05 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक ४ था

त्वदन्यः पाणिभ्यामभयवरदो दैवतगणः
त्वमेका नैवासि प्रकटितवरभीत्यभिनया ।
भयात्त्रातुं दातुं फलमपि च वाञ्छासमधिकं
शरण्ये लोकानां तव ही चरणावेव निपुणौ ॥ ४ ॥
'हे मातः जगज्जननि ! त्वदन्यः दैवतगणः पाणिभ्यां अभयवरदः अस्ति । एका त्वं प्रकटितवरभीत्यत्यभिनया नैव असि । हे लोकानां शरण्ये ! ही भयात् त्रातुं अपि च वाच्छासमधिकं फलं दातुं तव चरणौ एव निपुणौ स्तः ।" हे आई जगज्जननी ! तूं म्हणशील कीं, इतर पुष्कळ दैवतें भक्तजनांना अभय आणि इष्ट वर देण्याकरितां तत्पर आहेत. हें त्यांनीं धारण केलेल्या अभयमुद्रेवरून आणि वरमुद्रेवरून स्पष्टच दिसत आहे. मग त्यांनाच का नाहीं शरण जात ? यावर माझें उत्तर असें आहे कीं, तुझ्याहून निराळा असलेला देवतांचा समुदाय केवळ हातानेच आपण अभय आणि इष्ट वर देणारे आहोंत असें सुचविणारा आहे. हा केवळ त्यांचा अभिनय म्हणजे नाटकांतल्या सोंगासारखी कृति आहे. तत्त्वतः त्यांच्यामध्यें ते सामर्थ्य नाहीं असें आचार्यांनी "अभिनय" या शब्दाचा प्रयोग करून ध्वन्यर्थानें सूचित केलेले आहे. इतर देवांमध्ये जें कांहीं थोडेंबहुत सामर्थ्य आहे तेही त्यांना श्रीमहात्रिपुरसुंदरीच्याच कृपेनें प्राप्त झालेले आहे. हें सर्व त्यांच्या इतिहासावरून उघड आहे. "ये ही ब्रह्मादयो देवा भवन्ति वरदायिनः । त्वद्‌रूपां शक्तिमासाद्य ते भवन्ति वरप्रदाः ॥ "

आई ! तूं मात्र एकच एक अशी आहेस कीं, तूं कोणत्याही प्रकारें वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें सोंग केले नाहीस, आणि तसें करण्याचें तुला कांहीं कारणही नाहीं. कारण तूं सर्व लोकांनी शरण जाण्याला योग्य आहेस. अथवा सर्व लोकांचे संरक्षण करण्याला तूं योग्य आहेस. भक्तजनांचें भयापासून संरक्षण करण्याला अथवा त्यांना त्यांच्या इच्छेपेक्षांही अधिक फल देण्याला तुझे चरणच निपुण म्हणजे प्रवीण आहेत. निपुण शब्दाचा कुशल अर्थात समर्थ असाही अर्थ होतो. अशा स्थितींत हे आई ! तुला हातांनी वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण करण्याचें कांहींच कारण नाही. डाव्या हाताची चार बोटें तर्जनी, मध्यमा, अनामिका आणि कनिष्ठिका हीं एकास एक जुळवून उताणा तळहात किंचित् अधोमुख धारण केला म्हणजे वरमुदा बनते. त्याचप्रमाणें उजवा तळहात ऊर्ध्वमुख धारण केला म्हणजे अभयमुद्रा तयार होते. "अधोमुखो वामहस्तः प्रधृतो वरमुदिका ऊर्ध्वीकृतो दक्षहस्तः प्रधृतोऽभयमुद्रिका" अशीं या दोन मुद्रांची लक्षणें आहेत. तात्पर्य, आई महात्रिपुरसुंदरी ! तुझ्या कृपेनें हरिहरादि देवांचेही मनोरथ सफल होतात मग माझे होतील यात काय नवल आहे ! हें तुझें सामर्थ्य लक्षांत घेऊनच मी तुझ्या चरणी शरण आलो. "हि" या अव्ययाचा प्रयोग कारण आणि निश्चय अशा दोन्ही अर्थाने होतो. या श्लोकांत उपमेय हें उपमानापेक्षांही श्रेष्ठ असल्याचें वर्णन केले असल्यामुळें साहित्यशास्त्रदृष्ट्या व्यतिरेकालंकार सिद्ध होतो. 

 
 

हे यंत्र चांदीच्या पत्र्यावर लिहून त्याची पूर्वेकडे तोंड करून यथाशास्त्र पूजा करावी. सोळा दिवस अथवा छत्तीस दिवस या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. नैवेद्य केशरी भात. यानें साम्राज्य-सिद्धि, सर्व रोगांचा नाश व दारिद्र्याचा परिहार होतो. कांहीं लोक 'दुं'च्या ऐवजीं 'श्रीं' हें बीज लिहितात.

No comments: