29 April, 2008

तत्सुखे सुखित्वं

तत्सुखे सुखित्वं

दर्शनाचे तीन प्रकार - १) स्वप्नात प्रभूचे दर्शन - साधारण दर्शन २) मंदिरांत, मूर्तीत दर्शन - मध्यम दर्शन ३) भगवंताचे अपरोक्ष दर्शन - उत्तम दर्शन.
द्रष्टा म्हणजे पाहणारा, भगवंताला पाहतांच भगवत्‌मय होऊन जातो त्याला "उत्तम दर्शन", अपरोक्ष साक्षात्कार असे म्हणतात. भगवंत जगात ओतप्रोत भरला आहे, असा अनुभव घेता घेता जो देवांत विलीन होऊन जातो तोच भगवंताचे परिपूर्ण स्वरूप जाणू शकतो, ओळखू शकतो. भगवंत सर्वव्यापक आहे.
तो मूर्तीत व मंदिरांत आहेच, पण तेवढाच तो नाही. दृष्टी जाईल तेथे तेथे भगवंत आहे, इतकंच काय पण मन जेथे जेथे जाईल तेथे तेथे पण तोच परमात्मा आहे. हेच भगवंताचे "उत्तम दर्शन". जो भगवंत माझ्यात आहे तो सर्वांमध्ये आहे. अखिल जगत भगवंतच आहे.
आपण जे जे कांही करतो ते देवासाठीच करतो अशी भावना असल्यावर त्या सर्व कर्माची परिणतता एका भक्तीतच होते. अशा तन्मय भक्तीने जीव कृतार्थ होतो. गोपी भक्ति मार्गाच्या आचार्या. त्यांचा आदर्श मन, डोळे यांच्यासमोर असावा.
सुखाचा साथी जीव आहे. दुःखाचा साथी भगवंत आहे. नेहमी ही गोष्ट लक्षांत ठेवली पाहिजे. मनुष्य पैसे मिळविण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो, कष्ट करतो, दुःख सोसतो, त्यापेक्षा जरा थोडे तरी प्रयत्न, कष्ट तो एका सच्चिदानंदस्वरूप देवासाठी करील, तर त्याला भगवंताची प्राप्ती निश्चितच होईल.
श्रीकृष्ण तर न बोलावतांही गोपींच्या घरी जात असे. मग तो आपल्या घरीं कां बरे येत नाही ? आपल्या चित्तांत कां ठसत नाही ? याचा विचार कधीतरी आपल्या मनांत येतो का ?
श्रीठाकूरजींना लोणी फार प्रिय. लालाला लोणी फार फार आवडते. उत्तरेत एक वाक्‍प्रचार आहे "लालाको मख्खन भाये रे । कुछ और काम न आये रे ॥" लोणी सर्वाचे सार आहे. भगवंत पण साराचेही सार आहे. आपला भगवान बाळकृष्ण सारभोगी आहे. वैष्णवही सारभोगी असतात.
भक्ति हे प्रेमाच शास्त्र आहे. भक्ति हा पांचवा पुरुषार्थ आहे. परमप्रेमस्पद चिंतनात भान विसरते ती भक्ति. भगवंत हा प्रेमस्वरूप आहे. भक्तिमार्गात वेगळेपणा राहात नाही. विभक्त नव्हे तो भक्त. भक्ताला भगवंताचे, शिष्याला श्रीगुरुचे, रोग्याला औषध- पथ्यपाण्याचे ध्यान असावे. ध्यानाने तन्मयता वाढते, भक्ति-प्रेम भाव वाढतो. भगवंत अशा भक्ति-प्रेमाने ऋणी होतो. भक्ति-प्रेम भावांत हक्काची भावना अंतरात निर्माण करते.’स्व-सुख सुखित्वाला’ तिलांजली देऊन ’तत्सुख सुखित्वाचे’ संवर्धन हीच भक्ति. अशी भक्ति भगवंताने अण्णाला द्यावी हीच त्याच्या चरणी विनम्र प्रार्थना.
प्रभु रामचंद्रांनी राज्याभिषेकाच्या वेळी सर्व वानरांना सप्रेम भेट म्हणून पारितोषिके दिली, पण हनुमंताला कांहीच दिले नाही. म्हणून सीतामाईंना वाईट वाटले. त्या रामाला म्हणाल्या, "मारुतीला पण कांही द्या ना ? " श्रीराम म्हणाले, "त्याला मी काय देऊ ? त्यानेच माझ्यावर किती किती उपकार करून ठेवले आहेत". मारुतराय काय म्हणाले ? "सनमुख होई न सकत मन मोरा । " - म्हणाले, "प्रभू माझं मन कांही आपल्या पुढ्यात सन्मुख होत नाही, तेवढं करा". भक्ति-प्रेमात अपेक्षेचा भाव आला की भक्ति-प्रेम संपलेच. भगवंताने ही अपेक्षेची भावना अण्णाचे मनांतून तडीपार करावी. अपेक्षा असली तर भक्तिनें ती पूर्ण होते पण भगवंत मात्र हातातून निसटून जातो.
शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्ति-सूत्रात म्हटले आहे "तत्सुखे सुखित्वं प्रेमलक्षणम् " - अन्याच्या सुखांत सुख अनुभवणे हे खर्‍या भक्तिप्रेमाचे लक्षण आहे. दयाघन, कृपाळू भगवंताने हा बोध अण्णाला द्यावा हीच प्रार्थना -

अण्णा -

No comments: