29 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २८ वा

सुधामप्यास्वाद्य प्रतिभय-जरा-मृत्युहरिणीं
विपद्यन्ते विश्वे विधि-शतमखाद्या दिविषदः ।
करालं यत्क्ष्वेलं कवलितवतः कालकलना
न शम्भोस्तन्मूलं तव जननि ताटङ्‌कमहिमा ॥ २८॥


इतर सर्व तत्त्वांचा व त्या तत्त्वांच्या अधिष्ठात्री असलेल्या देवतांचा सदाशिवतत्त्वांमध्यें लय होतो, पण सदाशिवतत्त्वाचा मात्र कधींच कोठे लय होत नाहीं. सदाशिवतत्त्व हें अखंड अविनाशी आहे. सदाशिवाला प्राप्त झालेलें हें अविनाशित्व श्रीत्रिपुरसुंदरीच्याच प्रभावाने प्राप्त झालेलें आहे. अशा अभिप्रायानें आचार्य वर्णन करीत आहेत. "विधिशतमखाद्याः विश्वे दिविषदः सुधां आस्वाद्य अपि विपद्यन्ते" विधि म्हणजे ब्रह्मदेव. शतमख म्हणजे इंद्र इत्यादि सर्व देव अमृताचा आस्वाद घेऊनही - अमृत प्राशन करूनही शेवटीं "विपद्यन्ते" म्हणजे मरतात. सुधा म्हणजे अमृत. तें प्राशन केलें असतां अत्यंत भयंकर असलेल्या जरा-मृत्यूचाही नाश होतो, तथापि त्यालाही कांहीं कालमर्यादा आहे. ती कालमर्यादा संपली कीं, जरामृत्यु यांचा नाश करणारे अमृत प्राशन करूनही देवांना मृत्यु येतोच. देवांचें अजरत्व आणि अमरत्व हें अखेर कालाच्या उदरांत गडप होतच असतें. याच्या उलट भगवान् शंकर हे विष प्राशन करूनही अविनाशी आहेत. वस्तुतः विष हें अत्यंत भयंकर आणि मारक असते, तथापि तें शंकरांना मारक झालें नाहीं. कारण -

कराल म्हणजे अत्यंत जहाल भयंकर अशा विषाचेंही शंकराने प्राशन करून टाकले होतें. म्हणूनच तर त्यांना नीलकंठ नांव पडलें. एवढे भयंकर विष प्राशन करूनही त्यांना "कालकलना न" म्हणजे काळ कांहीं ग्रासूं शकला नाहीं ! हा काय त्या शंभूमहादेवाचा स्वतःसिद्ध प्रताप आहे ? छे, तो त्यांचा स्वतःसिद्ध महिमा नव्हे. मग त्याचें मूळ कशांत आहे असें विचारशील तर सांगतो. आई ! तो तुझ्या ताटंकांचा म्हणजे कानांत घालावयाच्या सौभाग्यालंकारांचा महिमा आहे ! जिचे कुंकू बळकट तिचा पति दीर्घायु हें प्रसिद्धच आहे. याच न्यायाने जिचे सौभाग्यालंकार प्रभावी तिचा पति दीर्घायु असणें स्वाभाविकच आहे. तात्पर्य, आई ! शंकराचे अविनाशित्व हा तुझ्या कानांतील ताटंकांचा म्हणजे कर्णभूषणांचा महिमा आहे ! ! जिच्या सौभाग्यालंकाराचा हा महिमा आहे, तिचा साक्षात स्वतःचा महिमा केवढा असणार !

सोन्याच्या पत्र्यावर सममुज चतुष्कोन काढावा. चारी कोनांत मिळणाऱ्या रेषांची टोकें किंचित् पुढें करून त्यांना त्रिशुळाचा आकार द्यावा. चारी कोपऱ्यात आठ त्रिशूळ होतील. मध्यभागीं एकाखाली एक ठं ठं ठं अशीं तीन बीजे लिहावींत. पंचेचाळीस दिवस विधिपूर्वक पूजा करून या श्लोकाचा रोज एक हजार वेळां जप करावा. द्‌ध, पायस, गुळ, नारळ, केळे आणि तांबूल यांचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे स्त्रियांची सर्व कार्यें सिद्ध होतील व पुरुषांचा अपमृत्यु टळेल.

No comments: