22 September, 2009

बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

बद्ध - मुक्त लक्षणे - (६) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

भगवंतांनी उद्धवाला सज्जनांची, साधूंची, संतजनांची २८ लक्षणे सांगितली. पुढील (३२ व्या) श्लोकात या साधुजनांतही श्रेष्ठ कोण, त्याचे विशेषत्व ते काय हे सांगतात. "मी व माझे भक्त यांच्याकडून सांगितलेल्या गेलेल्या गुणांचे व दोषांचे (हे वर्ज्य म्हणून टाळण्यासाठी) यथार्थ ज्ञान करून घेऊन स्वविहित अशा भागवत धर्माचरणाचे फलही माझ्या चरणी समर्पण करून माझी सेवा करतो तो पुरुष साधुजनांत श्रेष्ठ. अशा भक्तांचा भजनभाव कसा असतो ? तर, माझ्या अनुसंधानाशिवाय स्नान, संध्या, जप, होम, दान हे सर्व अधर्मच. कायावाचामनेंकरून माझ्या भक्तींत मग्न असणे, भजन करताना दिवस वा रात्र याचे भान नसणे ही खरी भक्तिची स्थिति. जपाशिवायच ज्याच्या मुखांत नाम, धारणेशिवायच ज्याच्या मनांत ध्यान, प्राणायामाशिवाय वायूचा निरोध, विषयाशिवाय सदोदित स्वानंद, संकल्पाशिवाय सर्व कर्मे मला अर्पण करणे - हे सर्व ज्याचेपाशी असते तोच माझा शुद्ध भक्त."


ऑलिंपिकमध्ये होणार्‍या १०० मिटर दौडीमध्ये भाग घेण्यासही विशेष पात्रता लागते. योगाची, ज्ञानसंपादनाची, भक्तिची वाटचाल सुरू केल्यावर वरील २९ गुण अंगी बाणतात तो सज्जन, तो साधु. असा साधु 'आत्यंतिक भक्त' (ही अखेरची पायरी) होण्यास qualify झाला. भगवंताच्या प्रितीसाठी पात्र झाला. मग आता उरले ते काय ? भगवंताची कृपा. त्याचे लक्ष वेढून घेणे. शर्यतीत कितीही शिकस्त केली तरी photo-finish मध्ये रेषा पार केलेलाच जिंकला. तशीच एक firm dividing line पार केल्याशिवाय "त्याचे" लक्ष वेढले जाणार नाही. पण एकदा का भगवंताचे अशा भक्ताकडे लक्ष गेले, त्याची पूर्ण कृपा झाली की असा भक्त भगवंताशी एकरूपच होतो. Like Midas Touch. ज्याने "त्याचे" लक्ष वेधून घेतले तो "तो" झाला. तोच आत्यंतिक भक्त. भगवंत म्हणतात असा भक्त म्हणजे "भक्ततम". भक्ततम हे खरे तर भक्तिमार्गावर वाटचाल करणार्‍या साधकांनी केलेले नामकरण. कारण एकरूप झाल्यावर तो असतो सगुणरूप ब्रह्मच. वसिष्ठांनी रामाला केलेल्या उपदेशामध्ये (योगवसिष्ठ) अशा आत्यंतिक भक्ताच्या अंतरंगाचे खूप छान वर्णन आले आहे ते असे.
आपण ब्रह्मस्वरूप होतां पूर्ण । ब्रह्मरूप दिसे त्रिभुवन ।
शत्रु मित्र थोर लहान । ब्रह्मरूप सर्व दिसे ॥
घागरी मडकी रांजण । आंत बिंबला चंडकिरण ।
परी सूर्यासी स्त्रीपुरुषनपुंसकपण । कल्पांतीही घडेना ॥
सोनें साच लटिके अलंकार । तरंग मिथ्या एक सागर ।
पट मिथ्या तंतु निर्धार । तैसें चराचर ब्रह्मरूप ॥
नाना घट एक अंबर । नाना मणि एक सूत्र ।
नाना मातृका एक ओंकार । ब्रह्म सर्वत्र तैसेंचि ॥
म्हणोन सुटतां हृदयग्रंथि । सर्व संशयां होय निवृत्ति ।
कर्मींच होय ब्रह्मप्राप्ति । त्रिजगतीं ब्रह्मरूप ॥
उभय पक्षांचे बळेंकरूनी । विहंगम संचरती गगनीं ।
तैसें कर्मब्रह्म ऐक्य करूनी । स्वानंदवनीं विचरावें ॥
जेथें निमाल्या सकळ आधी । श्रीरामा पूर्ण तेचि समाधि ।
तटस्थता हे उपाधि । एकदेशीं जाण पां ॥
अंतरीं जाणोनि निर्वाणज्ञान । बाहेर दाविजे भिन्नाभिन्न ।
अंतरीं बोध परिपूर्ण । बाहेर जडपण दाविजे ॥
अंतरीं करून पूर्ण त्याग । बाहेर दाविजे लौकिक भाग ।
अंतरीं होऊनि निःसंग । विषयीं विराग धरावा ॥
बाहेर लटिकेंच कृपणपण । परी अंतरीं समसमान ।
रामा तोचि सावध पूर्ण । लोकसंगविवर्जिन ॥
जैसा बीजामधूनि वट थोर । निघे अद्‌भुत पर्वताकार ।
तैसें आत्मरूपा चराचर । जाहलें जाणोनि वर्तावें ॥
तैसें जग आणि जगदीश्वर । भिन्न नोहे साचार ।
हें ज्ञान जाणोनि निर्विकार । वर्तें सदा तूं राघवा ॥


असा भक्त जो भगवंताशी एकरूप झाला, असा भक्ततम, भगवंताला किती प्रिय असतो -
तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।
तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं ॥
तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।
तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं ॥
तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥
दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥


मग असा स्वस्वरूप झालेला भक्त परत भजन कशाला करतो ?


कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं । 
वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी ॥ (ज्ञानेश्वरी- १२.१८६)


आता असा आत्यंतिक भक्त होण्यासाठी आपण काय करायचे ? ब्रॉंझ सिल्व्हर सोडा, आधी धावायला तर यावे लागेल. पण त्यासाठीही कसून मेहनत - म्हणजे उपासना, तप, साधना यांचा अंगिकार करणे अनिवार्य. उपासनेंत वरील सर्व लक्षणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे यम, नियम, आचरण, निष्काम कर्म सर्वच आले. पण हे सर्व करीत असताना एकच ध्येय पुढे असावयास हवे. ते म्हणजे भगवंताचे लक्ष वेधून घेणे, त्याची कृपा संपादन करणे. मग कशा प्रकारे करायची उपासना ? भगवंतच सांगतात उद्धवाला ३४ ते ४६ या श्लोकांतून.
क्रमशः


एकोहम्

No comments: