30 July, 2009

मानसमणिमाला (२२)

मानसमणिमाला (२२)


हिंदी : छमिहहिं सज्जन मोरि ढिढाई । सुनिहहिं बाल वचन मन लाई ॥ ८ ॥

जैं बालक कह तोतरि बाता । सुनहिं मुदित मन पितु अरु माता ॥ ९ ॥

हँसिहहिं क्रूर कुटिल कुबिचारी । जे पर दूषन भूषन धारी ॥ बाल. २.७.१० ॥

मराठी : सज्जन मम उद्धटता क्षमतिल । मन लावुन शिशु-शब्द ऐकतिल ॥ ८ ॥

बोल बोबडे बालक बोलति । माता पिता मुदित मन ऐकति ॥ ९ ॥

क्रूर कुटिल हसतिल कुविचारी । जे पर-दूषण-भूषण-धारी ॥ १० प्रज्ञानानंद ॥


अर्थ : या माझ्या ज्यादा धीटपणा बद्दल संत, सज्जन मला नक्कीच क्षमा करतील; आणि माझी बालभाषा मनापासून ऐकून घेतील. जेव्हां आपले लहान मूल बोबडे बोल बोलू लागते तेव्हां आईबाप ते बाळबोल ऐकून आनंदित होतातच ना ! कदाचित्‌ कुविचारी कुटिल माणसे मला हसतील. कारण दुसर्‍याचे दोष शोधून ते इतरांना दाखविण्यंत त्यांना स्वतःला भूषणच वाटत असते.


संत सज्जनांचे चित्त उदार आणि सर्वांप्रति क्षमाशील असते. त्यामुळे ते इतरांचे अपराध, गैरवर्तन माफ करतात. त्यातून असे वर्तन एकाद्या अज्ञानी बालबुद्धीच्या व्यक्तिकडून घडले असेल तर अहैतुकि कृपासिंधु असलेले संत क्षमा तर करतातच पण ते वर्तन सुधारावे म्हणून मार्गदर्शनही करतात, चूक सुधारून घेतात.


इथे तुलसीदास संतांना विनवीत आहेत' की मी जे रामयशोगान करण्याचे माझ्या अवाक्याबाहेरचे काम करण्याचे धाडस करीत आहे त्याबद्दल आपणही अशीच उदार दृष्टि ठेवावी. मी लहान अज्ञानी बालक आहे, त्यामुळे आपल्यासमोर बोबड्या शब्दांत काहीतरी सांगायचा प्रयत्‍न करीत आहे. मातापित्यांनाच आपल्या बाळाचे चुकत माकत काढलेले शब्द समजतात, ते मनापासून ते शब्द ऐकतात आणि त्यांचे मन आनंदाने भरून जाते. त्याचप्रमाणे आपणही माझ्या बालबोलीकडे दुर्लक्ष करावे. आपण क्षमा करालच याबद्दल मला खात्री आहे कारण मी 'रामचरितगान' करीत आहे, हा माझा उद्देश तरी उदात्त आहेच. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात - " नातरी बालक बोबडा बोली । कां वाकुडा विचुका पाऊली । ते चोज करुनी माऊली । रिझे जेवी ॥ तैसा मी जरी तुम्हाप्रती । चावटी करीतसे बाळमती । तरी तुम्ही तोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ (ज्ञानेश्वरी ९-६,१६) "


माझे हे धाडस कांही कुविचारी लोकांना हास्यास्पद वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते यांतील चुका, त्रुटी शोधून काढण्यांतच दंग होतील एवढेच नव्हे तर हेच आपले बुद्धिचातुर्य आहे असे भूषण मिरवितील. मिरवू देत बापडे ! त्यांची वृत्तीच तशी असते ना ! - 'हंसहि बक गादुर चातकहि । हँसहि मलिन खल विमल बत कही (२.८.२) - डबक्यांत मासे धरणारे ढोंगी बगळे मानस सरोवरांत विहार करणार्‍या राजहंसांनाही हसतात आणि निशाचर , कर्कश आवाज करणारी वटवाघुळे अनन्यचित्त चातकांना क्षुद्र लेखतात. अगदी तसेच खल दुर्जन माझ्या या विमल, अनन्य प्रेमभक्तिला व उपासनेला हसतील, क्षुद्र लेखतील. परंतु माझे मायबाप संतसज्जन व प्रभु सीताराम मला खचितच आपला म्हणतील नां !

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: