27 November, 2008

दैव आणि पुरुषार्थ -

दैव आणि पुरुषार्थ -
दैव हा शब्द सहसा negative अर्थाने वापरला जातो. एकाच तत्त्वाची ही एक बाजू. त्याची जी दुसरी बाजू आहे त्याला लोक भाग्य म्हणतात. दैव वा भाग्य हे दोन्ही आपल्या गतकर्मानुसार मिळतात. पण जेव्हां अनिष्ट गोष्टी घडतात तेव्हां आपण त्या घटनेला " माझे दैवच खोटे " म्हणून दैवावर खापर फोडतो. जेव्हां अनुकूल गोष्टी घडतात, तेव्हां म्हणतो, "किती थोर भाग्य माझे, मागच्या जन्मी मी पुण्यकर्मे केली त्याचे हे फळ". म्हणजे आता जे माझ्या भाग्याला आले आहे ते माझ्या गतकालीन् सत्कर्मामुळे आणि आत्ता जे मला भोगावे लागते आहे ते ’त्याची' वक्रदृष्टी यामुळे. माणूस आपल्या संचितातल्या दुष्कर्मांना आपण जबाबदार आहोत हे कबूल करायलाच तयार नसतो.
वाल्मीकि रामायणात जेव्हां कैकयी आपला डाव टाकते तेव्हां श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात, " या सगळ्याला दैवच कारणीभूत म्हटलं पाहिजे. माझ्या मतानं कैकेयीचे हे विपरीत मनोरथ दैवाचंच विधान आहे. जर तसः नसतं तर तिनें मला वनवासात पाठवून पीडा देण्याचा विचार का केला असता ? तू तर जाणतोसच की, माझ्या मनात आधी कधी मातांच्यात भेदभावा आला नाही आणि कैकेयीही कधीच माझ्यात व स्वतःच्या पुत्रात फरक करीत नव्हती. माझा अभिषेक थांबविण्यासाठी व वनवासात पाठविण्यासाठी महाराजांना प्रेरीत करण्यासाठी तिनं ज्या भयंकर कटू वचनांचा प्रयोग केला, तो सामान्य मनुष्याच्या तोंडून निघणं कठीणच. तेव्हा असा प्रयत्‍न दैवामुळंच समर्थनीय ठरतो. जर असं नसतं तर त्या उत्तम स्वभावाच्या व श्रेष्ठ गुणयुक्त राजकुमारी कैकेयीनं एका साधारण स्त्रीप्रमाणे आपल्या पतीसमोर मला पीडा देणारी गोष्ट काढली असती का ? ज्या विषयी कधी विचारही झाला नाही तेच दैवाचं विधान आहे. प्राण्यांमध्ये अथवा देवांमध्येसुद्धा कोणीच असं नाही की जे दैवाधीन नाही, तेव्हा नक्कीच दैवानंच हे फेरफार माझ्यात व कैकेयीत घडवून आणले आहेत." [वालिमीकि रामायण, बालकाण्ड, सर्ग २२, श्लोक १४-२०] श्रीरामांनी लक्ष्मणाला हे सांगितलं खरं [तो बिचारा शेषाचा अवतार, म्हणजे विष्णूचा सेवकच. Yes Sir म्हणून गप्प बसला. ’ह्या अवताराआधी तू काय काय क्लुप्त्या केल्यास मला ठाऊक नाहीत का ' असे नाही म्हणाला] पण रामावतारापूर्वी श्रीविष्णूने तीन चार अशी कर्मे केली होती की त्याला निरनिराळ्या आर्य स्त्रियांनी "तुलाही पत्‍नी विरह भोगावा लागेल" असा शाप दिला होता. पुराणांतून या कथा आलेल्या आहेत. ही झाली त्याच्या दैवाची पूर्व कहाणी. त्याबद्दल श्रीराम काही बोलले नाहीत.
महाभारतात भारत युद्धानंतर धृतराष्ट्राचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले. सर्वनाश होण्यास मुख्य कारणीभूत कोण होता तर धृतराष्ट्र्; याबद्दल कोणाचे दुमत असेल असे मला वाटत नाही. तरीही तो संजयाला सांगतोय -
न मे विशेष पुत्रेषु स्वेषु पाण्डुसुतेषु वा ।
वृद्धं मां अनुसूयन्ति पुत्रा मन्युपरायणाः ।
अहं तु अचक्षुः कार्पण्यात् पुत्रप्रीत्या सहामि तत् ॥
- मी कधी माझ्या व पाण्डुपुत्रात भेद केला नाही. पण काय करावे, माझे पुत्र क्रोधाला वशीभूत होत मलाच दोष देऊन माझी कधीही कोणतीही गोष्ट ऐकत नसत. मी अंध आणि दीन आहे ना ? म्हणून मी हा सर्व (दोषारोपाचा) अन्याय सहन करीत आलो आहे. पुढे तो संजयाला कमीत कमी ६५ अशा घटना सांगतो की त्या जसजशा घडत गेल्या त्या प्रत्येक समयी त्याने विजयाची आशाच सोडली होती. संजय देखील मुकाट्याने ऐकून घेतो असे नव्हे. श्रीव्यासांच्या विशेष मर्जितला शिष्य तो. आपण जसे घरात बसून टीव्ही बघतो तसे त्याला बसल्या जागी सर्व युद्ध पाहण्याचीच काय पण एवढ्या अफाट सैन्यात कोण कोण कसल्या चर्चा करत आहेत हे सुद्धा स्पष्ट ऐकता येईल अशी दिव्य दृष्टी दिली होती. तो निर्भय होता. तो धृतराष्ट्राला म्हणाला " तू पुत्रांविषयी शोक करणे तर मुळीच उचित नाही. " त्याने पुढे दिव्य कर्म, पराक्रम, त्याग, सत्य, पवित्रता, दया, आर्जव इत्यादि सद्‍गुणांनी संपन्‍न अशा कमीत कमी ७८ महान् राजांची यादी सुनावली (श्रीराम हे त्यापैकी एक. लिखित इतिहासाअभावी आपण कितीतरी महान् महान् आदर्श व्यक्तिंच्या चरित्रांना मुकलो नाही का ? ]. हे सर्व बुद्धिमान शक्तिशाली महान् राजे देखील कालगतीमध्ये नष्ट झाले तेथे तुझ्या दुःस्वभावी, क्रोधी, लोभी आणि दुराचारी पुत्रांची काय कथा ? ते तर शोक करण्यास मुळीच पात्र नाहीत. तरीपण पुढे सांत्वन करण्याच्या उद्देशाने म्हणतो - "दैवगति कोण टाळू शकतो. सुख-दुःख, जन्म-मृत्यु या सर्वांचे कारण काळ अहे. काळच सृष्टी निर्माण करतो आणि त्याचे विसर्जनही करतो. सर्व शुभ-अशुभ गोष्टींचा कर्ता काळ आहे. काळाच्या गतिचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. तेव्हां - तान् कालनिर्मिता बुद्ध्वा न संज्ञां हातुमर्हसि - ही सर्व काळाची करणी आहे हे जाणून आपला विवेक सोडू नकोस.
शेवटचे वाक्य फार महत्त्वाचे आहे. कारण विवेकाने सांप्रत कर्मे करणे हे पुढील कर्मफळाचे बीज आहे हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे. आपल्या जीवनातील सर्वच इष्ट-अनिष्ट घटनांशी आपल्या गतजन्मीचीच कर्मे कारणीभूत असतात असे नव्हे. या जन्मीच्या गत आयुष्यातील कमी अधीक प्रमाणातील प्रयत्‍न चालू परिस्थितीला कारणीभूत असू शकतात. उदा. शिक्षण घेत असताना अभ्यास कमी पडला तर यश त्याच लायकीचे असणार आणि त्यामुळे लाभणारी नोकरी धंदा यावर त्याचा परिणाम होणारच. हे एक उदाहरण झाले. याचा अर्थ शिक्षण न घेतलेले यशस्वी होत नाहीत आणि उत्तम शिक्षण घेतलेले बेरोजगार नसतात असे नव्हे. प्रयत्‍न कमी पडतो तेव्हां असेही होऊ शकते, एवढेच मला म्हणावयाचे आहे. सारांश सांप्रत काळातील आपल्या वाट्याला आलेले दैव वा भाग्य हे गतकर्मातील, गतआयुष्यातील कर्मगतिचे फळ आहे हे निश्चित. मग पौरुषाचा अर्थ काय ? आपल्याला पुढे कशा प्रकारचे आयुष्य वा जन्म अपेक्षित आहेत त्या ध्येयपूर्तीसाठी आत्ता काय करायला हवे याबद्दल जागरूक राहून विवेकाने चालू क्षण उत्तम कर्म करीत जगणे म्हणजे पुरुषार्थ.
अनिष्ट परिस्थितीत हतबल होऊन दैव दैव करत न बसता; तसेच इष्ट परिस्थितीत उन्मत्त न होता, वा खुशालचेंडू बनून ’मला हे करण्याची काय गरज' असे न म्हणता; आपण जे काही करतो आहोत ते सर्व शक्तिनिशी उत्तम प्रकारे करणे म्हणजे पुरुषार्थ.
आपण जे जे काही ज्या कशा प्रकारे करू ते ते सर्व भावी दैव वा भाग्याचे बीज आहे हे सदा ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. यासंबंधी मागे मी एके ठिकाणी काय म्हटले होते ते repeat करणे उपयुक्त ठरेल - पुरुषार्थ = whatever is my past, changing my future is in my hands. This requires lot of guts, belief in one's self, दृढ विश्वास, सामर्थ्य, चिकाटी, अविरत प्रयत्‍नांची पराकाष्ठा and all that. And all this is not easy. कोणत्याही कष्टमय तपाचरणात सातत्य राहणे हे सामान्यचे काम नव्हे Only firmly determined pursue पुरुषार्थ. Hence I guess 98 to 99.5% fall under 1st category. म्हणून तर गीतेत भगवान् म्हणतात - मनुष्याणां सहस्रेषु कस्चित यतति सिद्धये - इथे सहस्रेषु म्हणजे अगणित आणि सिद्धये म्हणजे आपल्या ध्येयपूर्तिसाठी- कोणी एकादाच विरळा सिद्धिसाठी प्रयत्नशील असतो.

No comments: