08 July, 2008

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

यद् यद् आचरति श्रेष्ठ: ...

श्रीमद् भगवद्‍गीतेत भगवान् श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना एके ठिकाणी म्हणतात, ' सामान्य लोक समाजातील श्रेष्ठ पुरुष जसे आचरण करतात त्याचे अनुसरण करतात'. पुढारी भ्रष्ट असेल तर अनुयायी त्याचेच अनुकरण करणार. आई वडीलांचे आदर्श वा स्वैर वागणुक, जे असेल त्याचा अपत्यांवर परिणाम होतोच. वैदिक संस्कृतीचा पाया रचणारे जे जे विचारवंत होते त्यांना मनुष्य स्वभावाच्या या मूलभूत तत्त्वाची जाण होती. ह्याबाबतीत नेहमी जनकराजा, ययाति इत्यादिंचे उदाहरण दिले जाते. पण प्रभु श्रीराम देखील हाच विचार बाळगून आपले आयुष्य कंठीत होते हे वाल्मीकि रामायणातील एका प्रसंगावरून चांगलेच जाणवते.
प्रसंग आहे पित्याच्या आद्न्येनुसार श्रीराम वनांत गेल्यावर भरत त्याला परत अयोध्येला नेण्यासाठी येतो. सर्वांना पटत असते की श्रीराम जे करत आहेत ते धर्माला अनुसरून आहेच. पण सर्व प्रजाच काय राजा दशरथाचे मंत्रीगण ज्यात वसिष्ठ व वामदेव या दोन महर्षींव्यतिरिक्त सुयश, जाबाली, कश्यप, गौतम, मार्कण्डेय व कात्यायन् यांसारखे ऋषि देखील होते (बाल. सर्ग ७); त्यांची देखील हीच इच्छा होती की श्रीरामांनीच राज्याभिषेक करवून घ्यावा.
भरताची प्रार्थना ऐकून श्रीरामांनी त्याला बराच उपदेश केला आणि त्यालाच अयोध्येचे राज्य करणे अनिवार्य आहे हे पटविले. त्यानंतर जाबालींनी एक प्रयत्न केला. ते म्हणाले - "रघुनंदन, आपण जे काही म्हणालात ते ठीकच आहे. पण श्रेष्ठ बुद्धीच्या तपस्वी मनुष्याने असे अडाणी माणसाप्रमाणे निरर्थक विचार करणे योग्य नव्हे. जीव एकटाच जन्म घेतो व एकटाच नष्ट होतो. हे जीवन म्हणजे मार्गस्थाला पुढच्या मुक्कामाआधी धर्मशाळेत एक रात्र आश्रय घेण्यासारखे आहे. कोण कुणाचा बंधू आणि कोण कुणाचा पुत्र. पिता केवळ जन्मास निमित्तकारण असतो. राजे आपले कोणी नव्हेत आणि आपण त्यांचे कुणी नव्हेत. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. आपण व्यर्थच कष्ट भोगीत आहात. प्राप्त झालेल्या अर्थाचा त्याग करून धर्म परायणता स्वीकारणारा मनुष्य या जगात केवळ दुःख म्हणूनच मृत्युनंतर नष्ट होतो.
"श्राद्धकर्माचे देव पितर आहेत. श्राद्धाचं दान पितरांना मिळतं असं लोक समजतात. पण जरा logic वापरून पहा. या असल्या परंपरेने काय साध्य होते. केवळ अन्नाची नासाडी. मरण पावलेल्याला अना कसे पोहोचेल. एकाने खाल्लेले अन्न जर दुसर्‍ पोचत असेल तर परदेशी जाणार्यांसाठी देखील शिदोरी द्यायच्या ऐवजी त्याचेही श्राद्धच करावे. तेव्हां असा निश्चय करा की या लोकाशिवाय दुसरा लोक नाही. परोक्ष अथवा पारलौकिक वगैरे विचार योग्य नाही. तेव्हां आपण भरताबरोबर परत अयोध्येत जाऊन राज्य ग्रहण करावं " हे सर्व ऐकून श्रीरामांनी जाबालींच्या नास्तिक विचारांची केवळ निंदाच केली. ते म्हणाले की वेदविरुद्ध मार्गाचा आश्रय करणारे आपण नास्तिक आहात. पुढे असेही म्हणाले की, अशा पाखंडी बुद्धीच्या द्वारे अनुचित विचर करणार्‍या आपणांस माझ्या पिताजींनी आपल्याला याचक बनविले ह्या त्यांच्या कृत्याचीच मी निंदा करतो. जाबालींचे नास्तिक व्यक्तव्य खोडून काढणारे असे श्रीरामांचे पुढे बरेच कथन आहे. पण त्यात महत्त्वाचे म्हणजे ते म्हणाले - " आपण सांगितलेल्या मार्गाने मी गेल्यास मी प्रथमतः तर स्वेच्छाचारी होईन. नंतर हा लोक स्वेच्छाचारी बनेल. कारण राजाचं जसे आचरण असते तसंच आचरण प्रजा करू लागते. " वडीलधारी, मंत्रीगणांपैकी एक आणि त्यात ऋषि असून श्रीरामांनी जाबालींना खडसावले ? पण मग आदर्श व्यक्ति अशीच असते नाही का ? असत्य, अधर्म याचा पुरस्कार करणारा मग कोणीही असो; प्रभू त्याला विरोध करणारच.
पण आता प्रश्न पडतो की जाबाली असे वेदविरुद्ध बोललेच कसे ? सर्गाच्या शेवटी स्पष्टीकरण आहे की केवळ समयाच्या आवश्यकतेनुसार ते नास्तिकवादी 'बनले' - त्यामागचा उद्देश होता की कोणत्याही कारणांनी श्रीरामांनी अयोध्येस परत जाण्यास राजी व्हावं. गंमत म्हणजे इतकं होऊनही वसिष्ठांनी देखील एक वेगळे कारण सांगून श्रीरामांना अयोध्येस परतवण्याचा प्रयत्न केलाच. तरीही कोणत्याही युक्तीला बळी पडून अधर्म करायचा असेल तर मग तो " आदर्श राम " नव्हेच. तसे झाले असते तर सर्व रामायणच कोसळले असते.

एकोहम् -

No comments: