26 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २५ वा

त्रयाणां देवानां त्रिगुण-जनितानां तव शिवे
भवेत्पूजा पूजा तव चरणयोर्या विरचिता ।
तथा हि त्वत्पादोद्वहन-मणि-पीठस्य निकटे
स्थिता ह्येते शश्वन्मुकुलित-करोत्तंस-मकुटाः ॥ २५॥


आई जगज्जननी ! तुझी पूजा केली म्हणजे सर्व देवांची पूजा केल्याचे श्रेय मिळतें. कारण सर्वांमध्ये श्रेष्ठ तूंच आहेस. ब्रह्मा, विष्णु आणि रुद्र हे सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. पण हे तिन्ही देव तुझ्या सत्व, रज आणि तम या तीन गुणांपैकी एका-एका गुणापासून जन्माला आलेले आहेत. अथर ती तुझी लेकरेंच आहेत. "ब्रह्मविष्णूमहादेवा अस्याः पुत्रा वरानने । चतुर्थोऽहं महेशानि सुतस्तस्या महेश्वरः ॥" असें भगवान् शंकरच प्रत्यक्ष पार्वतीला शिवशक्ति तत्त्वाचे वर्णन करतांना दक्षिणामूर्तिसंहितेत सांगत आहेत. हे शिवा भवानी ! "शिवयति इति शिवा" सर्व विश्वाचें तूं कल्याण करतेस म्हणून तुला शिवा असें म्हटलेलें आहे. हे जगत्कल्याणकारिणी माते ! तुझ्या चरणकमलांची पूजा केली म्हणजे या सर्व देवांची पूजा केल्यासारखीच आहे. "तव चरणकमलयोः या पूजा विरचिता सा देवानां पूजा भवेत्" आई ! तूं म्हणशील, असें कसें म्हणतोस ? एकाची पूजा केल्याने दुसऱ्याची पूजा केल्यासारखे कसें होईल ? सांगतो ऐक.

सर्व देवांत श्रेष्ठ असलेले ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश हे चारही देव तुझे पाय ठेवण्याकरितां तयार केलेले जें रत्नखचित पादपीठ म्हणजे चौरंगासारखें आसन अथवा उपसिंहासन आहे त्याच्या जवळ हात जोडून निरंतर नम्र भावाने उभे आहेत. त्यांनीं जोडलेले दोन्ही हात आपल्या मुकुटाला लावलेले असल्यामुळें त्यांचे मुकुट जणुं कांहीं तुरे लावल्याप्रमाणे दिसत आहेत. तात्पर्य, ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश्वर हे सर्व देवांत श्रेष्ठ असलेले देव, तुझी सेवा घडावी म्हणून निरंतर तुझ्या सान्निध्यांत हात जोडून नम्र भावानें उभे आहेत. अशा स्थितींत एखाद्या भक्तानें तुझी पूजा केली तर त्यांत त्यांना अत्यंत संतोषच वाटतो. उलट तुझी पूजा सोडून त्यांची पूजा केली तर त्यांत त्यांना संतोष वाटणार नाहीं. हा भक्तांचा स्वभाव असतो. ते तुझे भक्त आहेत. तुझी पूजा केल्यानेंच त्यांना आनंद वाटत असल्यामुळें तुझी पूजा हीच त्यांची पूजा होय. हाच अभिप्राय लक्षांत घेऊन श्रीत्रिपुरसुंदरीच्या पूजेचा महिमा आगमग्रंथांत गालेला आहे.

"विष्णुपूजासहस्राणि शिवपूजाशतानि च
अम्बिकाचरणार्चायाः कलां नार्हन्ति षोडशीम्"

सोन्याच्या पत्र्यावर अधोमुख त्रिकोण काढून त्याच्या तिन्ही कोणाला बाहेरच्या बाजूने त्रिशूळ काढावेत. त्रिकोणामध्ये सौः हें बीजाक्षर लिहावे. पंचेचाळीस दिवस त्याची पूजा करावी. मधाचा नैवेद्य दाखवावा. या श्लोकाचा रोज एक हजार जप करावा. सिद्ध यंत्र धारण करावे. याच्या योगाने राजकीय अधिकाराचा लाभ होईल. उत्कृष्ट पदवीचाही लाभ होईल.

No comments: