30 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २९ वा

किरीटं वैरिञ्चं परिहर पुरः कैटभभिदः
कठोरे कोटीरे स्खलसि जहि जम्भारिमुकुटम् ।
प्रणम्रेष्वेतेषु प्रसभमुपयातस्य भवनं
भवस्याभ्युत्थाने तव परिजनोक्तिर्विजयते ॥ २९॥


आई त्रिपुरसुंदरी ! भगवान् शंकर हे जेव्हां तुझ्या मंदिरामध्यें येतात तेव्हां तुझी सेवा करण्याकरितां नियुक्त असलेल्या देवतांची काय धांदल उडते ! पहा. तुझ्या दर्शनाकरिता आलेले ब्रह्मदेव, विष्णु, इंद्र इत्यादि देव तुझ्या जवळ गर्दी करून उभे असतात. ते नम्र झालेले असतात. ते तुला साष्टांग प्रणिपात करीत असतात. भगवान् शंकर आल्याबरोबर तूं जेव्हां त्यांचें स्वागत करण्याकरितां सामोरी जातेस तेव्हां तुझा सेवकगण "वैरिञ्चं किरीटं परिहर" हा ब्रह्मदेवाचा मुकुट आहे त्याला बाजूला सारा. आणि हा कैटभजित् म्हणजे कैटभारि विष्णु त्यांच्या मुकुटाचे हे तीक्ष्ण टोंक आहे. ते लागेल पायाला. हा जंभारि म्हणजे इंद्र, त्याचा मुकुट आहे. "जहि" म्हणजे तो बाजूला टाका. आई ! याप्रमाणे सर्व देव तुझ्या चरणीं प्रणिपात करीत असतांना अकस्मात् जेव्हां शंकर येतात तेव्हां त्यांच्या स्वागताकरितां तूं उद्युक्त होतेस त्या वेळीं तुझें "परिजन" म्हणजे सेवक, त्यांच्या मुखांतून बाहेर पडणारे हे शब्द तुझा अपार महिमा सुचवीत आहेत. त्यांचा उत्कर्ष असो. त्यांचा विजय असो.

आई त्रिपुरसुंदरी ! सर्व देवांची तुझ्या चरणी साष्टांग प्रणिपात करण्यासाठी अलोट गर्दी होत असते. अशा वेळीं शंकराचे तूं सामोरे जाऊन स्वागत करतेस. यांत तुझ्या मनाचें औदार्य आणि तुझें पातिव्रत्य प्रकट होत आहे. हाही तुझा महिमाच आहे. तूं शंकरांना हात दिला नसतास तर त्यांची संसारांत फटफजिति झाली असती. शंकरांना स्वतःला पांच तोंडे आहेत. एक मुलगा सहा तोंडांचा षडानन - कार्तिकस्वामी, तर दुसरा मुलगा हत्तीच्या तोंडाचा - गजानन लंबोदर. परिवार पहावा तर तो भूत, प्रेत, पिशाच ! ! आई त्रिपुरसुंदरी ! खरोखर तूं जर अन्नपूर्णा या रूपानें शंकरांना हात दिला नसतास तर त्यांना पोटभर खावयास मिळालेंही नसतें ! तुझ्यावांचून शंकर हे मृततुल्य झाले असते ! (श्लोक १ पहा). तात्पर्य, आई ! तुझा महिमा अपार आहे. या श्लोकांत श्रीमहात्रिपुरसुंदरीच्या समृद्धीचें वर्णन केलेले असल्यामुळें हा श्लोक उदात्त अलंकाराचे उत्कृष्ट उदाहरण झाला आहे.

श्लोक १० मध्यें दाखविलेल्या यंत्राप्रमाणें सोन्याच्या पत्र्यावर सहा त्रिकोण असलेले यंत्र काढून मधल्या षट्कोनांत फक्त क्लीं हें एकच बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. नैवेद्याला मध आणि उडदाचे वडे असावेत. हें यंत्र धारण केल्यास दुष्ट आणि मुर्ख लोकांची दुर्बुद्धि नष्ट होऊन त्यांच्या मनांत आपल्याबद्दल सद्धावना निर्माण होईल व ते वश होतील.

No comments: