27 April, 2014

सौन्दर्यलहरी श्लोक २६ वा

विरिञ्चिः पञ्चत्वं व्रजति हरिराप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम् ।
वितन्द्री माहेन्द्री विततिरपि संमीलितदृशा
महासंहारेऽस्मिन् विहरति सति त्वत्पतिरसौ ॥ २६॥


आई ! तुझा महिमा मी काय वर्णन करूं ? हा सृष्टिकर्ता ब्रह्मदेव पंचत्वाला जातो म्हणजे पृथक् पृथक् पंचमहाभूतांत तो विलीन होतो. हरि म्हणजे भगवान विष्णु देखील पंचमहाभूतांत विलीन होतात. "कीनाशः विनाशं भजति" म्हणजे यमाचाही नाश होतो. यम हा लोकांचा निष्ठुरपणें नाश करीत असतो म्हणून त्यास "कीनाश" असें म्हणतात. तात्पर्य, तो यमही मरतो आणि धनद म्हणजे कुबेर तोही निधन पावतो. "माहेन्द्री विततिः अपि सम्मीलितदृशा वितन्द्री भवति" चौदा भुवनांचे अधिपति चौदा इंद्र. त्यांना लोकपाल अथवा महेंद्र असे म्हणतात. या चौदा महेंद्रांचा समुदाय म्हणजे माहेन्द्री वितति या शब्दांचा अर्थ झाला. या इंद्रांच्या समुदायालाही कायमची तंद्री लागते. अर्थात् प्रलयकाळी त्यांचेही डोळे मिटतात, तेही मरतात. अशा या "महासंहारे" म्हणजे शेवटच्या कल्पांतकाळीं तुझे पति भगवान् सदाशिव हे तुझ्यासह आनंदाने विहार करीत असतात. इतरांप्रमाणे त्यांना मरण नाहीं, नाश नाहीं. हें त्यांचें अविनाशित्व हा तुझ्याच पातिव्रत्याचा प्रभाव होय.

हें यंत्र सोन्याच्या पत्र्यावर काढून अमावस्येच्या दिवशीं अथवा सहा दिवस विधिपूर्वक पूजा करून गुळपायसाचा नैवेद्य दाखवावा. रोज एक हजार या श्लोकाचा जप करून यंत्र धारण करावे. फल सर्व कार्यसिद्धि व शत्रुजय.

No comments: