15 April, 2008

सुकृतिनो vs दुष्कृतिनो - ३

सुकृतिनो vs दुष्कृतिनो -३

           भगवंतांनी अर्जुनाला सांगून टाकले की, "भ्रांतिरूप प्रपंचाचे ठिकाणी सत्यबुद्धि असणे हेंच अज्ञान." पण ही भ्रांती जीवमात्रावर इतकी दीर्घकालीन राहण्याचे कारण काय ? तर म्हणाले "माया". ही माया इतकी दुष्कर आहे की श्रीकृष्णच स्वतः तिला "दुरत्यया" म्हणतात. या मायेचा प्रभाव जितका जास्त तितका तो मूढ. मूढ का म्हणायचे ? कारण त्रिगुणात्मक मायेतील तमोगुणाचा इतका जबरदस्त पगडा असतो की त्याची बुद्धी अपहृत झालेली असते आणि त्याची बुद्धी ’आसुरं भावं आश्रिता’ झालेली असते. गीतेच्या १६ अध्यायात सांगितलेले सर्वच आसुरी संपदेचा तो धनी असतो. तो नर नाही, त्याला भगवंतांनी नराधम म्हटले आहे. चोराला पोलिस जसा शत्रू तसा परमात्मा म्हणजे शत्रूच. तो म्हणतो कोण भगवान ? तो तर म्हणतो ’ईश्वरो अहं, सिद्धो अहं बलवान् अहं, को अन्योऽस्ति सदृशो मया ? (गीता १६.१४) असा माणूस भगवंताचे भजन ते काय करणार ? तो कोणतेही चांगले कृत्य करूच शकत नाही. त्याला म्हणतात दुष्कृतिनो.
          मग सुकृतिनो कोण ? त्याच्यावर मायेचा प्रभाव नसतो का ? असतो. पण त्याच्यात मायेच्या तीनगुणांपैकी रजोगुण व सत्त्वगुण यांचाही अंश असतो. रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एकदा एक माणूस जंगलातून कुठेतरी जात असतो. अचानक त्याच्यासमोर तीन डाकू येतात आणि त्याचे सर्वकाही लुबाडून घेतात. नंतर तिघे आपापसात चर्चा करतात की आता ह्याचे काय करायचे ? एक म्हणतो की याला ठार करू आणि निघून जाऊ (तमोगुणी, क्रूरता भिनलेलीच असते.) दुसरा म्हणतो की ठार करायची काय गरज आहे. हा एकटा आपले काय करणार आहे ? (रजोगुणी) तिसराही त्याला सहमत असतो म्हणून पहिल्याला ’हो’ म्हणावे लागते. त्या वाटसरूला ते बांधून निघून जातात. पण थोड्या वेळाने तिसरा परत येतो, त्याला म्हणतो, ’अरेरे ! तुला खूप त्रास दिला आम्ही.’ (सात्त्विक) असे म्हणून त्याला सोडतो आणि म्हणतो चटकन् निघून जा. इथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की प्रत्येकात कमीजास्त प्रमाणात तिन्ही गुण असतातच. ज्या गुणाचे प्रमाण अधिक तो त्या गुणाचा असे समजावे. या तिघांवरही मायेचा निरनिराळा प्रभाव असतो.गीतेत दुष्कृतिनोची व्याख्या केलेली आहे पण सुकृतिनोचे स्पष्टीकरण नाही. याचा अर्थ घोर , नराधम यांना सोडून इतर सर्व सुकृतिनो म्हणायला हरकत नसावी असे दिसते. रजोगुणी व सत्त्वगुणी देखील वेळप्रसंगी खोटे बोलणे, चोरी, लबाडी करतातच. पण तो त्यांचा स्थायी भाव नव्हे. असे लोक कधी कधी भगवंतांची आठवण, आराधना वा भजन करतात. म्हणजे सुकृतही करतात. गीता ७.१६ इथे त्यांची वर्गवारी करून त्यांचे चार प्रकार सांगितले आहेत. त्यांना भक्तिचे अधिकारी म्हटले आहे. अशांच्या आयुष्यात ’यदृच्छया’ असे काही प्रसंग येतात की त्यांची भक्तीमार्गाकडे वाटचाल सुरू होते. मग दुष्कृतिनो यांना अधिकार नाही का ? तर असे नाही. त्यांना अधिकारी म्हटले नसले तरी अनधिकारी असेही म्हटलेले आढळत नाही. कारण गीता ९.३० मध्ये भगवान् म्हणता ’अपि चे सुदुराचारो भजते मां अनन्यभाक्’ त्यांच्याही आयुष्यात कधी ’यदृच्छये’ने कृपा होतेच. पण त्यांना मोजावे लागणारे दामही तेव्हढेच खडतर असते असे दिसते. दोन उदाहरणे पाहू - वाल्याचा वाल्मिकी होणे आणि कुबेरपुत्र नलकूबर - मणिग्रीव बंधूंना श्रीकृष्णाचे साक्षात दर्शन घडणे. पण त्यासाठी वाल्याला अंगावर वारूळ उठेपर्यंत तप करावे लागले आणि नलकूबर-मणिग्रीव बंधूंना देवांची शंभर वर्षे यमलार्जुन वृक्ष बनून उभे राहावे लागले.
 

No comments: