29 July, 2008

मानसमणिमाला (१२)


मानसमणिमाला (१२)

हिंदी : भल अनभल निज निज करतूती ।
लहत सुजस अपलोक विभूती ॥ १.४.७. ॥
सुधा सुधाकर सुरसरि सधु ।

गरल अनल कलिमल सति ब्याधू ॥ १.४.८. ॥
मराठी : भले बुरे निज निज कर्तूती ।

घेती कीर्ति अकीर्ति विभूती ॥ ७ ॥
सुधा सुधाकर सुरसरि सज्जन ।

गरल अनल कलिमलसति दुर्जन ॥ प्रज्ञानानंद
अर्थ : सज्जन अगर दुर्जन आपल्या चांगल्या किंवा वाईट करणीनें जगामध्ये सुयश कीर्ति, अगर अपकीर्तिरुपी वैभव प्राप्त करतात. सुधा (अमृत), सुधाकर (चंद्र) व सुरसरि गंगा यांच्या सारखे साधू सज्जन असतात तर दुर्जन हे गरल (विष), अनल (अग्नि) व कर्मनाशा नदी सारखे वाईट निंद्य असतात.

गोस्वामी तुलसीदासांनी या चौपायांमध्ये अगदी उदाहरणाने चांगले वाईट, साधु असाधु यातील फरक स्पष्ट केला आहे. अमृत आणि विष, दाहक अग्नि आणि शीतल चंद्र, पुण्य सलिला गंगा व पुण्य कर्मांचा नाश करणारी कर्मनाशा नदी, इतरांवर उपकार करणारे साधू व इतरांची स्वार्थाकरितां पारध करणारे व्याध (पारधी) अशा जोड्या घेऊन लोकसुखकारक कल्याणप्रद चांगले गुण व, त्यामुळे प्राप्त होणारी सत्‌कीर्ति व परपीडादायक दुर्गुण व त्यामुळे होणारी अपकीर्ति यांतील विरोध चांगल्या रीतीने दाखविला आहे.
अमृत सर्व व्यथा व मरणभयापासून माणसाला सोडविते त्याच प्रमाणे संत साधु जनांचा सहवास निर्भय करतो व त्यामुळे दुःख हरण होते. चंद्राचे अमृतभरित किरण आल्हाददायक तापशमन करणारे असतात हा तर सर्वांचाच अनुभव आहे तसेच साधू जनांचे बोल जणूं अमृताचे कल्लोळ असतात, त्यामुळे दुःखशमन तर होतेच पण मनोमालिन्य दूर होऊन मोह नाश होतो. जगदंबा पार्वती भगवान शंकरांना म्हणते - 'शशिकर सम गिरा तुम्हारी । मिटा मोह सरदा तप भारी ॥ १.१२० - मोह नाश हा केवढा मोठा गुण आहे साधू वचनामध्ये ! तशीच सुरसरि गंगा नदी - "कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप । समुद्र जाय आप । गंगेचे जैसे ॥" (ज्ञाने. १६.१९९) - सर्व जगाचे पाप पोटात घालून आणि जातां जातां तीरावरील असंख्य वृक्ष, पशुपक्षी, माणसे, शेतीवाडी व इतरही उद्योगधंद्यांना जिवनदान देत देत गंगामाई जशी समुद्रांत मिसळून जाते तसेच संतजनही आपल्या जीवन कालावधींत तर असंख्य जणांचा उद्धार करतातच परंतु भविष्यांतील अनेक पिढ्यांनासुद्धां मार्गदर्शन करीत परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातात. 'सकल सुलभ सब दिन सब देसां' असे संत साधू आपली गुणसंपत्ती परोपकारार्थ वेचून कीर्तिमान होतात.
परंतु जगामध्ये जसे सुजनत्व आहे तशीच दुष्प्रवृत्तीही आहे. तीव्र विषाप्रमाने ती इतरांचा नाश करते आणि भडकणार्‍या अग्निप्रमाणे त्यांचा ठावठिकाणाही उरूं देत नाही. त्यावेळी दुःखातून बाहेरही पडणे अशक्य होईल. कर्मनाशा नदीप्रमाणे उरले सुरले सत्‌कर्म व शुभ वासना बुडवून टाकून निराशेच्या खोल गर्तेत ढकलून देते.


डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: