20 November, 2008

नामसाधना -

नामसाधना

वेदांतानुसार नामरूपात्मक जगत् अनादि आहे. तसेच त्याचे नाम-रूप व त्याचे प्रेम उत्पन्न करणारी लीला यांचा संबंधही अनादी व अविनाशी आहे. वेदकाळी जे नाम घेतले जायचे ते म्हणजे ॐ. पण सद्यकाळी शुद्ध अशुद्ध, ब्राह्मण ब्राह्मणेतर इत्यादि बरेच वाद (मानवानेच) निर्माण करून त्याबद्दल जनसामान्यांत एक आदरात्मक का असेना, पण ॐ उपासनेबद्दल एक भितीच निर्माण केली आहे. मग परमेश्वरच संत अवतार धारण करून सामान्य जनांना झेपतील, पटतील, जमतील असे मंत्र देऊन त्यांना नाम-उपासनेला लावतात. संतजण जो मंत्र नाम म्हणून देतात तो मंत्र म्हणजे ॐ चेच प्रतीक असते. श्रीज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या तोंडी नाम घेतल्याने काय होते हे सांगितले आहे (अध्याय १७ ओवी ३३० ते ३३७). भगवान् म्हणतात -
जन्मास आलेल्या बालकास प्रथम नाम नसते, पण ते ठेवलेल्या नामाने हाक मारली असता, हे आपले नाव आहे, असे समजून ते "ओ" देत असते. संसारात अहोरात्र शीण करता करता त्रासलेले जीव जेव्हा आपल्या दुःखाचे निवारण करण्याकरिता परमेश्वराचा धावा करतात, तेव्हा ज्या नावाने मला हाक मारली असता मी धावून येतो, असे भगवंताने आपल्या वेदवाणीने ठरविले किंवा संकेत केला, ते संकेतरूप नाव हेच ( हेच म्हणजे ॐ ). परब्रह्म अखंड, अविकारी असे एकमेव सद्‍रूप आहे, त्यात काही बदल न होता, त्याची अबोल स्थिती बोलकी होईल व तेच परब्रह्म जीवाशी अद्वैत एकरूप राहून सद्‍रूपाने जीवाला गोचर होईल असा हा मंत्र कृपाळू बाप वेदाने शोधून काढला आहे. मग वेदाने ज्या एका नाममंत्राने परब्रह्माला आळविले असता दृष्टीआड असलेले परब्रह्मच दृष्टिगोचर होते. परंतु निगमरूपी पर्वताच्या शिखरावरील उपनिषदार्थरूप नगरात राहणार्‍या परब्रह्माच्या पंक्तीला जे बसले - परब्रह्मस्वरूप झाले, त्यांनाच ते कळून येते. [ भारीच जड वाक्य - काय कळून येते, तर परब्रह्माचे स्वरूप ]. प्रजापतीच्या ठिकाणी सृष्टी निर्माण करण्याची जी शक्ति आहे ती त्या एका नामाच्या आवर्तनामुळेच आली आहे. आता श्रीमहाराजांनी [ब्रह्मचैतन्य श्री. गोंदवलेकर] ज्यांना नाम दिले आहे ते नाम म्हणजे 'श्रीराम' ह्या अवताराचे नाम नसून त्या अवताराचे जे मूळ, म्हणजे सर्वव्यापी परमात्म्याचे, ॐ ह्या रूपाचेच प्रतिक आहे. पण सगुण उपासना मात्र 'श्रीराम' ह्या अवताराचीच बरं.
          रामायणात एक घटना आहे. सेतूबंधनाचे वेळी श्रीरामाला वाटले आपणही एक दगड टाकून बघावा. पण तो दगड बुडाला. रामाला आश्चर्य वाटले. पण मारुतीराय म्हणाले, असू दे असू दे, दगड जर पाण्यात तरंगतात तर ते तुमच्यामुळे नव्हे, तुमच्या नामामुळे.
क्रमशः

2 comments:

veerendra said...

तुमचा ब्लॉग विविध आध्यात्मिक विचार मांडत असतो. मी तुमचा ब्लॉग माझ्या "ब्लॉग" या विषयाच्या लेखामधे पहावे असे ब्लॊग या शीर्षकाखाली जोडला आहे. कृपया एक नजर टाकावी.

एकोहम् said...
This comment has been removed by the author.