25 February, 2009

मानसमणिमाला (२१)

मानसमणिमाला (२१)

हिंदी : निज बुधि बल भरोस मोहि नाही ।

तातें बिनय कर‍उँ सब पाहीं ॥ बा. कां. २.७.४

करन चह‍उँ रघुपति गुण गाहा ।

लघु मति मोरे चरित अवगाहा ॥ ५ ॥

सूझ न एक‍उ अंग उपा‍ऊ ।

मन मतिं रंक मनोरथ राऊ ॥ ६ ॥

मति अति नीच उँचि रुचि आछी ।

चहि‍अ अमि‍अ जग उर‍इ न छाछी ॥ ७ ॥

मराठी : मज निज मतिबल-निश्चित नाहीं ।

म्हणून विनवितो सर्वांनाही ॥ ४ ॥

मज इच्छा रघुपति-गुण-गानी ।

चरित अगाध नि मम मति सानी ॥ ५ ॥

नुमजें अंगां एक उपाया ।

मन मति रंक मनोरथ राया ॥ ६ ॥

मति अति नीच उच्च रुचि रुचिरहि ।

अमृत इच्छि जगिं मिळत तक्र नहिं ॥ ७ ॥


अर्थ : मला माझ्या बुद्धीचा व बलाचा जराही भरवसा वाटत नाही. म्हणून मी सर्वांना विनंती करत आहे ॥ ४ ॥ रघुपतींच्या चरित्राचे, गुणांचे वर्णन करावे अशी माझी फार इच्छा आहे खरी, पण त्यांचे चरित्र किती अगाध आहे आणि माझी बुद्धि किती तोकडी आहे ॥ ५ ॥ उत्कृष्ट काव्याची अंगे, त्याच्या पद्धती यातील कांहीच मला माहीत नाही. माझी बुद्धि अगदी निकृष्ट आहे, मन कंगाल आहे पण माझे मनोरथ मात्र राजाचे आहेत बरं ! ॥ ६ ॥ मी अल्प बुद्धीचा असलो तरी माझी रुचि मात्र उच्च प्रतीची आहे. प्रत्यक्षांत जगात मला कुणी ताकही द्यायला तयार नाही पण, महत्वाकांक्षा मात्र अमृत प्राप्त करून घ्यायची आहे ॥ ७ ॥


संत तुलसीदास आपल्या ग्रंथाचा आरंभ करीत आहेत. प्रभु रामचंद्रांचे गुणगान करण्याची मनीषा ते व्यक्त करीत आहेत. अत्यंत विनम्रभावाने या कार्याकरितां आपले, बुद्धि, बल अगदीच अपुरे आहे अशी ते कबूली देतात. हा त्यांचा विनय असला तरी प्रभूंचे चरित्र अगाध, अपार आहे यांत काहीच शंका नाही. त्यामुळे आपल्याला सर्वांनी सांभाळून घ्यावे अशी ते वारंवार विनंती करतात. मुळात भगवंताच्या चरित्राचे गान करायचे हा आपला विचारच इतका राजस, उच्च प्रतीचा आहे कीं आपली बुद्धि तुटपुंजी असली तरी चालेल, मन सद्‌विचारांच्या बाबतीत अगदी दरिद्री असले तरी चालेल, आणि लौकिकात आपल्याला ताकासारखी क्षुद्र वस्तू मिळविण्याची पात्रता नसली तरी चालेल पण आपली रुचि प्रभूंचे गुणगान करणारी, उच्च प्रतीची आहे म्हणून तिला अमृतप्राप्ति होणारच असा त्यांचा ठाम विश्वास आहे. ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिकेंत म्हणतात -

शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।

अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें ॥ १८.१७६८ ॥

सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।

तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा ॥ १७६९ ॥


आपल्या स्वामींवर पूर्ण श्रद्धा असल्याने ते सर्व तर्‍हेने सांभाळून घेतात याचा भरंवसा सर्वच संतांना असतो. त्यामुळेच त्यांच्या हातून उत्तुंग कार्ये घडतात. भगवंताच्या कृपेने "जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकेयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कायी ॥ १.७८ ॥ स्वतःला अल्पमति म्हणविणे, मुका बाहुला म्हणविणे हा त्यांचा विनम्र भाव असला तरी 'वस्तु सामर्थ्य शक्ति' त्यांच्यातूनच व्यक्त होते नां ?

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: