13 February, 2008

मानसमणिमाला रत्‍न ३ रे


मानसमणिमाला (३)


हिंदी दोहा : जथा सु‍अंजन अंजि दृग साधक सिद्ध सुजान ।
कौतुक देखत सैल बन भूतल भूरि निधान ॥ १ ॥ बालकाण्ड
गुरु-पद रज मृदु मंजुल अंजन ।
नयन अमिअ दृग दोष विभंजन ।
तेहिंकरि बिमल बिबेक बिलोचन । चौपाई - १
मराठी : नेत्रि सु-अंजन घालिता साधक सिद्ध सुजाण ।
वनि पर्वति कौतुकि बघतो भूतळि भूरि निधान ॥
गुरु-पद रज मृदु मंजुल अंजन ।
नयनामृत दृग-दोष-विभंजन ।
तत्कृत विमल विवेक-विलोचन । प्रज्ञानानंद
अर्थ : डोळ्यात सिद्धांजन (सु‍अंजन) घातले असतां साधकभक्त सिद्ध व सुजाण होतो आणि त्याला सहजतेने, विनाप्रयास वन, पर्वत किंवा भूमिमध्ये सलेले गुप्त धन स्पष्ट दिसते. श्रीगुरुमहाराजांचे पदरज हे अत्यंत मृदु व मुलायम नेत्रंजन आहे. त्यामुळे दृष्टीदोष पूर्ण नाहीसे होतात तसेच आपला ज्ञानचक्षु स्वच्छ व निर्मल होतो.
गुरु पदरजांची प्राप्ती म्हणजे गुरूंची कृपा प्राप्त होणे व ही कृपा अनेक चमत्कार घडवूं शकते. तातील प्रमुख चमत्कार म्हणजे साधकाला एक वेगळीच दृष्टि प्राप्त होते. रोजच्या जीवनांत घडण्यार्‍या घटना, प्रसंग यांचेकडे पाहण्याची त्याची दृष्टि बदलू लागते. सामान्यतः आपल्या जीवनांत घडणार्‍या प्रसंगांकडे आपण व्यक्तिनिरपेक्षतेने, वस्तु निष्ठतेने पहात नाही. त्यांना दुख-दुःखांचा, मी-तू पणाचा, मानापमानाचा रंग लावून तांचे विकृत मूल्यमापन केले जाते. त्यामुळे ते प्रसंग व त्यातून निघणारा खरा अर्थ आपल्याला नीट कळत नाही. अनेक गैरसमजांचे, अज्ञानाचे जाळे तयार होते. कोण बरोबर चूक, काय खरे खोटे, किती आवश्यक अनावश्यक सगळेच्या सगले धूसर आणि विकृत होते.
भूमीमध्ये खोलवर पुरलेले किंवा गहन अरण्यांत नेऊन लपवून ठेवलेले धन सहजगत्या दृष्टीला दिसत नाहीच, परंतु अनेक वेळां फसगत होऊन गोंधळ मात्र आणखीच वाढतो. असे म्हणतात की विशिष्ट तर्‍हेचे अंजन डोळ्यात घातले असतां भुमीतील धनही स्स्पष्ट दिसते. पण हे अंजनहि असे सहजी उपलब्ध नसते. ते मिळविण्याकरितां खूप प्रयत्‍न करावे लागतात.
त्यापेक्षां अनंतपटीने गुरुकृपारूपी अंजन दुर्लभ आहे. त्यकरितां गुरुसेवा, दास्य करणे अत्यंत आवश्यक आते. गुरुंची आज्ञा पालन करून गुरुंना प्रसन्न करून घेतले तर मात्र हेगुरू हे अमृतमय सिद्धांजन आपल्या सिष्याच्या नेत्रांत घलतात. त्यामुळे जगाकडे बघण्याची साधकाची दृष्टिच बदलून जाते. पूर्वीचे मूल्यमापन, त्यांतील सुखदुःखें, मी-तूपणा किती हास्यास्पद, अनावश्यक होता हे त्याला जाणवू लागते. 'विमल विवेक' जागृत होऊन त्याला शुद्ध ज्ञानाचा एक दिव्य चक्षु 'विलोचन' म्हणजे प्राप्त होतो आणि त्याला आपल्या गुप्तधनाचा म्हणजेच स्व-स्वरूपाचा ठावठिकाणा कळतो.
मग मीराबाई आनंदाने म्हणतात 'पायोजी मैने रामरतन घन पायो ! आणि मुकुंदराज म्हणतात - 'आजि मी ब्रह्म पाहिले !
आणि ज्ञानदेव तर तुलसीदासांच्याच शब्दांत म्हणतात -
(गुरुकृपेने) जैसे डोळ्या अंजन भेटे । ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे । मग वास पाहिजे तेथ प्रकटे । महानिधी ॥ [ज्ञानेश्वरी १.२३]

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: