20 May, 2008

मानसमणिमाला (७)


मानसमणिमाला (७)


हिंदी : मति कीरति गति भूति भला‍ई । जब जेहिं जतन जहाँ जेहिं पाई ॥ ५ ॥
सो जानव सतसंग प्रभाऊ । लोकहु वेद न आन उपाऊ ॥ बालकाण्डा २.६
मराठी: मति गति भूति भलेपण कीर्ती । जैं ज्या जेथें प्राप्त जशीं ती ॥ ५ ॥
तो सत्संगति - महिमा जाणा । लोकीं वेदिं उपाय दुजा ना ॥ ६ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सर्व प्राणिमात्र व मनुष्यांना जिथे, जेव्हां आणि ज्याप्रकारे सुमति, उत्तमगति, भूति म्हणजे ऐश्वर्य, भलाई व कीर्ति प्राप्त होते त्याचे मागे सत्‌संगतीचा प्रभाव हेच मुख्य कारण असते असे निश्चितपणे समजावे. लोकाधार व वेददेखील हाच एकमेव उपाय आहे असे आग्रहाने सांगतात.

ह्या पृथ्वीवर राहणारे सजीव कीटक, पशुपक्षी, वनस्पती सृष्टि व मनुष्य प्राणी या सर्वांच्या जीवनावर सत्‌संगतीचा प्रभाव पडतो व त्यांना सद्‌बुद्धि, कीर्ति, ऐश्वर्य, स्वास्थ्य, चांगलेपणा प्राप्त होतो असे संत तुलसीदास वेद, शास्त्रे व लोक व्यवहार यांच्या पुराव्यानिशी आपल्याला ठामपणे सांगतात. अनेकांना अशी विधाने अतिरंजित किंवा धर्मभोळेपणा निर्माण करणारी अशी वाटतात. परंतु विज्ञानाने, इतर शास्त्रग्रंथांनी व इतिहास-पुराणांनी यातील सत्यता अनेकवेळा सिद्ध केली आहे.
भगवान रामचंद्र सीतामाई व लक्ष्मणासह पंचवटीमध्ये वास्तव्याला आले आणि तेथल्या चराचरामध्ये अवर्णनीय स्थित्यंतर झाले. तेथील भितीप्रद, भयानक, उग्र अरण्याचे शांत, सुरक्षित व नयन मनोहर उपवनांत रुपांतर झाले. त्यांत वास्तव्य करणारे ऋषि-मुनि, गिरीजन अत्यंत सुखाने, आनंदाने कालगणना करूं लागले. इतकेच नव्हे तर -
खग मृग वृंद अनंदित रहहिं । मधुर मधुर गुंजत हरुनि लहहि ॥
सो बन बरनि ना सकें अहिराजा । जहाँ प्रगट रघुवीर बिराजा ॥
गीध, व्याघ्र, मर्कट व इतर हिंस्र प्राणीही आपापले त्रासदायक, भितीप्रद दुर्गुण सोडून एकत्र नांदू लागले. अहिंसा प्रतिष्ठायां तत्‌ संनिद्धौ वैरत्यागः । असे एक योगसूत्रही या सत्‌संगतीच्या प्रभावाची ग्वाही देते.
बालमुकुंद श्रीकृष्णाच्या सान्निध्याने गोकुळातील आबाल वृद्ध, स्त्री-पुरुष आनंदित सुखी झाले. इतकेच नव्हे तर गाई-गुरे, त्याच्या मधुर मुरलीनादाने वेडावून गेली. भरभरून दूध लोणी तुपाच्या गंगा वाहू लागल्या. यमुनेचे जल शांत निर्मल झाले. कालियाचे प्रदुषण नाहीसे केल्याने निर्विघ्न झाले. भूमि, गोवर्धन पर्वत सस्य शामल झाले व सर्वत्र शांतता समाधान समृद्धि नांदू लागली.
वनस्पती सृष्टिवर व प्राणिसृष्टिवर सत्‌विचारांच्या प्रक्षेपणाचा, संगतीचा, मंत्रोच्चारणाचा अत्यंत चांगला परिणाम होतो, योग्य तर्‍हेने वृद्धि होते, रोगराई नाहीशी होते हे तर विज्ञानानेही सिद्ध केले आहे. अशी अनेक मनोरंजक व उद्‌बोधक उदाहरणे आपल्या नेहमी वाचनात येतात, त्यामुळे त्याचाबद्दल शंका राहात नाही.
मनुष्यांचा बाअतीतही सत्‌संगतीचा प्रभाव मोठमोठी कार्ये घडवून आणतो, आणि अशी हजारो उदाहरणे इतिहास पुराणांत तर सापडतातच. पण वर्तमानांतही असंख्य उदाहरणे मिळतात. अगदी अलिकडच्या काळांत लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारख्या संततुल्य नरवीरांच्या प्रभावामुळे अडाणी दीन भारतीय जनतेने आपला पारतंत्र्याचा अपमानास्पद कलंक पुसला व भारताला आत्मगौरवाचे अभिमानास्पद स्वातंत्र्य प्राप्त करून दिले. सुख समृद्धीचा व ज्ञानप्राप्तीचा मार्ग खुला झाला हा निःसंशय संतसंगतीचा प्रभावच नाही कां ?
संत संगतीचा हा लाभ संतांच्या प्रत्यक्ष सहवासाने होतोच पण तो प्राप्त होणे नेहमीच शक्य होत नाही. संतांच्या जीवन चारित्र्याचे, त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथ संपदेचे, त्यांच्या कार्याचे परिशीलन करून त्याचे अनुसरण करणे प्रत्यक्ष सहवासा‍इतकेच प्रभावी असते व म्हणूनच लाभदायी असते.

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: