02 May, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ३१ वा

चतुष्षष्ट्या तन्त्रैः सकलमतिसन्धाय भुवनं
स्थितस्तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः पशुपतिः ।
पुनस्त्वन्निर्बन्धादखिल-पुरुषार्थैक-घटना-
स्वतन्त्रं ते तन्त्रं क्षिति-तलमवातीतरदिदम् ॥ ३१॥


आई त्रिपुरसुंदरी ! तुझें भक्तवात्सल्य किती वर्णन करावे ? भक्तजनांचे सकल मनोरथ पूर्ण करण्याला समर्थ असें हें श्रीविद्यातंत्र शंकरांना प्रकट करावयास तूंच भाग पाडलेस. शंकरांनींही पण तुझ्या आग्रहास्तव तें प्रकट केलें, अशा अभिप्रायानें स्तुति करीत आहेत. "पशुपतिः चतुःषष्ट्या तन्त्रैः सकलं भुवनं अतिसन्धाय पुनः त्वन्निर्बन्धात् इदं ते तन्त्रं क्षितितलं अवातीतरत्" असा या श्लोकाचा मुख्य अन्वय आहे. शंकरांनी चौसष्ट तंत्रांची रचना करून लोकांना सिद्धींच्या व काव्य फळांच्या नादी लावले. केवळ मोक्ष प्रतिपादन करणारा वेदान्तही सांगितला आणि ते स्वस्थ बसले. ज्या योगें धर्म, अर्थ आणि काम यांच्यासह परम पुरुषार्थाचा लाभ होईल, असे साधन प्रकट होणें आवश्यक होतें. आई जगज्जननी ! असें साधन प्रकट करण्याचा तूंच त्यांना आग्रह केलास तेव्हां त्यांनी पुन्हा साधकांना सकल पुरुषार्थांचा प्रामुख्याने लाभ होईल अशा योग्यतेचें तुझें एक स्वतंत्रच तंत्र या भूमंडलावर अवतरविले, प्रकट केलें. असा या श्लोकाचा अन्वयानुसारी तात्पर्यार्थ आहे.

विशिष्ट प्रकारच्या निरनिराळ्या सिद्धि अथवा ऐहिक फलें सत्वर प्राप्त करून देणाऱ्या साधनांचा अथवा उपासनांचा मार्ग दाखविणाऱ्या शास्त्राला तंत्र असें म्हणतात. तंत्रशास्त्राचे आद्य प्रवर्तक भगवान् शंकरच आहेत. ही तंत्रे बुद्धीमध्ये काय फलांविषयी मोह निर्माण करतात. अद्‌भुत सिद्धि प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य तंत्रविद्येच्या नादी लागतो. पण शेवटीं त्यांत त्याचा नाशच होतो. याकरितां शहाणे लोक सिद्धींचा अथवा ऐहिक फळांचा मोह विवेकानें जिंकतात व तंत्र विद्येपासून दूर रहातात. बहुतेक तंत्रविद्या या अवैदिक असल्यामुळेंही विवेकी लोक त्यांची उपेक्षा करतात. एकंदर या तंत्रविद्या संख्येने चौसष्ट आहेत. तंत्रविद्यांना शंबरतंत्र अथवा शंबरविद्या असेही म्हणतात. शंबर शब्दाचा अर्थ मायावी अथवा जादूगार असा आहे.

वाचकांना कल्पना यावी म्हणून आम्ही या ठिकाणी कांहीं तंत्रविद्यांचा उल्लेख करीत आहोंत. १. महामायाशंबरतंत्र. या तंत्राच्या साधनानें साधक हा लोकांच्या डोळ्यांना घटाचा पट भासवितो तर पटाचा घट भासवितो. अत्तराला घासलेटाचा वास भासवील तर घासलेटाला अत्तराचा वास भासवील. रडण्याच्या आवाजाला सुस्वराचा भास निर्माण करील तर सुस्वर गायनाला रडण्याचा भास दाखवील. काट्यांची टोके गादीप्रमाणे मऊ असल्याचें दाखवील. तर पराची गादी कांट्याप्रमाणे टोचत असल्याची प्रतीति आणून देईल इत्यादि. यालाच मोहनतंत्र असेंही म्हणतात. २. यो गिनीजालतंत्र. स्मशानांत अपरात्री बसणे, प्रेतें उकरणें इत्यादि वाममार्गानें या तंत्रातील साधनांचे अनुष्ठान करावे लागतें. त्यानें योगिनी प्रसन्न होतात व वाटेल तें कार्य करता येतें. ३. तत्त्वशंबरतंत्र. यायोगे पृथ्वीचें जल आणि जलाची पृथ्वी याप्रमाणे भूततत्त्वांचें परिवर्तन करतां येतें. ४. सिद्धभैरवतंत्र. ५. बटुकभैरवतंत्र. ६. काळभैरवतंत्र ७. कालाग्निभैरवतंत्र. ८. योगिनीभैरवतंत्र. ९. महाभैरवतंत्र. १०. शक्तिभैरवतंत्र. या तंत्रांच्या साधकांना कापालिक असें म्हणतात. ११. बहुरूपाष्टकतंत्र. यांत ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी इत्यादि देवतांची तंत्रें येतात. १२. यमलाष्टकतंत्र. यांत ब्रह्मयामल, विष्णुयामल, रुद्रयामल, लक्ष्मीयामल, उमायामल, स्कंदयामल, गणेशयामल आणि जयद्रथयामल अशीं आठ यामले आहेत. १३. चंद्रज्ञानविद्यातंत्र. १४. मालिनीविद्यातंत्र. १५. महासंमोहनतंत्र. १६. वामजुष्टतंत्र. १७. महादेवतंत्र. १८. वातुलतंत्र. १९. वातलोत्तरतंत्र. २०. कामिकतंत्र. २१. हद्‌भेदतंत्र. २२, तंत्रभेदतंत्र. २३. गुह्यतंत्र. २४. कलावादतंत्र. २५. कलासारतंत्र. २६. कुंडिकातंत्र. २७. मतोत्तरतंत्र. २८. वीणातंत्र. २९. त्रोतलतंत्र. ३०. त्रोतलोत्तरतंत्र. ३१. पंचामृततंत्र. ३२. रूपभेदतं व इत्यादि. एकंदर तंत्रांची संख्या चौसष्टापेक्षांही अधिक भरते. यांतील कांहीं तंत्रे अवैदिक आहेत तर कांहीं तंत्रे अंशतः वैदिक व अंशतः अवैदिक आहेत. ही सर्व तंत्रे राजस व तामस असल्यामुळें सात्त्विक सत्प्रवृत्तीच्या दृष्टीने त्याज्यच आहेत.

यावर कोणी असें विचारील कीं, शंकरांनीं या तंत्रांचा उपदेश करून लोकवंचना कां केली ? यांत शंकरांचा दोष नाहीं का ? पण हा आक्षेप बरोबर नाही. समाजामध्ये अनेक स्वभावाचे लोक असतात. त्यांचे अधिकारही भिन्न भिन्न असतात. अशा स्थितींत अधिकारभेदानें उपदेश करणें अपरिहार्य असतें. कांहीं उद्योग न करतां पशुतुल्य जीवन व्यतीत करण्यापेक्षा कांहीं उपासना करून सिद्धि मिळविणे, इष्ट सुखे संपादन करणें हें केव्हांही ये योयच होय. अशा रीतीने बहुजनसमाजाला उद्योगाचा मार्ग दाखविण्याच्या दृष्टीनें शंकरांकडून तंत्रांचा उपदेश केला गेला. सिद्धींच्या आणि ऐहिक सुखाच्या लोभानें व मोहानें सात्त्विक आणि वैदिक मार्गानुयायी लोकही जर त्या तंत्रमार्मानें जाण्यास प्रवृत्त झाले तर त्यांत शंकरांचा काय दोष आहे ? दीपक, पाचक, रेचक, वामक, अवष्टंभक इत्यादि अनेक प्रकारची औषधें असतात. रोग्याने आपल्या रोगाचा, प्रकृतीचा व अवस्थेचा विचार करून त्यांतील योग्य ते औषध घ्यावयाचे असतें. भलत्याने भलते औषध घेतल्यास त्याचा परिणाम अनिष्ट होणार हें निश्चित. यांत औषधिशास्त्राचा किंवा तें शास्त्र सांगणाऱ्याचा काय दोष आहे ? ग्रंथालयांत अनेक विषयांचे ग्रंथ असतात. वाचकानें आपल्या अधिकाराप्रमाणें ग्रंथांची निवड करूनच ते वाचावयाचे असतात. भलत्याने भलते ग्रंथ वाचून काळाचा अपव्यय केल्यास त्यांत ग्रंथालयाचा किंवा ग्रंथकाराचा काय दोष आहे ? भोजनामध्ये राजशाही थाटाच्या विविध प्रकारच्या चटण्या, कोशिंबिरी, भाज्या, कुरडया, पापड, वडे, भजीं, कढी, आमटी, वरण, पांढरा भात, केशरीभात, मसालेभात, साजूक तूप, पुरणपोळी, खीर, बासुंदी, श्रीखंड, पुरी, लाडू, इत्यादि अनेक प्रकारचे पदार्थ असतात. खाणाऱ्यानें आपली शक्ति पाहूनच ते सेवन करावयाचे असतात. मोहाला आणि जिव्हालौल्याला बळी पडून एखाद्याने न सोसणारे पदार्थ खाल्ले आणि ते बाधले तर त्यांत भोजन घालणाऱ्याचा काय दोष आहे ? याच न्यायाने तंत्रमार्गाचा उपदेश शंकरांनीं करण्यांत त्यांनीं लोकवंचना केली असें म्हणतां येत नाहीं. ते तर परम दयाळू आहेत. अवैदिक मार्ग आणि वैदिक आणि अवैदिक असा मिश्र मार्ग सुजनांनी सोडून द्यावा असे स्वतः शंकरांनीच सांगितलेले आहे. "मिश्रकं कौलमार्गं च परित्याज्यं ही शांकरि" शंकर म्हणतात, हे पार्वती ! अवैदिक आणि वैदिक व अवैदिक अशा मिश्र स्वरूपाचा हा वाममार्ग - तंत्रमार्ग अखेर त्याज्यच आहे.

तंत्रवाङ्‌मयांत शुभागमतंत्र नांवाचा एक भेद आहे. शुभागमतंत्रांतील सर्व अंगें ही वेदमार्गानुसारी आहेत. वसिष्ठ, शुक, सनक, सनंदन आणि सनत्‌कुमार हे या तंत्रमार्गाचे पुरस्कर्ते आहेत. वासिष्ठसंहिता, सनकसंहिता, शुकसंहिता, इत्यादि त्यांची नांवे आहेत. या पांच संहितांना शुभागमपंचक असेंच म्हणतात. या सर्व ग्रंथांत श्रीचक्राधिष्ठीत श्रीविद्येचाच पुरस्कार केलेला आहे. यालाच नित्याषोडशिकातंत्र अथवा महात्रिपुरसुंदरीतंत्र असें म्हणतात. याचेंही मुख्य उपदेशक लोकहिततत्पर भगवान् श्रीसदाशिवच आहेत. तात्पर्य पशुपति म्हणजे भगवान् शंकर यांनी "तत्तत्सिद्धि-प्रसव-परतन्त्रैः" म्हणजे भिन्नभिन्न सिद्धींच्या प्राप्तीसाठी रचली गेलेली अशीं चौसष्ट तंत्रे लोकांना उपदेशिलीं. या तंत्राच्या योगाने सर्व लोकांना सिद्धींच्या व काम्यफलांच्या नादी लावून (अतिसंधाय) ते स्वस्थ बसले. तेव्हां हे आई त्रिपुरसुंदरी ! तूंच त्यांना निर्बंध म्हणजे आग्रह केलास. तुझ्याच आग्रहावरून त्यांनीं चारी पुरुषार्थांची प्रामुख्याने प्राप्ति करून देण्यांत स्वतंत्र असलेलें तुझें हे तंत्र या भूतलावर प्रकट केलें. या तंत्रालाच महात्रिपुरसुंदरीतंत्र अथवा श्रीविद्यातंत्र असें म्हणतात. तेंच तंत्र या सौंदर्यलहरीचा विषय आहे.

श्रीचक्र हेंच या श्वोकाचें यंत्र होय. या श्लोकांतील व बाविसाव्या श्लोकातील श्रीयंत्रांत मध्यवर्ति त्रिकोणांत असलेला बिंदु हा त्या त्रिकोणाच्या वरच्याच बाजूस असलेल्या बारक्या चतुष्कोणांत दाखविलेला आहे. श्रीचक्रलेखनांतही कौलचक्र आणि समयचक्र असे दोन भेद आहेत. कौलचक्रांत बिंदु हा मध्यवर्ती त्रिकोणांत असतो तर समयचक्रांत तो त्रिकोणाच्यावर असलेल्या चतुष्कोणांत दाखावतात.

हें श्रीयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून त्याची पंचेचाळीस दिवस समाराधना करावी. यंत्र हातावर ठेवून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. दुधाचा आणि मधाचा नैवेद्य दाखवावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याने सर्व लोक आणि राजेही वश होतील.

No comments: