28 July, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (३) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (३)
(भागवत स्कंध ११ अध्याय ११)

कैवल्य उपनिषदांत म्हटले आहे - त्यागेन एके अमृतत्त्वं आनशुः - त्याप्रमाणे भगवंतांनी, "तीव्र वैराग्याने देहाभिमान घालवायचा" असे एक prescription in a nutshell सांगून टाकले. शुकमुनि, शंकराचार्य, ज्ञानदेव अशा सारख्या मंडळींसाठी या वैराग्य गुटीच्या उपदेशाची एक मात्रा पुरे. पण सामान्यांचे काय ? उद्धव श्रीकृष्णाला सांगत आहे, आमचे चित्त तर इतके चंचल [’प्रमाथी बलवत् दृढम्’ - गीता] आहे की तू हे जे वैराग्य म्हणतोस ते दोन पळेसुद्धा टिकणारे नाही. आता बोल.

भगवंत म्हणतात - खरे आहे. ’मी विरागी’ हा अभिमान देखील मनुष्यासाठी कोणते वेगळे जाळे विणतो आणि त्यामुळे तो या मायामय संसारात कसा पहिल्यापेक्षाही अधिकच गुरफटून जातो याचा त्याला पत्ताही लागत नाही. कारण थोड्या प्रमाणांतील वैराग्यही आसपासच्या लोकांत मान-मरातब मिळवून द्यायला कारणीभूत होते. आणि अशावेळी जर मनुष्य सावध राहिला नाही, तर ’लोकेषणा’ नामक वासनेच्या अधीन व्हायला वेळ लागत नाही. लोकेषणेची तहान भल्याभल्यांना देखील गुंडाळून टाकते. मग वैराग्ययुक्त आचरणाचा उपदेश अशा self glory च्या वासनेत रमणार्‍या लोकांना पटतही नाही. ज्याला आत्मप्रौढीच्या वासनेतून निर्मुक्त होऊन सहज आत्मस्वरूपात स्थित व्हायची तीव्र इच्छा आहे अशांसाठीच हे prescription.

वैराग्य म्हणजे संन्यास. संन्यास दोन प्रकारचा असतो. आळसामुळे, तमोगुणाच्या प्राबल्यामुळे कष्ट टाळण्यासाठी अंगिकारलेला बाह्य कर्मसंन्यास, आणि दुसरा उत्साहाने पण आसक्तिरहित होऊन सर्व कर्मे पार पाडीत असतां कर्मफलाशी असंग राहून (no trace of proud if accomplished or no regret if failed) घडणारा आंतरीक संन्यास. बाह्य संन्यासाचा अंगिकार केलेला संन्यासी प्रत्यक्ष कर्म करीत नसला तरी ’मनसा स्मरन्’ करीत असतो आणि बाहेरून ’कर्मेंद्रियाणि संयम्य’ असा देखावा करीत असतो. त्यामुळे वासनाक्षय कधीच होत नाही आणि म्हणून पुढे लोकेषणेची तहान दृढावते. या करीता संन्यास - वैराग्य या दिशेने पाऊल टाकायच्या आधी कर्म कोणते, अकर्म कोणते, विकर्म कोणते हे नीट जाणून घेणे आवश्यक आहे.

आता चंचल, प्रमाथी मनाला संयमीत करायचे, वैराग्य, त्यागवृत्ति जोपासायची म्हणजे सदा भरकटत असणार्‍या मनाला सतत (हो अगदी सतत) जागरूक राहून - hey ! turn back, not that way, this way असे निरंतर वळवत राहावे लागणार. मग go this way म्हणजे which way ? भगवंत दोन तीन मार्ग सांगतात. ’तत्त्वजिज्ञासा’ (श्लोक २१). जितकी शरीरे दिसतात, जितक्या चेतन वस्तु दिसतात, ते सर्व पृथक् पृथक आत्मे आहेत असा मनुष्याला जो भास होतो तो दूर सारून ’आत्मा सर्वत्र एकच आहे’, ’सर्व दृष्यमय जगत् भासमय - मिथ्या आहे’ हा भाव दृढ करावा. ’नानात्वभ्रममात्मनि’ अनेकत्वाचा भास दूर करावा. अशा प्रकारे मनाची शुद्धी होत होत त्याला मज सर्वव्यापी परमेश्वराचे ठिकाणी लावावे - मनो मय्यर्प्य विरजं. पण हे सोपे नाही. याला विहंगम मार्ग म्हणतात. तो सर्वांसाठी नाही. मग दुसरा मार्ग ? ’मयि सर्वाणि कर्माणि निरपेक्षः समाचर (श्लोक २२) सर्व कर्मे निरपेक्षपणे केवळ माझ्यासाठीच करतोयस ही भावना ठेवून कर. म्हणजे काय होईल ? धर्म, काम, अर्थ मदर्थे आचरन्, मयि निश्चलां भक्तिं लभते (श्लोक २४). OK. पण तुझी भक्ति लाभली की मी बद्धाचा मुक्त कसा होईन ? ’मदर्पण’ भावनेने धर्म, अर्थ कामाचे आचरण करायला लागलास की संतांचा सत्संग लाभतो. मग सत्संगाने मनुष्य भक्तिपूर्वक माझी उपासना करतो. आणि पुढे संत ज्याचे नेहमी वर्णन करतात, ज्याचा निर्देष करतात, जे भक्तांना दाखवितात, ते माझे परमपद तो सहजच प्राप्त करतो, अर्थात् त्यायोगे बद्धाचा मुक्त होतो.

आता हा संत कसा असतो ? त्याची लक्षणे कोणती ? भक्ति आम्हाला ठाऊक आहे. पण संतांनी सांगितलेली भक्ति कोणती ? ती कशा प्रकारची असते ? हो, आता आमचा गणूही गायन करतो आणि तानसेनही गायन करायचा. मग कोणासारखे गायन केले असता परमपद प्राप्त होईल ? संतांमध्ये असे कोणते वैशिष्ट्य असते की जे गायनकले मधे तानसेनाचे म्हणावे ? पाहू पुढे.
(क्रमशः)
एकोहम्

No comments: