मानसमणिमाला (२०)
:
हिंदी : जड चेतन जग जीव जत सकल राममय जानि ।
बंदउँ सबके पद कमल सदा जोरि जुग पानि ॥ बा. कां. १.७(ग)
देव दनुज नर नाग खग रेत पितर गंधर्व ।
बंदउँ किंनर रजनिचर कृपा करहु अब सर्व ॥ (घ)
मराठी : जगिं जड चेतन जीव सव राममयचि जाणून ।
सर्व-पदाब्जां वंदितो सदा करां जोडून ॥ प्रज्ञा. बा. कां. १.७(ग)
देव दनुज नर नाग खग प्रेत पितर गंधर्व ।
नमतो निशिचर-किंनरां कृपा करा तरि सर्व ॥ (घ)
अर्थ : या जगांत असलेले सर्व जड-चेतन जीव राममयच आहेत, असे समजून मी सर्वांच्या पदकमलांना सदा हात जोडून वंदन करतो ॥ ग ॥ देव, दानव, नाग, पक्षी, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर, निशाचर या सर्वांना मी आता नमन करतो. तरी सर्वांनी माझ्यवर आता कृपा करावी. ॥ घ ॥
संत तुलसीदासांचा सर्वांभूती भगवत् भाव अवर्णनीय आहे. सगुणोपासक असूनही त्यांची भक्ति मर्यादित, संकुचित भावनेत अडकलेली नाही. पृथ्वीवरील सर्व जड चेतन जीवांमध्ये त्यांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन नित्य होतच होते व त्यामुळे ते सर्वांचे ठिकाणी विनम्र भावनेने वंदन करतात. याखेरीज देव, दानव, प्रेत, पितर, गंधर्व, किंनर इत्यादि अदृष्य, अमानवी योनीतील जीवांनाही नमन करतात, तेही भगवान राम समजून ! इतके विशाल अंतःकरण व सर्वांविषयी भगवत् भावना स्वतः रामस्वरूप - प्रेमस्वरूप झाल्याखेरीज कशी होईल ?
माऊली ज्ञानेश्वर विभूतियोगांत भगवंताच्याच मुखाने बोलतात - "जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा ॥" (ज्ञानेश्वरी १०.११८) आणि ही भगवंताची आज्ञा शिरोधार्थ मानून सर्व भूतमात्रांचे ठिकाणी गोस्वामी विनम्र भाव प्रकट करतात; त्याच बोधामध्ये निमग्न होतात.
' चित्ते मीचि जाहले । मियांचि प्राणि धाले । जीवों मरों विसरले । बोधाचिया भुलिं ॥ (ज्ञा. १०.११९) त्यामुळे पुढच्या चौपायीमध्यें द्विरुक्तिचे भय न बाळगतां ते पुन्हा पुन्हा हात जोडून वंदन करतात व कृपायाचना करतात -
सीयराममय सब जग जानी । करउँ प्रनाम जोरि जुग पानी ॥
जानि कृपाकर किंकर मोहू । सब मिलि करहू छाडि छल छोहू ॥ बा. कां. २.७.२,३
सर्व जगच सीताराममय आहे असे जाणून मी सर्वांनाच हात जोडून प्रणाम करतो. आपण सर्व कृपाकर आहात म्हणून माझा दास म्हणून स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. माझ्यातील छल-कपट (ढोंगीपणा) इत्यादि दोष विसरून आपण मजवर कृपा करा. - (१.७.१,२)
धन्य ते संत तुलसीदास व धन्य त्यांचे रामभक्ति.
डॉ. सौ. उषा गुणे.
No comments:
Post a Comment