14 June, 2008

मानसमणिमाला (८)

मानसमणिमाला (८)

हिंदी : बिनु सतसंग बिबेक न होई । रामकृपाँ बिनु सुलभ न सोई ॥ ७ ॥
सत-संगत मुद मंगल मूला । सोइ फल सिधि सब साधन फूला ॥ बालकाण्डा २.८
मराठी: विण सत्संग विवेक न होतो । राकृपेविण सुलभ न हो ! तो ॥ ७ ॥
सत्संगति मुद-मंगल-मूलहि । ती फल सिद्धि साधने फूल हि ॥ ८ ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सत्‌संगाशिवाय विवेकविचार प्राप्त होत नाही. आणि श्रीरामाच्या कृपेशिवाय सत्‌संग मिळणेही सोपे नाही बरं ! सर्व आनंद मंगलाचे मूळ संतसंगतीच आहे. कारण सत्‌संगति प्राप्त होणे हेच फळही आहे आणि सर्व साधनांची सिद्धि आहे. इतर साधने केवल फुलेच आहेत.
संतसंगतीचा मुख्य परिणाम कशावर होत असेल तर तो आपल्या विचारसरणीवर. सामान्य माणूस साधारणतः विचार करतो तो स्वतःसंबंधी, स्वतःच्या कुटुंबासंबंधी, त्यातील सुखदुःखे अडीअडचणी वगैरे. आपल्या मानवी जीवनाचा मुख्य उद्देश यामध्येच साठविलेला आहे इतकीच त्याची धारणा असते. पण संत त्याला आपल्या कृतीने, वाणीने, सहवासाने जागे करतात त्याच्या जीवनाची प्रत व संतांच्या जीवनाची प्रत, त्यांच्या जीवनाची उंची त्याला जाणवूं लागते. आणि मग तो आपला जीवनस्तर सुधारण्याच्या मार्गाला लागतो. पण तुलसीदास म्हणतात आधी सत्‌संगाची प्राप्ती होणेच महाकठीण आहे. खरोखर प्रभु रामचंद्रांची कृपा असेल तरच सत्‌संग प्राप्त होतो.
मुळांत संताचे संतत्व कळणे खूप कठीण असते. कारण ते आपले वेगळेपण, आपली अंतःस्थिती कधीच प्रदर्शनीय होऊ देत नाहीत. उलट सामान्यपणेच जीवनाची पद्धती ठेऊन सामान्यांच्या बरोबर राहण्याचा प्रयत्‍न करतात. आपला महिमा वाढवूं देत नाहीत.
'वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता जरी जोडे । परि वेडिवेमाजी दडे । महिमे भेणे (ज्ञानेश्वरी १३.१९०)' अश संताचे खरे संतपण चांगल्या तर्‍हेने ओळखायला आपल्याजवळ साधन तरी कोणचे आहे ? केवळ सामान्य बुद्धीच्या जोरावर ते कधीच उमजणार नाही, अगदी तीव्र बुद्धीनेही नाही. म्हणून परमेश्वराजवळ कृपायाचना करावयाची; व संताचे संतपण ओळखण्याची दृष्टि मागून घ्यावयाची.
ही दृष्टीच आपला विवेक जागा करते. संत तुकाराम महाराज म्हणतात - 'काय वानूं आतां संतांचे उपकार । मज निरंतर जागविती ॥' ही जागृती जीवनाचा खरा अर्थ शोधूं लागते. रामकृपेमुळे संताचे उदाहरण डोळ्यासमोर दिसूं लागते. त्यांच्या जीवनाची उंची खोली हळूहळूं समजूं लागते. त्यांचे अनुसरण करणे मंगलप्रद, कल्याणकारक आहे याची खात्री पटते. तेच आपल्या जीवानाचे फल, सार्थक आहे असे समजून, इतर साधनांचा त्याग करून सत्‌संगतीमध्येच आपल्या जीवनाची धन्यता आहे हे मनोमनी पटते !

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: