10 July, 2008

मानसमणिमाला (११)

मानसमणिमाला (११)

हिंदी : तेज कृसानु रोष महिषेसा ।
अघ अवगुन धन धनी धनेसा ॥ ५ ॥
पर अकाजु लगि तनु परिहरहिं ।
जिमि हिम उपल कृषी दलि गरहीं ॥ बालकाण्ड ३.७ ॥
मराठी : तेजिं कृशानु रोषिं महिषेश्वर ।
अघ-अवगुण-धन धनी धनेश्वर ॥ ५ ॥
परिहरति तनु परापकारा ।
पीक विनाशुनि वितळति गारा ॥ ३.७ प्रज्ञानानंद
अर्थ : हे खलगण तेजाने (तापट) अग्नीच असून क्रोधाने महिषासुरच असतात. पाप आणि दुर्गुण हेच त्यांचे धन असते व या धनाने ते खूपच श्रीमंत, अगदी कुबेरच असतात. ते दुसर्‍याचा अपकार करण्यासाठी अगदी आपल्या देहाचा सुद्धां नाश करायला तयार असतत. जसे पिकाचा नाश करून गारा स्वतःही वितळून नष्ट होतात.

क्रोध उसळून येणे हे खलवृत्तीचे ठळक लक्षण आहे. एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली किंवा घडविली तर सामान्यतः माणसाला राग येतोच. पण तो राग कारणाच्या प्रमाणात व व्यक्तिनुसार कमीजास्त असावा. अजाण बालके, अज्ञानी मनुष्य, आजारी रोगी व्यक्ति यांच्याकडून चुका झाल्यास त्या क्षम्य मानाव्या. अपराध मोठाच असेल तर ती समज देऊन, कारवाई करून राग वाढूं न देतां सर्व प्रकरण हाताळणे हेच शहाणपणाचे असते. परंतु हा विवेक दुष्प्रवृत्त माणसांजवळ नसतो. अग्नी जसा एकदम भडकतो व त्याच्या समोर असेल ते जाळीत सुटतो तसा दुष्ट माणसांचा क्रोध असतो. त्यांना लहान मोठे, ज्ञानी अज्ञानी वंद्य निंद्य यातील कांहीच फरक समजत नाही इतके ते रागानें बेभान होतात व त्यामुळेच त्यांच्या हातून अनेक दुष्कृत्यें घडतात. अनेक तर्‍हेचे अवगुण त्यांना येऊन चिकटतात. पण त्यांना त्याचे वाईट वाटत नाही, उलट फुशारकी वाटते हे खरोखर दुर्दैवच असते. एखादा माजलेला रेडा उन्मत्तपणानें वाटेल त्याला धडका मारून लोळवितो आणि जीवही घेतो तसे दुष्ट माणसाला आपले विकार आवरत नाहीत व त्या भरात ते इतरांचा नाश घडवून आणतात. त्यातच त्यांचा आनंद साठविलेला असतो.
परंतु या सर्व खटाटोपात ते स्वतःचाही सर्वनाश करून घेत असतात हे त्यांच्या लक्षांत येत नाही; इतके ते त्या दुष्ट विचारानें भारावलेले असतात. नको असलेल्या व्यक्तिचा नाश घडवून आणण्याकरिता स्वतः 'मानवी बाँब' होऊन आपलाही नाश पत्करावयाचा हे किती अघोरी कृत्य आहे ? त्यातून ना कुठला स्वार्थ साधता येतो ना परार्थ. उलट स्वतःच्या मनुष्यत्वाची हानी आणि जगाकडून शिव्याशाप व निंदा !
जगाच्या कल्याणाकरितां, देशकार्याकरितां, मानवतेच्या भूमिकेतून अनेक संत सत्‌शील व्यक्तींनी आपल्या प्राणांचे बलिदान केलेले आपण आदरानें स्मरतो. अनंतकाल पर्यंत त्यांच्या कीर्तिंचे गायन होत राहते. मरावे परि कीर्तिरुपे उरावें - असे त्यांचे चारित्र्य. या पार्श्वभूमीवर स्वतःचा नाश झाला तरी चालेल पण दुसर्‍याचा नाश केल्याखेरीज राहणार नाही ही विचारसरणी किती विपरीत आणि विघातक आहे नां ?
डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: