच्या ज्ञानदायी सामर्थ्यावर प्रकाश टाकतात एवढे खरे.
श्रीगुरुच्या पाऊलापाशी काय पिकत नाही ? ज्ञानोबाराय एके ठिकाणी म्हणतात - 'पिके सारस्वत तुझिया पाऊली' ! 'पिके' हा शब्दच मुळी नवनिर्मितीसूचक आहे. 'पिकणे' ह्यात सृजनाची, सृजनात नवनिर्मितीची आणि नवनिर्मितीत चेतनाची (ब्रह्मचैतन्याची) गर्भित अशी आशय घनता आहे. आध्यात्म शास्त्रदृष्ट्या गुरु स्नेहाळ माऊलीप्रमाणे परिपुष्ट करणारे आहेतच, पण साधकाच्या सर्व स्तरावरील विकासात, उन्नतीत, सर्वोदयास हातभार लावणारे असतात.
प्रभावसंपन्न, प्रतिभासंपन्न, ऐश्वर्यसंपन्न गुरुमाऊलीच्या, श्रीमंत गुरु‍अंबापदाचे केवळ स्मरणच प्रभुत्व आणि राऱ्याच संपत्तीची निर्मिती अगदी सहज करत असते. स्मरणासरशीच लक्ष्मी-मोक्षलक्ष्मी पायाशी लोळण घेते असा आजवरचा अनुभव आहे.
केवळ आणि केवळ गुरुसामर्थ्यामुळेच प्रापंचिक आणि अध्यात्मिक - पारमार्थिक अशी सगळी उद्दिष्टे साध्य होत असतात असा आपला दृढ विश्वास असावा. एकाच वेळी आत्मज्ञानाची जिज्ञासा आणि प्रपंचाची लालसा तृप्त करण्याचा गुण श्रीगुरुच्या रुपाने अवतरलेला आहे. श्रीगुरुला व्यावहारिक पातळीवरून न पाहता आत्मसत्तेच्या स्तरावरून पाहावे. नाही का ? श्रीगुरु साधकाकडे व्यावहारीक सत्तेतून कधीच पाहात नसतात, तर आत्मभावाने पाहतात. साधक हा कायम साधकच न राहतां तो आपल्यासारखा "गुरु"स्वरूप व्हावा अशी ज्याची तळमळ तो खरा "श्रीगुरु". ही साधक परिपूर्ण व्हावा अशी तळमळ - कळकळ त्या श्रीगुरुच्या सगळ्या कृतीतून, उक्तीतून सारखी, अखंड निथळत असते. साधकांनी पण ही श्रीगुरुच्या अंतरीची आत्मीयता नको का जाणायला ? गुरुप्रेमाला व्यवहाराचा स्तर नाही. आहे तो निखळ - निरपेक्ष अध्यात्मिक प्रेमभाव.

अण्णा -