29 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८३

श्लोक ८३
समावर्तोऽनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमः ।
दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिहा  ।।
(७७) समावर्त :  - कुशलतेने सम्यक आवर्तन करणारा. आवर्तन म्हणजे फिरविणे. संसारचक्राचे (जीवनचक्राचे) योग्यतर्‍हेने आवर्तन करणारा. जन्ममृत्यूचे सतत फिरणारे चक्र म्हणजेच संसारचक्र व ते चक्र ज्या नियमांनी फिरते तो नियम दुसरे कोणी नसून स्वतः भगवंतच आहे. तो नियम त्या नियमांचा कर्ता भगवंत श्रीनारायणच आहे.
(७७) निवृत्तात्मा :  - ज्याचे मन इंद्रिय विषयांच्या आसक्तिमधून निवृत्त झाले आहे असा. मुंडकोपनिषदांतील दोन पक्ष्यांच्या सुप्रसिद्ध रूपकाची येथे आठवण येते. अत्यंत निकटचे सख्यत्व असलेले दोन पक्षी एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत. पैकी एक झाडाची फळे आवडीने खात आहे व दुसरा न खांताच निरिक्षण करत आहे. त्या पैकी दुसरा निवृत्तात्मा आहे. काही टिकाकार या संज्ञेची फोड 'अ-निवृत्तात्मा' अशी करतात. त्याप्रमाणे अर्थ होईल जो कधीही कशातूनही निवृत्त होत नाही, परंतु प्रत्येकात  समाविष्ट होतो असा. आत्माच सर्व आहे, सर्व प्राणीमात्र तोच आहे, तोच परमात्मा श्रीनारायण आहे.
(७७) दुर्जयः :  - अजिंक्य. जो कोणाकडूनही जिंकला जात नाही असा. आपल्या पैकी बहुतेक व्यक्तींमध्ये सामान्य वासनांचे प्राबल्य असले तरी हळूहळूं कालगतीमुळे शेवटी उन्नत ध्येय विचार प्रबल होऊ लागतात आणि आपण अवशतेनें परमात्म्याकडे ढकलले जातो. कित्येकवेळां लढाईमध्ये हार खावी लागते परंतु युद्धातील अंतिम विजय मात्र आपल्या हृदयातील भगवंताचाच असतो.
(७७) दुरतिक्रमः :  - ज्याची कधीच अवज्ञा करतां येत नांही असा. पूर्ण वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित अशा विश्वाचे निरिक्षण केले असता. जे सत्य प्रतीत झाले त्याच्याच निर्देश या संज्ञे मध्ये केला आहे. व ते सत्य आहे की कुठलाही जीव अगर वस्तू त्या भगवंताची आज्ञा मोडण्याचे धाडस करूं शकत नाही.  [1]कठोपनिषदामध्ये ऋषी म्हणतात, त्याच्याच भयानें अग्नि प्रज्वलित होतो त्याच्याच भयानें सूर्य प्रकाशतो, इंद्र व वायु त्याच्याच भयाने आपापली कामे करतात व पांचवा मृत्युही त्याच्याच भयाने धावतो (कार्य करतो). जणू कांही त्यानें प्रत्येकांचे मागे वज्र उगारलेले आहे. अतिक्रम म्हणजे ओलांडून जाणे. अर्थात् दुरतिक्रम म्हणजेच ज्या अवस्थेच्या पलिकडे कोणालाही जाता येणार नाही अशी अवस्था म्हणजेच श्रीनारायण. कारण तो सर्व उत्क्रांतीचे अंतिम व एकमेव ध्येय आहे. तो सर्वांच्या पलीकडील अंतिमसत्य असून त्याच्या पलीकडे प्राप्तकरून घेण्यासारखी कुठलीही अवस्था नाही.
(७७) दुर्लभः :  - अत्यंत परिश्रमाने ज्याची प्राप्ती होऊ शकते असा. आध्यात्मिक परिपूर्ण अवस्था, हे उत्क्रांतीचे ध्येय श्रीनारायणच आहे. हळूहळू होणार्‍या असंख्य उत्क्रांती नंतरच त्याची प्राप्ती होत असते. उत्क्रांतीमध्ये अत्यंत सूक्ष्म व नगण्य अशा एक पेशीय जीवापासून हळूहळू उत्क्रांत होत मनुष्याची अवस्था निर्माण झाली आहे व यापुढे मनुष्याची बौद्धिक उन्नत अवस्था म्हणजेच देवत्व होय. निरंतर व सतत केलेल्या प्रयत्नांचे फल म्हणूनच हे सुबुद्ध मनुषत्वाचे बक्षिस प्राण्यास प्रदान केले गेले आहे. त्यानंतर स्वार्थरहित सेवा बुद्धिने कर्म करणे, भावपूर्ण अंतःकरणाने भक्ति करणे, खूप खोल असे अध्यात्मिक ग्रथांचे अध्ययन करणे, यांचे सहाय्याने मनुष्य आपल्यातील लौकीक वासनांपासून स्वतःस परावृत्त करण्यास शिकतो व शेवटी प्रत्यक्ष प्रतीतीस येणारे दिव्य भगवत स्वरूप प्राप्त करतो. खरोखर नारायण स्वरूपाचा हा साक्षात्कार कष्ट साध्य असल्याने दुर्लभच आहे.
(७७) दुर्गमः :  - ज्याचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे असा.[2] भागवतात उल्लेख आहे की भगवंत प्राप्त करून घेणे अत्यंत सोपे आहे (अदुर्गम). ज्यानी समर्पित वृत्तीने अद्याप खोल ध्यान करण्याची पात्रता मिळवलेली नाही, आपल्या अंतःकरणाचा विकास केकेला नाही व शुद्धि प्राप्त केली नाही, ज्यांनी गुरुकडून अगर स्वतः शास्र वाचून केवळ ज्ञा मिळविले तरी अशा अपरिपक्व बुद्धिच्या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया होते की हे फारच कठीण आहे. परंतु तो जसजसा आपल्या साधनापथावरून पुढे जावू लागतो तसतसे त्याला मार्गदर्शन मिळते व ’पुढे चल’ अशी आणकीही पुढे जाण्याची प्रेरणाही मिळते, एक उदार तेजस्वी चेहरा त्याच्या दृष्टोप्ततिस येतो आणि त्याचा कृपाळू, दयार्द्र प्रकाश त्याला सर्व अडजणी व संकटातून सुरक्षितपणे त्याच्या ध्येयाकडे नेतो. सामान्य दिव्याचा प्रकाश वाटसरूचा फारतर १५-२० फुटापर्यंतचा मार्ग प्रकाशित करूं शकतो. परंतु एकावेळेला १-२ मैलाचा मार्ग तो प्रकाशित करूं शकणारच नाही. तरीही त्याने मार्गक्रमणा सुरू केलीच पाहिजे व जितके दृष्टिपथात आहे तितके चालत राहिले पाहिजे. तो जसा पुढे जाईल तसा त्याचा पुढचा मार्ग प्रकाशित केला जातो.
(७७) दुर्गः :  - आंत प्रवेश करण्यास कठीण असा. संस्कृतमधील या संज्ञेचा अर्थ होतो अभेद्य किल्ला. व या अर्थानें असे सुचविले जाते की ते परमतत्व श्री नारायण प्राकृतिक आवरणाने व त्याच्या मोहमयी प्रभावाने झाकले गेले आहे व त्याच्याकडेच आकर्षित झाल्याकारणानें आपले सर्व लक्ष आवरणातील सुखसंवेदनेतच गुंतून राहिले आहे. ही आवरणांची भुलविणारी शक्ति म्हणजेच बलवान माया होय. फारच थोडे धैर्यवान व कृपाप्राप्त लोक तिच्या पलीकडे जा शकतात. भगवंत स्वतःच गीतेत म्हणतात, ' माझी माया ओलांडून जाणे कठीण आहे. 'मम माया दुरत्यया ।' उपनिषदे म्हणतात, 'ते परमसत्य नारायण कुठल्याही इंद्रियांनी जाणले जावू शकत नाही, मनाच्या कल्पनेनें त्याचे आकलन होत नाही किवा बुद्धिच्या तर्कानेंही तो समजत नाही. ही सर्व आपल्या ज्ञानाची साधने आहेत.व त्यांना सत्यज्ञान होणे अगदी अशक्य आहे. जेव्हा कोणी एखादाच आपले प्राण पणाला लावून त्या आवरणांवर हल्ला करतो तेंव्हाच तो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जो बहिर्मुख आहे त्याला ते परमपद एकाद्या दुर्भेद्य किल्ल्याप्रमाणे भासते. या संज्ञेचा सरळ अर्थ, आपल्या अंतर्यामी असलेला श्रीनारायण आपल्याला सहजतेने ज्ञात होणार नाही.
(७८०) दुरावासः :  - ज्या ठिकाणी वास करणे, रहाणे सुलभ नाही असा. अत्यंत प्रामाणिकपणे व सतत प्रयत्न करणार्‍या महान् साधकाच्याही हृदयांत तो स्थिरतेने स्थापित झालेला आढळत नाही. कारण सुखसाधन असलेल्या विषयांपासून मन परावृत्त करणे व चैतन्याचा ध्यास घेऊन तिथेच स्थिर रहाणे ही गोष्ट बिलकुल सोपी नाही. योगी साधकांनाही अत्यंत नेटाने केलेल्या ध्यानांतही त्या नारायणांस स्थिरतेनें धरून ठेवणे कठीण भासते म्हणूनच त्यास 'दुरावास' ही संज्ञा प्राप्त झाली आहे. म्हणूनच गीतेमध्ये अर्जुन अत्यंत विषादाने म्हणतो, 'मन अत्यंत चंचल असल्यानें हे मधुसूदना, हा जो तू समत्वाचा योग सांगीतलास तो आचरण्यास, मनांत स्थिर करण्यास अत्यंत कठीण आहे. आणि भगवंतही त्याच अध्यायांत सांगतात की निर्वात स्थळीच्या दिव्याप्रमाणे अगदी न हलणारे स्थिर असे ध्यान असले पाहिजे.
(७८) दुरारिहा :  - असुर, दुष्प्रवृत्तींच्या लोकांचा नाश करणारा. आपल्यातही जे कोणी आपला चांगुलपणा स्थिर करू शकत नाहीत त्यांच्या दुष्टपणाचा नाश तो भगवंत कृपामय असल्यानें करतो आणि त्यांना दुष्कृत्यांच्या वाईट परिणामांपासून वाचवितो. प्रत्येक साधकाच्या अंतःकरणांत असुर-दुष्ट प्रवृत्ती असतातच. परंतु भक्तिने त्याला आवाहन केल्यास तो अंतःकरणातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट करून टाकतो. त्यामूळे त्याला दुरारिहा ही सार्थ संज्ञा मिळाली. 
डॉ. सौ. उषा गुणे.



   द्वा सुपर्णासयुजा सखया समानं वृक्षं परिषस्वजातं ।
    तयोरन्यः पिप्पलं स्वाद्वत्यनश्नन्नन्यो अभिचाकशीति । मुंडक ३-१ ।।
[1]   भयादस्याग्निस्तपतिभयात्तपति सूर्यः  । भयादिंद्रश्च वायुश्चमृत्युर्धावतिपंचमः ।। कंठोपनिषद २-३-३
[2]   दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति । कठोपनिषत् १.३.१४
   यथा दीपो निवातस्थोनेङ्गते सोपमा स्मृतः  योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः (गीता ६.१९)

26 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८२

श्लोक ८२
चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्युहश्चतुर्गतिः 
चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात्  ।।
(७६) चतुर्मूर्तिः :  - चार प्रकारचे आकार, मूर्ति असलेला. नित्य अनंत असे परमतत्व जेव्हा विश्वरूपानें प्रकट होते तेंव्हा चार प्रकारांनी प्रकट होते. पुराणांतरी म्हटले आहे की भगवंताच्या अवतारांनी वेगवेगळया युगांत वेगवेगळे  रंग धारण केले. ते असे कृत युगांत पांढरा, त्रेता युगांत लाल, द्वापार युगांत पिवळा, व कलीयुगांत काळा. परंतु वेदांताच्या विचाराप्रमाणे प्रत्येक व्यक्तिच्या जीवनात परमात्मा चार अवस्थामधून व्यक्त होतो. याप्रमाणे जागृत, स्वप्नद्रष्टा, सुषुप्त व शुद्ध चैतन्यस्वरूप. व्यष्टिमध्ये त्यांनाच म्हटले आहे विश्व, तैजस, प्राज्ञ व तुरीय. तसेच समष्टिमधील स्थूल, सूक्ष्म व कारण देहांची नांवे आहेत विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर अनुक्रमे व या तीनही देहांपलीकडे असलेला तो सनातन परमात्मा चतुर्मूर्ति होय.
(७६) चतुर्बाहुः :  - त्या परमात्मा श्री नारायणाला चार बाहू आहेत असे सुवविले आहे. मनुष्याच्या अंतरंगातील चार घटक मन बुद्धि चित्त व अहंकार हे त्या चार बाहूनी दर्शविले आहेत. ह्याच चार घटकांचे मार्फत शरीरातील सर्व व्यवहार नियमीत केले जातात, सुरळीत व योग्य तर्‌हेने केले जातात.
(७६) चतुर्व्यूहः :  - भगवंत स्वतःस चार व्यूहामधून क्रियाशील केंद्रस्वरूपात प्रकट करतात. व्यूह म्हणजे असंख्य सामान्य व्यक्तिंनी विशिष्ठ उद्देशाने केलेले कार्यप्रवर्तन (भोवरा), जे एका केंद्रवर्ती व्यक्तीच्या अधिपत्याखाली चालविले जाते. म्हणून त्यांना चतुव्यूह म्हटले आहे. ज्याप्रमाणे एकादी सेना आपल्या सेनापतीच्या अधिपत्याखाली त्याने नेमून दिलेल्या क्षेत्रात काम करते त्याप्रमाणे हे समजायचे एका रूपकाप्रमाणे असे असे दाखविले आहे की [1] 'ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या सर्वकार्याला प्रेरणा देतो, वैश्विक शक्तिच्या रूपाने प्रकट होतो व मानवीय संबंधात त्यांना आशिर्वाद देतो त्यांच्या सत्कृत्यांत त्यांना आशीर्वाद देतो व सर्व कार्यात शक्तिेह प्रदान करतो. ऐतरेयोपनिषदामध्ये या चार व्यूहांना म्हटले आहे (१) शरीरांत रहाणारा तो शरीर पुरूष, मंत्रामध्ये (छंदामध्ये) रहाणारा तो छन्दपुरूष, वेदरूपाने असलेला तो वेदपुरूष व चौथा महापुरूष.
(७६) चतुर्गतिः :  - चारही वर्ण आश्रमांची अंतिम गती. जरी बाह्यात्करी मनुष्यांचे प्रत्येक वर्गाचे, त्यांच्या कार्याचे, वर्णाचे ध्येय वेगवेगळे दिसत असले तरी शेवटी श्रीनारायणच अपरिहार्यपणे सर्वांचे ध्येय-गति आहे. तत्वचिंतक(ब्राह्मण), शासक किवा अग्रणी (क्षत्रिय), व्यापारी उद्योगी (वैश्य) व सामान्य कामे करणारे (शूद्र) हे चार वर्ण होत. तसेच विद्यार्जन करणारा (ब्रह्मचारी), कुटुंबाचे पालनपोषण करणारा- (गृहस्थ), निवृत्तीचे जीवन जगणारा (वानप्रस्थी) व सर्व संग त्याग करणारा (संन्यासी) या चार अवस्थांचे (आश्रमांचे) गंतव्य आहे श्री नारायण.
(७६) चतुरात्मा :  - कांही ठिकाणी पाठभेदानें चत्वरात्मा असेही म्हटले जाते. प्रथम चतुरात्मा या संज्ञेप्रमाणे अर्थ होईल ज्याचे मन अत्यंत शुद्ध आहे असा. श्री नारायणाचे अंतःकरण राग, आसक्ति, मद  इत्यादि विकारांनी रहित, अहंकाराच्या कुठल्याही दुःखकारक छटेनें न रंगलेले असे आहे तो त्याचा ’स्व’भाव आहे म्हणून तो चतुरात्मा - चत्वरात्मा या संज्ञेप्रमाणे अमर्याद तेजस्वरूप श्री नारायण अंतःकरण चतुष्ट्यरूपाने मनुष्याच्या अंतर्यामातून प्रगट होतो.
(७७०) चतुर्भाव :  - चारभावांचे उगमस्थान. त्याचेपासून चार वर्ण; आयुष्यातील चार अवस्थांचे चार आश्रम, मनुष्यांची चार ध्येये (पुरुषार्थ) हे भाव निर्माण झालेले आहेत. सनातन र्म शास्त्रानुसार चार पुरुषार्थ येणेप्रमाणे -  नीतिनियमानें वागणे म्हणजेच धर्मपुरुषार्थ होय. अर्थोत्पादन हा अर्थपुरुषार्थ. सर्व तर्‍हेच्या आनंदाची कामना काम पुरुषार्थ व आध्यात्मिक प्रगतीचा प्रयत्न करणे हा मोक्ष पुरुषार्थ होय. श्रीकृष्ण स्वतःच गीतेमध्ये सांगतात चारही तर्‍हेची उत्पत्ति माझेपासूनच झाली आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः
(७७) चतुर्वेदवित् :  - चारही वेदांचा ज्ञाता. चारही वेदांचा प्रतिपाद्य व चर्चेचा विषय आहे श्रीनारायण.  ज्यावेळी वेदवाङ्‌मयाच्या विद्यार्थ्याला त्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते तेंव्हाच त्याची ज्ञानसाधना पूर्ण होते. त्याच अर्थांने भगवंत गीतेच्या १५व्या अध्यायांत म्हणतात जे सर्व वेदांनी जाणण्यास योग्य ते मीच आहे. मीच वेदांचा कर्ता आहे व वेदांचा [2]ज्ञाताही मीच आहे.
(७७) एकपात् :  - एकपाय असलेला. संस्कृतमधील पाद शद्बाचे दोन अर्थ होतात. (१) अंश व (२) पाय. भगवान गीतेमध्ये पहिल्या अर्थानें शद्ब वापरून आपल्या विभूतिंचे वर्णन करतांना म्हणतात, 'संपूर्ण विश्व हे माझ्या एका अंशाचे आधारानें [3] राहिलेले आहे. तैतिरीय आरण्यकात एक संदर्भ आहे व तो दुसर्‍या अर्थाचे (पाय) स्पष्टिकरण करतो. सर्व प्राणीमात्र हे त्याचे पाय आहेत. याच अर्थाने गीतेनेही विवेचन केले आहे. संपूर्ण ब्रह्मांडाच्या एकत्रित सामर्थ्यापेक्षाही तो महान आहे त्यामुळे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. तो अनंत सत्‌स्वरूप आहे.

डॉ. सौ. उषा गुणे.



[1]    ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ - ईश्वर सर्व जीवांच्या हृदयात राहतो व हे अर्जुना ! तो आपल्या मायेने सर्व प्राणिमात्रास यन्त्रावर आरूढ झाल्याप्रमाणे भ्रमण करावयास लावतो.
 शरीरपुरूषश्छंदः पुरुषो वेदपुरुषो महपुरुषो – ऐतरेयोपनिषद् ३.२८
 गुणकर्मांच्या विभागणीनुसार चारही तर्‍हेचे वर्ण माझेकडून निर्मित झाले आहेत.
[2]   वेदांतकृत् वेदविदेव चाहम्  । गीता १५-१५
[3]   'विष्टभ्याहमिदं कृत्स्नं एकाशेन स्थितोजगत् । गीता १०-४२.

23 October, 2011

श्री विष्णु सहस्रनाम श्लोक ८१

श्लोक ८१
तेजोवृषो द्युतिधरः सर्वशस्रभृतांवरः 
प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकश्रृंगो गदाग्रजः  ।।
(७५) तेजोवृषः :  - जो तेजाचा वर्षाव करतो तो. बाह्य जगतात सूर्यच तेज उष्णता देतो त्यामुळे पाउस पडतो व त्यातूनच कृषी शक्य आहे. जरी प्रत्यक्ष सूर्य त्यात भाग घेत नाही तरी कार्यकारण भावानें तोच कर्ता म्हणविला जातो. त्याच प्रमाणे केवळ आपल्या अस्तित्वानें प्रत्येक प्राणीमात्रांचे अनुभव प्रकाशित करणारा श्रीनारायण आहे तोच आत्मस्वरूपानें तेजाचा वर्षाव करणारा आहे.
(७५) द्युतिधरः :  - द्युति या शद्बानें सौंदर्यातील तेजस्विता व आकारातील सामर्थ्य निर्देशित केले जाते. म्हणून या संज्ञेचा अर्थ होइल ज्यानें दिव्य आकार धारण केला आहे तो. तसेच ही संज्ञा सुचविते की शुद्ध जाणीव हीच तेजाला प्रकाशाला धारण करणारी असते व याच आत्मप्रकाशामुळे जीवांना आपल्या संवेदना, भावना व विचार यांचे ज्ञान होते.
(७५) सर्वशस्रभृतांवरः :  - शस्र चालविणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ. पुराणांमध्ये नारायणाचे वर्णन सुदर्शन चक्रधारी असे केलेले आहे. सुदर्शन चक्र हे सर्वात्कृष्ठ शस्र असल्याने ही संज्ञा त्याला योग्यच ठरते. पण तो आपले शस्र अविवेकाने कधीच चालवित नाही कारण त्याचे प्रत्येक कार्य न्यायपूर्ण असते. निसर्गामधील प्रत्येक विध्वंस हा 'विधायक विध्वंस' या स्वरूपाचा असतो म्हणूनच नारायणाच्या शस्त्रास 'सु-दर्शन' असे म्हटले आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये पूर्णता येत असतांना हळूहळू पण अनिवार्यपणे साधकाला उमजू लागते की त्याच्या अंतर्यामी राहून कोणीतरी त्याचे बाह्य जगताचे संबंध नष्ठ करीत आहे व उच्चतर अवस्थेकडे जाण्यास भाग पाडीत आहे. आपले पौराणिक वाङ्‌मय अशा उदाहरणांनी परिपूर्ण आहे. व त्या सर्व ठिकाणी श्रीनारायण आपले सुदर्शन मनुष्याच्या दुष्ट प्रवृत्ती विरूद्ध चालवितो व त्याला मोक्ष प्रदान करतो. म्हणजेच दिव्यदृष्टि सुदर्शन देतो. इतर लोक ज्यावेळी संहार करतात तेंव्हा तो केवळ विघातक असल्यानें दुःखदायक असतो. परंतु भगवंताचा संहार विधायक असल्यानें तो शस्र धारण करणार्‍यांमध्ये श्रेष्ठ आहे हे साधकाच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.
(७६०) प्रग्रहः :  - जगातील कुठल्याही जातीधर्माच्या, कुठल्याही भक्तानें, केव्हांही केलेली प्रार्थना पूजा ग्रहण करण्यास सर्वथैव योग्य असा तो श्री नारायण प्रग्रह आहे. भक्त स्वतःच्या संप्रदायाप्रमाणे त्याच्या संस्थामधून सुचविल्याप्रमाणे प्रतिकांमार्फत अगर धर्मग्रथांच्या आदेशानूसार भगवंताला आवाहन करीत असतो. तो कुणीही असला तरी तो जेव्हा आपल्या शरीर, बुद्धि, मन इत्यादि साधनांच्या पलीकडे जातो तेंव्हा त्याला आत्मस्वरूपाचा अनुभव येतो तो सर्वत्रिक व एकच स्वरूपाचा असतो. तो असतो परमात्म्याच्या व्यापकतेचा व नित्यतेचा. श्रीनारायणच आत्मस्वरूप असल्यानें तो सर्वत्र पूजा प्रार्थना ग्रहण करणारा आहे मग ती प्रार्थना करणारा मनुष्य असो, इतर प्राणी असोत वा वनस्पती असोत, त्यांनी केलेली प्रार्थना समजून केलेली असो वा नसो ती प्रार्थना तो ग्रहण करतो म्हणून तो 'प्रग्रह'.
     तसेच प्रग्रह या संस्कृत शद्बाचा अर्थ होतो 'लगाम'. ज्याच्यामुळे घोडयावर नियंत्रण ठेवता येते. यादृष्टिने विचार करू लागल्यावर आपल्या डोळयापुढे ताबडतोब उपनिषदांतील रूपक येते. या रूपकामध्ये मनाला लगामांची उपमा दिलेली आहे व हे लगाम इंद्रियांचे बलवान् लढाउ घोडे आवरून धरतात, नियमित करतात. येथे भगवंतालाच 'प्रग्रह' म्हणून आवाहन केले आहे. मग भक्तांना आपली इंद्रिये नियमित करण्याकरतां वेगळी खटपट करावी लागतच नाही. भक्ताचे मन भगवंताच्या पायाशी भक्तिनें लीन झालेले असले म्हणजे भगवंत स्वतःच आपल्या सामर्थ्यानें पण भक्ताला नकळत हे कार्य आपल्या भक्तांकरतां करत असतो, म्हणूनच खरा भक्त अनन्य होऊन भगवंताला शरण जातो व आपल्या मन इंद्रियांना आवरण्याची विनंती करतो.
(७६) निग्रहः :  - नष्ट करणारा. नाश करणारा भगवंत. ह्या कल्पनेचा अपरिपक्व विद्यार्थ्यास धक्काच बसेल! परंतु ते खरे आहे. फरक इतकाच आहे की तो 'अहंकार ' नष्ट करणारा देव आहे. ज्याप्रमाणे एकादा डॉक्टर रोग नष्ट करतो, सूर्य अंधःकार नष्ट करतो, किवा ग्रीष्म ऋतु थंडी नष्ट करतो तसा तो अहंकार नष्ट करतो. व त्याच बरोबर साधकाचे अहंकेंद्रित विकार, मर्यादा नाहीशा करतो. ही संस्कृत संज्ञा सुचविते की तो भगवंत आपल्या भक्ताला स्वतःमध्ये पूर्णतः सामावून घेतो. (निःशेष ग्रहणम्) एकादा भक्त आपले लौकीकामध्ये पूर्ण आसक्त झालेले मन त्या जगापासून निवृत्त करून जेव्हा थोडेसे तरी स्वस्वरूपाकडे वळवायचा प्रयत्न करतो तेंव्हा तो भगवंत भक्ताचे मन स्वतःच्या सौंदर्याकडे व सामर्थ्यामध्ये जास्त जास्त रमवायचा प्रयत्न करतो व शेवटी त्या व्यक्तिला शुद्ध चैतन्यामध्ये पूर्णपणे विलीन (नि-ग्रह) करून घेतो.
(७६) व्यग्रः :  - जो सतत भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यांत गुंतला आहे असा. मनुष्याच्या मनांत जेव्हा अपूर्णता असते तेंव्हा इच्छा उत्पन्न होते. भगवान श्रीनारायणाचे रूप परमशांत व आनंदपूर्ण आहे. त्यामुळे तेथे कुठलीच अशांतता नाही कारण मुळात कुठलीच इच्छा नाही, तो मात्र इच्छापूर्ती करण्यात व्यग्र आहे.
(७६) नैकश्रृंगः :  - ज्याला अनेक शिंगे आहेत असा. आधुनिक विचारांच्या विद्यार्थ्याला अनेक शिंग असलेला देव ही कल्पनाच मोठी विलक्षण व हास्यास्पदही वाटेल व त्याची पूजा करणे त्याहून मूर्खपणाचे वाटेल. त्याला तीन पाय आहेत हे वाचून तर आश्चर्याने तो थक्कच होऊन जाईल. (चत्वारो शृंगाः त्रयोअस्य पादाः) ( महा उप.) परंतु ही साहित्यिक कल्पना त्याला धक्का देउ शकली तर त्याची बुद्धि आणखी खोल विचारणा करू लागते. ही चार शिंगे म्हणजे जाणीवेच्या चार अवस्था आहेत. व त्या म्हणजे जागृत, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या. तुर्या अवस्थाही शुद्ध जाणीवेची अवस्था होय. तीन पाय म्हणजे जाणीवेच्या स्थूल - सुक्ष्म - कारणदेह या तीन अवस्था ज्याच्यामध्ये आपणसध्या भटकत आहोत.
(७६) गदाग्रजः :  - गदाचा मोठा भाऊ. 'गद' नावाचा श्री कृष्णाचा एक धाकटा भाऊ होता. तसेच गद म्हणजे मंत्र. (गायते इति गदः) व ते मंत्र म्हटले जातात. टिकाकार सांगतात 'निगद' म्हणजे मंत्र परंतु त्यातील 'नि' हे उपपद जाऊन नुसते 'गद' राहिले त्याचाही अर्थ होतो 'मंत्र' म्हणून 'गदाग्रज' या संज्ञेचा अर्थ होईल त्याचे मंत्राने आवाहन केले जाते किवा जो मंत्राने प्रसन्न होतो तो.
डॉ. सौ. उषा गुणे.