15 February, 2009

मानसमणिमाला (१९)

मानसमणिमाला (१९)

हिंदी : ग्रह भेषज जल पवन पट पा‍इ कुजोग सुजोग ।

होहिं कुबस्तु सुबस्तु जग लखहिं सुलच्छन लोग ॥ बा. कां. १.७(क)

सम प्रकास तम पाख दुहुँ नाम भेद बिधि कीन्ह ।

ससि सोषक पोषक समुझि जग जस अपजस दिन्ह ॥ बा. कां. १.७(ख)

मराठी : ग्रह भेषज जल पवन पट मिळुनि कुयोग सुयोग ।

होती कुवस्तु सुवस्तु जगिं बघति सुलक्षण लोक ॥ प्रज्ञा . बा कां १.७(क)

नाम भेद विधि पक्षिं करी सम तम जरी प्रकाश ।

शशि पोषक शोषक गणुनिं दे जगिं यश-अयशास ॥ १.७.(ख)

अर्थ : ग्रह, औषध, जल, वायु, वस्त्र यांचा सुयोग्य अथवा अयोग्य उपयोग झाल्याने त्या वस्तू चांगल्या वस्तू अगर वाईट वस्तू मानल्या जातात. ॥ क. ॥ दोन्ही पंधरवडे सारख्याच प्रकाशाचे अगर अंधाराचे असतात. परंतु त्यांना शुक्लपक्ष - कृष्णपक्ष अशी नांवे दिल्यामुळे एक चंद्राची वृद्धी करणारा व दुसरा क्षय करणारा मानला जातो व म्हणूनच एक शुभ म्हणजे यश देणारा ठरतो तर दुसरा अशुभ म्हणजे अपयश देणारा ठरतो. (ख)


सूर्य, चंद्र, मंगळ शनि, गुरु इत्यादि ग्रह यांचे पृथ्वीवरील प्राणी, वस्तू यांचेवर विशिष्ट परिणाम होत असतात असे मानले जाते. औषधासारखी वस्तू खरे तर रोगनिवारकच असायला हवी. परंतु तिचा उपयोग करताना रोगी त्याचे वय, रोगाची अवस्था, काल, पथ्य अनुपान, औषधाचे शीत उष्णादि परिणाम, मात्रा या सर्व गोष्टींचा सुयोग साधावा लागतो तरच ते औषध गुणकारी होते. अन्यथा निरुपयोगी अथवा हानिकारकही ठरू शकते. परंतु हा दोष औषधाचा नसूनहि औषधालाच दोष दिला जातो. विषारी टाकावू द्रव्यांच्या, रोगजंतूंच्या संपर्कात आलेले पाणी जीवनदायी ठरण्यापेक्षा घालाघातक ठरूं शकते. तीच गोष्ट आजूबाजूच्या वातावरणाची ! आपण म्हणतो 'अमुक हवामान सोसत नाही' परंतु त्याच हवेमध्ये इतर माणसे आनंदाने राहात असतात. म्हणजे दोष हवेत नाही माझ्यामध्ये आहे, तरी हवेलाच, वातावरण, पाणी, अन्न व इतर वस्तूंना दोष देऊन मनुष्य नामानिराळा होतो !


शुभशकून अपशकूनांच्या कल्पनांनी तर माणसांची मति इतकी गुंग करून टाकली आहे कीं माणूस भितीपोटी त्यांचा स्वच्छ मनानें विचार करायलाही तयार नाही. म्हणून समर्थ म्हणतात - 'प्रचितीविण जे ज्ञान । तो अवघाचि अनुमान ॥ या कारणे मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण कामा न ये । उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ दासबोध. १४.७.१९ उपाय आणि अपाय, सदुपयोग आणि दुरुपयोग, उपयोग आणि उपभोग, यांच्यामधील सीमारेषा स्वच्छ मनाने समजून घेतल्यास, त्यावर आपल्याच पूर्वग्रहांतून चांगले-वाईट, शुभ-अशुभ, पाप-पुण्य अशी लेबलें न लावतां शास्त्र प्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति घेतल्यास हे जग किती आनंदमय, सुंदर आहे याचीही प्रचीति निश्चित येईल. म्हणूनच संत तुलसीदास म्हणतात - "जग जानकीनाथ सहाय करे - कौन बिगाड करे अब तेरा ?

डॉ. सौ. उषा गुणे.

No comments: