26 November, 2008

'' तो '' कृपा करतोच, पण...

'' तो '' कृपा करतोच, पण...
परवा एका मित्राला म्हटले, 'चल सज्जनगडावर जाऊ, तिथून गोंदवलेस जाऊन मुक्काम करू आणि उद्या प्रसाद घेऊन संध्याकाळपर्यंत परत येऊ.' माझ्यापेक्षा लहान तो. तरी म्हणाला, 'अरे आता कुठे गड चढायला सांगतोस. हे आपलं वय आहे का गड चढायचं'. म्हटलं, वाटतं तितकं कठीण नाही. थोड्याशा आग्रहानंतर जायचे ठरले. एस् टी जाते तिथपर्यंत गाडीने गेलो. मग थोडीशी चढण आणि अवघ्या ५० पायर्‍या. एकून २० मिनिटात चढून झाले. आल्यावर हिची धाकटी बहिण तिला विचारते, "वर चढून गेलीस ? कसं काय ?" बरेच लोक, विशेषतः VRS किंवा निवृत्तिनंतर कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी करण्यास देखील निरुत्साही जाणवतात. अनुभवानंद स्वामी एका प्रवचनात म्हणत होते, "रिटायर् होने के बाद खाली मत बैठो. कंप्युटर सिखो, रशियन् सिखो, चाय बनाना सिखो, कुछ भी करो लेकीन व्यस्त रहो." अध्यात्मची, परमार्थाची गोडी लागली नाही अशांची गोष्ट सोडा पण परमार्थाची वाटचाल करणार्‍याने 'ह्या वयात आता हे शिकायचे कसे जमणार' , 'आता उमेद राहिली नाही हो' , ’ मी असलं काही करू शकेन असा माझा मलाच विश्वास वाटत नाही' वगैरे शब्द वापरले तर मला कसेसेच वाटते. वय झाल्यास हात पाय ढिले होतील, किंवा काही व्याधी असेल तर गीर्यारोहण सारखे शारिरीक क्षमता लागणारे काम करता येणार नाही हे कबूल. तरीही मला वाटते उमेदीचा संबंध मनाशी आहे. ज्या गोष्टीत शारिरीक कष्ट विशेष नाहीत त्या अवघड कशा ? मन थकले तर ? तर गीर्यारोहणाची शक्यता काय आशाच नाही असे होईल. पण आपण ठरविल्याशिवाय मन कधी थकत असते का ? तिरुपतीला जाताना ८०+ चे वयस्क १५ किलोमिटर पायी चढण माझ्याबरोबर चढत असलेले मी अनेकदा पाहिलेले आहेत. त्यांचे ते कृश आणि थकलेले शरीर पाहून मलाच कसेतरी वाटायचे. शंभर मिटर जाऊन बसतात आणि २-३ मिनिटात 'गोविंदा गोऽऽऽविंदा' अशी आरोळी ठोकून परत चढायला सुरू करतात. वैष्णवी देवीला जाताना देखील १३-१४ कि. मी. चढण आहे. एक अगदी म्हाताऽऽरी बाई थकून बसली होती. चार पोरे जाता जाता ओरडली, "नानी बोले जय मातादी, जोर लगाके जय मातादी". आणि नानी उठून तरातरा चढायला लागली. २०० मीटर जाऊन बसली परत. पण, परत कोणीतरी दुसरा डोस देई आणि परत चढणे चालू. उमेद मनात असते.
मुळात 'मी' काही करतो/करते ही भावनाच हळू हळू बाजूला करायचा प्रयत्‍न हवा. याचा अर्थ 'सर्व काही तो करतो, आपण काय करू शकतो. आपल्या हातात काही आहे का ?' असे म्हणत निवांत बसणे हेही योग्य नाही. कर्ता करविता "तो" आहे हे खरे पण I am a partner in His creation for which he lends me His helping hand हे देखील तितकेच खरे. बाळ चालते ते स्वप्रयत्‍नाने. आईबाप त्याच्या त्या प्रयत्‍नानंतरच त्याचे बोट धरतात आणि मदत करतात. पण बाळाने नुसतेच बसून राहून 'त्याने चालविल्या मी चालेन' असे म्हटले तर ते कधीच चालणार नाही. आधी बाळाने उढून उभे राहायचा प्रयत्‍न दिसला तर आईबापांची पुढची क्रिया संभवते. त्याअभावी आईबापांनी त्याचे बकोटे धरून त्याला उभे केले असे कधी पाहिलेत काय ? बाळाला जसे आईबाप तसे जीवाला गुरू आणि भगवंत. साधकाला गुरू/भगवंत भेटतात किंवा गुरू/भगवंत त्याला शोधत येतात ते साधकाच्या प्रयत्‍नामुळे. काही न करता " तो माझ्यावर केव्हां कृपा करील " अशी वाट बघणे व्यर्थ आहे. गुरू देखील मार्गदर्शन करताना, 'सर्व काही कर, पण त्याला नामाची (म्हणजेच अकर्तेपणाची) जोड दे. आपणही पाहतो एकेका गुरूचे कितीतरी शिष्य असतात. पण गुरूची मर्जी काही विशेष शिष्यांवरच असते. [मी फक्त सच्चे गुरू आणि सच्चे शिष्यांच्या बाबतीतच बोलतोय] बाकीच्या शिष्यावरही त्यांचे प्रेम असते, मार्गदर्शन करतात; पण त्यांची गति त्यांच्या स्वसाधनेवर अवलंबून असते. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात भगवंत म्हणतात, "अरे ह्यांना तूच मारणार आहेस असे तुला वाटते आहे काय ? पुढे म्हणतात - तूं भ्रमलेपणे अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगे काय हे होती । चिरंतन ॥ - तूं यांना मारले नाहीस तर हे चिरंजीवी होणार आहेत असे तुला वाटते काय ? यांच्यापैकी कोण केव्हां कसे मरणार हे मी ठरविले आहे. तरीपण तू तुझ्या वाटेस आलेले कर्तव्य कर्म - म्हणजे युद्ध - कर. भारत युद्धाच्याही आधी अर्जुन पराक्रम करीतच होता, स्वपयत्‍न करीतच होता, आणि भगवंताला आवडणार्‍या गुणांचीही त्याने जोपासना केली होती. म्हणून तर भगवंताने त्याची निवड केली, ते काम त्याला सोपविले आणि कीर्तिने तो अमर झाला.
काहीही करायचे झाल्यास शारिरीक क्षमतेची जाणीव असावी हे योग्यच. पण जिथे त्याची विशेष जरूरी नाही अशा गोष्टी निरुत्साहाने टाळणे म्हणजे एका नव्या अनुभवाला आणि पर्यायाने आनंदाला मुकावे लागणार हे निश्चित.
कृपया कोणी उपदेश करतोय असे समजून घेऊ नये. पण या कलाने विचार केल्यास मनातील जळमटे नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल असे मला वाटते.

No comments: