10 June, 2008

संतपरंपरा

संतपरंपरा


ह्या चिंतनाला अक्षरस्वरूप देण्याआधी प्रथमतः अखिलगुणनिधान, सच्चिदानंदघन, करुणावरुणालय, भक्तवत्सल, प्रेमळजनप्रांजळ अशा रुक्मिणीप्राणसंजीवन श्रीपांडुरंगाच्या चरणांवर माथा ठेवतो.
चिंतन करताना श्रीमहाविष्णुचा अवतात "सखा माझा ज्ञानेश्वर" असं आपल्या श्रीजनाबाई ज्यांचा उल्लेख करतात, महाकैवल्यतेजोनिधी असे श्रीगुरु ज्ञानेश्वर महाराज यांचे जाज्वल्य, स्वयंभू अधिष्ठान, शब्दशक्तीचा सातत्याने पुरवठा करत असते.
या चिंतनाच्या मागे ऋषी, मुनी, आचार्य आणि संतपरंपरा यांचा प्रकाश आहे. अण्णा फक्त गोमुख - दगडाचे. ह्या सगळ्या परंपरांतील महात्मे, मनुष्यमात्राला प्रबोधन करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी झालेले ईश्वर शक्तीचेच अवतार आहेत.
सत्ययुग व त्रेतायुगात ऋषी व मुनी परंपरा प्राधान्य. आचार्य परंपरेचा प्रारंभ झाला द्वापारयुगातच. पण आता त्यानंतर ह्या कलियुगात प्रधान रूढ परंपरा म्हणजे संत परंपरा. ऋषी, मुनी, आचार्य ह्या जुन्या सनातन वैदिक औपनिषदिक तत्त्वज्ञान यांचा विचार आचार करणार्‍या परंपरा असल्या तरीसुद्धां आता त्या घोर कलियुगात आपल्यामध्ये परमार्थिक बी रुजवणारी मुख्य उपकारण असणारी संतपरंपराच आहे.
सांप्रदायिक चाकोरीचा आग्रह अट्टाहास प्रकाशित केला, 'यारे यारे लहान थोर' हा ज्यांचा उदार दृष्टिकोन 'येति भलते नारी नर' असा आवांका लोककल्याणाचा आणि "करावा विचार । न लगे चिंता कोणाची ॥" ही आश्वासकता ती संतपरंपरा. संतांनी परमार्थाच्या "सूक्ष्म-दुस्तर" वाटा मोडल्या आणि राजमार्ग रूढ केला, सर्वांसाठी खुला केला. हे करतांना त्यांनी ऋषी, मुनी आणि आचार्य या परंपरेचाच आधारभूत पाया म्हणून उपयोग केला. आपले श्रीतुकोबाराय काय म्हणतात - "वेदमार्गे मुनि गेले । त्याचि मार्गे चालिलो ॥". आपली ज्ञानराज माऊली - "व्यासांचा मागोवा घेतू । भाष्यकारांते वाट पुसतु ॥" अशी साक्ष. तुकोबारायांनी या सगळ्याचा सुंदर समन्वय साधला. "वाचा बोलो वेदनीति । पण करूं संतीं केले तें ॥" म्हणजेच औपनिषदिक वैदिक तत्त्वज्ञान. प्रमेय सिद्धांत समाजात रुजवतांना, देश-काल मानानुसार पद्धतीत थोडा बदल केला. पण हा बदलसुद्धा दार्शनिक दृष्ट्या, तत्त्वदृष्ट्या न करता तपशीलात केला. त्यांत सुलभता, सर्वंकशता आणली.
जरा विचार केला तर जेवढी जवळीक संतांची वाटते तेवढी "ऋषी, मुनी, आचार्य" यांची नाही वाटत. काय गंमत आहे पहा - मत्स्य, कच्छप, वराह हे अवतारच, पण ह्या अवतारातील भगवंताची कोणी उपासना करतं का ? नंतर नारसिंह, वामन , परशुराम, राम, कृष्ण. पण ह्यातदेखील प्राधान्येकरून उपासना 'राम कृष्णाचीच' नाही कां ?
राम अवतार उपास्य खरे पण ह्या अवतारांत प्रभूंचे राजेपण अवतार समाप्तीपर्यंत आहेच आहे. पण कृष्णावतार पहा. ह्या अवतारांत आपले मूळ अनादि स्वरूप तसंच्या तसं ठेवून गवळ्या घरी अवतार घेतला. समाजात इतके मिसळले कीं ह्या गवळ्यांच्या पोरांशी खांद्याला खांदा लावून खेळले. खेळतांनाही वेळ आली तर त्यांचा डाव त्यांना द्यावा. कृष्णावर डाव आला की पेंद्याने म्हणावे, "खाली वाक, मी आत तुझ्या पाठीवर बसणार रे". कृष्णाने खाली वाकावे, पेंद्याला येथून तेथवर वाहून न्यावे व डाव द्यावा.
एवढेच काय - 'पाहतां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥' - कुठे जगत नियंता परमात्मा व कुठे ही गवळ्यांची मुलं ! त्यांचं उच्छिष्ट खावे, ब्रह्मांडनायकांनी ? त्यामुळे भगवान कृष्ण अगदी सामान्य जीवालाही आपालाच वाटतो. खेळीमेळी खेळगडी वाटतो. तसंच संतांच. कुठे भगवतकृपा पात्र पुण्यवंत संत व कुठे सामान्य जीव. तत्त्वतः खूपच अंतर. पण तरीही संत समाज कल्याणासाठी खाली उतरतात, सोपं करून सांगतात. आणि सोपं काय ? तर "नाम". आणि ज्या लोकांना वर उचलतात - आपल्यासारखंच करतात. हे संतपरंपरेचे कौशल्य.
अण्णा -

1 comment:

Unknown said...

Simply wonderful