10 February, 2008

मंत्र, स्तोत्रे आणि सूक्ते - १

भारतीय संस्कृति मुख्यतः यज्ञप्रधान संस्कृति आहे असे म्हटलेले बऱ्याच ठिकाणी पहायला मिळते. कांही शतकांपूर्वी तसे असेलही कदाचित्, पण आज तरी ती शिथील होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे असे वाटते. पुरातन काळी यज्ञ घरोघर केले जात असत. पुढे जसजशा मनुष्याच्या गरजा वाढू लागल्या तसतसे यज्ञयागासाठी वेळ काढणे, सामुग्रीची जमवाजमव, त्या साठी लागणारा खर्च या सर्व दृष्टीने वैयक्तिक यागाची जागा सामुहिक यज्ञाने घेतली. कालांतराने तेही कोणा मोठ्या धनिकाच्या पाठिंब्याने शक्य होऊन कोणी मोठा धनिक (यजमान) यज्ञ करणार आणि इतर सर्व प्रेक्षक असे त्याचे स्वरूप झाले. मोठे यज्ञ काही दिवस वा एक-दोन महिनेही चालणारे असत. त्यांत सकाळी अग्निमंथन आणि दुपारी ऋषि समुदायाचे वैचारिक मंथन असा क्रम होऊ लागला. तिथे आपापल्या ध्यानसाधनेत स्फुरलेल्या विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण होत असे आणि कधी कधी सिद्धांत मांडले जात. थोडक्यात upanishadic declarations सरखे काहिसे. बहुतेक वेळेस चर्चेचा विषय 'मनुष्याची उन्नती कशा प्रकारे होऊ शकेल' अशा स्वरुपाचे असत.

मानवी जीवनाच्या परीक्षणावरून ऋषिंना जाणवले की मनुष्याचे जीवन प्रायः बहिर्मुखी आणि भोगैकप्रवण असते. त्यामुळे त्याचे जीवन सतत सुख-दुःखांमध्ये हेलकावत असते. स्वस्थ शांत जीवन फारच थोड्यांच्या वाटेला येते. ज्यांचे जीवन स्वस्थ आणि शांत आहे त्यांचे जीवनाचा स्तर साधारण मनुष्यापेक्षा कितीतरी उंच असतो. अशा मनुष्याची वृत्ति अंतर्मुखी असते, त्याचे चित्त स्थिर असते. परिस्थितीनुसार त्याचा आनंद हेंदकाळत नाही. मग त्यामागील कारणांच्या संशोधनांतून, परीक्षणातून त्यांना जाणवले की मनुष्याच्या विचारांची बैठक त्याच्या असलेल्या स्तराला कारणीभूत असते. जर जीवनाचा स्तर वाढवायचा असेल तर अंतर्मुख होण्यासाठी बहिर्मुख वृत्तीवर नियंत्रण हवे. आणि हे नियंत्रण कोणी कोणावर लादू शकत नाही. ते स्व-निश्चय करूनच पत्करावे लगते. पण अनुभव असा असतो की एखाद वेळेस मोठ्यातली मोठी कामे जमू शकतील पण नियंत्रण ? छे, अतिशय कठीण. पण पर्याय तर नाही. मग कसे आणायचे नियंत्रण ? त्यासाठी सतत चालणारा विचारांचा जो प्रवाह असतो त्यात परिवर्तन होणे आवश्य आहे. त्यांना हे कळून चुकले की वाईट कृतिपेक्षा वाईट विचार भयानक परिस्थिती निर्माण करतात. कृति क्षणिक असते पण विचारांनी होणारे संस्कार जन्मोजन्मी पिच्छा सोडीत नाहीत. अगदी चांगल्या वाटणार्‍या व्यक्तीच्या ठिकाणीही ते बीज रुपाने सुप्त असतात; आणि एकादे वेळेस असे डोके वर काढतात की त्याचे परिणाम स्वतःसकट इतरांनाही भोगायला लावतात. कारण जन्मोजमींचा वासना संचय आणि इंद्रियांची बलवत्तर शक्ति यांच्या संयोगामुळे बीज रूपातील क्षुद्र वृत्ति संधीच शोधत असतात. कधी परिस्थितीमुळे मनुष्याची आंतरीक श्रद्धा डळमळते तर कधी बाह्य कारणांमुळे (संगती वगैरे) क्षुद्रवृत्ति डोके वर काढतात. उदाहरण घ्यायचे तर रामायणातील (रामायण इतिहास मानल्यास) कैकयी. तिचा पिंड राजस गुणी. श्रीरामावर कौसल्यापेक्षाही जास्त प्रेम करणारी. पण अचानक रामाचा द्वेष करून भरतावरील ममत्व जाहीर करते. वास्तविक मंथरेच्या प्राथमिक संभाषणानेही तिच्या विचारसरणीत बदल झालेला नसतो; पण मंथरेच्या अधिक उकसवण्यामुळे कैकयीच्या सुप्त असलेल्या क्षुद्र वृत्ति जागृत होतात.

उन्नतीचा पाया वैचारीक संतुलनावर अवलंबून आहे हे तर सर्वमान्य झाले. वैदिक काळीच ऋषींच्या यज्ञीय सभांमधून असे निष्कर्ष काढले गेले. आजही गेल्या ५० वर्षांतील पाश्चात्य देशातील Dr. Wayne Dyer सारखे इतर psycologist, psychiatrist, psychotherapist यांचे साहित्य पाहता सर्वजण एकमताने Positive Thinking चा पुरस्कार करणारे दिसतात. म्हणून मनातील विचार प्रवाहाला निरंतर चांगल्या गोष्टीत गुंतवून ठेवणे आवश्यक. बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे निकडीचे. मग प्रवाही मन स्थिर झाले की सर्वदा 'आनंदाचे डोही आनंद तरंग' उठतात. side benefit म्हणून अद्‌भुत शक्तीचा प्रत्यय तर येतोच पण आचरणसुद्धा कोणालाही हेवा वाटेल असेच असते.

वैदिक सूक्तांच्या निर्मितीत ( आणि आधुनिक काळात अभंगांच्या निर्मितीत ) परमेश्वर स्तुति वगैरे दिसून येतेच पण मुख्यतः मन एके ठिकाणी स्थिर करणे ह्यासाठी त्याचा उपयोग जास्त होतो असे म्हणतात. सूक्तांच्या निर्मितीतही मंत्रांची रचना करताना मंत्रातील शब्द, वर्ण यांची देखील खूप अभ्यासपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने योजना झाली. कित्येक मंत्र, उच्चार आणि भाव यांच्या योगे चित्तस्थैर्य, शुद्ध सात्विक विचार, मनाचे संतुलन वाढविण्यास उपयुक्त आहेत आणि त्याचबरोबर त्यात काही सुप्तशक्ति (उदा - वाक्‌सिद्धी) जागृत होण्याचेही सामर्थ्य आहे. आधुनिक "विज्ञाननिष्ट" मनुष्याला त्याची प्रचिती येत नाही कारण त्या मंत्राचा अर्थ आणि रहस्य जाणून घेण्याचा धीरही नसतो आणि त्यासाठी लागणार्‍या कष्टाची तयारीही नसते. MBA, MBBS इ. करायलाही काही कमी कष्ट पडत नाहीत. पण ते केल्याने अर्थप्राप्ति आणि ऐहिक सुखासाठी लागणारे सर्व काही मिळवण्याचा जो विश्वास आणि जी श्रद्धा असते, ते सर्व मिळवून देण्यास मंत्र/सूक्ते इ. देखील तितकीच सामर्थ्यवान आहेत अशी श्रद्धा नसते.
एकोऽहम्‌

No comments: