20 February, 2009

या देवी सर्वभूतेषु

या देवी सर्वभूतेषु

:

प्राणीमात्राच्या जीवनाची एकंदर जडण घडण श्रद्धेतूनच होत असते. प्रत्यक्ष हे एक श्रद्धेचे महत्त्वाचे प्रमाण आहे. आपण प्रत्यक्ष पाहिलेल्यावर मनुष्यमात्राची सहजच श्रद्धा बसते. त्याच प्रमाणे शब्द प्रमाणाचे. आप्त वाक्यातून पण श्रद्धेचा उगम होत असतो. येथे आप्त म्हणजे नातेवाईक सोयरे धायरे असा अर्थ अभिप्रेत नाही. तर आप्त म्हणजे, संत, साधु, श्रीसद्‌गुरू, अध्यात्मग्रंथ इत्यादि. ज्यांना आपण ज्येष्ठ श्रेष्ठ पूज्य मानतो. त्यांच्या शब्दावर आपला सहजच मोठा विश्वास बसतो. त्यांचे शब्द आपल्याला सत्य वाटतात. वेदतुल्य वाटतात.


श्रद्धाकेंद्रे अनेक असतात. व्यक्ति व्यक्ति समाज राष्ट्र यांच्या स्तरावर भौतिक जीवनांत ती भिन्न भिन्न सगळ्यांचे ध्येय एकच. ते म्हणजे आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार, आत्मानुभव. आणि ते ध्येय गांठण्याचा निश्चित मार्गही पण एकच. तो म्हणजे नामसाधन. नामस्मरण. या साधनाची प्रक्रिया पण सामान्यतः एकच आहे. म्हणून अध्यात्म जीवनांत श्रद्धेचे स्थान एकच. आपले श्रीगुरू.


या क्षेत्रांतील महाजनांमध्ये श्रीसद्‌गुरूचे स्थान श्रेष्ठतम. त्यानंतर क्रमांक म्हणजे सगळे आत्मसाक्षात्कारी संत.


संत सद्‌गुरु भेटणं कठीण. महाकठीण. "पूर्व जन्मी सुकृते थोर केवी । ती मज आजि फळासी आली ॥" असे खुद्द श्रीगुरूज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, मग आपला काय पाड नां ? बरं भेटले तर त्यांच्यावर श्रद्धा बसणे आणखी कठीण. एवढ्यानीही झालं नाही. श्रद्धा बसली आपली, तरी त्यांची कृपा होणे कठीण. श्रीगुरुंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून सबीज नाम मिळणे त्याहून कठीणच. श्रीगुरूंची कृपा म्हणजे त्यांच्याकडून नाम मिळणे. पण आपल्या संपर्कात, सान्निध्यात, आपल्याजवळ देणार्‍या जीवींचा भक्तिप्रेमभाव, श्रद्धा, त्याचे अंतःकरण ते जाणतात. आणि मगच त्याच्यावर कृपानुग्रह करतात. आता अशा कसोटीला उतरून नाम जरी मिळाले तरी, सुरुवातीची श्रद्धा, पुढे शेवटपर्यंत टिकवणे हे पण अति महत्त्वाचे. अत्यंत प्रयासाने, कष्टाने, त्याआड येणार्‍या सर्व गोष्टी निर्भयपणे बाजूस सारून ती श्रद्धा जोपासावी लागते, टिकवावी लागते.


श्रीगुरुंवरील अर्थात निवृतिमार्गावरील श्रद्धेला प्रवृत्ति मार्गातील अनेक धोके असतात. अध्यात्ममार्गातील या श्रद्धेचा मुख्य शत्रु म्हणजे देहभाव. देह भावांतच सुख वाटले तर श्रद्धा तेथेंच विसंबते. कारण जेथें सुख तेथें श्रद्धा हा सामान नियम. आपले सुख, पैसा, लौकिक, व्यवहार इत्यादि ठिकाणी विभागलेले. हे प्रवृत्तितील सुख सहज अनुभवता येते. थोड्या श्रमाने, प्रयत्‍नाने सहज हाती येते (आले असे वाटते) त्यामुळे अध्यात्माकडील श्रद्धा कमी पडते.


श्रद्धा हा मनाचा स्थायीभाव आहे. श्रद्धा ही भावनामय असते. देहभावाला चिकटलेल्या मनाच्या कल्पना श्रीगुरुवरील श्रद्धेच्या आड येतात. त्यासाठी देहभावातून हळूहळू आत्मभावाकडे पाऊले टाकणें फार आवश्यक.


मनाची संकल्पशक्ति आणि बुद्धीची भावनाशक्ति यांचा सुंदर समन्वय साधला की मग श्रद्धा वाटते, ती सूक्ष्म पण बळकट होते. सगळ्या शंकासुरांना तोंड देऊन त्यांचे निर्दळण करते मग ही श्रद्धास्वरूपी महालक्ष्मी - महाकाली - महासरस्वति. "या देवी सर्वभूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता । नमस्तस्मै नमस्तस्मै नमस्तस्मै नमो नमः" ॥" मग परमपदाचे, भगवद्‌साक्षात्काराचे ध्येय श्रद्धा आणि नामसाधना यांतून साकार होतेच होते. म्हणून सद्‌गुरूंवर नितांत श्रद्धा ठेवून त्यांनी दिलेल्या सबीजनामाचे नित्य, अखंड स्मरण असावे.


अण्णा -

No comments: