श्लोक ७६
भूतोवासो वासुदेवः
सर्वासुनिल योऽनलः ।
दर्पहा दर्पदो
द्दप्तो दुर्धरोऽथापराजितः ।। [1]
(७०८) भूतावासः :
- पंचमहाभूतांचे प्रमुख आश्रयस्थान. 'सर्व जीवमात्र तुझ्यामध्येच
वास करतात म्हणून तुला [2]भूतावास
असे म्हणतात.' अशा प्रकारचा उल्लेख हरिवंशात आला आहे. भगवंत स्वतःच गीतेमध्ये
म्हणतात, 'मी सर्वांचे उप्तत्तिस्थान आहे.'[3]
म्हणून तो भूतावास आहे.
(७०९) वासुदेवः :
- जो आपल्या मायेच्या आवरण व विक्षेप या शक्तिंनी सर्व विश्वास व्यापतो तो
वासुदेव. भगवंत स्वतःच स्पष्ट करतात की 'ज्याप्रमाणे
सूर्य आपल्या किरणांनी सर्व विश्व व्यापतो त्याप्रमाणे मी विश्व व्यापतो.'[4]
(७१०) सर्वासुनिलयः :
- सर्व जीवनशक्तिंचे आश्रयस्थान. तो सर्व
प्राणीमात्रांच्या अस्तित्वाचा, जीवनाचा आधार आहे. तो आत्मा आहे म्हणजेच आपणातील 'जीवन'
तोच आहे. म्हणून प्रत्येक प्राण्यातील प्राणांचा आधार तोच आहे. (असु = प्राण)
(७११) अनलः : -
ज्याच्या वैभव, सामर्थ्य व ऐश्वर्यास मर्यादा नाही असा तो अनल. (अलं - पर्याप्ति) त्याच्या
विभूतींना अंत नाही व त्याची महानता अमर्याद आहे. स्वभावतःच तो सर्व
नामरूपादींच्या पलीकडे व सर्वव्यापी आहे. भगवंत गीतेत सांगतात – माझ्या दिव्य विभूतिंना अंत
नाही.[5]
(७१२) दर्पहा :
- दुर्जनांचा गर्व नाहीसा करणारा. यमुना नदीच्या तीरावर रहाणार्या गोपांचे व त्यांच्या गाईंचे
रक्षण करण्याकरतां त्याने गोवर्धन पर्वत सहजतेनें उचलला व सहजच इंद्राचे गर्वहरण केले.
(७१३) दर्पदः :
- जे नीतीने वागतात त्यांना अभिमान देणारा. जे नीतीमान् व गुणसंपन्न आहेत
त्यांच्यामध्येही, धर्मशील व गुणवंतांमध्येही आपण
सर्वश्रेष्ठ व्हावे अशी प्रबल आकांक्षा निर्माण करतो. हा अभिमान हेच त्याचे बल
असते व त्याच्याच आधाराने नीतीचे बाबतीत कुठलीही तडजोड न करतां ते निश्चयाने वागू शकतात. हा श्रेष्ठ
तर्हेचा आत्मगौरव आहे. कांही पाठभेदांप्रमाणे अ-दर्पदः असे म्हटले आहे. व या
संज्ञेप्रमाणे जो आपल्या भक्तांना कधीही गर्विष्ठ होऊ देत नाही तो अदर्पदः. अशाप्रकारे जे भक्त आपले
सर्व गुण त्याच्यापायाशी समर्पित करतात व केवळ त्याच्या हातातील एक साधन होऊन रहातात ते अर्थातच आध्यात्मिक अभिमानापासून, त्याच्या
बंधनापासून सोडविले जातात. सत्वगुणाच्या प्राबल्यानें व कर्तुत्व भावनेनें अशातर्हेचा
अभिमान निर्माण होतो व त्यामुळे त्यांचा चांगुलपणा व सत्कार्य गौरवशून्य होण्याचा
धोका असतो.
(७१४) द्दप्तः :
- जो आपल्या सच्चिदानंद स्वभावामध्ये सदैव निमग्न राहून त्या आनंदाचे सदैव
पान करतो असा.
(७१५) दुर्धरः :
- ध्यानामध्ये धारण करण्यास अत्यंत कठीण असा. योगीजनांनी अत्यंत एकाग्रतेने,
सावधतेने व सततच्या तपःश्चर्येनेच त्याला प्राप्त केलेले असते. गीतेमध्ये
भगवंत मान्य करतात की ,[6] ज्यांचे चित्त अव्यक्तावर केन्द्रित झालेले आहे
त्यांना जास्त क्लेश सहन करावयास लागतात. देहधारी व्यक्तींना अव्यक्तरूस्वरूप
प्राप्त करणे अत्यंत कठीण आहे.
(७१६) अपराजितः :
- कधीही पराभूत न होणारा. 'अपराजितत्व' हे त्या
परमात्म्याचे वैभव आहे. कारण केवळ विषयच जिंकले जातात.
ते जाणणारा ज्ञाता कधीही जिंकला जात नाही. तो सत्यस्वरूप आत्माच असल्याने इंद्रिये व त्यांच्या देवताही त्याला जिंकू शकत नाहीत. फारकाय अत्यंत प्रबळ
इंद्रिये व त्यांच्या राक्षसी वासना जरी त्याच्या विरूद्ध संघर्ष करण्यास उभ्या
राहिल्या तरी त्या आत्मस्वरूप नारायणाला कधीही जिंकू शकत नाहीत.[7]
डॉ. सौ. उषा गुणे.
[1]
दुर्धरः
अथ अपराजितः ।
[2] वसन्ति त्वयिभूतानि भूतावासस्ततो
भवान् । हरिवंश २७९-५२
[3]
अहं सर्वस्य प्रभवः । (गीता ८-८)
[4]
छादयामि
जगद् विश्वं भूत्वा सूर्य इवांशुभिः । (महाभारत-शांतिपर्व ३४२.४१)
[5]
नान्तोऽस्ति ममदिव्यानां विभूतीनां परंतप । (गीता १०.४०)
[6] क्लेषोऽधिक तरस्तेषां अव्यक्ता सक्तचेतसाम् ॥ (गीता १२-५)
[7]
नैनद्देवा
आप्नुवत् । देवही त्याला जिंकू शकत नाहीत. (ईशा. उप. ४)
No comments:
Post a Comment