06 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ५ वा

हरिस्त्वामाराध्य प्रणत-जन-सौभाग्यजननीं
पुरा नारी भूत्वा पुररिपुमपि क्षोभमनयत् ।
स्मरोऽपि त्वां नत्वा रति-नयन-लेह्येन वपुषा
मुनीनामप्यन्तः प्रभवति हि मोहाय महताम् ॥ ५ ॥


"हे मातः हरिः प्रणतजनसौभाग्यजननीं त्वां आराध्य पुरा नारी भूत्वा पुररिपुं अपि क्षोभं अनयत् । स्मरः अपि त्वां नत्वा रतिनयनलेह्येन वपुषा महतां मुनीनां अपि अन्तः मोहाय प्रभवति हि ।" हे माते जगदंबे ! भगवान श्रीविष्णू यांनी तुझीच आराधना करून सामर्थ्य संपादन केले आहे. कारण तूं चरणीं नम्र झालेल्या भक्तजनांना सर्व प्रकारचे उत्तम भाग्य प्राप्त करून देणारी आहेस. भगवान श्रीविष्णू तुझ्या कृपेनेच परम विरक्त असलेल्या शंकरांच्याही अंतःकरणांत मोह निर्माण करण्यास समर्थ झाले आहेत. पूर्वी देवांना अमृताची प्राप्ति करून देण्यासाठी समुद्राचे मंथन करण्यांत आलें. त्या वेळीं हातांत अमृताचा कलश घेऊन धन्वंतरी समुद्रांतून बाहेर आले. पहाता पहाता दैत्यांनी त्यांच्या हातून अमृताचा कलश पळविला. देव हताश झाले. इकडे दैत्यामध्ये अहमहमिका सुरू झाली. हा म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? तो म्हणतो मी अगोदर घेईन. तूं कोण ? इतक्यांत भगवान विष्णू मोहिनीचे रूप घेऊन तेथें आले. मोहिनीला पहातांच सर्व दैत्यांना मोह निर्माण झाला. ते तिच्या पाठीमागे लागले ! ते तिच्या अंकित बनले ! त्यांनीं तो अमृतकलश तिच्या स्वाधीन केला ! तिने मोठ्या युक्तिप्रयुक्तीने तें अमृत देवांना वांटून टाकले ! देव संतुष्ट झाले. देवांच्या संतोषानें त्रैलोक्यही संतोषले. पुढें शंकरांना तें रूप पहावेसें वाटलें. पार्वतीसह ते विष्णूकडे गेले. तें रूप दाखविण्याची श्रीविष्णूला त्यांनीं विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन विष्णूने पुन्हा मोहिनीचे रूप घेतलें. भगवान् शंकर स्वतः कामारि, मदनाला भस्म करून टाकणारे. पण तें रूप पाहून त्यांच्याही चित्ताचा क्षोभ झाला ! जवळ असलेल्या पार्वतीला सोडले आणि ते मोहिनीच्या पाठीमागे लागले ! ! हा इतिहास लक्षांत घेऊनच आचार्यांनी "पुरा नारी भूत्वा" इत्यादि वर्णन केलेले आहे. तात्पर्य, विष्णूच्या अंगीं त्रैलोक्यरक्षणाचें व विविध रूपें धारण करण्याचें जें सामर्थ्य आहे तें महात्रिपुरसुंदरीच्याच आराधनेचें फळ आहे.

स्मर म्हणजे कामदेव. केवळ स्मरणानेंही लोकांच्या चित्ताला अस्वस्थ करून टाकतो म्हणून त्याला "स्मर" असें म्हणतात. याला शंकरांनी जाळून टाकले होतें. पण आदिभवानीच्या जगदंबेच्या कृपेने त्याला जीवदान मिळाले. पुढें त्यानें महात्रिपुरसुंदरीची आराधना केली. त्या आराधनेच्या प्रभावानेंच पुढें तो त्रैलोक्यविजयी बनला. रति कामदेवाची स्त्री, ती अतिशय सुंदर, पण तिनेंही आपल्या सौंदर्याचा अभिमान बाजूला ठेवून अहोरात्र आपल्या डोळ्यांची ओंजळ करावी व मदनाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. इतकें सुंदर रूप महात्रिपुरसुंदरीच्याच कृपेने कामदेवाला मिळाले. मोठ्या मोठ्या ऋषिजनांच्याही अंतरंगांत मोह निर्माण करण्याला तो समर्थ झाला. आचार्य म्हणतात आई ! हा तुझ्याच कृपेचा प्रभाव आहे.

कोणी म्हणेल विष्णूने आणि कामदेवानें श्रीमहात्रिपुरसुंदरीची आराधना केली याला काय प्रमाण ? यावर उत्तर असें कीं, वामकेश्वर महातंत्रांतच हा इतिहास वर्णिलेला आहे. पहा -

"एतामेव पुराऽऽराध्य विद्यां त्रैलोक्यमोहिनीम् ।
त्रैलोक्यं मोहयामास कामारिं भगवान् हरिः ॥
कामदेवोऽपि देवेशीं देवीं त्रिपुरसुन्दरीम् ।
समाराध्याभवल्लोके सर्व सौभाग्यसुन्दरः ॥"

श्रीविद्येच्या मंत्राचे विविध प्रकार आहेत. त्यांपैकीं एका मंत्राचे ऋषि अर्थात द्रष्टे प्रत्यक्ष श्रीविष्णूच आहेत. त्याचप्रमाणे कामदेव देखील एका मंत्राचे द्रष्टे असल्याबद्दलचा उल्लेख दृष्टीस पडतो. असा हा श्रीविद्यास्वरूप महात्रिपुरसुंदरीचा प्रभाव लक्षांत घेऊनच आचार्य म्हणतात, आई ! मी तुझ्या चरणी शरण आलों आहे. कृपा कर.
 



हें यंत्र तांब्याच्या पत्र्यावर काढून त्याची विधिपूर्वक वायव्य दिशेला तोंड करून आठ दिवस पूजा करावी. गूळ आणि पायस यांचा नैवेद्य दाखवावा. रोज दोन हजार वेळां या श्लोकाचा जप करावा हें यंत्र सकलजन संमोहन करणारे आहे. पति आणि पत्नी यांच्यांतील वैमनस्य दूर होईल. हें यंत्र गळ्यांत अथवा वेणींत घालावे.

No comments: