25 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २४ वा

जगत्सूते धाता हरिरवति रुद्रः क्षपयते
तिरस्कुर्वन्नेतत्स्वमपि वपुरीशस्तिरयति ।
सदापूर्वः सर्वं तदिदमनुगृह्णाति च शिव-
स्तवाज्ञामालम्ब्य क्षणचलितयोर्भ्रूलतिकयोः ॥ २४॥ 


आई ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेताने ब्रह्मांडांच्या घडामोडीची केवढी प्रचंड कामें चाललेली आहेत. पहा - "धाता जगत् सूते" ब्रह्मदेव तुझ्या भुवयांचा संकेत होतांक्षणींच जग निर्माण करतो. "हरिः अवति" विष्णू त्या जगाचे पालन-पोषण करतो आणि "रुद्रः क्षपयते" म्हणजे प्रलयकाली रुद्र त्या जगाचा लय करतो. यापमाणें जगाची उत्पत्ति, स्थिति आणि प्रलय या कामी नियुक्त असलेले अधिकारी देव "तव भ्रूलतिकयोः आज्ञां आलम्ब्य" तुझ्या क्रियाशील झालेल्या भ्रूलतांची आज्ञा होतांच आपआपले कार्य करूं लागतात. रुद्रदेवतेनें प्रलयकाळीं सर्व कार्याचा नाश केल्यानंतर त्या कार्याची कारणें शिल्लक रहातात. घट फुटला तरी खापरे शिल्लक रहातात. पट फाटला तरी धागेदोरे शिलक रहातात. त्याचप्रमाणें कार्यप्रपंचाचा नाश झाला तरी कारणप्रपंच शिल्लक रहातोच. त्या कारण प्रपंचाचाही लय करण्याचें कार्य महेशाचे आहे. तो महेश देखील, आई ! तुझ्या भ्रुकुटीचा संकेत होतांच ती तुझी आज्ञा समजून त्या विस्कळित झालेल्या कारणप्रपंचाचा आपल्या स्वरूपांत लय करून घेतो. येथें लय शब्दाचा अर्थ अव्यक्त स्वरूपांत रहाणे असा समजावा. सर्व कारणप्रपंचाला आत्मस्वरूपांत लीन करून घेऊन शेवटीं तो महेश्वर देखील स्वतःला सदाशिवस्वरूपांत लीन करून घेतो. हाच अभिप्राय श्लोकाच्या दुसऱ्या चरणांत सांगितला आहे. "ईशः एतत् तिरस्कुर्वन् स्वं अपि वपुः तिरयति" ईश म्हणजे महेश्वर. या सर्वांचा लय करीत स्वतःच्या देहाचाही सदाशिवतत्त्वांत लय करून घेतो. सदाशब्दपूर्वक शिवतत्त्व म्हणजे भगवात् सदाशिव. हे ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि महेश या सर्वांनाच अव्यक्तरूपानें आपल्या स्वरूपांत ते लीन होऊन राहिले असतांना पुन्हां सृष्टिकालीं आविर्भूत करण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांचा प्रयत्नही आई, तुझ्या भ्रुकुटीच्या संकेतानेच होत असतो. ब्रह्मा, विष्णु, रुद्र आणि ईशान म्हणजे महेश्वर यांना सृष्टिकाली त्यांच्या कार्यासह आविर्भूत करणें या क्रियेला अनुग्रह असें म्हणतात. सदाशिवाच्या अनुग्रहानेच हे सर्व देव सृष्टिकाली प्रकट होऊन आपआपली कार्यें करीत असतात. हा सदाशिवाचा अनुग्रह देखील तुझ्या भ्रूसंकेतावरच अवलंबून आहे. तात्पर्य, हे माते त्रिपुरसुंदरी ! तुझ्या केवळ भुवयांच्या संकेतानेच ब्रह्मा, विष्णु, रुद्र, ईशान आणि सदाशिव या पांचही देवता आपआपले कार्य सृष्टि, स्थिति, प्रलय, तिरोधान आणि अनुग्रह क्रमशः करीत असतात. आई ! तुझ्या नुसत्या भुवयांचा हा प्रभाव आहे तर मग साक्षात तुझा प्रभाव काय वर्णन करावा ? सर्वांवर अनुग्रह करणाऱ्या सदाशिवावर देखील तुझा अनुग्रह आहे, म्हणूनच तो सर्वांवर अनुग्रह करूं शकतो. ही सगळी कार्ये तत्त्वतः तूंच करीत आहेस, म्हणूनच तुझें वर्णन करतांना ललितासहस्रनामामध्यें -

सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविन्दरूपिणी ॥
संहारिणी स्वरूपा तिरोधानकरीश्वरी ।
सझाशवानुग्रहदा पञ्चकृत्यपरायणा ॥

असें वर्णन केलेले आहे. पंचकृत्य शब्दाचा अर्थ वर सांगितलेली उत्पत्ति स्थिति इत्यादि पांच कार्ये असा समजावा. या पांचही कार्यांचा आश्रय किंवा त्यामध्ये तत्पर श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच आहे. सकलजननीस्तवामध्येंही हाच अभिप्राय मोठ्या बहारीने वर्णन केलेला आहे.

"विरिञ्चाख्या मातः सुजसि हरिसंज्ञा त्वमवसि
त्रिलोकीं रुद्राख्या हरसि विदधासीश्वरतया ।
भवन्ति सादाख्या प्रभवसि च पाशौघदलने
त्वमेवैकाऽनेका भवसि कृतिभेदैर्गिरिसुते ॥ "

हे आई ! ब्रह्मदेव हें नांव धारण करून तूं हे सर्व जग निर्माण करतेस. विष्णु हें नांव धारण करून त्याचें तूं संरक्षण करतेस. रुद्र हें नांव धारण करून तूं त्रैलोक्याचा संहार करतेस. तर पुन्हां ईश्वर हें नांव धारण करून या सर्वांना उत्पन्न करतेस. तूंच सच्चिदानंदरूप सर्वाधारभूत सादाख्यकलारूपाने सर्व जीवांच्या भवपाशांचे दुःखपाशांच्या समूहाचे निर्दालन करतेस. आई गिरिसुतु ! तत्त्वतः तूं एकच असून कार्यभेदानें अनेक नांवे व रूपें धारण करतेस धन्य आहेत तूं.

हें शिवयंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढावे. विधिपूर्वक त्याची तीस दिवस पूजा करावी. मध उडदाचे वडे आणि तिळकुटाचा नैवेद्य दाखवावा. यंत्राजवळ बसून रोज या चोविसाव्या श्लोकाचा एक हजार जप करावा. हें यंत्र धारण केलें असता ३ भूतप्रेत-पिशाच बाधा नाहीशी होते. अपस्मार म्हणजे फीट येण्याचा विकार थांबतो.

No comments: