24 November, 2008

नामसाधना - ५

नामसाधना - ५
नाम घेण्याच्या पद्धतीमध्ये जर qualitative change असेल तर काही फरक पडतो का ? का काहीच फरक पडत नाही, हे तपासणे आवश्यक आहे. श्रीमहाराजांच्या २९ ऑक्टो. च्या प्रवचनाचे शीर्षक आहे 'भगवंताचे होण्यास आपण निर्दोष असणे जरूर आहे'. त्यात म्हटले आहे, 'मनाने नेहमी शुद्ध असावे'. कशासाठी निर्दोष असावे, कशासाठी शुद्ध असावे ? आपण जेव्हां नाम घेतो तेव्हां ते नाम घेत असताना आपल्या मनात वा at subconscious level वर काय चालले आहे, आपला भाव कशा प्रकारचा आहे ह्याच्याशी नाम घेणे या क्रियेचा काहीतरी संबंध आहे का ? नामाची वा ॐ ची आवर्तने भस्मासुरानेही केली रावणानेही केली आणि प्रल्हादानेही केली. भस्मासुराने आणि रावणाने लगेच पार्वतीमाई आणि सीतादेवी ह्यांनाच भोगायची इच्छा झाली. पण प्रल्हादाला भगवंताची स्तुतिच करावी वाटली. मग तिघेही भक्त प्रल्हाद का झाले नाहीत ? प्रल्हाद वा ध्रुवबाळ यांना दर्शन होण्यास किती काळ लागला ? आणि वाल्या कोळी वाल्मीकि ऋषि व्हायला किती काळ लागला ? तो तर दुष्टच माणूस होता. मग त्याचे चित्त शुद्ध व्हायला बराच बराच काळ लागला असणार हे उघड आहे, नाही का ? कारण - वाल्याची आधीची लुटालुट करण्याची वासना घालवून त्या जागी नविन शुद्ध वासनांची स्थापना करणे - हे करावे लागले; आणि असे घडायलाच नेमका जास्त काळ लागतो. कारण वासना चक्रातून बाहेर पडून दुसरे काही करायला माणूस सहसा कधीच तयार नसतो. Resistance to change ही इतकी बलवान असते की resistance overcome करायला त्याच मनाच्या दुसर्‍या शक्तीचा प्रचंड वापर करावा लागतो. ह्याचा अर्थ तप करतेवेळी भस्मासुर व रावण ह्यांच्या मनांत सत्तेची, त्याच्या जोरावर भौतिक जगतातले काय वाटेल ते साध्य करून घेण्याची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. म्हणजे नामाच्या आवर्तना बरोबरच अशा सुप्त संकल्पांची/विचारांची [subconscious मध्ये] आवर्तने होत असलीच पाहिजेत आणि पुढे ते विचार बळकट होऊन त्याला कृती करण्याची शक्ति प्राप्त होतेच. रामदासांचे शिष्य हेरंबशास्त्री आफळे ह्यांची गोष्ट पहा. आफळेंचा एक कोटी गायत्री जप झाल्यावर त्यांना वाचासिद्धी झाली होती. पण चित्त वृत्ति शुद्ध नसल्यामुळे उन्मत्तपणा आला होता. आणि त्यांची जेव्हां स्वामींशी गाठ पडली तेव्हां काय झाले ? भलत्या ठिकाणी सिद्धीचा वापर केल्यामुळे वाचासिद्धी गेली. सर्व तप फुकटच गेले ना ? अर्थात् कृत्याचा पश्चात्ताप झाल्यावर करुणामय स्वामींनी त्यांच्यावर कृपा केली हा भाग वेगळा. पण केव्हां ? पश्चात्ताप होऊन उन्मत्तपणा गेल्यावरच ना ? म्हणजे मन शुद्ध झालावरच ना ? तेच शुद्ध विचारांबरोबर गायत्रीची साधना झाली असती तर ती विशेषरूपे फलद्रूप झाली असती आणि पुढील तपाचरणात द्विगुणित झाली असती. पुराणाचे/इतिहासाचे जाऊ द्या. सद्यकाळीही काही अशी उदाहरणे दिसतात की कधी कधी १३ कोटी जप केलेल्या व्यक्तिपेक्षा तीन साडेतीन कोटी जप केलेल्या मनुष्यात संतपणाची लक्षणे जास्त आढळतात. पहिल्या व्यक्तिपेक्षा दुसर्‍या व्यक्तीची संगत जास्त हवी हवीशी वाटते. असे का ? आपणच विचार कारावा आणि आपणच उत्तर शोधावे.
मी जेव्हां पाण्यात प्रतिबिंब पाहायला जातो तेव्हा ते प्रतिबिंब पाणी किती स्थिर आहे वा स्वच्छ आहे ह्यावर अवलंबून असते. जर चंचलतेमुळे पाण्यात सतत तरंग असतील वा ते अतिशय गढूळ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसणार नाही. कदाचित् माझी छबी तिथे उमटणारच नाही. आणि जेव्हा उमटेल तेव्हांच कळेल की हे माझेच प्रतिबिंब आहे. आणि ते माझेच असल्यामुळे मला त्या बिंबाबद्दल आत्मीयता वाटते. जीव वा जीवात्मा परमेश्वराचे अंशात्मक प्रतिबिंब आहे असे शास्त्र म्हणते. पण हे प्रतिबिंब जेव्हां अहंकार धारण करते तेव्हां 'मी' म्हणजे मूळ बिंबाहून भिन्न अशी कल्पना करून घेते आणि त्याचा संसार, जन्म-मरण फेरे सुरू होतात. मी ह्या जगत् रूपी पाण्याशी, त्यातील विषय, त्या विषयांबद्दलची तृष्णा, तृष्णा शमविण्यासाठी वेळोवेळी करावी लागणारी अधार्मिक वा अनैतिक कर्मे; ह्या सर्वांशी मी इतका समरस झालो आहे, मग हे पाणी तर सोडाच मी स्वतःदेखील इतका गढूळ झालो आहे की, परमेश्वर मला - ह्या विशिष्ट जीवाला - पाहूच शकत नाही. पण मी, माझे विचार, माझे आचरण, माझ्या मनातून व्यक्त होणारे भाव - एकूण माझे चित्त व माझ्या वृत्ति - हे सर्व प्रयत्‍नपूर्वक मी शुद्ध करू शकतो का ? आणि शुद्ध करू शकलो तर माझे अशांत, अशुद्ध प्रतिबिंब परमेश्वराला नीट दिसायला, त्याला माझ्याबद्दल आत्मीयता वाटायला लावू शकेल का ? आणि मी माझ्या कोणत्याही बाबतीत यत्किंचितही बदल घडवून न आणता, परमेश्वरा धाव, परमेश्वरा धाव मला ह्या संसार सागरातून सोडव, असे म्हणत राहिलो तर ? No way. आधी असलेला विषयांच्या वासनेचा पगडा सुटून त्याजागी शुद्ध वासनेची स्थापना झाली तरच शक्य. मग तेरा कोटी काय आणि पंधरा कोटी काय. They remain only numbers. वाल्याने जितके कोटी केले तेवढे कोटी करावे लागणार का ? हो. resistance to change वर मात करे पर्यंत. वासना शुद्ध होईपर्यंत - अगदी subconscious level मधल्यादेखील, ज्याची आपल्याला सुतराम देखील कल्पना नसते. कारण नामाची जितकी आवर्तने त्याबरोबरच आपल्याला हव्या असलेल्या, प्रकट वा अप्रकट विचारांची आवर्तने असे गणित स्पष्ट दिसायला लागले आहे नाही का ?
एकोहम् 

No comments: