08 February, 2009

अमृतानुभव - एक चिंतन - 2


श्रीज्ञानेश्वर अमृतानुभवात म्हणतात, सत्य, ब्रह्म, परब्रह्म, ज्ञान, मोक्ष, कर्म, पाप-पुण्य हे सर्व केवळ मानवनिर्मित शब्दच. त्या सर्व शब्दांचा अर्थदेखील आपणच लावलाय. वेदांतात जसे म्हणतात - ब्रह्म सत् ही नाही आणि असत् ही नाही. जेथे ज्ञान ही वस्तू देखील एक कल्पनाच आहे तेथे अज्ञानही कसे असू शकेल ? मग अज्ञानाचे आवरण दूर करायचे म्हणजे काय, आणि कसे ? अखंड आनंद स्थितीची प्राप्ती करायची ती कशी ? कारण 'कसे' हा शब्द आला की एक प्रणाली, एक सिद्धांत एक सिस्टीम वगैरे आले. पण वस्तुतः There is no 'HOW' or no system for achieving that state.
अमृतानुभवाचा खोलात जाऊन अभ्यास करायचे म्हटले तर आपल्यासारख्या (म्हणजे माझ्यासारख्या) सामान्य मनुष्याचे डोके भिरभिरायला लागते. मग प्रश्न पडतो की मग आपण आहोत कोण ? आणि करायचे ते काय ? मोठमोठे साधक जेव्हां साधना करता करता उत्थान मार्गातील निरनिराळ्या अवस्था प्राप्त करतात तेव्हां त्यादेखील जीवभावातल्याच पण सामान्य माणसापेक्षा थोड्याफार उन्नत अवस्थाच. पण सर्व उपाधीयुक्तच ना ? मग मला वाटते "काही न होणे" हा एकच मार्ग (अर्थात् त्याला मार्ग म्हणता आले तर) शिल्लक राहतो. 'काही न होणे' म्हणजे काय ? मुक्त नव्हे, मोक्ष नव्हे, परमात्म्यात विलीन होणे नव्हे, ज्ञानप्राप्ती नव्हे - यातले काही काही नाही. श्रीमद् भागवतातील पाचव्या स्कंधाच्या ७ ते १२ अध्यायामध्ये भरतराजाची कथा आहे (ज्याच्या नावावरून या देशाला भारत नाव पडले) - त्यावरून 'काही न होणे' याची कल्पना येते. अर्थात् सारांशरूपे पाहायचे म्हणजे चुकूनही कशातही न अडकणे याची नितांत काळजी घेणे असा त्याचा अर्थ. अगदी संक्षेपात त्याची कथा सांगायचे तर असे -

हजारो वर्षे सम्राटपदी स्थित असा भरत राजा एकदा सर्व काही मुलांवर सोपवून तप करण्याकरता अरण्यात निघून गेला. तप करता करता इतका काळ गेला की हा एके काळी हा आपला सार्वभौम राजा होता हेही प्रजेला माहित नाहीसे झाले. निर्विषय अंतःकरण (मन, बुद्धि, चित्त, अहंकार) होऊन बस आता जन्ममृत्युच्या फेर्‍यातून त्याची सुटका होण्यास काही थोडासा अवधी होता, एवढ्यात एक घटना घडली. एक गर्भिणी हरिणी पाणी पीत असता एका सिंहाची डरकाळी ऐकून जिवाच्या आकांताने तिने उडी मारली आणि गर्भपात होऊन शिशू हरिण बाहेर पडले आणि ती पळून गेली. त्या शिशू हरिणाला पाहून भरताचे चित्त द्रवले आणि त्याने त्याचा सांभाळ केला. माया, आसक्ति जडली आणि संसार परत सुरू झाला. काही काळ गेल्यावर ते हरिणाचे पाडस निघून गेले. तेही काय करणार ? कोणताही प्राणी आपल्या सदृश कळपातच रमणार ना ? पण भरताला त्याच्यावाचून चैन पडेना ? सदा त्याचाच ध्यास. कुठे असेल ? कसे असेल ? काही वर्षांनी तो मेला आणि लगेच हरिणाचा जन्म घेऊन अवतरला. पण पूर्वाभ्यासामुळे त्याला गतजन्मांचे ज्ञान होते, आणि तेव्हां त्याला जाणवले की आपण हे काय करून बसलो. तेव्हाच त्याने निश्चय केला की काहीही करून कशातही अडकायचे नाही. हरिणाचा अवतार संपला आणि पुढे एका ब्राह्मणाच्या घरात त्याचा जन्म झाला. तो जडभरत या नावाने. आधी ठरविल्याप्रमाणे अगदी बालपणापासून तो अगदी मूढ भाव घेऊनच वागत असे. त्याला शिकविण्याचे वगैरे संस्कार सर्व व्यर्थ झाले. अन्न, वस्त्र, निवारा काही मिळो न मिळो तो केवळ आपल्यातच रमत असे; पण इतरांना तो एक मूढ, वेडा, पागल असेच भासवीत असे. पण त्याची खरी स्थिती कशी होती हे बाराव्या अध्यायातील राजा रहूगण याच्याशी त्याची गाठ पडल्यावर रहूगणाला त्याने जो उपदेश केला त्यावरून कळते आणि आपण 'ज्ञानी' कसा असतो याची कल्पना करू शकतो.

ही झाली पुराणातील कथा. पण असे ज्ञानी खरेच या युगात असतात का ? होय, असतात. एका संताने स्वतः अनुभव घेतलेल्या सुमारे २५-३० वर्षापूर्वीची अमृतसर इथली ही गोष्ट -

अमृतसर मध्ये एके ठिकाणी ज्ञानसत्र चालत असे आणि त्या ठिकाणी रोज दिसणारी अगदी भणंग अवस्थेतील एक व्यक्ति सर्वांना परिचित होती. अस्ताव्यस्त केस दाढी नखे वाढलेली, मलीन वस्त्रे, पाहता क्षणीच ओंगळ वाटाणारा एक भिकारीच म्हणा. तेथे एकदा कोणाचेतरी भागवतावर प्रवचन चालले होते. एके दिवशी प्रवचनकाराला एका वचनाचा/श्लोकाचा सामाधानकारक अर्थ सांगता येईना. त्याने काहीतरी सांगून वेळ निभावली. प्रवचन संपल्यावर तो भिकारी त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, "महाराज, मघाशी आपण अमक्या वचनाचा जो अर्थ सांगितलात तो चुकीचा होता. त्याचा अर्थ/भावार्थ असा असा आहे". त्या भिकार्‍याचे ते ज्ञान पाहून प्रवचनकाराला तो भिकारी म्हणजे एक महात्मा आहे याची जाण झालीच आणि लगेच त्याने त्याचे चरण धरले. इतर लोकही ते दृष्य पाहून अवाक् झाले. प्रवचनकार म्हणाला, "आपण खरोखर महात्मा आहात. एवढे ज्ञानी असून आपण जराही तसे कधी भासवत नाही". तो भिकारी म्हणाला, ते सर्व ठीक आहे. पण आता यानंतर अमृतसरमध्ये माझे राहणे दुष्कर झाले ना ? आणि त्यानंतर ती व्यक्ति अमृतसरमध्ये कधीही दिसली नाही. कारण ? कोणत्याही उपाधीने, कोणतेही कारण झाल्यामुळे, कोणत्याही गोष्टीत अडकल्यामुळे कधी कशाची आसक्ति निर्माण होईल आणि भवसागरात पडून केव्हां आणि कसे या जन्मजमृत्यूच्या चक्रात परत अडकून फेर्‍या माराव्या लागतील याचा सुतराम भरवसा नाही.

मग आपल्यासारख्या संसारी लोकांनी काय करायचे ? - भागवत ५.१२.१७ इथे सांगितल्या प्रमाणे प्रयत्‍न करायाचा -
गुरोर्हरेश्चरणोपासनास्त्रो, जहि व्यलीकं स्वयमात्ममोषम् ॥
मनरूपी हा शत्रू संपूर्णपणे जरी मिथ्या असला तरी त्यानेच आत्मस्वरूपाला अच्छादित करून ठेवले आहे. म्हणून श्रीगुरू आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेच्या अस्त्राने त्याला मारून टाक. हळू हळू ढाळे ढाळे, केउतेनी एके वेळे - कधीतरी आपण ती अवस्था गाठूच ही आशा मात्र सदा जागृत असावी म्हणजे झाले.
एकोहम् -

No comments: