24 February, 2008

मंत्र, स्तोत्रे आणि सूक्ते - २

मागच्या (पहिल्या) भागात आपण पाहिले की मनुष्यमात्राच्या उन्नतीचा पाया वैचारीक संतुलनावर अवलंबून आहे. म्हणून मनातील विचार प्रवाहाला निरंतर चांगल्या गोष्टीत -Positive Thinking- गुंतवून ठेवणे आणि बहिर्मुख मनाला अंतर्मुख करणे आवश्यक आहे. चित्तस्थैर्य, शुद्ध सात्विक विचार, मनाचे संतुलन वाढविण्यास उपयुक्त आहेत प्रवाही मनाला स्थैर्यप्राप्तिसाठी ऋषि-मुनींनी अनेक मंत्र, स्तोत्रे, सूक्ते यांची निर्मिती केली. स्थीर मनातच 'आनंद तरंग' उठतात. ब्रह्मणस्पती सूक्त, विष्णुसहस्रनाम, ललिता सहस्रनाम, पुरुषसूक्त, नारायणसूक्त, देवीसुक्त, रुद्रसूक्त - किती variety ज्याची जशी taste ज्याची जशी कुवत त्याप्रमाणे वैदिक साहित्यात स्तोत्रे, सूक्ते उपलब्ध आहेत. सर्व सूक्ते वेद, उपनिषदे, ब्राह्मण ग्रंथ, अरण्यके इत्यादिंमधून वेचून condenced स्वरूपातील निर्माण केलेल्या कृति. सूक्तांच्या संदर्भात लक्षात घेणे आवश्यक आहे की कोणत्याही सूक्ताचे नुसते पठण करून विशेष काही साध्य होणार नाही. वेदांमध्ये कर्मकाण्ड व ज्ञानमार्ग दोन्ही मार्ग उपलब्ध आहेत पण दोन्ही वेगवेगळे आहेत. ज्ञानाद्वारे मोक्ष व कर्माद्वारे ऐहिक व स्वर्गादिची प्राप्ति. म्हणून सुक्तांच्या उपयोगाची फळे भिन्न आहेत. अनुष्टान करतांना दोन्ही प्रयोजनांचा समुच्चय होणे शक्य नाही, किंवा एकात दुसरे अंतर्गत आहे असेही होऊं शकत नाही. सूक्तांचा तीन प्रकारे उपयोग केलेला आढळतो. १) उपासना - पठण मनन करून परमात्व तत्त्वाची ओळख करून घेणे २) कर्म - एक धार्मिक विधि म्हणून उपयोग करून इच्छित साध्य करून घेणे ३) ह्या लोकी ऐहिक साध्यासाठी तसेच स्वर्गादि पारलौकिक प्राप्तिसाठी सूक्त मंत्रांचा उपयोग अभिषेक वा यज्ञाहुति देण्यासाठी करणे [ २ आणि ३ मध्ये प्रयोग वेगळा असला तरी उपयोग एकच ] ४) अगदी यांत्रिक पद्धतीने पाठ करून 'आपण काही विशेष केले' असे थोड्या वेळेपुरते टिकणारे समाधान मिळविणे ( पण ह्यामध्ये क्वचित अहंकार बळावण्याचा धोका उद्‍भवू शकतो ). जो पर्यंत जीव 'अहं-मम' च्या (मी-माझे) कक्षेत वावरतो तोपर्यंत सुख-दुःख असणार. कारण ' यत् अप्लं तन् मर्त्यम् ' हा नियम आहे. छांदोग्य उपनिषदात ब्रह्माला 'भूमा' म्हटले आहे. 'भूम' म्हणजे विशाल, इतके विशाल की दृष्य जगताचे ते एक आधारभूत तत्त्व आहे. परमात्म स्वरूप विशाल आहे. आपण त्या विराटाचाच अंश आहोत. उपासनेने साधकही व्यापक होतो आणि तशी वृत्ती विशाल व्हावी म्हणून सूक्तांचा अभास आवश्यक. अखंड आनंद प्राप्तीसाठी आपण परमात्म्याचा (अल्प) अंश नसून आपण स्वतःच परमेश्वर आहोत असा भाव ठेवून 'भूम' बनायचे हा उद्देश ठेवून उपासना करायची असे ऋषींचे म्हणणे. म्हणून नुसता सूक्त पाठ करण्य़ापेक्षा सूक्तांचा अर्थ जाणून परमेश्वर स्तुति म्हणून उपासना करणे जास्त लाभदायक होणारच. काही विद्वान म्हणतात सूक्ताद्वारा 'शिवो भूत्वा शिवं भजेत' किंवा 'विष्णुः भूत्वा विष्णूं अर्चयेत्' अशा भावनेने उपासना केल्यास त्वरीत लाभ होतो.

No comments: